Showing posts with label औरंगाबाद. Show all posts
Showing posts with label औरंगाबाद. Show all posts

मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये विधवा भगिनींनीसाठी मदत आराखडा तयार करण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

औरंगाबाद : कोरोना काळात पतीच्या निधनानंतर विधवा भगिनींना मालमत्ता हस्तांतरण प्रक्रियेसह सुरक्षित आणि सक्षम आयुष्य जगण्याच्या संधी सुलभतेने उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महसूल आणि इतर सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिले .

विभागीय आयुक्त कार्यालयात आज घेतलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस आमदार अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे,उपायुक्त जगदीश मिनियार,पराग सोमण, समीक्षा चंद्राकार, महिला व बाल विकास उपायुक्त हर्षा देशमुख, यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी महिला व बाल विकासाच्या, कृषी, कामगार, परिवहन, महसूल विभागाच्या विविध योजना अंमलबजावणीचा आढावा घेतला.
विधवा तसेच एकल महिलांना रोजगाराच्या संधी सुलभतेने प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने आणि एकंदरीतच त्यांच्या सुरक्षित जगण्यासाठी आवश्यक संधी, सुविधा विनासायास उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने एकत्रित असा मदत आराखडा तयार करावा. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मनपा, नगरपालिका यांच्यासह सर्व संबंधित विभागांच्या अधिका-यांना यामध्ये सहभागी करुन घेत विधवा महिलांना सहाय्यक ठरणा-या विविध योजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्याचे श्रीमती गोऱ्हे यांनी सूचित केले. सुशिक्षित महिलांना रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे, शेतीमधील महिलांपर्यंत कृषी विभागाने त्यांच्या योजना व्यापक प्रमाणात पोहचवाव्यात. तसेच विविध महामंडळांनी त्यांच्याकडील निधीतील काही भाग कोवीडमुळे वैधव्य आलेल्या महिलांच्या आर्थिक मदतीसाठी देणार असल्याचे सांगितले होते, त्याचा पाठपुरावा करावा. महिला व बाल विकास, समाज कल्याण, कृषी, शिक्षण, रोजगार, पशुसंवर्धन विभाग, विविध महामंडळे या सर्वांनी आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांबाबत सहकार्याची भूमिका ठेऊन त्यांना योजनेचा लाभ विनाविलंब मिळवून द्यावा,असे डॉ. गोऱ्हे यांनी सूचित केले.
सर्व जिल्ह्यातील श्रमिक नोंदणी बाबतचा आढावा घेऊन येत्या दिनांक १० ते १५ जून २०२२ पर्यंत अधिक संख्येने कामगारांची नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी विभागीय आयुक्तांचा आवाहन करणारा व्हीडीओ प्रसारीत करावा. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीतील महिला, असंघटीत क्षेत्रातील कामगार महिला यांची नोंदणी करुन घ्यावी. ज्येष्ठ एकल महिलांसाठी देखिल मदत कक्ष सुरु करावा,जेणेकरुन ज्येष्ठ महिला नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवता येतील.तसेच शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी ही कटाक्षाने उपाययोजना कराव्यात, असे डॉ.गोऱ्हे यांनी सूचित केले.

विभागातील कोवीड उपचार सुविधांच्या तयारीसह कोरोनामुक्त गावांचा आढावा,सानुग्रह अनुदान वाटप, कोविड काळात कामगारांना देण्यात आलेले अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या बांधकाम साहित्य संचाचे वाटप, कोवीड लसीकरण, माथाडी कामगार, स्थलांतरित कामगारांच्या सुविधासह विविध योजनांच्या अमंलबजावणीचा आढावा डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी घेतला.

विभागीय आयुक्त श्री. सुनील केंद्रेकर, जिल्हानिहाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करून जिल्हानिहाय विधवा भगिनींसाठी मदत आराखडा तयार करण्यासंर्दभात लगेचच कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना दिल्या.

आपल्या विभागात कोवीड लसीकरण, उपचार सुविधांची उपलब्धता,ज्येष्ठांसाठी राबवण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत असल्याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

साहित्य समाजाच्या विकासासाठी साह्यभूत – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
औरंगाबाद, (२६ सप्टें.) :
साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचं व दिशा देण्याचे कार्य साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत असते. काव्य, नाटक, कथा, कादंबरी या घटकाच्या माध्यमातून समाजाला वैचारिक मेजवाणी मिळत असते. या घटकांना साह्य आणि मदत करण्याचे काम शासन करीत आहे. यातूनच मराठवाडा साहित्य परिषदेचे नांदेड येथील कार्यालय सुरु करण्याची ग्वाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. मराठावाडा साहित्य परिषद आणि लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबु बिरादार, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, आमदार सतिश चव्हाण, मधुकर अण्णा मुळे, के. एस. अतकरे, मावळते संमेलन अध्यक्ष ऋषीकेश कांबळे, साहित्यिक दादा गोरे यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, लोकांच्या मनातील संवाद व्यक्त व्हायला पाहिजे, बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कसा करता येइल याबाबतही चिंतन होणे गरजेचे आहे. वाचनातून वैचारिक बैठक तयार होवून समाजाला दिशा दर्शक भावी पिढी घडवण्याचं काम साहित्य करित असते विचार व्यक्त करण्याची मोकळीक साहित्य लेखणातून मिळते म्हणून साहित्याचा उल्लेख सामाजाचे प्रतिबिंब म्हणून केला जातो, असे मत मंत्री अशोक चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले.

या संमेलनाच्या प्रास्ताविकात कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्य आणि मागण्या, संमेलन आयोजनामागची भूमिका व्यक्त केली. तसेच नांदेड येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयाची सुरुवात करण्याबाबत मागणी मांडली.

मावळते अध्यक्ष ऋषीकेश कांबळे यांनी साहित्यात मराठवाड्याचे योगदान, साहित्य चळवळ आणि साहित्यातील बदलते स्वरुप याविषयी मत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात बाबु बिरादार यांनी आपली साहित्यिक जडणघडण व जीवनानुभव व्यक्त करणाऱ्या साहित्याची निर्मिती त्या विषयी सांगितले. तसेच मराठवाड्याची संत परंपरा, निसर्ग, अनुभव व संस्कार यामुळे मराठवाड्यातील साहित्यिक जमिनीवर राहून लिखाण करीत आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान देशमुख यांच्या ‘संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची’ या गीताने झाली यांनतर संमेलन उद्घाटन कार्यक्रमात शेवटी ‘गोंदन’ या मराठवाडा साहित्य परिषदेचे स्मरणिकेचे प्रकाशन तसेच बाबू बिरादार यांच्या ‘अधिवास’ या कादंबरीचे प्रकाशन मंत्री अशोक चव्हाण यांनी मान्यवर साहित्यिक यांच्या उपस्थितीत केले.

महाराष्ट्र राज्य शासनाची आरोग्य विभागाची परिक्षा आठ दिवस पुढे ढकलावी - मनीष नरवडे


सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (२२ सप्टें.) : महाराष्ट्र राज्य शासनाची आरोग्य विभागाची परीक्षा दि.२५,२६ संप्टेबर २०२१ या तारखेला होणार असून, तरी आज तारखे पर्यंत अजूनही विद्यार्थ्यांच्या हातात या आरोग्य विभागाच्या स्पर्धा परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा देणार कशी? 


नरवाडे सांगतात की, जर विद्यार्थी बाहेरील जिल्ह्याचे फॉर्म भरलेले असतील तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागेल, उदरणार्थ औंगाबादचा विद्यार्थी हा यवतमाळ उस्मानाबाद, अमरावती, नागपुर आदी जिल्ह्यात जाण्यासाठी दोन दिवस लागतात. सध्या मुसळधार पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यात हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या हातात नाहीत, मग विद्यार्थी कोणत्या सेंटरवर व कसा पोहचेल आणि सध्या आरोग्य केंद्राचे इंटरनेट सर्व्हेवर (साईट) बंद आहे. ऐनवेळी जर हॉल तिकीट आले तर, बाहेरील जिल्यातील विद्यार्थ्यांना वाहतूकदार सदर पत्रिका केंद्रावर पोहचविण्यासाठी  जास्तीची लूट करतील,त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना अश्या परिस्थतीमध्ये काय करायचे हा प्रश्न विद्यार्थ्या समोर आहे.

अशात जर विद्यार्थी सेंटरवर पोहचला नाही तर, विद्यार्थ्यांनी जी फीस रू.४५०/_ भरणा केलेली आहे, ती वाया जाईल व विद्यार्थ्याचे नुकसान होईल. परत आम्ही नोकरी पासून वंचित राहू,गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होईल व त्यातच काहीचे वय देखील संपत आहेत. तसेच, परिक्षा या पारदर्शकपणे घेण्यात याव्यात, जे परीक्षासाठी डमी उमेदवार बसविल्या गेल्यास व तसे आढळुन आल्यास त्यांच्या वर व त्यांना सहकार्य करणारे आधिकरी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
वरील बाबीचा विचार करून सदरील परिक्षा पुढे ढकलुन ग्रुप सी. ग्रुप डी. ची महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या परिक्षेत किमान आठ दिवसाचा तरी अंतर असावे, जेणेकरून विद्यार्थ्याना परिक्षा सेंटरवर पोहोचणे शक्य होईल व विद्यार्थ्याना संधी मिळेल.

आधीच महाराष्ट्रात बेरोजगारी वाढलेली आहे आणि परिक्षेच्या कारभारात वरीलप्रमाणे गोंधळ असेल तर तरूण पिढी ही सरकारी नौकरीपासुन वंचितच राहील व पुन्हा महाराष्ट्र बेरोजगाराच्या खाईत ढकलला जाईल, करीता वरील प्रकरणाची दखल घेऊन परिक्षा आठ दिवस पुढे ढकलुन विद्यार्थ्याना न्याय द्यावा. अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मनीष नरवडे, योगेश उबाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्रा. राजकुमार गाजरे नितिन मोहीते उपस्थित होते.

तेरणा हायस्कूल एन-6 सिडको औरंगाबाद येथील कार्यरत क्रीडा शिक्षक रमेश प्रधान यांना आदर्श क्रिडा मार्गदर्शन गौरव पुरस्कार !


सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (३१ ऑगस्ट) : राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रमेश प्रधान यांना आदर्श क्रीडा मार्गदर्शन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आज पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अर्थराज्यमंत्री भारत सरकार मा.ना.डाॅ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य मा.राजेंद्र दर्डा हे होते. क्रीडा महर्षी डाॅ.दत्ताभाऊ पाथ्रीकर तसेच संस्थापक अध्यक्ष मा.सचिन मुळे यांच्या हस्ते आदर्श क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार गौरव प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम भानुदास चव्हाण हाॅल येथे संपन्न झाला.

शिवछत्रपती पुरस्कार विजेते आदित्य तळेगावकर यांना आदरांजली


सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (२४ ऑगस्ट) : शिवछत्रपती पुरस्कार विजेते आदित्य अंकुश तळेगावकर यांना प्रथम पुण्यतिथी निमित्त एम जे बॉईज डान्स अकॅडमी वर आदरांजली देण्यात आली.

मागच्या वर्षी २४ ऑगस्टला आदित्य यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शंभरहून अधिक मेडल्स त्यांनी जिमनॅस्टिक या क्रीडा प्रकारात मिळवले होते. 'कोरिया' येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पयनशिपमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व ही केले होते. त्यांच्या या कार्याला बघता महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानला जाणारा 'शिवछत्रपती पुरस्कार' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 
     
कार्यक्रमाच्यावेळी त्यांच्या परिवरातले सदस्य, एम जे बॉईज ग्रूप, एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल चे संचालक तुकाराम मुंडे, स्पोर्ट्स पॅनोरमाचे संचालक प्रविण वाघ, सागर वाघ हे उपस्थित होते.

मंत्री राणे विरोधात पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दाखल

सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (२४ ऑगस्ट) : केंद्रियमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांविषयी चुकीचे वक्तव्य केले या कारणाने पूर्व विधानसभा संघटक मा.श्री.रेणुकादास (राजु भाऊ) वैद्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पुंडलीक नगर पोलीस ठाण्यात राणेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

यावेळी संतोष खेंडके, वामनराव शिंदे, सुर्यकांत जायभाये, अजय गटाने, संजय दराडे, राजु चव्हाण, बापु कवळे, हिंमत पटेल, सचिन जेजुरकर, दत्ता निंबाळकर, राम केकान, राज नीळ, कैलास तिवळकर, भरत ढवळे,लक्ष्मण बताडे, शरदराव कुलकर्णी, राजु जायभाये, प्रमोद कलकले, दिपक परेराव, सोनु अहिले, बबलू धोत्रे, साईनाथ एरडे, शुभम साळवे, बंटी कचकुरे आदी उपस्थित होते.

वर्षे २२ वे : ध्वजारोहण कार्यक्रम


सह्याद्री न्यूज | संतोष गडवे
औरंगाबाद, (१४ ऑगस्ट) : हनुमान चौक शिवछत्रपती सेवाभावी मंडळ व भाजपा गारखेडा मंडळ संभाजीनगर
वर्षे २२ वे
आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दि.१५ ऑगस्ट रविवार रोजी स्वातंत्र्यदिनी ठीक सकाळी १०:०० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आमदार अतुलजी सावे साहेब, शहर अध्यक्ष संजय भाऊ केनेकर, प्रदेश प्रवक्ते शिरीषजी बोराळकर, प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, प्रदेश कार्यकर्णी सदस्य अनिलभैया मकरिये, गटनेते प्रमोदभैया राठोड, महीला शहर अध्यक्ष अमृताताई पालोदकर, प्रदेश ऊपअध्यक्षा माधुरीताई अदावंत, सरचिटणीस राजू शिंदे, शिवाजी दाडंगेजी, सरचिटणीस समीरजी राजुरकर, सरचिटणीस राजेशजी मेहता, सरचिटणीस कचरूजी घोडके, ओबीस शहरअध्यक्ष गोविंद केंद्रे सर, मंडळ अध्यक्ष लक्ष्मिकांत थेटे, महीला मंडळ अध्यक्ष गिताताई कापुरे यांच्या प्रमुख ऊपस्थितीत होणार आहेत. तरी सर्व देशभक्तानी ध्वजारोहणास सलामी देण्यासाठी हजर राहावे विनंती.

आपले विनीत 
• अशोक दामले, अध्यक्ष:-हनुमान चौक शिवछत्रपती सेवाभावी मंडळ,
• मारोती आगलावे
सचिव:-हनुमान चौक शिवछत्रपती सेवाभावी मंडळ,

सिडको एन-६ संभाजी काॅलनीतील उद्यान बनले नशेखोराचा अड्डा


सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (१० ऑगस्ट) : वार्ड क्र. ६२ सिडको एन-६ संभाजी काॅलनी येथील नागरी वसाहतीमध्ये महाराष्ट्र पब्लिक स्कुलच्या लगत असलेल्या उद्यानामध्ये गेल्या अनेक वर्षापासुन शहरातील विविध भागातील मद्यपी, तळीराम तसेच टवाळखोर यांच्या मैफली रंगत आहेत.

विविध भागातून आलेले टवाळखोर हे गुंडप्रवृत्तीचे असुन, यांच्याकडे शस्त्र असतात. या उद्यानामध्ये आलेले नशाखोर हे दारू, गांजा, सिगरेट, व्हाईटनर, स्टीकफास्ट व इतर नशा सर्व प्रकारचे नशा करतात. नशा केल्यानतंर उद्यानामध्ये धिगाना घालणे, आपआपसात भाडणं करणे, आरडाओरड करणे, परिसरातील नागरीकांच्या घरावर दगडफेक करणे, तसेच उद्यान परिसरातील महिला व मुलीची छेड काढणे, तसेच परिसरातील नागरीकांना चाकुचा धाक दाखवुन लूटमार करणे व मारहाण करणे, असे अनेक प्रकार या उद्यानामध्ये दिवसा व रात्री घडत आहेत. परिसरातील नागरीक व बालके उद्यानात गेल्यास टवाळखोराकडून त्यांना छेडठाड व शिवीगाळ होते, या कारणामुळे परिसरातील महीला-मुली, लहान बालके, व वृद्ध व्यक्ती उद्यानात जाण्यासाठी घाबरत आहेत. असाच प्रकार रोज घडत राहीला तर या ठिकाणी अनुचित प्रकार घडू शकतो, त्यामुळे उद्यानामध्ये बसणाऱ्या नशेखोरावरती कारवाई करून गुन्हा दाखल करावा तसेच उद्यानामध्ये पोलीसांची दिवसा व रात्री गस्त वाढवावी असे परिसरातील नागरीकांनी सिडको एन-7 पोलीस ठाणे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.

निवेदनकर्ते मनीष नरवडे, सचिन गायकवाड, यश, पट्टेकर, अभिषेक गावडे, क्षितीज कांबळे, सुमित हिवराळे, आकाश गायकवाड, सचिन दाडगे यावेळी उपस्थित होते.

मथुरानगरातील नागरीकांनी ड्रेनेजलाईनचे बोगस होत असलेले काम पाडले बंद



सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (०४ ऑगस्ट) : एन सहा सिडको मथुरानगर कुलस्वामीनी मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजुस गेल्या अनेक वर्षापासुन ड्रेनेजलाईन लाईनचे काम प्रलंबीत होते. वारंवार ड्रेनेजलाईन चोकअप होणे चेंबरमधुन घाण पाणी वरती येऊन रस्त्यावर वाहणे, त्यामधुन दुर्गधी येणे तेच घाण पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये निचरा होऊन तेच पाणी नळाद्वारे येऊन नागरीकांना ते घाण पाणी प्यावे लागत असे. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मनीष नरवडे यांनी महानगरपालीकेकडे वारंवार पाठपुरावा करून ड्रेनेजलाईनचे काम करण्यास भाग पाडले. 
परंतु या कामात संबंधीत कत्राटदार, शाखा अभियंता व महानगरपालीकेतील कर्मचारी यांनी निष्कृष्ट दर्जाचे कामास सुरूवात केली आहे. संबंधीत कामाचे कार्यरंभ आदेश, अंदाजपत्रक, व मार्गदर्शक सुचना कुठेही प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत. संबंधीत काम हे कत्राटदारास देण्यास कुठल्याही प्रकारची निविदा प्रसिद्धीस देण्यात आलेली नाही. यापूर्वी या प्रभागात संबंधीत कत्राटदाराने निष्कृष्ट दर्जाचे काम केले आहे, यांच्या अनेक तक्रारी अनेक नागरिकांनी आपल्या कार्यालयास सादर केलेल्या आहेत.

करिता संबंधित काम तात्काळ बंद करण्यात यावे, करण्तात यावे, खुली करण्यात आलेली ड्रेनेजलाईन व त्यापासुन नागरीकांना होणारी असुविधा याचे तात्काळ नियोजन करण्यात यावे संबंधित कत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे व वरील कामे नवीन कत्राटदाराला देऊन ड्रेनेजलाईनचे काम चांगल्या व दर्जेदार पद्धतीने करावे नसता स्थानिक नागरीकांनाच्या वतीने लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असे महानगरपालीकेला निवेदनाद्वारे कळवले आहे.

या निवेदनावर मनीष नरवडे, आकाश गायकवाड, म्हस्के, सागर शेजुळ, विक्की शेजुळ, अनिल वैद्य, सुनिल वैद्य, ॠशीकेश शेजुळ, सुनिल तिडके, सोनु चौथमल, अभिजीत निकाळजे, दिपक म्हस्के, शैला दाभाडे, आकाश शेजुळ, ओम कुकलवार, शंकुतला चौथमल, राम बिडवे, शितल वैद्य, आशा आरकिले, साहेबराव प्रधान, रमेश ठोबरे, भिमाबाई नेमाने, मीणा राणा ज्ञानेश्वर ढापसे इत्यादीच्या सह्या आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (०२ ऑगस्ट) : दि.१ ऑगस्ट रोजी आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सिडको एन सहा मित्र मंडळ, विश्वजीत फाउंडेशन व एज्युकेशन सोसायटीच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच घाटी रूग्णालयातील गोरगरीबांना अल्पहार वाटप करण्यात आला.

यावेळी मनीष नरवडे, सचिन दांडगे , पवनभाऊ पवार, अभिषेक गावडे, अतुल गायकवाड, सचिन गायकवाड, सुमेध हिवाळे, करण कसारे, अनिकेत गायकवाड, अनिकेत श्रीवास्तव, शुभम् आसलकर, अनिकेत राऊत, मयुर जमधडे, निखिल गवळी, अभिषेक कुटे, आशिष मोकळे इत्यादी मित्र परिवार उपस्थित होता.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (२८ जुलै) : गेल्या वर्षभरापासुन कोराना या महा भयंकर रोगाने संपूर्ण भारतात थैमाण घातले त्यामुळे अनेकांना रूग्नवाहीका, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर तसेच इतर उपचाराचे साहित्य सामुग्री व योग्य उपचार न मिळाल्याने नाहक अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

कित्येकवेळा गोरगरीबांना रूग्णालयात जाण्यासाठी रूग्णवाहीका न मिळाल्याने आपला जीव सोडावा लागला ती अत्यंत गंभीर परिस्थीती होती. या गोष्टीचा विचार करून माजी महापौर विमलताई बी राजपूत व किशोर राजपूत यांनी वार्ड क्र 62 संभाजी काॅलनी सिडको एन सहा मध्ये मोफत रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला त्या अनुषंगाने दि. २७ जुलै २०२१ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रूग्णवाहीका लोकार्पण सोहळा अर्पण करून वार्डातील तसेच शहरातील गोरगरीबांना मोफत रूग्णवाहीकेमार्फत चोवीस तास सेवा करण्यासाठी रूग्णवाहीका उपलब्ध करून दिली.

म्हणुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मनीष नरवडे यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सचिन दाडगे, मयुर जमधडे, सचिन गायकवाड, अभिजीत गावडे, शेखर बिडला, निखिल गवळी, क्षितीज काबळे, अनिकेत श्रीवास्तव, उमाकांत वैद्य, पप्पु गवई, महेन्द्र कुलकर्णी, उपस्थित होते.

डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील


                       (संग्रहीत फोटो) 

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
औरंगाबाद, (१२ जुलै) : डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे ५ हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे ७ हजार पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश दिले.

औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.एम.प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील तसेच बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला श्री. प्रसन्ना यांनी सादरीकरणाव्दारे गृहमंत्र्यांना परीक्षेत्रातील सविस्तर माहिती दिली.
पुढे बोलतांना गृहमंत्री म्हणाले की, औरंगाबाद परिक्षेत्रातील गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याने पोलिसांनी अधिक सक्षमपणे तपास करणे गरजेचे आहे. पोलीस दलात कर्मचारी हा घटक महत्त्वाचा असून त्याची तपासात देखील भूमिका महत्त्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणुन घ्या आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत असणारा राजशिष्टाचार प्राधान्याने पाळा. डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे ५ हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे ७ हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. पोलीस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, त्यादृष्टीने योजना बनविण्यात येत आहे. जिल्ह्यांमध्ये पोलीस दल अधिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतुन निधीची मागणी करा. कोरोना काळात पोलीस दलाने कौतुकास्पद कामगिरी केल्याचेही गृहमंत्री म्हणाले.

बैठकी दरम्यान उपस्थित पोलीस अधिक्षकांनी आपआपल्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती गृहमंत्र्यांना दिली. गृहमंत्र्यांनी बैठकीपूर्वी आयुक्तालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला भेट दिली. बैठकीमध्ये विविध पुस्तिकांचे विमोचन गृहमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.
सायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असून पोलिसांनी प्रभावीपणे कारवाई करत सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

पोलीस आयुक्तालयात आयोजित औरंगाबाद शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत गृहमंत्र्यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यासह शहर पोलीस यंत्रणेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलीसांनी समाजातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अधिक सक्रीयपणे तपास मोहिम राबवावी जेणेकरुन गुन्हेगारांना शिक्षा होण्यात वाढ होईल, यादृष्टीने कारवाई करण्याचे निर्देशित करुन गृहमंत्र्यांनी सायबर गुन्ह्यासोबतच नागरिकांचे विविध पध्दतीने होणारे आर्थिक फसवणूकीचे गुन्हे रोखण्यास प्राधान्य देऊन गुन्हेगारांमध्ये जबर निर्माण करावी.
कायदा सुव्यवस्था अबाधित राखत नागरिकांना पोलीस प्रशासनामार्फत अपेक्षित सहकार्य तातडीने उपलब्ध होईल याची खबरदारी बाळगावी, असे सूचित करून वळसे पाटील यांनी विविध समाजमाध्यमांद्वारे दैवते, प्रसिध्द व्यक्ती, समाजपुरुष यांची बदनामी करणाऱ्या आक्षेपार्ह प्रसारणाचे प्रमाण सध्या वाढत असून त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी गृहविभाग प्रयत्नशील असून अधिक परिपूर्ण प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पूरक सूचना, उपाय असल्यास सादर करावे तसेच पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या सामान्य माणसाला आपुलकीची वागणूक आणि न्याय देण्याच्या जबाबदारीतून पोलीसांनी कृतीशील रहावे. पोलीस कॉन्सटेबल पोलीस प्रशासनाचा कणा असून त्याच्या मानसिक, शारीरिक यासोबतच कौटुंबिक स्वास्थ्याची काळजी घेतली जावी. शहरामध्ये मनपासह इतर विविध निवडणूका येत्या काळात नियोजित असून त्या कायदा व सुव्यवस्थेच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडतील याची खबरदारी घेत नियोजन करावे. कोरोना काळात पोलिसांनी स्वत:ची तसेच कुटुंबाची जोखीम पत्करत अहोरात्र काम केले आहे, त्याबद्दल सर्व पोलिसांचे अभिनंदन करुन कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही पोलीस प्रशासनाने उत्तम कामगिरी करावी, असे गृहमंत्र्यांनी सूचित केले.

महासंचालक पांडे यांनी मालमत्तेशी निगडीत गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असून गुन्ह्यांची तातडीने नोंद होणे, अधिक तत्पर शोध मोहिम राबविणे या गोष्टीमंध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले.

पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी शहर पोलीसामार्फत राबविण्यात येत असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या अंमलबजावणी अंतर्गत तपास मोहीम, दामिनी पथक, ट्राफिक हेल्पलाईन, प्रतिबंधात्मक कारवाई, शहरात संवादी तसेच सौहार्दाचे वातावरण ठेवण्यासाठी पोलीसामार्फत सुरु करण्यात आलेल्या भरोसासेल, सिटीजनसेल, सिटीजन सेंट्रीक पोलीसींग यासह राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली.

सिडको एन सहा मथुरानगर भागात ड्रेनेजलाईनचे पाणी रस्त्यावर, सगळीकडे घाणीचे साम्राज्य


सह्याद्री न्यूज | संतोष गढवे 
औरंगाबाद, (ता.२७) : वर्षभरापासुन सिडको एन सहा मथुरानगर कुलस्वामीनी मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजुस घाणीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरापासुन कोरोना या महाभयंकर रोगाने संपूर्ण देशात थैमाण घातलेले असतांना प्रत्येक व्यक्ति हा आपल्या आरोग्यांची विशेष काळजी घेतांना दिसतोय अशी परिस्थिती असतांना महानगरपालीकेच्या दुर्लक्षामुळे सिडको एन सहा मथुरानगर भागातील रस्त्यावर तसेच घरासमोरून नाल्याचे घाण दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने परिसरात डास, मच्छर, विविध प्रकारचे किटके वाढल्याने साथीच्या रोगाची नागरीकांना तसेच लहान बालकांना महीलांना लागन झाली आहे. संपूर्ण गल्लीमध्ये ड्रेनेजचे घाण पाणी साचल्याने नागरीकांना ये जा करतांना मोठी कसरत करावी लागते. ड्रेनेजलाईनचे पाणी खुप मोठ्या प्रमाणावर वाहत असुन हेच पाणी पिण्याच्या पाण्याच्या नळाच्या आत जाऊन अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. परिणामी फिल्टरचे विकतचे पाणी घ्यावे लागते त्यामुळे आर्थीक भूर्दड सुद्धा लागतोय. ही परिस्थिती मनपा वार्ड अधिकारी यांना कळवली असता, त्याच्यामार्फत तात्पुरत्या स्वयमरूपाचे काम केले जाते. त्यातही स्थानिक नागरीकांकडून पैसे घेतले जातात. काम झाल्याच्या एक तासानंतर परिस्थिती जेसे थे बघायला मिळते. मथुरानगरमधील हा भाग उताराच्या दिशेने असल्याने संपूर्ण वार्डाचे पाणी उताराच्या दिशेने जाऊन सरळ घरामध्ये शिरते. सद्या  पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचे लोढे मोठ्या प्रमाणावर वाहतात,भविष्यात या भागामध्ये दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जवाबदार मनपा प्रशासन असेल. पाण्याचा निचरा होण्यासाठी या भागामध्ये नवीन ड्रेनेजलाईन टाकुन अतिरिक्त नविन चेंबर बाधावे व पाण्याचा निचरा चेंबरमध्ये करावा. तसेच सगळा परिसर स्वच्छ करून जंतुनाशक फवारणी या भागात करावी व होणा-या त्रासापासून नागरीकांना मुक्त करावे अशी मागणी मनीष नरवडे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडी तर्फे महानगरपालीकेला करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा, इशारा मनीष नरवडे यांनी दिला आहे.

सिडको एन सहा मथुरानगर, संभाजी काॅलनी जी सेक्टर, ई सेक्टर भागातील नागरीकांना गेल्या 4 वर्षापासून काळया पाण्याची शिक्षा..


सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (ता.१३) : सिडको एन सहा मथुरानगर, संभाजी काॅलनी ई सेक्टर जी, सेक्टर , परिसरात गेल्या काही दिवसापासुन नळाला दुषित पाणी येत असल्याची समस्या ताजीच असतांना पुन्हा याच भागातील मथुरानगर घर क्र E1-29/8, पासुन पुढे संपूर्ण गल्लीला ड्रेनेजचे पाणी आल्याने नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या सदर्भामध्ये येथील स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासन वार्ड अधिकारी व पाणी पुरवठा विभागाला कळवलेले आहे. याभागातील ड्रेनेजलाईन ही वारंवार भरत असते ही ड्रेनेजलाईन आणि वार्डाला जलपुरवठा करणारी जलवाहीनी ही आजुबाजुलाच असल्याने या ड्रेनेजलाईन मधील तुबलेले दुर्गंधीयुक्त घाण पाणी हे जलवाहीच्या आत जाऊन संपूर्ण वार्डाला घाण आणि दुषीत पाणी येत असल्याने नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. 

"एक महीन्यापूर्वी मथुरानगरमध्ये मनपाने खासगी कत्राटदारा मार्फत ड्रेनेजलाईनमधील जुने पाईप खोदून काढले आणि स्वच्छ करून तेच पाईप बसवुन बोगस पद्धतीने काम केल्याने ड्रेनेजलाईनला एक महिन्याच्या आत गळती लागुन नळाद्वारे ड्रेनेजचे पाणी येत आहेत. ज्या ठेकादारामार्फत ड्रेनेजचे काम झाले त्याला काळ्या यादीत टाकुन दिलेले बिल परत घ्यावे केलेल्या बोगस कामाचा पंचनामा करून त्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. ड्रेनेजलाईनच्या लागुनच असलेले नळ कनेक्शन कापावे, जुनाट झालेली ड्रेनेजलाईनचे बोगस काम पुन्हा एकदा चागल्या पद्धतीने करावे. खराब व मोडकळीस असलेले चेबर नवीन टाकावे आणि ड्रेनेजलाईनची गळती कायमस्वरूपी थाबवावी. "
  
औरंगाबाद शहराला सहा दिवसातुन एकदा पाणी येते त्यातच नळाला जर दुषित आणि दुर्गंधी युक्त ड्रेनेजचे पाणी येत असेल तर स्थानिकांचा वर्षभराचा पाण्याचा कर मनपा प्रशासनाने माफ करावा अशी मागणी नागरीकातर्फे होत आहे. संपूर्ण देशात कोरानाचा कहर आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या जिवाची विशेष काळजी घेत असतांना अशा ड्रेनेजच्या पाण्यामुळे रोगराई पसरण्यास वेळ लागणार नाही. काही महिन्यापूर्वी याच वार्डातील संभाजी काॅलनी ई सेक्टर, जी सेक्टर मधील नागरिकांना दुषित आणि दुर्गंधी युक्त ड्रेनेजचे पाणी येत असल्याचे चित्र ताजेच असताना परत असाच प्रकार पुन्हा याच भागात घडतो हे निदंनीय आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला पाहीजे. हा वार्ड मोठा असल्याने याभागात अनेक समस्या आहेत. मनपा प्रशासन औरंगाबादच्या नागरिकांकडुन पूर्ण वर्षभराचा कर आकारते मात्र स्वच्छ पाणी देण्यास निष्फळ ठरते. दुषित आणि दुर्गंधी युक्त पाण्यामुळे लहान मुले. महीला तसेच वृद्ध व नागरीक सतत आजारी पडत आहेत. परिणामी आजारापासुन वाचण्यासाठी विकतचे फिल्टर केलेले जारचे पाणी घ्यावे लागते त्यामुळे आर्थिक भुर्दड सुद्धा लागतो. काही लोकांना गरीब परिस्थितीमुळे फिल्टर केलेले जारचे पाणी घेणे शक्य नाही. या भागातील ड्रेनेजलाईन वारंवार चोकअप होते त्यामुळे जलवाहीनीच्या आत ड्रेनेजचे पाणी शिरते. ड्रेनेजलाईनचे काम लवकर करावे आणि पाण्याची समस्या पण मनपा प्रशासनाने तात्काळ सोडवावी अन्यथा स्थानीक नागरिकांना घेऊन मी मनीष नरवडे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देतोय. 



औरंगाबादेत कुख्यात गुंडांची हत्या; साडूनेच केला साडूचा 'गेम'


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
औरंगाबाद, (ता.५) :  औरंगाबादमध्ये एका कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. जमीर शब्बीर खान असं त्याचं नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार पैशांच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. जमीरच्या नातलगानेच त्याचा खेळ संपवल्याची माहिती आहे. याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

औरंगाबादमध्ये जमीर खानची (jamir khan) कुख्यात गुंड म्हणून दहशत होती. त्याच्या नावावर अनेक प्रकरच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.चोरी-घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये अनेक वेळा तो अटकेत होता. साडूसोबत झालेल्या पैशाच्या वादातून त्याची हत्या झाल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?
जमीन खान आणि त्याचा साडू यांचा पैशावरुन वाद झाला होता. वाद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या अगोदरही त्यांच्यात पैशावरुन खटके उडायचे. मात्र त्या त्या वेळी भांडणं मिटायचं. काल मात्र, असं काही झालं नाही. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास शहाजान मंडीतील जैन धर्मशाळेच्या एका बिल्डिंगजवळ उभा होता. यावेळी जमीरचा साडू शोएब खान (Shoaib Khan) एका मित्रासह तिथे आला. त्यांच्यात पुन्हा पैशावरुन वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की साडू शोएब खानने त्याच्या मित्रासह धारदार शस्त्राने जमीरवर घाव घातले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शोएबने धारदार शस्त्राने जमीरच्या छाती, पोटावर वार केले. जमीर रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर शोएब आणि त्याचा मित्र घटनास्थळावरुन पोबारा केला. पण मात्र, पोलिसांनी काही तासांच्या आतच जमीरचा साडू शोएबला अटक केली आहे.

मराठवाडा विभाग माहिती संचालकपदाचा हेमराज बागुल यांनी स्वीकारला कार्यभार

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
औरंगाबाद, (ता.४- (वि.मा.का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक म्हणून हेमराज बागुल यांनी आज येथे (दि.04) रोजी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. श्री. बागुल हे सध्या नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

यापूर्वी मराठवाडा विभागाच्या माहिती संचालकपदाची सुत्रे श्री.राधाकृष्ण मुळी यांच्याकडे होती. त्यांच्या निवृत्तीमुळे दि.31 मे 2021 रोजी हे पद रिक्त झाले होते. खडकेश्वर येथील संचालक कार्यालयात आज श्री. हेमराज बागुल यांचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती अधिकारी वंदना थोरात, सहायक संचालक मीरा ढास, माहिती सहायक संजीवनी जाधव पाटील, श्याम टरके, रेखा पालवे आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री.बागुल यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला.

श्री.बागुल यांनी यापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून तसेच महासंचालनालयातील लोकराज्य, महान्यूज, वृत्त शाखा आदी विभागात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे संचालकपदी सरळ सेवेने थेट निवड करण्यात आलेले ते या विभागातील पहिलेच संचालक आहेत. प्रशासनात येण्यापूर्वी त्यांनी पत्रकारितेतही लक्षणीय योगदान दिले असून त्यासोबत विविध साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमातही ते सक्रीय असतात.

पैठणमधील पाणी समस्यांसंदर्भात रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी घेतली आढावा बैठक

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
औरंगाबाद, (ता.४) : पैठणमधील प्रभाग क्रमांक दहा व अकरामधील नागरिकांची पाणी समस्या लवकरच दूर करणार असल्याचे रोहयोमंत्री संदिपान भूमरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आज सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पैठणमधील पाणी प्रश्नांबाबतच्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अजय सिंग, विलासबापू भुमरे, पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, नंदूअण्णा काळे, पैठण नगर परिषदेचे गटनेते तुषार पाटील, भूषण कावसानकर, जालिंदर अडसूळ, अजीम कट्यारे, सादेखभाई धांडे, अनिल चपडे व वसीम शेख आदी उपस्थित होते.

पैठण शहरातील प्रभाग क्रमांक 10 व प्रभाग क्रमांक 11 मधील पाण्याची समस्या लक्षात घेता याठिकाणी जलकुंभ असण्याबाबतचा विचार श्री. भूमरे यांनी मांडला. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी या जलकुंभास तत्काळ मंजुरी देऊन काम सुरू करण्याचे संबंधितांना आदेश दिले. त्याचबरोबर नवनाथ महाराज मंदिर जलकुंभाचे उद्घाटन श्री. भूमरे व जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे श्री. भूमरे यावेळी म्हणाले.

नगरोत्थान योजनेमधून जायकवाडीतील पाणीपुरवठा केंद्र, फिल्टर प्लांट दुरुस्तीसाठी लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल. वॉटर ग्रीड योजनेत पैठण शहराचा विचार करावा. त्यासंबंधी आराखडा तयार करावा, अशा सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना श्री. भूमरे यांनी दिले. या वॉटरग्रीड योजनेमुळे पैठणमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले. पैठण शहरातील प्रभाग क्रमांक दहा व अकरामधील नागरिकांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित करून मार्गी लावल्याबद्दल श्री. भूमरे यांचे आभार मानले.



औरंगाबादचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा, पोलिस ठाण्यातील राडा भोवला


 
                   (संग्रहित छायाचित्र)

 सह्याद्री न्यूज नेटवर्क |
औरंगाबाद, (ता.३१) : औरंगाबादेत २० मे २०१८ रोजीच्या मध्यरात्री झालेल्या जातीय दंगलप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खुर्च्यांची मोडतोड आणि काचांची फोडाफोडी करून पोलिसांना शिविगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेचे औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रदीप जैस्वाल यांना विविध गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली असली तरी ती त्यांना एकत्रच भोगायची आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एम. भोसले यांनी ही शिक्षा सुनावली.

२० मे २०१८ रोजी औरंगाबादेत निर्माण झालेल्या दंगलसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर भागातील दोन शिवसैनिकांना अटक केली होती. त्यावेळी प्रदीप जैस्वाल हे रात्री ११ वाजता पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुद्दाम त्रास देता, त्यांना विनाकारण अटक करता असे म्हणत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गोंधळ घातला होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विनाकारण अटक केली, त्यांना तत्काळ जामिनावर सोडा, अशी मागणी करत जैस्वाल यांनी गोंधळ घातला.

जैस्वाल हे गोंधळ घालत असताना कर्तव्यावर असलेले ठाणे अंमलदार चंद्रकांत पोटे, उपनिरिक्षक संजय बनकर, अकमल यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आताच तुमच्या वरिष्ठांना बोलवा म्हणत जैस्वाल यांनी पोलिसांनाच र्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच टेबलवरील काच फोडली आणि खुर्च्यांची फेकाफेक केली होती. त्यानंतर सहाय्यक निरीक्षक विजय घेरडे पोलिस ठाण्यात आले, त्यांनीही प्रदीप जैस्वाल यांना समजावून सांगीतले. दरम्यान सात-आठ शिवसैनिकांनी जैस्वाल यांची समजूत घालून त्यांना परत नेले.

याप्रकरणी चंद्रकांत पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात मुख्य सरकारी वकिल अविनाश देशपांडे यांनी पाच जणांच्या साक्ष नोंदवल्या. सुनावणीनंतर जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. एम. भोसले यांनी प्रदीप जैस्वाल यांना कलम ३५३ अन्वये सहा महिन्याची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अन्वये सहा महिने व अडीच हजार रुपये अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. सरकारी अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले. तर पैरवी अधिकारी म्हणून एस.के. घुगे यांनी काम पाहिले.