Showing posts with label वणी. Show all posts
Showing posts with label वणी. Show all posts

जोपर्यंत माणसाच्या जीवनात वेदना शिल्लक आहे तोपर्यंत आंबेडकर थांबणार नाही - गीत घोष


खैबर अली सय्यद | सह्याद्री चौफेर 

घोन्सा :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे युगप्रवर्तक गती असून ते नवयुग निर्माते आहेत, त्यामुळे त्यांचे विचारावर विषमतावादी ब्राम्हणी प्रवृतीने कितीही आघात करून त्यांना संपविण्याचा प्रयत्न केला तरीही जगातील माणसाच्या जीवनात वेदना शिल्लक आहे तोपर्यंत ते त्यांना थांबवू शकणार नाही,असे प्रतिपादन प्रगतिशील साहित्यिक व विचारवंत गीत घोष यांनी दहेगांव येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य आयोजित व्याख्यानात अध्यक्ष पदावरून बोलत असतांना केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार प्रबोधन मंच दहेगांव च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंती निमित्य हे व्याख्यान आयोजीत केले होते, त्या निमीत्याने अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
या व्याख्यानमालेचे अध्यक्ष मा. गीत घोष होते तर, प्रमुख अतिथी म्हणून मा.माजी जी.प.सदस्य, दिलीप काकडे, ग्रामगीताचार्य विद्याताई, जुनगरी, वणी,राजेंद्र खोब्रागडे सर, मुकुटबन पो. स्टे .चे पोलीस निरीक्षक मा.अनिल सकवान साहेब, गणेश खाडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा प्रबोधन मंचाचे अध्यक्ष, डॉ.रामदास काटकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुढे आपले विचार मांडतांना घोष म्हणाले की, विषमतावादी धर्मांध,जात्यांध सत्ताधारी पक्षाकडून या देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, बेरोजगार लोकाची दिशाभूल करून त्यांची फसवणूक केली जात आहे. जात आणि धर्माच्या नावावर या देशातील तरुणांची माथे भडकवून सामाजिक तेढ निर्माण केल्या जात आहे व त्यांचे लक्ष त्यांच्या मूळ समस्यापासून भटकविल्या जाते आहे. देशाला पुन्हा एकदा ब्राम्हणी व्यवस्थेचे गुलाम करण्याचे षडयंत्र रचल्या जात असून देशाचे संविधान ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी देशातील दलित, शोषित, आदिवासी,सर्वहारा बहुजन लोकांनी आपली एकता मजबूत करुन देशाची सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी सज्य व्हावे असेही म्हणाले.
सायंकाळी ९ वाजता सामाजिक प्रबोधनपर गुणवंत पचारे सर याचा जाहिर किर्तनाचा आयोजीत करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्थावीक बाळू निखाडे यांनी केले तर आभार जगदीश बेसेकर यांनी मानले.

बाबसाहेबांनी महिलांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले - प्रतिक्षाताई गुरनूले


खैबर अली सय्यद | सह्याद्री चौफेर 

घोन्सा : पुरातन व मनुवादी व्यवस्थेने स्त्रीयांना खुप छळले त्यांचे समाजिक, आर्थिक, शैक्षणिक व धार्मिक अधिकार काढून स्वातंत्र्य हिरावून घेतले होते अशा महिलांना बाबासाहेबांनी घटणात्मक अधिकार देवून सन्मानाचे जीने मिळवून दिले, असे उदगार प्रतिक्षाताई गुरनूले हिने प्रमुख वक्ता म्हणून बोलत असतांना काढले.
घोन्सा येतील पंचशिल महिला मंडळ व आंबेडकरी युवा उत्सव समीतीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव घेण्यात आला.

उदघाटन करतांना मा गीत घोष म्हणाले की,
डा.बाबासाहेब आंबेडकर यांची लढाई ही फक्त सत्ता मिळविण्यापुर्ती मर्यादित नव्हती तर विषमता व चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारित ब्राम्हणी समाजव्यवस्था ध्वस्त करुन त्याठिकाणी समता, स्वातंत्र्य बंधूभाव व न्यायावर आधारित नव लोकशाही समाजव्यवस्था प्रस्थपित करण्यासाठी होती.

या कार्यक्रमाचे ग्रामपंचायत सरपंच तथा घोन्सा गावचे प्रथमन नागरिक मंगेशजी मोहुर्ले हे होते, कार्यक्रमाचे उदघाटन प्रगतिशील साहित्यिक व विचारवंत मा.गीत घोष यांनी केले, कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रतिक्षाताई गुरनूले, वैशाली पाटील, प्रवीण वनकर, ललीताई वनकर, आनंद पाटिल, नलिनीताई, यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून मा. पोलीस पाटील सचिनजी उपरे, विजय जीवने, गुणवंत मुन हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक यशवंतराव रामटेके सर यांनी केले, सूत्र संचालन गजानन बेसकर यांनी केले,तर आभार विश्रांत ताकसांडे यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता युवा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रणव जीवने, भिमराव तेलंग, हर्षल मून, शेषराज ताकसांडे, मारोती रामटेके, सुमित बारसागळे, चित्तरंजन कांबळे, सौ.मंगला बेसरकर, सुनिता बारसागळे,अरुणा रामटेके, दिपाली कांबळे, पपीता जीवने, मंगला घोष, ताई मुन, कविता ताकसांडे, संध्या तेलंग, वैशाली रमटेके, गयाबाई पथाडे, तारा तेलंग, बबीता रामटेके व जयश्री पथाडे आदिंनी परिश्रम घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेस चे चिखलगाव लालपुलीया येथे चक्काजाम आंदोलन


सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : अनेक आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या कोळसा धुळीच्या प्रकोपाला कंटाळून चिखलगाव परिसरातील कोल डेपो तातडीने हटविण्यात यावे , या मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात गावकरी रस्त्यावर उतरले.

चिखलगावातील वाय पॉईंटवर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे यवतमाळकडून वणीकडे येणारी तसेच वरोरा बायपासने यवतमाळकडे जाणारी वाहने व सोबतच वणीवरून यवतमाळकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिवासी सेलचे प्रदेश अध्यक्ष राजू तोडसाम सहभागी झाले होते. त्याचा सहभागा मुळे पक्षाच्या कार्यकर्त्या मध्ये व गावकरी मध्ये उत्साह वाढला, दुपारी दोन वाजता आंदोलनाला सुरुवात झाली, मार्गावरील वाहतूक अडवून धरली. नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचविणारे कोल डेपो तातडीने हटविण्यात यावे, या मागणी करीता राष्ट्रवादी पुर्ण ताकदीने काम करणार व प्रदुषणाच्या या प्रश्नकर्ता मी धावून येणार असे वचण माजी आमदार प्रा.राजुभाऊ तोडसाम यांनी दिले.प्रशासकीय अधिकारी यांचा आशीर्वादा मुळे हे कोलडेपो सुरु आहे,त्यांच्या आर्थिक संबंधा मुळे आम्हचा आवाज पोहचत नाही आहे, त्याकरिता आता आम्ही १ एप्रिल ला वणी तहसील कार्यालयात घंटानाद आंदोलन करून आम्हचा आवाज पोहोचवणार असल्याचे पक्षाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी पत्रकाराशी बोलतांनी सांगीतले.
या आंदोलन यशस्वी करण्याकरीता राष्ट्रवादीचे विजय नगराळे, सूर्यकांत खाडे, चिखलगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या अंजुम रियाज शेख, राजुभाऊ डावे, गुणवंत टोंगे, हेमंत गावंडे, कर्माताई तेलंग, वैशाली तायडे, मोबीन शेख, शहर उपाध्यक्ष रामकृष्ण वैद्य, मनोज वाकटी, प्रणय बलकी, संदेश तिखट, सतेन्द्र मंडल, अतुल इखारे व शेकडो कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

नागपूर येथे सागर मुनेचे राजकारण !

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : आपल्या शहराचे हरहुन्नरी कलावंत, व्यावसायिक, असणारे येत्या निवडणुकीत नव्या भूमिकेत दिसणार यात शंका नाही, मात्र त्याची पूर्व तयारी त्यांनी नाटकाद्वारे सुरू केली आहे अस म्हणायला हरकत नाही. 

वणीच्या नाट्यकलेला पुन्हा संजीवनी देणारे व शहरात विविध नाट्य निर्मिती करणारे सागर मुने हे नागपूर येथे सुरू असलेल्या ६० व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत  "राजकारण" या दोन अंकी नाटकात अभिनय सादर करणार आहे. आज प्रभास बहुद्देशीय ट्रस्ट निर्मित राजकारण हे नाटक सायंकाळी 5 वाजता सुरू होत आहे. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक रविंद्र नारायण गुजर यांनी केले आहे. 

या नाटकात राजकारण हा वेगळ्या पद्धतीने विषय मांडणी लेखकाने केली आहे. अतिशय गंभीर, गुप्त, शरीरावर काटे येतील असे कथानक, असल्याने पाहताना प्रत्येक वेळेस काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना असणार आहे. सर्व कलावंत दमदार अभिनय सादर करतील यात शंका नाही.

यात प्रणाली ईश्वर भोसकर, दिलीप हरकरे, मिलिंद शेट्टे, कार्तिक काकडे, सागर मुने, प्रशांत ढोके, ज्ञानेश्वर नाडेकर, रौनक तायवाडे, जय कोचे, गीता, डॉ विजया, गावातील बाई, मनोज इंगोले, वैष्णवी ढाबरे, विलास राऊत, सुभाष मांडवकर आणि पुढारी माणूस (दुहेरी भूमिकेत) महेश वांगे, पंकज, सोहम भोसकर, लाजरि काळे, साक्षी गुमगावकर, शताब्दी सहारे, नीलम हे सर्व कलावंत अभिनयाद्वारे आज राजकारण नाटक रंगवणार आहे.

रावसाहेब दानवे च्या निषेधार्थ बारा बलुतेदार महासंघाचे निवेदन


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : भाजप नेते तथा केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री यांनी जालन्यातील जाहीर कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात टिका टिपन्नी करीत असताना तिन्ही पक्ष म्हणजे तिरुपती येथील न्हावी असे विधान करून एका विशिष्ट समाजाचा उल्लेख करून नाभिक समाजच्या भावना दुखविन्याच कार्य केले आहे ह्या विधानाच्या विरोधात बारा बलुतेदार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देऊन आपलं रोष व्यक्त करीत निषेध नोंदविला, केंद्रस्थानी असलेल्या सरकारचा मंत्री एका अल्पसंख्यांक जातीचा हेतू पूरस्पर उल्लेख करून ह्या जातीच्या भावना दुखवीत असताना जर जाणीव नसेल तर नवलच म्हणून अश्या नेत्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी समाजातून निवेदनाच्या माध्यमातुन केलेली आहे.
या वेळी प्रवीण खानझोडे अध्यक्ष बारा बलुतेदार वणी विधानसभा, सुरेश मांडवकर, बंडूभाऊ येसेकर, संजय गाथाडे, भास्कर गोरे, राजूभाऊ वाघमारे, जितेंद्र घुमे पुरुषोत्तम नवघरे, दिलीप वनकर, शशिकांत नक्षीने, आकाश कडुकर, अभय नागतुरे, राजू किन्हेकर, दिवाकर नागतुरे, कवडू जमदाळे, सचिन धाबेकर,अनिल मांडवकर, गणेश वासेकर, संतोष वासणकर, दादाजी वनकर प्रमोद निंबुळकर शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

वणी च्या "क्षण एक पुरे" या नाटकांनी राज्य नाट्य स्पर्धेत पटकावले अभिनयाचे दोन पारितोषिक

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 

वणी : ६० व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत नुकतेच अंजना उत्तम बहूउद्देशिय संस्थने चंद्रपूर इथे प्राचार्य हेमंत चौधरी निर्मित क्षण एक पुरे नाटक सादर केले होते त्यावेळी चंद्रपूर करांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला होता.

या स्पर्धेचा निकाल काल महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाने जाहीर केला. यात या नाटकातील जेष्ठ रंगकर्मी अशोक सोनटक्के यांनी तसेच बालकलाकार कु.राधा सोनटक्के या दोन्ही कलावंतांना राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

भावनिक गुंतागुंत, कौटुंबिक अडचणी, त्यात प्रेयसीचा हट्टीपणा या साऱ्या प्रश्नाभोवती फिरणारी 'क्षण..एक पुरे' ही मर्मस्पर्शी नाट्यकृती कलावंतांनी  सादर केली.

या पुरस्काराने वणीतील नाट्य चळवळीत मानाचा तुरा रोवला गेला. उल्लेखनीय म्हणजे वणीमध्ये एकेकाळी समृद्धशाली नाट्यपरंपरा होती. कालांतराने ती लोप पावत गेली. मात्र पुन्हा एकदा येथील रंगमंच चळवळीला नवीन उभारी देण्याचे काम प्राचार्य हेमंत चौधरी व त्यांची चमू करीत आहे, हे निश्चितच एक आशादायी चित्र असल्याचे या नाटकाचे सर्वेसर्वा प्राचार्य हेमंत चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलताना सांगितले आहे.



शुल्लक कारणावरुन लाकडी दांड्याने मारुन इसमाला केले जखमी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शुल्लक कारणावरुन एका इसमाला लाकडी दांड्याने मारुन गंभीर जखमी केल्याची घटना काल 8 फेब्रुवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास यवतमाळ रोड वरील नटराज ट्रेडर्स समोर घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील दामले फैल येथे राहणारा राहुल रमेश रामटेके (47) हा यवतमाळ रोड वरिल नटराज ट्रेडर्स या दुकानात हमाली करुन चौकीदारी करायचा. आरोपी महादेव वाढई (60) रा. दामले फैल हा त्या दुकाना जवळीलच देशी दारू दुकानात दारू पिण्याकरिता यायचा. 8 मार्चला दुपारी 2 वाजता महादेव वाढई हा दुकाना बाहेर झोपून असलेल्या राहुल रामटेके जवळ आला, व त्याला दुकानातून देशी दारू आणायला सांगितली. राहुलने देशी दारू आणली व तो झोपून असलेल्या ठिकाणी ठेवली. आरोपी उठल्यानंतर त्याला दारुची शिशी दिसली नाही. महादेवने दारू का आणली नाही म्हणून राहुलशी वाद घालत लाकडी दांड्याने त्याच्यावर प्रहार केला. राहूलच्या उजव्या हातावर व पाठीवर दांड्याचे वार बसले. तसेच त्याच्या डोक्यावर लाकडी दांड्याचा वार बसल्याने त्याचे डोके फुटले व डोक्यातून रक्त वाहू लागले. त्याला गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात जाऊन पोलिसांनी त्याचे बयाण घेतले असता त्याने महादेव वाढई याने लाकडी दांड्याने मारुन जखमी केल्याची तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारी वरुन पोलिसांनी महादेव वाढई याच्या विरुध्द भादंवि च्या कलम 326 नुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपीला अटक केली आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात जमादार बुर्रेवार करित आहे.

कठीण काळातही सोडला नाही तिने आंधळ्या पतीचा हात

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : संसारिक जिवनाचची आधारवड बनत स्त्रियांनी आपलं स्त्री दायित्व जोपासलं आहे. कठीण काळातही त्या आधार बनून खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. खडतर वाटांना उडवत त्यांनी ध्येय गाठले आहेत. जीवनातील काळोख आपल्या डोळ्यात साठवून त्यांनी प्रकाशाची वाट मोकळी करून दिली आहे. स्त्री कुणाची प्रेरणा, कुणाची सावली तर कुणाचा आदर्श बनून समोर आली आहे. स्त्रि ही ममतेचा झरा असतांनाच वास्तल्याचा पाझर आहे. तिची रूपं अनेक आहेत. ती माता, भगिनी, पत्नी, मुलगी या सर्वच रूपांची सांगड घालते. माता बनून ती मुलाला घडवते, तर भगिनी म्हणून ती पाठीराखी बनते. पत्नी बनून ती जीव लावते, तर मुलगी म्हणून ती जिव्हाळा जपते. स्त्री आणी पुरुष ही संसाराच्या रथाची दोन चाके आहे, असे म्हणतात. एक चाक जरी डगमगलं तरी संसार डगमगतो. पण जीवनाच्या प्रत्येक वळणावर दोघांचीही एकमेकांना साथ राहिली तर संसाराचा गाडा सुरळीत चालतो. कुठलीही खंत न बाळगता संसाराचा भार वाहतांनाच जोडीदाराचा हात खांद्यावर ठेऊन त्याचा खंबीर आधार बनलेली ही माऊली खडतड वाट तुडवूनही जोडीदाराच्या जीवनाचा प्रकाश बनली आहे. आंधळ्या जोडीदाराशी कुटुंबीयांनी तिची गांठ बांधून दिली. पण तरीही तिने त्याची साथ सोडली नाही. "ज्याच्याशी जीवनाची बांधली गांठ, त्याला जीवनभर देईल साथ" हा निर्धार तिने केला. आंधळ्या पतीचा ती डोळा झाली. पतीच्या लाचारीची ती सदाचारी झाली. कष्ट उपसून तिने संसार फुलवला. अर्धांगिनी म्हणून तिने अर्ध्याच नाही तर पूर्णच संसाराचा भार उचलला. संसार डगमगू दिला नाही. उतरत्या वयातही तिने आपल्या खांद्यावरचा जोडीदाराचा भार व हात सरकू दिला नाही. कष्टाला पर्याय म्हणून आता ती पतीला सोबत घेऊन रस्त्यांनी फिरून भिक मागते. काबाड कष्ट करून मुलांना मोठं केलं. पण मुलं कुटुंबाचा आधार बनली नाही. एक मुलगा व्यसनाच्या आहारी गेला, तर एकाचे मानसिक संतुलन बिघडले. दोनही मुलं त्यांना म्हातारपणातही सुख देऊ शकले नाही. या उतरत्या वयात आई वडिलांना दोन घास देण्याऐवजी मुलं त्यांच्याच तोंडचा घास पळवू लागले. पैशासाठी त्यांनाच मारझोड करू लागले. ते म्हणतात ना, एकदा दुःख शिवलं की, दुःखाचीच सावली माग धरते. या मायमाऊलीचही असच झालं. दुःखाने साथ सोडलीच नाही. पण तिनेही परिस्थीसमोर लोटांगण घातलं नाही. पतीचा सांभाळ करत तिने परिस्थितीशी झुंज दिली, व आजही ती परिस्थीशी झुंज देत आहे. 

घाटंजी तालुक्यातील निर्मलाचा कुटुंबीयांनी मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील जगन गोविंदा कोकुडे या अंध युवकाशी विवाह लावून दिला. जगन कोकुडे हा जन्मतः अंध नसून तो तीन वर्षाचा असतांना त्याला माता (कांजण्या) निघाली, व त्याचे डोळे गेले. त्याने आनंदवन येथे आंधळ्यांच्या शाळेत शिक्षणही घेतले आहे. पण दुर्दैवाने त्याला अपंगाच्या कोठ्यातुन नोकरी मिळाली नाही. दरम्यान निर्मलाचा त्याच्याशी विवाह झाला. पती अंध असतांनाही तिने संसाराची गती होऊ दिली नाही. संसाराचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. त्याचा हात आपल्या खांद्यावर ठेऊन तिने जीवनाची मोट बांधली. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुलं उमलली. या माऊलीने कष्ट उपसून पोरांना मोठं केलं. मुलं कर्ती झाल्यानंतर कुटुंबाला हातभार लावतील अशी जन्मदात्यांना आशा होती. पण मोठा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला. व्यसन भागविण्यासाठी तोच आईकडे पैशाचा तगादा लावू लागला. छोटा मुलगा कुटुंबाचा आधार झाला असतांनाच त्याचे अचानक मानसिक संतुलन बिघडले. तो वेड्यासारखा वागू लागला. आई वडिलांनाच शिवीगाळ करून मारू लागला. आई वडिलांचं घरी राहणं कठीण झालं. अखेर कुणाचा आसरा घेत त्याच्यावर कसाबसा उपचार करून त्याला ठिक केलं. पण लॉकडाऊन काळात त्याला वेळेवर औषधं न मिळाल्याने परत त्याचे मानसिक संतुलन बिघडले. आता त्याच्या उपचारासाठी ही माऊली ग्रामपंचतेसह राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवत आहे. पण कुणीही तिला सहाय्यता करायला तयार नाही. तिच्या मुलाला आज उपचाराची नितांत गरज आहे. पण दातृत्वाची भावना दाखवायला कुणीही तयार नसल्याने तिचा नाईलाज होत आहे. तिच्या घराला तडे गेले आहेत, पण ग्रामपंचायत तिला घरकुल द्यायला तयार नाही. अपंगांसाठी शासनाच्या अनेक योजना असतांनाही कोकुडे परिवाराला त्यापासून वंचित राहावं लागत आहे. अंध जगन कोकुडे याला बासरी वाजविण्याची कला अवगत आहे. पण प्रशासनाची उदासीनता त्याला त्याचा छंदही जोपासू देत नाही. कुणीही त्याला मदत करायला तयार नाही. अंध जगन कोकुडे याला निराधार सहाय्यता निधी मिळते, पण माऊलीला मात्र मिळत नाही. कुंभा गावावरून काही दिवस मारेगाव तर काही दिवस वणी येथे रस्त्यांनी फिरून ही माऊली अंध पतीला सोबत घेऊन मागील काही वर्षांपासून भीक मागते. तिला भीक मागणे पसंत नाही, तिला मदतीची आस आहे. मुलगा मानसिक आजारातून बरा व्हावा, याकरिता ती ज्याला त्याला सहाय्यता मागत आहे. पण तिची नुसती अव्हेलनाच सुरु आहे. लोकप्रतिनिधींकडे ती नेहमी मदतीसाठी साकडे घालत असते. पण तिला मदत करण्यास कुणाचेही हात सरसावत नाही. तरीही ती कुणीतरी सहाय्यता करेल, या भाबळ्या आशेवर आपली आपबिती कथन करत असते.

कोलडेपो व कोळसा व्यवसायामुळे वाढले धुळीचे प्रदूषण, कोळशाच्या धुळीमुळे नागरिकांना जडले जीवघेणे आजार


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी तालुक्यातील चिखलगाव हद्दीत येणाऱ्या कोलडेपोंमुळे मानवी आरोग्य धोक्यात आले असून माणसांच्या जिवनाचाच ऱ्हास होऊ लागला आहे. कोलडेपोंमधून सतत उडणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे येथील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले असून या जीवघेण्या आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. कोळशाच्या धुळीमुळे उद्भवणाऱ्या आजारांचा सामना करतांना नागरिकांच्या जिवीतास धोका झाल्यास त्यासाठी प्रशासनाला जबाबदार धरले जाईल. त्यामुळे वेळीच धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवून कोलडेपो धारकांना पर्यावरणासंबंधीचे नियम पाळण्याची सक्त ताकीद देण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कोळशाच्या उडणाऱ्या धुळीमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात न आल्यास १४ मार्च पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादीचे स्वप्नील धुर्वे यांनी दिला आहे. 

चिखलगाव हद्दीत येणाऱ्या लालपुलिया परिसरात अनेक छोटे मोठे कोळसा व्यवसाय व कोलडेपो आहेत. या कोलडेपोंना प्रशासनाने नियम व शर्तींवर व्यवसायाची परवानगी दिली आहे. परंतु कोळसा व्यवसायी व कोलडेपो धारक पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करत आहेत. कोलडेपोमध्ये कोळशाची छाननी व कोळसा मिक्सिंग करतांना सारखा कोळशाचा धूळ उडत असतो. तसेच ट्रकांमधून कोळसा खाली करतांनाही कोळशाचा धूळ उडतो. काही कोलडेपो धारकांनी कोळशातुन चुरी वेगळी करण्याकरिता छोटे बनकर तयार केले आहेत. त्या बनकर मधून मोठ्या प्रमाणात काळा धूळ उडत असतो. कोलडेपो धारक व कोळसा व्यावसायिकांचा मनमानी कारभार सुरु असून प्रदूषण नियंत्रणाकडे त्यांचे कायम दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते. नांदेपेरा रेल्वे क्रॉसिंगच्या काही अंतरापासून तर निंबाळा फाट्याच्या जवळपास कोळसा व्यावसायिकांनी कोळशाचे प्लॉट थाटलेले आहेत. या कोळसा प्लॉटवर दररोज शेकडो ट्रक कोळशाची वाहतूक करतात. वणी यवतमाळ हा मुख्य रहदारीचा रस्ता असतांनाही या रस्त्याची साफसफाई व या रस्त्यावर पाणी मारण्याचे सौजन्यही कोळशा व्यवसायातून लाखोंची उलाढाल करणारे हे कोळसा व्यवसायी दाखवतांना दिसत नाही. वणी यवतमाळ रोडवर या कोळशाच्या वाहतुकीमुळे व कोळसा डेपोंमुळे नेहमी धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. कोळसा डेपोंमधून सतत उडणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे लालपुलिया परिसरातील व चिखलगाव येथील नागरिकांना अनेक दुर्धर आजारांनी ग्रासले आहे. नागरिक जीवघेण्या आजारांचा सामना करत आहेत. मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना या धुळीच्या प्रदूषणामुळे त्वचा रोगांपासून तर फुफ्फुसांपर्यंतचे आजार जडले आहेत. त्यांनी उपचाराकरिता लाखो रुपये आणायचे तरी कुठून. शारीरिक विकार व आंतरिक कमतरता निर्माण करणाऱ्या या धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण न मिळविल्यास अनेकांच्या जिवीताला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळे कोलडेपो व कोळसा प्लॉट मधून कोळशाची धूळ उडून प्रदूषण होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, व प्रदूषण नियंत्रणात आणावे. तसेच कोळशाच्या उडणाऱ्या धुळ प्रदूषणामुळे विविध आजारांचा सामना करणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने वैयक्तिक सुविधा पुरवाव्या. अन्यथा १४ मार्च पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीचे स्वप्नील धुर्वे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

निवेदन देतांना स्वप्नील धुर्वे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष धीरज कुचनकर, कर्मा तेलंग, वैशाली तायडे, राजाभाऊ डावे, तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, शहराध्यक्ष मनोज वाकटी, विद्यार्थी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रणय बलकी, शहराध्यक्ष संदेश तिखट, चिखलगावचे ग्रा.प. सदस्य अंजुम शेख, संगीता वानखेडे, सुनिता कातकडे, वैशाली लिहितकर आदी उपस्थित होते.

लालपुलीयातील कोळसा डेपो हटवा, चिखलगाव वाचवा


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या लालपुलिया परिसरात अनधिकृत थाटलेल्या कोळशाच्या डेपोतून निघणाऱ्या धुळीचा भस्मासुर येथील ग्रामस्थांच्या जीवावर बेतला आहे. परिणामी अनेकांना दुर्घर आजाराने ग्रासले आहे. सदर अनाधिकृत कोळसा डेपो तात्काळ न हटविल्यास येत्या १४ मार्च ला सर्व नागरिकांना सोबत घेऊन कोळशाचे वाहन  परिसरात येऊ देणार नाही असा ईशारा राष्ट्रवादी चे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

शहरालगत असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या लालपुलिया परिसरात अनधिकृत कोळसा डेपो थाटले आहेत. या कोळसा डेपोतून निघणाऱ्या घुळीने चिखलगाव येथील सर्व नागरिकांना  दमा किडनीचे आजार, हृदयविकार, अनेक असे दुर्धर आजार जडले आहेत .लालपुलिया येथील कोळसा डेपोधारक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे कोणतेही पालन करीत नाही .परिणामी धुळीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.

घरात धुळीचा खच पडलेला आहे . या गावातील सर्वच धुळ प्रदूषणाने ग्रासलेले आहे, रुग्ण मोलमजुरी करून जगणारे आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर रुग्णांना महसूल प्रशासन सेवा पुरविणार की डेपोधारक पुरविणार याचा खुलासा उपविभागीय अधिकारी यांनी करावा. धुळीने ग्रासलेल्या लोकांना सुविधा पुरवून त्यांच्या जीवित्वाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. अन्यथा चिखलगाव येथील रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आणणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
लालपुलिया परिसरात असलेले अनधिकृत कोळसा डेपो येत्या सात दिवसात न हटविल्यास १४ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लालपुलिया परिसरात आंदोलन उभारून डेपोत कोळशाचे एकही वाहन येऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष धीरज कुचनकर, राजु दावे, कर्मा तेलंग, वैशाली तायडे, तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, शहराध्यक्ष मनोज वाकटी, शहर उपाध्यक्ष रामकृष्ण वैद्य, विद्यार्थी चे तालुकाध्यक्ष प्रणय बलकी, शहराध्यक्ष संदेश तिखट, चिखलगाव चे ग्रा.प.सदस्य अजुंम शेख, संगीता वानखेडे, सुनीता कातकडे, वैशाली लिहीतकर, रियाज शेख आदींनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

यावेळी पोलीस विभागातील गोपनीय विभागातील कर्मचारी हजर होते.

महादेवाला जाऊन ६० किलो वजनाचा नंदीची मुर्ती नंदीगढा वर स्थापन करुन वणीतील भाविकांनी रचला इतिहास


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : येथील सुप्रसिद्ध मूर्तीकार नथ्थु डुकरे यानी ६० किलोची नंदी ची मुर्ती तयार करुन वणीतील भाविकांना सोबत घेऊन मध्य प्रदेश येथील नंदीगढा वर त्या मुर्ती ची स्थापना करुन एक प्रकारचा इतिहास वणी तील या भाविकांनी रचला.

या भाविकांनी नंदी च्या मुर्तीला जमीनी पासुन जवळपास ७० ते ८० हजार फुट उंच वर चढवली, चढवत असतांना आपल्या जिवाची पर्वा न करता हे महादेवाच्या भक्तानी  वणी चा नावाची नोंद इतिहासात रचली.
प्रसिद्ध मूर्तीकार नथ्थु डुकरे यांनी आपल्या आई वडीलांच्या स्व. लटारी संभाजी डुकरे व गंगुबाई लटारी डुकरे यांचा स्मृतिप्रीत्यर्थ नंदीच्या मुर्ती ची स्थापना केली, त्यांचाबरोबर त्यांचे सहकारी संदीप धांडे, दत्ता गुरनुले, राहुल उपाते, आकाश उपाते, उमेश मोहुर्ले, अमित चौधरी, पियुष खामणकर, रवी राळे, सुयोग भेडांळे, गौरव मडावी, गुणवंत गोलर, अनिकेत सोनटक्के, प्रवीण खामणकर, विठ्ठल डुकरे व त्याचे इतर सहकारी सोबत होते.

सत्कारमुर्ती नथ्थु डुकरे यानी सांगीतले की या मूर्तीची स्थापना करा साठी त्याना कीती कष्ट करावे लागले, ४०० वर्षा नंतर नंदीगढा वर ही मुर्ती स्थापन झाली, त्याचा सर्व सहकारी मित्राच्या सोबती मुळे  व माऊली च्या आशीर्वादाने मुर्ती ची स्थापना झाली. त्यांचा या कार्यामुळे वणी चा नावाची नोंद मध्यप्रदेश मधील नंदीगढा वर करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी या भाविकांची केलेल्या कार्याची दखल घेऊन आपल्या टिम ला सोबत घेऊन वणी येथील महालक्षी मंदिरात भाविकांचा सत्कार केला.

यावेळेस त्यांचासोबत युवक जिल्हा उपाध्यक्ष धीरज कुचनकर, महेश पिदुरकर, राजुभाऊ डावे, तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे,शहराध्यक्ष मनोज वाकटी,उपाध्यक्ष रामकृष्ण वैद्य,विद्यार्थीचे तालुकाध्यक्ष प्रणय बल्की व  शहराध्यक्ष संदेश तिखट, अमोल चामाटे, मुकेश कडु आदी पक्षाचे कार्यकर्ते  उपस्थित होते.

शिक्षक नेते,सत्कार मुर्ती मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा सत्कार!


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : तालुक्यातील जि.प.शाळा मोहोर्ली येथे कार्यरत असलेले,मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा आज (ता.४) मार्च शुक्रवारला निरोप समारंभ संपन्न झाला.

"ज्ञान रुपी समुद्रातील देवमासा म्हणजेच शिक्षक "त्यांच्या हातुन हजारो विद्यार्थी घडुण,समाजामध्ये आपले योगदान देत असतात,त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत सर्वांत मोठा दुआ म्हणजेच शिक्षक असे मत बोलतांनी मा.मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहुर्ली येथील सरपंच दिपमाला वडसकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.कविता टेकाम, धनराज टेकाम उपसरपंच-छाया मडावी, ज्योती टेकाम, कवडू वडसकर, सुधीर गौरकार ग्रामपंचायत सदस्य, केंद्र प्रमुख नामदेव बोबडे, केंद्र मुख्याध्यापक मारोती उपरे, शाळा समिती सदस्य पुष्पा राजुरकर, संगीता टिकले, गंगुबाई टेकाम, संगीता जाधव, प्रमोद कन्नाके, मंगेश आत्राम, अरविंद राजुरकर, राकेश दुबे,यांचे उपस्थिती होती. यावेळी मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा शाल,श्रीफळ,व भेट वस्तु देवून सत्कार करण्यात आला. तसेच चिखलगाव केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या वतीने मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशोक चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. जि.प.शाळा मोहोर्लीच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते.

यावेळी मा.मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी जि. प.शाळा मोहोर्ली येथे तांत्रिक साहित्या करीता रू ५०००/- रु.चा धनादेश मुख्याध्यापिका सौ.लक्ष्मी धुर्वे यांचे कडे देणगी स्वरूपात देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.लक्ष्मी धुर्वे यांनी केले. तर सुत्र संचालन शिक्षक राजेंद्र आसुटकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी उत्तरवार, कु.कोयल जिवतोडे (शिक्षिका) तंटामुक्त अध्यक्ष शंकरराव टेकाम, संजय उरकुडे, माजी अध्यक्ष प्रमोद टेकाम, सदस्य शंकरराव बोढाले, धिरज तायडे यांनी परिश्रम घेतले. कु.राखी चौधरी यांनी मान्यवरांचे आभार मानले.

यावेळी चिखलगाव केंद्रातील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, स.शिक्षक, शिक्षिका व मोहोर्ली गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

लढा शिक्षणाचा विद्यार्थीच्या हक्का चा चळवळीतील कार्यकर्त्यांना पद देऊन केला त्यांचा सन्मान


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : येथे आज विश्राम गृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन विद्यार्थ्यांना नियुक्तपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. विद्यार्थी चळवळीत काम करणा-या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र यावेळी देण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रितेश बोबडे यांनी हि नियुक्ती केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
ना जयवंतराव पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, सुनील गव्हाणे व पश्चिम विदर्भ अध्यक्ष अविनाश चव्हाण यांच्या आदेशानुसार वणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी प्रणय बलकी तर शहर अध्यक्षपदी संदेश तिखट यांची नियुक्ती करण्यात आली.

वणी विभागा मध्ये लढा शिक्षणाचा विद्यार्थीच्या हक्काचा या चळवळीतील स्वप्नील धुर्वे यांच्या सातत्याने सोबत असणारे हे विद्यार्थी आज महत्वाचा पदावर नियुक्त झाले आहे.

विद्यार्थीची चळवळ उभी करुन त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता त्यांच्या प्रवेशा करीता यात संघटनेच्या प्रत्येक व्यक्तीचा खुप मोठा लढा वणीकराना अनुभवला आहे, चळवळीतील कार्यकर्त्यांना त्यांचा नियुक्तपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी पक्षाचे जेष्ठ नेते विजय नगराळे, महेश पिदुरकर,कर्मा तेलंग, जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे, तालुकाध्यक्ष सुर्यकांत खाडे, युवक उपाध्यक्ष धीरज कुचनकर, युवक तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, युवक शहराध्यक्ष मनोज वाकटी, राजु उपरकार, राजुभाऊ डावे, रामकृष्ण वैद्य, वैशाली तायडे व विद्यार्थी वर्ग उपस्थित पती व त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

या नियुक्ती मुळे वणी विभागात विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

कोळसा वाहतूक करणारा ट्रेलर उलटून एकाचा मृत्यु

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : कोळसा वाहतूक करणारा ट्रेलर उलटून झालेल्या अपघातात ट्रॅकमध्ये बसलेला युवक मरण पावल्याची घटना वणी रोडवरिल संविधान चौकाच्या वळण रस्त्यावर काल रात्री उशिरा घडली. ट्रक चालक मात्र सुखरुप असल्याचे समजते.

उकणी कोळसाखाणीतून साई वर्धा पॉवर प्लान्ट येथे कोळसा घेऊन जाणारा ट्रेलर क्रमांक MH 40 BG 4283 हा संविधांन चौकातील वळण रस्त्यावर उलटला. वळण घेतांना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यने हा अपघात घडल्याचे बोलल्या जात आहे. ट्रक चालक विनोद गौरकर हा सुखरुप असुन ट्रकमध्ये बसलेला सुरज ठाकुर हा युवक ग्रामीण रुग्णालयात आणताना मरण पावल्याची चर्चा आहे. हा युवक ट्रान्स्पोर्ट कंपनीत कार्यरत नसतांना ट्रकमध्ये कशासाठी गेला ही चर्चा ऐकायला मिळत आहे. सुरज ठाकुर याचे लग्न होऊन जेमतेम 25 दिवस झाले होते. त्याचे असे अपघाती निधन झाल्याने कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सुखी संसाराचे स्प्वप्न रंगविलेल्या नववधूचे तो अर्ध्यावर संसार सोडून गेल्याने स्वप्न भंगले आहे. त्याच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

गौरकार कॉलनी येथे घरफोडी, चोरट्यांनी रोख रक्कमेसह चांदीच्या वस्तूंवर केला हाथ साफ

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहर व तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून हे चोरटे बंद घरांना टार्गेट करू लागले आहेत. महाशिवरात्री निमित्त परिवारासह बाहेरगावी गेलेल्या गौरकार कॉलनी येथिल रहिवाशाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीच्या वस्तूंसह रोख रक्कमेवर हाथ साफ केल्याची घटना १ मार्च ते ३ मार्च दरम्यान घडली. कुटुंब प्रामुखाने आज ३ मार्चला सायंकाळी ६.४५ वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. 

गौरकार ले-आऊट, दत्त मंदिर मागे राहणाऱ्या कुंतलेश्वर नागोराव तुरविले (५६) यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. कुंतलेश्वर तुरविले हे खाजगी शिकवणी वर्ग घेतात. ते महाशिवरात्री निमित्त कुटुंबासह जळका ता. मारेगाव येथे गेले होते. घराला कुलूप लागले असल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेऊन असलेले रोख १२ हजार ८०० रुपये, २० ग्राम वजनाचा चांदीचा गडवा किंमत १०६० रुपये, चांदीचे १० ग्रामचे ३ व २० ग्रामचा एक सिक्का किंमत २५०० रुपये, असा एकूण १६ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांच्या शेजारी राहणारे रोहित भुसारी यांनी त्यांना फोन करून तुमच्या घराचे दार खुले असल्याचे सांगितले. त्यांचा फोन येताच तुरविले यांनी घराकडे धाव घेतली. घरी पोहचताच त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच पोलिस स्टेशनला येऊन घरी चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करित आहे.

ओव्हरलोड रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रक महसूल विभागाने पकडले

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून दोन ब्रास रेतीच्या रॉयल्टीवर पाच ते सहा ब्रास रेती वाहनामध्ये भरून आणली जात आहे. रेती घाटांवर गैरप्रकार सुरू असून शासनाचा महसुल वाळू माफिया गिळंकृत करू लागले आहेत. दोन ब्रासच्या रॉयल्टीवर पाच ते सहा ब्रास रेती वाहनामध्ये भरून सर्रास रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. जादा नफा मिळविण्याच्या प्रयत्नात वाळू माफियांकडून हा गोरखधंदा सुरु आहे. प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून अवैधरित्या अतिरिक्त रेती ट्रकांमध्ये भरून विक्रीकरिता आणणाऱ्या दोन ट्रकांवर महसूल विभागाने कार्यवाही केली आहे. दोन ब्रास रेतीचा परवाना असतांना जास्त रेती भरून आणणाऱ्या दोन्ही ट्रकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. 

रेती घाटांचे लिलाव करून अधिकृत रॉयल्टी देण्यात आली असतांनाही अधिक नफा कमविण्याच्या नादात वाळू माफिया रेती वाहतुकीत गैर प्रकार करीत आहे. दोन ब्रासची रॉयल्टी घेऊन पाच ते सहा ब्रास रेती ट्रकांमध्ये भरून सर्रास विक्रीकरिता आणली जात आहे. वाळू माफियांकडून शासनाची शुद्ध फसवणूक सुरु असून रॉयल्टीच्या आडून शासनाच्या महसुलावर डल्ला मारण्याचे प्रकार सुरू आहे. दोन ब्रासच्या परवान्यावर पाच ते सहा ब्रास रेती वाहनांमध्ये भरून विक्री केली जात आहे. रेतीच्या या चोरट्या व्यवहारातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. घाटांमधील रेती अक्षरशः ओरबाडून टाकण्याचा घाटमालकांचा प्रयत्न सुरु आहे. दोन ब्रास रेतीचा परवाना असतांना जास्त रेती भरून आणणाऱ्या MH २९ BE २६१६ व MH ३४ BE ४९७५ या दोन वाहनांवर महसूल विभागाने कार्यवाही करून ट्रक तहसील कार्यालयासमोर लावले आहेत. अधिकृत रॉयल्टीचा वाळू माफियांकडून गैरफायदा घेतला जात आहे. दोन ब्रास ऐवजी वाहनामध्ये पाच ते सहा ब्रास रेती भरून विक्री केली जात आहे. यातून वाळू माफियांना चांगलाच आर्थिक लाभ मिळत आहे. MH २९ BE २६१६ या ट्रक चालका जवळ गडचिरोली जिल्ह्याची रॉयल्टी असून ट्रकमध्ये दोन ब्रास पेक्षा जास्त रेती असल्याचे महसूल विभाकडून सांगण्यात आले आहे. हा ट्रक संजय जुनगरी याच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही ट्रकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असून दंड भरल्यानंतर हे दोन्ही ट्रक सोडण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

कोळसा वाहतुकीमुळे प्रदूषणात झाली मोठी वाढ, रस्त्यांवरही निर्माण झाले खड्डे, ब्लास्टिंगमुळे घरांना पडले तडे तर मातीच्या ढिगाऱ्यांमुळे शेतात साचू लागले तळे

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील कोळसाखाणींमधून रेल्वे साईडींग व विद्युत निर्मिती केंद्रांना रस्ते मार्गाने होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे धुळीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कोळसाखाणींकडे जाणाऱ्या व नव्यानेच तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यातल्यात्यात काही कोळसाखाणींमधून सर्रास ओव्हरलोड वाहतूक सुरु असल्याने मागील काही दिवसांत दोन्ही समस्या चांगल्याच वाढल्या आहेत. कोळशाची वाहतूक करतांना कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने प्रदूषणाची समस्या तर ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्यास व जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या या दोन्ही समस्यांच्या तक्रारी राजकीय व सामाजिक पुढाऱ्यांनी वेकोलि मुख्य महाप्रबंधकांपासून तर मंत्र्यांपर्यंत केल्या आहेत. 

कोळसाखाणींमुळे वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोळसाखाणींमधून होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण निर्माण झाले आहे. कोळसाखाणींकडे जाणाऱ्या मार्गांवर नेहमी काळ धुकं पसरलेलं असतं. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून रस्त्यावर पडणाऱ्या कोळशाची भुकटी तयार होऊन ती धूळ बनून सतत उडत असते. या धुळीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोळशाच्या उडणाऱ्या काळ्या धुळीमुळे येथील जनतेचं जीवनचं काळवंडलं आहे. प्रदूषणाचा दर शंभरी पार झाला आहे. या वाढत्या प्रदूषणाकडे शासन व प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. राहुटी वस्त्यांलगत वणी येथे दोन रेल्वे साइडिंग आहे. या कोळशाच्या साईडिंगवर शेकडो ट्रक दररोज कोळशाची वाहतूक करित असतात. मालवाहू रेल्वेमध्ये कोळसा भरतांना परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. कोळशावर व रस्त्यांवर मुबलक पाणी मारण्याची व्यवस्थापकांकडून जराही तसदी घेतली जात नाही. वणी व राजूर येथे रहिवासी वस्त्यांजवळ कोळशाचे मालधक्के असून हे मालधक्के रहिवासी वस्त्यांपासून दूर नेण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. पण काळ्या कोळशात हात रंगलेल्यांनी या मागण्यांकडे दुर्लक्ष करित नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु ठेवला आहे. या कोळशाच्या धुळीमुळे नागरिकांचे जीवनमान खालावले असून त्यांना अनेक जीवघेणे आजार जडले आहेत. प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष होत असल्याने या कोळसाखाणी आता नागरिकांसाठी शाप ठरू लागल्या आहे. 
कोळशाच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. उकणी कोळसाखाणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घोन्सा गावाकडे जाणारा रस्ताही खड्यांनी व्यापला आहे. राजूर फाट्यापासून भांदेवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याचीही अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. प्रमुख रहदारीचे रस्ते असलेल्या या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहे. या रस्त्यांवरून वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. काही कोळसाखाणींमधून सर्रास ओव्हरलोड वाहतूक सुरु असतांना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. काळ्या कोळशाची काळी माया, कशी जाऊ द्यायची वाया, कोण जाईल या जनतेला सांगाया, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. कुणीही या समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. कोळसाखाणींमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंमुळे घरांना तडे पडले आहेत, दगड ढेले उसळून शेतात पडत आहेत, कोळशाच्या धुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे, ब्लास्टिंसाठी वापणाऱ्या बारुदच्या वासामुळे श्वास घेणे कठीण झाले आहे, कोळसाखाणींमध्ये उत्खनन करून मातीचे गावाभोवती ढिगारे तयार करण्यात आल्याने गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे भुस्खननाची भितीही निर्माण झाली आहे. मातीच्या मोठमोठ्या ढिगाऱ्यांमुळे नदीनाल्यांचा प्रवाह बदलला आहे. नाल्यांचे पाणी शेतात शिरून पिकांची हानी होऊ लागली आहे. परंतु शहर प्रशासन व वेकोलि प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वेकोलिच्या कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या या सर्व समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविल्या जात असतांनाही यावर समाधानकारक तोडगा निघत नाही. वेकोलिने नागरिकांच्या आरोग्याशी व जीविताशी खेळ चालविला असून कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल साळवे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तर सामाजिक कार्यकर्ते प्रदिप बांदूरकर यांनी वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

एकाधिकारशाही गाजवणारा तो अधिकारी झाला सेवानिवृत

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : एकाधिकारशाही गाजवणारा तो अधिकारी अखेर सेवानिवृत्त झाला. आपल्या कार्यकाळातील विविध कारामतींमुळे हा अधिकारी नेहमी चर्चेत राहिला. उर्मटपणा व अहंकारी बाणा हा त्याचा स्वभावगुण होता. आक्रमक शैलीचा तो पुरस्कर्ता होता. आक्रमक शैलीमुळे त्याने अनेकांचा रोष ओढवून घेतला. विरोधाभासी प्रवृत्तीमुळे त्याला अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्याचे कधी कुणाशीच पटले नाही. या अधिकाऱ्याच्या त्रासदायक वागणुकीमुळे कार्यालयीन कर्मचारीही वैतागले होते. कारण कर्मचाऱ्यांशी बोलतांना हा अधिकारी नेहमी शिवराळ भाषा वापरायचा. त्याच्या सेनिवृत्तीसाठी सर्वच आतुर झाले होते. बरं झालं रिटायर झाला, हे एकच वाक्य सर्वांच्या तोंडून ऐकायला मिळालं. सेवानिवृत्तीचा काळ जवळ येताच त्याने टक्केवारीही वाढवली. त्यामुळे अनेक विकासकामांना खीळ बसली. त्याच्या वाढलेल्या टक्क्यांमुळे सेवकांनी निधीची उलाढाल व कंत्राटदारांनी कामेच थांबवून दिली. विकासकामांतही गटबाजी करणारा असा हा अधिकारी होता. तो सेनिवृत्त झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. या अधिकाऱ्याने अधिकाराचा वापर करत अनेक कारनामे केले, व अनेक कारनामे पचवलेही. फॅगिंग मशीन व्यवहारात त्याच्या बदलीची मागणी झाली, पण ते प्रकरण त्याने पद्धशीरपणे हाताळलं. मधातल्या काळात चौकशी समित्यांच्या चौकशीलाही त्याला सामोरे जावं लागलं, पण त्याच काहीही वाकडं झालं नाही. कार्यालयात पत्रकारांसाठी त्याने नोटीस लावून पत्रकारांची नाराजी ओढवून घेतली. शासकीय कार्यालयाला स्वतःची जहागीरदारी समजणारा हा अधिकारी कित्येकदा तोंडघशी पडला. पण अकड मात्र गेली नाही. कुणाशीही वाद घालण्यामुळे त्याचा कार्यकाळ हा वादग्रस्त ठरला. कोरोनाचे कडक निर्बंध असतांना हा अधिकारी कार्यालयात विना माक्स वावरायचा. नियमांचे पालन करण्याऐवजी नियमांना पायदळी तुडविण्याचं काम या अधिकाऱ्याने केलं. कार्यालयात स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याचा पराक्रमही त्याने आपल्या अधिकाराचा वापर करून केला. वाढदिवसाचा भन्नाट सोहळा साजरा केला. कार्यालयाला एक दिवसाची अघोषित रजाच त्याने देऊन टाकली. गेटवर चपराशी तैनात केले. ते फक्त साहेबांच्या वाढदिवसाकरिता आलेल्यानाच आत जाऊ देत होते. साहेबांवर स्तुती सुमनांचा वर्षाव करणारे स्तुती पाठकाचे गोडवे माईकवरून ऐकायला मिळत होते. त्याला नाईलाजास्तव वाजवाव्या लागणाऱ्या टाळ्यांचा गडगडाट होत होता. कार्यालयात वाढदिवस साजरा करणारा हा पराक्रमी अधिकारी संपूर्ण तालुक्यात चर्चेस पात्र ठरला. या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या दोन दिवसाआधी पंचायत समिती कार्यालयाला आग लागली. सर्व योजनांचे महत्वपूर्ण दस्ताऐवज या आगीत जळून खाक झाले. ही आग कशी लागली, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. या आगीबाबत या अधिकाऱ्यानेच संशय व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात असे अवचित प्रकार घडले. या अधिकाऱ्याच्या अशाच प्रतापांमुळे त्याची बढती न होता गळती झाली. त्याला सक्तीच्या रजेवर पाठवले, व याकाळात तो येथेच स्थिरावला. त्याच्या वागणुकीमुळे तर प्रत्येकाचीच तळपायाची आग मस्तकात जायची. त्याच्या शब्द प्रयोगामुळे कित्येकदा वादही उद्भवले. आता हा अधिकारी कौटम्बिक जिवनात कसा वावरेल व कुटुंबियांना कशी वागणूक देईल, ही चर्चा आता या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर ऐकायला मिळत आहे. या अधिकारयाच्या सेवानिवृती नंतर येथिलच एका अधिकारयांकडे प्रभार देण्यात आला आहे.

धान्याचे चुकारे थकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या धान्याचे कास्तकारांना अद्यापही चुकारे न मिळाल्याने कास्तकार व बाजार समितीची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी कास्तकार व बाजार समितीची कोट्यावधी रुपयांनी फसवणूक करण्याऱ्या दोन व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कास्तकारांच्या धान्याची व्यापाऱ्यांमार्फत खरेदी केली जाते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी धान्याची बोली लावून कास्तकारांकडून धान्य खरेदी करतात. बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी विक्रीचा हा व्यवहार चालतो. ५ जानेवारी २०२२ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कास्तकारांनी विक्रीकरिता आणलेले धान्य बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी धीरज अमरचंद सुराणा रा. बन्सल ले-आऊट, दत्त मंदिर याने खरेदी केले. या व्यापाऱ्याची रुपेश नवरतनमल कोचर रा. पद्मावती नगर याने हमी घेतली होती. कास्तकारांचे धान्य घेतल्यानंतर व्यापारी व जमानतदार दोघेही धान्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. धान्य खरेदी केल्यानंतर २४ तासांच्या आत धान्याच्या चुकाऱ्याची रक्कम कास्तकाराच्या खात्यात जमा होणे अनिवार्य असते. पण महिना लोटूनही कास्तकारांना अद्याप धान्याचे चुकारे मिळाले नाही. व्यापाऱ्यांना वारंवार नोटिसा बजावूनही ते धान्याची रक्कम अदा करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे कास्तकार व बाजार समितीची त्यांनी फसवणूक केल्याचे दिसून येते. या व्यापाऱ्यांनी १४७ कास्तकारांकडून जवळपास १९३५.०२ क्विंटल धान्य (चना, तूर, सोयाबीन) खरेदी केले असून त्या धान्याचे बाजार मूल्य १ कोटी १३ लाख ७८ हजार १३१ रुपये एवढे आहे. बाजार समितीचे सेवा शुल्क देखिल या व्यापाऱ्यांनी भरले नसून ८५ हजार ३३५ रुपये या व्यापाऱ्यांकडे थकीत आहे. कास्तकार व बाजार समितीचे मिळून १ कोटी १५ लाख २६ हजार ४६ रुपये या व्यापाऱ्यांकडे थकीत असून पैसे देण्याची त्यांची नियत नसल्याने ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यांना गुन्हे दाखल झाल्याचे कळताच त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठीही प्रयत्न केल्याचे समजते. धीरज अमरचंद सुराणा हा बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी असून त्याचा परवाना नंबर ०७ हा आहे. या जेम्सबॉन्ड ने कोट्यवधी रुपयांचे धान्य हडप केले आहे. मागील दोन वर्षांपासून संकटांचा सामना करणाऱ्या कास्तकारांच्या तोंडचा घास या व्यापाऱ्यांनी पळवला असून त्यांना आर्थिक संकटात टाकले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या कास्तकाराच्या पोटावर मारून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या या लबाडांवर बाजार समितीचे सचिव अशोक काशीनाथ झाडे (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि च्या कलम ४०६,४२०,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत असून लवकरच त्यांना गजाआड करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोउपनि शिवाजी टिपूर्णे करीत आहे.

मोची मादिगा मादगी मादरू महासंघाची वणी तालुका व शहर कार्यकारणी गठीत


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : वणी तालुक्यातील लालगुडा येथे मादगी समाजाची तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून या कार्यक्रमात समाजातील दिगज्यांची उपस्थिती होती त्यात उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडीत सांगितले की,समाज कोणत्याही प्रकारे पिछाडता कामी नये जोमाने कामी लागा आपण एकजूट होऊन पूर्ण पणे समाज घडविण्याकरिता प्रयत्न करू असे यावेळी उपस्थितांनी बोलून दाखविले. 
     
दिनांक 28,02,2022 सोमवार लालगुडा येथे वणी तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी M4 महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख सोमेश्वर येलचेलवार, M4 महाराष्ट्र सल्लागार चरणदासजी कोंडावार, जेष्ठ समाजसेवक शितलजी कलवलवार, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल शंकावार, विदर्भ उपाध्यक्ष प्रभाकर लिक्केवार, महाराष्ट्र उपाध्यक्ष M4 नत्थुजी नगराळे यांच्या विशेष उपस्थितीत सभा पार पडली यावेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करीत समाजाप्रती असलेली जान दाखवीत नवीन वणी तालुका तथा शहर कार्यकारिणीचीएकमताने घोषणा करण्यात आली. 
    
वरील मंडळींच्या विशेष उपस्थितीत वणी तालुका अध्यक्ष सुरज रमेश चाटे, कार्याध्यक्ष पदी नागेश मोहूर्ले, उपाध्यक्ष पदी राकेश शंकावार, सचिव पदी अरुण येनपल्लीवार, कोषाध्यक्ष पदी प्रमोद नगराळे, सहसचिव पदी अर्जुन शेंग्रपवार, तर शहर कार्यकारिणीत शहर अध्यक्षपदी विक्की मधुकर परगंटीवार, कार्याध्यक्ष पदी शिवकुमार नलभोगे, उपाध्यक्ष पदी रवी दुर्गाजी कोमलवार, सचिव पदी कैलास पोन्नलवार, सहसचिवपदी विशाल लिंगमपल्लीवार, कोषाध्यक्ष पदी संदेश नत्थुजी नगराळे तर कार्यकारी सदस्य म्हणून घनश्याम नगराळे यांची निवड करण्यात आली असुन सभेला मादगी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन नत्थुजी नगराळे यांनी तर आभार अरुण येनपल्लीवार यांनी मानले.