Showing posts with label मराठवाडा. Show all posts
Showing posts with label मराठवाडा. Show all posts

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना गुरूवार दिनांक ८ जून,२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृह एस टी स्टँडच्या पाठीमागे लातूर येथे विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहेत. तसेच संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, मॅक्स महाराष्ट्रचे ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड अमोल सकट, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, दैनिक पुढारीचे पत्रकार नितीन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे असणार आहेत.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, म. फुले महाविद्याय, अहमदपूरचे प्राचार्य डॉ वसंत बिरादार, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य उपाध्यक्ष विशाल पवार, पंकज वानखेडे, अजय सुर्यवंशी, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील संपादक, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहवे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, ओमकार टाले व सर्व तालुका अध्यक्षांनी आवाहन केले आहे.

महसूलमंत्री विखे पाटलांची छ. संभाजीनगरात मोठी घोषणा, राज्यातून एन.ए. टॅक्स (अकृषी कर) पूर्णपणे हटवणार...


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्यातून लवकरच एन. ए. टॅक्स (अकृषी कर) हटविण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे खरेदीच्या वेळीच एकदाच 'एनए' भरावा (वन टाइम टॅक्स) लागणार आहे. तर एकदा एन. ए. टॅक्स भरल्यावर नंतर भरण्याची गरज राहणार नसल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या निर्णयामुळे सरकारच्या महसुलावर परिणाम होईल, पण नागरिकांचा मोठा त्रास वाचणार असल्याचं देखील विखे पाटील यांनी म्हटले आहे. क्रेडाई महाराष्ट्रच्या 2023-25 च्या कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळा रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. 

 यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, दरवर्षी एनए करणे ही क्लिष्ट असते, लोकांना याचा मोठा त्रास होता. त्यामुळे आता खरेदीच्या वेळीसच एकदाच 'एनए' भरावा (वन टाइम टॅक्स) लागणार असल्याचा निर्णय सरकार घेणार आहे. त्यामुळे एकदा एन. ए. टॅक्स भरल्यावर नंतर भरण्याची गरज राहणार नाही. या नवीन निर्णयामुळे सरकारचा काही महसूल बुडेल, परंतु प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना याचा फायदा देता येईल. तसेच यासह भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीचे जे नकाशे दिले जातात ते आता 15 दिवसांत घरपोच देण्यात येईल, असेही विखे पाटील म्हणाले. 

मालमत्ताची डिजिटल मॅपिंग करण्यात येणार

दरम्यान पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की, सरकारकडून अनेक चांगले आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहे. ज्यात आता मालमत्ताची डिजिटल मॅपिंग करण्यात येणार आहे. महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मालमत्तांची मॅपिंग ड्रो- नद्वारे सर्वेक्षण करता यावे यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला ड्रोन पुरवण्यात येत आहे. आपले स्वतःच घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते, आणि त्या दृष्टीने सरकार पावले उचलत असल्याचं विखे पाटील म्हणाले. 

अवैध वाळू ठेकेदारांची साखळी तोडणार..!

दरम्यान सर्वसामान्यांना वाळूसाठी मोठ्याप्रमाणावर पैसे मोजावे लागत असल्याने यावर देखील सरकराने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे वाळूचा लिलाव बंद केले आहे. तर 1 मे पासून बांधकाम क्षेत्राला लागणारी वाळू सहाशे रुपये ब्रासने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार जास्तीत जास्त ट्रान्स्पोर्टचा खर्च धरून एक हजार रुपये ब्रास वाळू बांधकाम व्यावसायिकांना मिळावी, असे धोरण ठरवण्यात आले आहे. या माध्यमातून अवैध वाळू ठेकेदारांची साखळी तोडण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे देखील विखे पाटील म्हणाले.


पंचनामे तात्काळ पूर्ण करा – स्वामी लोहराळकर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नांदेड  : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे व्यवस्थित व काळजीपूर्वक करा. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी अंकुर सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा स्वामी लोहराळकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून आज आग्रही मागणी केली.

नांदेड जिल्ह्यातील काही भागासह तालुक्यात गुरुवार व शुक्रवारदरम्यान (दि. 17 व 18 मार्च) अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेती व शेतमालाचे नुकसान झाले आहे. दोन दिवसात जिल्ह्यात सरासरी पेक्षा पाऊस पडला. तसेच नांदेड तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यात गहू, हरभरा, केळी पीकाचे नुकसान झाल्याचा वृत्त आहे. भोकर येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी केली. यावेळी जिल्हा प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याची सूचना दिली. जिल्हा प्रशासनामार्फत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या शेतकऱ्याच्या शेतातील गहू हरभरा व केळी फळपीकाची पाहणी केली. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात येईल. एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच येथील अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील पीकांचीही पाहणी केली. पण 31 मार्च जवळ येत असल्यामुळे बँकेचे कर्ज शेतकऱ्यांना भरणे शक्य नसल्याने शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्यात यावे अशी प्रसिद्धी पत्रकातून लोहराळकर यांची मागणी आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा आज सकाळी विधानसभेत उपस्थित केला, त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात काल नांदेड आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार आज अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे तर नाशिक जिल्ह्यात देखील नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला प्राप्त होईल. गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत, असे सांगून कालपासून ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, त्या भागात देखील पंचनामे सुरु असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.