सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : कपाशीची लागवड अन् सोयाबीनच्या बहुतांश पेरण्या आटोपल्या असून शेतकऱ्यांना सध्या पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाच्या आगमनासाठी शेतकरी वरुणराजाकडे आर्तहाक घालत असल्याचे दिसून येते. यातच वणी शहरातील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते श्री विजय चोरडिया यांनी आज रविवारी सकाळी ११ वाजता 'देवाकडे साकडे घातले की बळीराजाला सुखी समाधानी ठेव.' यासाठी शहरातील मोठी कमान चौक येथील आपल्या पारसमल प्रेमराज या प्रतिष्ठान समोर नागरिकांना मसाला चने वाटप केले आहे.
गेल्या सात ते आठ दिवसाआधी झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी, तूर आणि सोयाबीनच्या पेरण्या उरकल्या. परंतु तेव्हापासून अचानक पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. ज्यांच्याकडे ओलीताची सोय आहे ते शेतकरी कसेबसे पीक वाचवण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त ही वरुणराजावरच आहे. त्यामुळे रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी रविवारी मसाला चने वाटप करुन वरुणराजाकडे पावसासाठी एकप्रकारे साकडेचं घातले.