शाळा कॉलेज शिक्षकांच्या उन्हाळ्यात सुट्ट्या रद्द!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

पुणे : राज्यातील सर्व शाळांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन कामकाज, आधार व अपार आयडी अद्ययावत करणे, स्कूल मॅपिंग आणि संचमान्यता दुरुस्ती यांसारखी महत्त्वाची कामे उन्हाळी सुट्टीतच पार पाडावी लागणार आहेत.

यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, लिपिक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टीला मुकावे लागणार आहे. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, उन्हाळी सुट्टीत सर्व संबंधित शालेय कर्मचारी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत रितीने पार पाडण्यासाठी कार्यरत राहतील. 

सुट्टीत करावयाची कामे:
•अकरावी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी, पडताळणी
•विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पडताळणी, अद्ययावत करणे
•अपार (स्थायी विद्यार्थी नोंदणी क्रमांक) माहिती सुधारित करणे
•शाळेचे स्कूल मॅपिंग आणि भूगोलविषयक माहिती अद्ययावत करणे
•संचमान्यता दुरुस्तीची कामे पूर्ण करणे
•विविध शैक्षणिक व प्रशासकीय अहवालांची पूर्तता व अपलोडिंग

सुट्ट्यांचे नियोजन फिसकटले

दरवर्षी उन्हाळी सुट्टीत मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी गावाकडे तसेच पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करतात. मात्र, यंदा सुरवातीला अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसोबत विविध शालेय कामांची गर्दी असल्याने यावर्षी सुट्टीच्या काळातच कामे पार पाडावी लागणार आहेत. त्यामुळे अनेकांनी सुट्ट्यांमध्ये फिरण्याचे केलेले नियोजन बिघडले आहे. दीर्घकाळ सलग कामानंतर उन्हाळी विश्रांतीची गरज असताना प्रशासनाने कामाचे ओझे वाढवल्याने संबंधितांत नाराजीचा सूर उमटत आहे. 

तलाठ्याच्या गाडीची तोडफोड, पोलिसात तक्रार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यातील तलाठी कुणाल निलकंठ आडे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली असून, या प्रकरणी तलाठी आडे यांनी पोलिसात तक्रार नोंद करून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही खळबळजनक घटना 27 एप्रिल च्या मध्यरात्री विठ्ठलवाडीत घडली. 

सावर्ला साजातील तलाठी कुणाल आडे (35) यांची टाटा पंच कार क्र. (MH-29,BV-4662) ही विठ्ठलवाडी येथील घरासमोर उभी असतांना दगड मारुन कारचे 30,000/- रुपयाचे नुकसान केले आहे. फिर्यादी कुणाल आडे यांच्या जबानी रिपोर्ट वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 329 (3), 125,324(2),3(5) BNS नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास सफौ सुरेद्र टोंगे पो. स्टे. वणी करत आहे.


माकप च्या आमरण उपोषणाला प्रशासनाचा प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : मेंढोली येथील पारधी समाजाचा मूलभूत हक्काचा मागण्यांना घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने दिनांक 28 एप्रिल पासून मेंढोली ग्रामपंचायत समोर पारधी समाजाचा दोन पुरुष व दोन महिलांकडून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. उपोषणाचा पहिल्याच दिवशी प्रशासनाने प्रतिसाद दिल्याने मागण्या पूर्ण होणार हे निश्चित झाले आहे. 

आमरण उपोषणाला सकाळी 11 वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांच्या उपस्थितीत कॉ. मनोज काळे व कॉ. प्रकाश घोसले यांच्या नेतृत्वात मालाबाई घोसले, राजमल घोसले, अनारशा काळे, सुनिता घोसले यांनी सुरुवात केली. यावेळेस कॉ. मोहरमपुरी यांनी उपस्थित पारधी समाजातील स्त्री पुरुष बांधवांना मार्गदर्शन केले. त्याच वेळेस मेंढोली ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक ह्यांनी उपस्थिती दर्शवून पारधी कुटुंबाची घरे नियमानुकुल करून घरकुल प्रस्ताव मंजूर करून वरिष्ठांकडे पाठविल्याचे सांगितले.

मागील एक वर्षापासून पारधी समाज आपल्या मागण्या प्रशासनाकडे रेटत होते. परंतु प्रशासनाच्या धिम्या गतीचा कार्यभारामुळे पारधी समाजाचा प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. 

पारधी समाजातील 24 परिवार गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मेंढोली येथील स्मशानभूमी जवळ गट नं 36 वर झोपड्या बांधून राहत होते. जंगलात शिकार करून जगणाऱ्या पारधी समाजाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी मेंढोली येथे शेती व्यवसाय करून आपली गुजराण करीत आहेत. आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून मुलांना शिक्षण देत आहेत. त्यासाठी मात्र ह्या लोकांना प्रशासनाकडून जमिनीचा हक्क, रेशन कार्ड, गाव नमुना 8 अ, घरकुलचा लाभ आदी पाहिजेत. प्राथमिक कागदपत्रे असल्याशिवाय पुढील शासकीय कागदपत्रे मिळू शकत नाहीत, परिणामी मुलांना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेऊ शकत नाहीत. पण प्रशासन म्हणजे प्रशासनच असते. त्यासाठी शेवटी त्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्वातील आमरण उपोषणाचा धसका घेत शेवटी स्थानिक ग्रामपंचायतीने तसेच तहसील प्रशासनाचे मागण्यांची पूर्तता करीत असल्याचे व त्या दिशेने प्रक्रिया सुरू असायचे सांगितले. एवढेच नाही तर प्रक्रिया पूर्णत्वाच येत असल्याचे तहसील प्रशासनाचे वतीने उपोषण मंडपी येऊन लेखी आश्वासन मंडळ अधिकारी बांगडे यांनी देऊन आमरण उपोषण कर्त्यांना निंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

वणीत पुन्हा चोरट्यांचा धुडगूस, 4 लाखांचे वर दागिणे लंपास

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरात घरफोडीच्या सतत घटना घडत असून, लक्ष्मी नगर येथे चोरट्यांनी तब्बल चार लाखांचा वर ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील लक्ष्मी नगर येथील नांदेपेरा रोड परिसरातील सदनिका बंद असताना चोरट्यांनी कडी-कोयंडाचा स्क्रू काढून घरातील 4 लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सौ. सोनू रवींद्र बरडे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. 

यामध्ये महागड्या सोन्याचे गोप, अंगठ्या, जिवती, मंगळसूत्र, कानातले, बारीक रिंग, चांदीचे चाळ, चांदीचे छल्ला, चांदीचा करदोळा असे विविध दागिणे होते. ही चोरी अज्ञात चोरांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार आज दि. 28 एप्रिल ला सोमवारी 12 ते पहाटे 5 च्या सुमारास घडला. त्याआधारे वणी पोलिस तपास करत आहेत. 

वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मी नगर मधील बंद सदनिका फोडून चोरट्यांनी सोन्याचे सोन्या चांदीचे दागिने, असा एकूण 4,13,500 रु.चा ऐवज चोरून नेला. हा खळबळजनक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडला असून, पुढील तपास पो उपनि धिरज गुल्हाणे करत आहेत.

घरकुल, इतर बांधकाम रखडले, मनसेचे तहसीलदारांना निवेदन

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी : जिल्ह्यातील कोणत्याही रेती घाटाचा अध्याप लिलाव झाला नसल्याने घरकुल लाभार्थ्यांची बांधकाम रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत ऑफलाईन पद्धतीने रेती उपलब्ध करून द्यावी तसेच इतर बांधकामे रेती अभावी रखडले असल्याकारणाने त्यांना सुद्धा रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना झरी तालुक्याच्या वतीने  तहसीलदारांना केली आहे. 

झरी तालुक्यामध्ये शासनातर्फे आर्थिक दुर्बल कुटुंब, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी घरकुल योजना मंजूर झाली असून लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता अंदाजे १५००० हजार रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे, तसेच शासन निर्देशाने लवकरात लवकर घरकुल बांधकाम सुरू करावे असे आदेश सुद्धा काढण्यात आले आहे. 

घरकुल बांधकामासाठी सर्वात महत्त्वाचा विषय असलेला एक भाग म्हणजे रेती, झरी तालुक्यामध्ये कोणताही रेती घाट लिलाव झाला नसल्याने कुठेच रेती मिळत नसून याच संधीचा फायदा घेवून रेती तस्कर ज्यादा दराने मोठी रक्कम आकारून रेती देत आहेत, वाढत्या महागाई मुळे घर बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत किंवा गाडी भाडे व मजुरी आकारून रेती उपलब्ध करून द्यावी तसेच ही रेती देताना घरकुल यादीतील क्रमवारीने तसेच ऑफलाईन पद्धतीने द्यावी कारण अनेक लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आपण ही रेती देताना ऑफलाईन पद्धतीचा वापर करावा जेणेकरून या लाभार्थ्यांना ते सोयीचे होईल. यासह शहरातील अनेक नागरिकांनी आपलं स्वतःचा हक्काचं घर असाव यासाठी घराची बांधकाम चालू केले मात्र रेती अभावी ही कामे सुद्धा पूर्णता रखडलेली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक प्रविण लेनगुळे, विठ्ठल बोथाडे, चेतन हेपट, नागोराव आत्राम, दिनेश दरेकर ,लोकेश डहाके, दिलीप डहाके, दादाजी कलमाळे, गजानन गौरकार, गजानन राऊत,विश्वनाथ गजलवार, कुंडलिक राऊत, कवडू ढोके, पंडित शिरसागर, गिरीधर ठमके यांच्यासह तालुक्यातील अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..