सह्याद्री न्यूज नेटवर्क |
औरंगाबाद, (ता.५) : औरंगाबादमध्ये एका कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. जमीर शब्बीर खान असं त्याचं नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार पैशांच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. जमीरच्या नातलगानेच त्याचा खेळ संपवल्याची माहिती आहे. याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
औरंगाबादमध्ये जमीर खानची (jamir khan) कुख्यात गुंड म्हणून दहशत होती. त्याच्या नावावर अनेक प्रकरच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.चोरी-घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये अनेक वेळा तो अटकेत होता. साडूसोबत झालेल्या पैशाच्या वादातून त्याची हत्या झाल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
जमीन खान आणि त्याचा साडू यांचा पैशावरुन वाद झाला होता. वाद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या अगोदरही त्यांच्यात पैशावरुन खटके उडायचे. मात्र त्या त्या वेळी भांडणं मिटायचं. काल मात्र, असं काही झालं नाही. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास शहाजान मंडीतील जैन धर्मशाळेच्या एका बिल्डिंगजवळ उभा होता. यावेळी जमीरचा साडू शोएब खान (Shoaib Khan) एका मित्रासह तिथे आला. त्यांच्यात पुन्हा पैशावरुन वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की साडू शोएब खानने त्याच्या मित्रासह धारदार शस्त्राने जमीरवर घाव घातले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शोएबने धारदार शस्त्राने जमीरच्या छाती, पोटावर वार केले. जमीर रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर शोएब आणि त्याचा मित्र घटनास्थळावरुन पोबारा केला. पण मात्र, पोलिसांनी काही तासांच्या आतच जमीरचा साडू शोएबला अटक केली आहे.