Showing posts with label मारेगाव. Show all posts
Showing posts with label मारेगाव. Show all posts

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम - आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी "माझी माती,माझा देश" या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केल्याचे प्रतिपादन वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. पंचायत समिती मारेगाव येथील प्रांगणात "माझी माती, माझा देश" अंतर्गत अमृत कलशांचे श्री. बोदकुरवार यांच्या हस्ते तालुक्यातील सर्व एकत्रित केलेली माती दिल्ली जाणाऱ्या स्वयंसेवकांकडे सुपूर्द करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार उत्तम निलावाड, मुख्याधिकारी अरुण भगत, गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी दिनकरराव पावडे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, भाजपाचे अविनाश लांबट, कृषी अधिकारी वानखेडे, वाघमारे, नगर पंचायतचे नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की, ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी मुनेश्वर, भारतीय जनता युवा मोर्चाचे अनुप महाकुलकर, यांच्यासह सर्व अधिकारी, विभाग प्रमुख, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात माझी माती, माझा देश अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगून आमदार श्री. बोदकुरवार म्हणाले की, शहिद, वीर, जवानांना अभिवादन करून देशपातळीवरील एक अतिउच्च स्मारक दिल्लीमध्ये तयार होत आहे, वणी विधसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून मला अभिमान आहे, कारण मी या महोत्सवात सहभागी होता आले, पुढे बोलताना म्हणाले की, त्याठिकाणी ही आपल्या प्रत्येक गावातील, देशभरातील माती समर्पित करणार आहोत. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिलेला हा एक स्तुत्य उपक्रम तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्यासह संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायत शाळा मिळून तालुका भर साजरा केला.
सुरुवातीस पंचायत समितीच्या आवारामध्ये तालुकास्तरावरून आणलेल्या अमृत कलशांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भजन गायन, शपत घेण्यात आली.  गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे अमृत कलश सुपुर्त केले. तसेच पंचायत समिती ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अशी अमृत कलश यात्रा पार पडली. शेवटी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात या यात्रेचा समारोप करण्यात आला.

जगात स्वाभिमानाने जगण्यासाठी आदिवासींना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही- आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जगात स्वाभिमानाने जगायचं असेल तर शिक्षण घ्यावेच लागेल. आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचा टक्का पाहिजे तसा वाढला नाही, त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी १ हजार क्षमतेचे मुलांचे व ५०० क्षमतेचे मुलींची आश्रमशाळा बांधण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालय,आदिवासी वसतिगृह भूमिपूजन आणी मुलींचे वसतिगृह लोकार्पण प्रसंगी सांगितले.

पांढरकवडा येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार प्रा.अशोक उईके, संजीव रेड्डी- बोदकुरवार, आदिवासी अप्पर आयुक्त सुरेश वानखडे, प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, नगराध्यक्ष वैशाली नहाटे, आदिवासी बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता उज्वल डाबे उपस्थित होते.

शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांनाही उत्तम दर्जाच्या शाळा, चांगल्या सुविधा आणि शिक्षक देण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच आश्रमशाळेच्या इमारती सुसज्ज आणि परिपूर्ण बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षणाच्या दर्जाप्रमाणे व्यवसाय किंवा नोकरी देण्यासाठी ॲप तयार करण्यात येईल. त्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यावर त्या पद्धतीचे व्यवसाय शिक्षण त्यांना देण्यासाठी योजना तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण अकॅडमी तसेच खेळाडूंसाठी स्पोर्ट्स अकॅडमी तयार करण्यात येणार आहे.
सर्व आश्रम शाळा सीबीएसई अभ्यासक्रमाप्रमाणे राबाविण्याचा प्रयत्न असणार आहे. उत्पन्नाच्या आधारे स्मॉल स्केल इंडस्ट्री काढुन त्यात आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईल यादृष्टीने योजना आखण्यात येत असल्याचेही श्री. गावित यांनी सांगितले. आश्रम शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी शाळेतच नियमित उपस्थित राहावेत, यासाठी आश्रम शाळेच्या आवारातच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी बांधवांना त्यांच्या मागणीप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी त्यांनी दिली.आदिवासी बांधवांना शेतीत चांगले उत्पन्न काढण्यासाठी मेहनतीने शेती करावी, त्यासाठी लागणाऱ्या सुविधा त्यांना पुरविण्यात येईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जनगणनेच्या वेळी प्रत्येक आदीवासी बांधवाने त्यांचे नाव नोंदवले जाईल याची काळजी घ्यावी. कारण या माहितीच्या आधारावरच आदिवासींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तयार होणार आहेत असे श्री. गावित म्हणाले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आश्रम शाळेतील इयत्ता दहावी व बारावीतील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ई-रिक्षा चे वाटप, दालमील, शेळीपालन, सूक्ष्म सिंचन, वैयक्तिक व सामूहिक वन हक्क पट्टे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सामूहिक वन हक्कचा चांगला आराखडा तयार करणाऱ्या गावांनी आराखड्याची प्रत मंत्री महोदयांना सादर केली.

यावेळी प्राध्यापक अशोक उइके आणि संजीव रेड्डी बोदकुरवार यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक याशनी नागराजन यांनी केले.

आज वाढदिवस अभिष्टचिंतन : श्री आनंद नक्षणे

                       "जीवेत शरद: शतम्"
२७ मार्च : 
आमचे परम मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
नाभिक समाजाचे युवा आधारस्तंभ तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि प्रगतीशील व्यावसायिक असलेले,
शहराची आण-बाण-शान आणि हजारो लाखो तरुणाईची ट्रेंड असलेले,
अत्यंत हँडसम, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे वावरणारे, 
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास परम मित्र, यांचा आज अभिष्टचिंतन!!!!

श्री आनंदभाऊ नक्षणे यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
ईश्वर आपल्याला निरोगी दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो हीच सदिच्छा व प्रार्थना…!

•• शुभेच्छुक :-
सह्याद्री चौफेर न्यूज परिवार २०२२

जाहिरातसाठी संपर्क : 7218187198

मच्छिन्द्रा येथे तलाठी आहे की नाही

सह्याद्री चौफेर | न्यूज

मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथील तलाठी गेल्या कित्येक दिवसापासून गावाकडे फिरकले नाही. किंबहुना येथील नेमका तलाठी आहे तरी कोण? असा प्रश्न पडला असून अनेकाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शासनाच्या विविध योजना असो की शासकीय काम यासाठी तलाठ्याच्या दाखला घ्यावा लागतो मात्र, येथील तलाठी मुख्यालयी किंबहुना फिरकत नसल्याने नागरिकांना त्यांच्याकडे हेलपाट्या माराव्या लागत आहे. येथे तलाठीच नसल्याने जन सामान्यांचे काम रखडले आहे. 

याबाबत संबंधितांना विचाराणा केली असता ते एकमेकांवर चाल ढकल करीत असल्याचे प्रकार सुरु आहे याचा मनस्ताप ग्रामस्थांना होत आहे. त्यामुळे मच्छिन्द्रा येथे तलाठी आहे की नाही, शिवाय येथील तलाठी आहे तरी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आज सत्यपाल महाराज मारेगावात

सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : आज दि.१३ मार्च रोजी मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात गुरुदेव सेवा मंडळ व पुंडलिक साठे यांच्या मार्गदर्शनात सायंकाळी ८ वाजता सत्यपाल महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

त्या अगोदर दिवभर मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार आहेत. याचा लाभ तालुक्यातील गुरुदेव भक्त मंडळींनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

हटवांजरी पोड येथील रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधात


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील हटवांजरी पोड येथील हा रस्ता डांबरी करणाकरीता मंजूर झाला असून रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

सदर रस्ता हा हटवांजरी पोड येथील 25 ते 30 कुटुंब वास्तव्य करीत असलेल्या आदिवासी वस्तीकडे जाणारा असून ह्या रस्त्यावर गैरअर्जदार जाणून-बुजून आदिवासी पोडाच्या विकास होऊ नये या दृष्ट हेतूने अडवणूक अडथळा निर्माण करीत आहे.

त्याबाबत गावकऱ्यांनी तहसील कार्यालय तथा वेगवेगळ्या महसुली विभागात तसेच आमदार 
साहेब यांना निवेदने देऊन गैरअर्जदार यांचा अडथळा दूर करून रोडचे काम व्हावे अशी विनंती केली.

परंतु संबंधित अधिकारी यांच्या कडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे गैरअर्जदार हे मुजोर होऊन वागत आहे गैरअर्जदाराने वेळ काढून घेण्या करिता शेतीची मोजणी केल्यावर रस्त्यावरील अडथळा दूर करण्याचे सांगितले. परंतु दि .08/03/22 रोजी मोजणी होऊन सुध्दा गैरअर्जदाराणे अडथळा दूर केला नाही किंवा प्रशासना कडून गैरअर्जदार यांचेवर कार्यवाही झाली नाही. हटवांजरी पोड रस्त्याचे बाबतीत आम्ही वारंवार निवेदन तक्रारी माध्यमातून जाहिराती देऊन व वारंवार पाठपुरावा करून त्रस्त झालो आहो,परंतु आमच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे आम्ही गावकरी येत्या दि .14/03/22 पर्यंत गैरअर्जदार यांचेवर कठोर कार्यवाही होऊन रोडचे काम सुरू न केल्यास आम्ही दि .17 /03/22 रोजी वेळ दु 12.00 वा वणी यवतमाळ रोडवर बुरांडा स्टॉपवर चक्का जाम आंदोलन करणार व याची सर्वंस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.

यावेळी राजू पारखी, परशराम ठक, लक्ष्मण आस्वले, संतोष टेकाम, सुरेश आत्राम, प्रमोद मेश्राम आदी गावकरी उपस्थित होते.

रावसाहेब दानवेंच्या बेताल वक्तव्याचा नाभिक समाजाकडून निषेध

सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात एका चर्चा सभेमध्ये बेताल वक्तव्य केले. त्यामुळे मारेगाव नाभिक समाजाकडून दानवेंचा तीव्र निषेध करण्यात असून समाजाच्या वतीने तहसीलदार पुंडे यांना निवेदन देण्यात आले.

जालन्यातील कार्यक्रमात बोलतांना दानवे म्हणाले, "ज्या प्रमाणे तिरुपती बालाजीच्या नाव्ह्याकडील ग्राहकाचे केस एकाच वेळेस न काढता सुरुवातीला दोन दोन वस्तरे हाणतात आणि बसवून ठेवतात नंतर त्यांच्या डोक्यावरील राहिलेले अर्धे केस दिवस वाळल्या नंतर काढतात" असे अपमानास्पद बोलल्याने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या असून, दानवे यांनी जाहिर माफी मागावी अन्यथा नाभिक समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. राज्यभर पडसाद उमटल्यानंतर मारेगाव येथे रावसाहेब दानवेंनी केलेल्या बेताल वक्तव्याचा नाभिक समाजबांधवानी तीव्र निषेध व्यक्त केला.

यावेळी निवेदन देताना रवि घुमे, आनंद नक्षीने, संजय क्षीरसागर, अजय धांडे, विनोद नक्षीने, प्रमोद जांभुळकर, प्रमोद नक्षीने, अरविंद शेंडे, शंकर शेटे, अमित नक्षीने, राजू घुमे, शालिक जांभुळकर, छगन दर्वे, मोरेश्वर बनसोड यांच्यासह शहर व तालुक्यातील नाभिक समाजबांधव उपस्थित होते.

आमदार फंडातून अर्थसहाय्य करा - वनोजा ग्रामवासियांची मागणी

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वनोजा येथील उपसरपंच जनार्धन गाडगे यांच्या नेतृत्वात गावातील जेष्ठ नागरिकांनी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा श्री संजीवरेड्डी बोदकुरवार यांना गावातील विविध कामासंदर्भात आपल्या फंडातून अर्थसहाय्य करा या आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना उपसरपंच जनार्धन गाडगे, प्रकाश पिदूरकर, बंडू पुनवटकर, पांडुरंग राजूरकर, हरिदास नगराळे, पुंडलिक शेडामे, इत्यादी उपस्थित होते.

तालुक्यातील वनोजा (देवी) येथील काँक्रीट रोड व इतर विकास कामे, वनोजा ते आपटी शेत पांदण रस्ता तसेच गावातून जाणारा (pwd) चा रास्ता, इत्यादी कामासाठी निवेदन देण्यात आले असून 
आमदार बोदकूरवार यांनी निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत, कामे लवकरच मंजूर करू म्हणून 
हमी दिली. 


कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा संपन्न

सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : कला, वाणिज्य व विज्ञान महविद्दालय, मारेगाव जि. यवतमाळ येथे, जागतिक विज्ञान दिनानिमित्त दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागा तर्फे आंतर महाविद्यालयीन ऑनलाईन सामान्यज्ञान परीक्षा 'Bio Genius- 2022' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन सोडनर, इतिहास विभाग व मार्गदर्शक प्रा. डि. एन. वाताखरे, यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे प्रथम क्र. श्री. प्रसन्ना सगणे, ब्रिजलाल बियाणी महाविद्दालय, अमरावती, द्वितीय क्र. कु. मुस्कान ददलानी, ब्रिजलाल बियाणी महाविद्दालय, अमरावती तर तृतीय क्र. कु. गोवरदिपे, एल. टी. महाविद्यालय, वणी यांनी पटकावला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी तर प्रा. स्नेहल भांदक्कर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. तानुरकर, डॉ. कुळकर्णी, प्रा. देशमुख, डॉ. पवार, डॉ. परदेशी, डॉ. चिरडे, प्रा. जेनेकर, प्रा. आत्राम, प्रा. शेंडे, प्रा. भगत, श्री. आकाश कुमरे व श्री. पंढरपुरे इत्यादी मंडळी उपस्थित होती.

या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. माकडे व प्रा. डॉ. अडसरे यांनी परिश्रम घेतले.

'त्या' निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा - वनोजा (देवी) येथील गावकऱ्यांची मागणी


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : तालुक्यातील वनोजा येथील गावाकऱ्यांनी निकृष्ट बांधण्यात आलेला रस्ता व साचलेली घाण,कचरा,सांडपाणी यापासून निर्माण झालेली दुर्गंधी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. या संदर्भात मारेगाव गटविकास अधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील वनोजा येथे चौदा वित्त आयोगातून गावात काँक्रीट रोड चे बांधकाम करण्यात आले, मात्र या कामामुळे गावकरी समाधानी नसून सदर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करीत असल्याचे येथील नागरिकांनी तक्रारीत नमूद केले आहे. हनुमान मंदिर ते गाडगे यांच्या घरा जवळ गावातील सांडपाणी साचले असून त्यापासून दुर्गंधी पसरून आम्हा गावाकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तात्काळ निकृष्ट रस्त्याच्या बांधकामाची चौकशी येत्या आठ दिवसात करावी, अन्यथा आम्ही गावकरी तीव्र आंदोलन उभारू असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

यावेळी प्रशांत भंडारी, रोशन शिंदे, कृष्णा पुनवटकर, सौ प्रेमीला गाडगे, जगन्नाथ पुनवटकर, सौ प्रेमीला ब. गाडगे, सौ मीना गाडगे, सौ रिता गाडगे आदी उपस्थित होते. 

हरहर महादेव ग्रुप च्या वतीने पाचपावली साजरी

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : नरसाळा येथील हर हर महादेव ग्रुप च्या वतीने तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पांढरदेवी येथे स्नेह भोजन सोहळा संपन्न झाला. सध्या महाशिवरात्री पर्व सुरु असल्याने भोल्या च्या दर्शनासाठी विदर्भातील दुरुदुरून भक्त चौऱ्यागड येथे जातात, अशातच नरसाळा येथील हरहर महादेव ग्रुप चे सर्व सदस्य चौऱ्यागड चे दर्शन घेऊन गावी परतले. त्या अनुषंगाने ग्रुपच्या वतीने पाच पाऊली सोहळा पंढरदेवी येथे साजरा करण्यात आला.

या वेळी हर हर महादेव ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण कनाके व उपाध्यक्ष नाना दडांजे तसेच सदस्य आकाश नक्षीने, मारोती तोडासे, सतीश मरस्कोले, गजानन नेहारे, आशिष रामटेके, भाविक कोयचाडे, नितेश मेश्राम, महेश राऊत, देवा बोढे, विलास तोडासे, पवन बोढे, संजय नक्षिने विलास राजगडकर, महेंद्र उईके, निरंजन तिकट, निलेश बोढे, अमोल नेहारे आदी उपस्थित होते.

युवतीचे लैंगिक शोषण, २७ वर्षीय आरोपीस केली अटक


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : लग्नाचे आमिष दाखवून सतत चार वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका २७ वर्षीय आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला आज रोजी अटक केली. 

तालुक्यातील खेकडवाई येथील २५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून विलास मनोहर रामपुरे (२७) याने त्याच गावात राहणाऱ्या युवतीचे गेल्या चार वर्षाच्या कालावधीत लैंगिक शोषण केले. यासंदर्भात पीडितेने गुरुवार दि.३ मार्च रोजी मारेगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून, दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विलास रामपुरे विरुद्ध लैंगिक शोषण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व मारेगाव ठाणेदार पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहे.

मारेगाव मैत्री कट्टा तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : शहरात येत्या ९ मार्च २०२२ रोजी मारेगाव "मैत्री कट्टा" तर्फे जल्लोष खास महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांमध्ये आपल्या क्षितिजा पलीकडे बघण्याचा दृष्टीकोन वृद्धींगत व्हावा व महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा या प्रमुख उद्देशाने स्पर्धेत ९ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य महिला सांस्कृतिक रॅलीचेही आयोजन करण्यात येणार आहे असे प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.

यामध्ये सामूहिक नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक ७००१, द्वितीय ५००१ तर, ३००१ तिसरे पारितोषिक आहे. यासाठी २५१ रुपये प्रवेश फी आकारण्यात येईल.

युगल नृत्य स्पर्धेत प्रथम ४००१, दुसरे ३००१ तर तिसरे २००१ पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याकरिता १५१ रुपये प्रवेश फी आहे. एकल नृत्य स्पर्धेत प्रवेश फी १०१ रुपये असून प्रथम पारितोषिक ३००१, द्वितीय २००१ तर १००१ तृतीय पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी आयोजकाकडून नृत्य स्पर्धेचा वेळ केवळ तीन मिनिटाचा आहे. ही नृत्य स्पर्धा ३० वर्षावरील महिलांकरिता आहे. समूह नृत्य स्पर्धेत कमीतकमी सहा महिला असाव्यात. स्पर्धा प्रवेशाची अंतिम तारीख ७ मार्च २०२२ आहे. होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनिताताई खैरे व सरीताताई वानखेडे यांचे सोबत संपर्क साधावा.

१० मार्च रोजी स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात होणार आहे. स्पर्धेत सहभागी महिलांना प्रोत्साहनपर बक्षिसासह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यावेळी नगरसेविका व विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या महिलांना गौरविण्यात येणार आहे. तालुक्यातील महिलांनी विविध वेषभूषा, नृत्यस्पर्धा सहभाग घ्यावा असे आवाहन "मैत्री कट्टा" च्या वतीने करण्यात आले आहे.

अवैध रेती उपसा करणारा ट्रॅक्टर वनविभागाने केला जप्त

सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : वनविभागाच्या हद्दीत येत असलेल्या नाल्यातून अवैधपणे रेतीचा उपसा करणारा ट्रॅक्टर केगाव बीट वनरक्षकांनी पकडला. ही कारवाई बारा वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

मारेगाव तालुक्यातील वेगाव परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील नाल्यामधुन अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टर वेगाव मार्गाने येत असल्याचे वन विभागाने गोपनीय माहिती च्या आधारे एम एच २९ ए डी ८२१६ या क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रॉली आज (ता.२७) व चालक अमोल राजुरकर रा. डोंगरगाव तसेच मालक पवन जांभुळकर रा. वेगाव यांच्या मालकीहक्काचा ट्रॅक्टरमध्ये भरलेली लाल रंगाची रेती व उत्खननाची साधने वनविभागाने ताब्यात घेवून मारेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा केले आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे, वनपाल अशोक पोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केगाव बीट वनरक्षक प्रेमिला सिडाम यांनी केली आहे.


विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सिंधी येथील घटना

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील सिंधी (कुंभा) येथे आज संध्याकाळी सव्वा सात च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात शोककळा पसरली.

वैभव मारोती वैद्य (२८) असे गळफास घेऊन आत्महत्या केले लेल्या मृतकाचे नाव आहे. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. वैभव ची पत्नी गर्भवती होती. ती प्रसूतीसाठी माहेरी गेली होती. आज (ता.२४) गुरुवारी रोजी सकाळी मृतक वैभव हा शेतात कामाला गेला होता. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास तो घरी परत आला होता. घरी कुणीच नसल्याची संधी साधून त्याने घराच्या सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. सव्वा सात च्या जवळपास ही घटना वैद्य कुटुंबीयांच्या लक्षात आली. पोलीस पाटीलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याच्या पश्चात आई,वडील आणि पत्नी असा परिवार आहे. वैभवने आत्महत्या का केली सध्या तरी कारण समजू शकले नाही. 

घटनेचा तपास पोलीस करीत आहे. 

वाघाने पाडला गायी चा फडशा, फिस्की जंगल परिसरातील घटना


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्‍यातील सालेभट्टी शिवाराला लागुन असलेले फिस्की च्या जंगल परिसरात वाघाने हल्ला करून एका गायीला ठार केले.

सालेभट्टी येथील तुळशीराम लोनसावडे यांचे पशुधन बुधवारी चराई ला शिवारात गेली. रात्री ती परत न आल्यामुळे त्यांनी रात्रीच खूप शोध घेतला. परंतु तीचा शोध लागला नाही. गुरुवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास सालेभट्टी शिवारात फिस्कीच्या जंगलात पट्‌टेदार वाघ व त्याच्या बाजूला मृत गाय आढळून आली.

वाघाला पाहून तो घाबरून परत गावाकडे आला. गावातील काही लोकांना घेऊन पुन्हा त्या घटनास्थळी पोहोचला. दिवस उजाडला असल्यामुळे वाघ तेथून पसार झाला होता.

या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

शंकरराव मडावी यांची स्वीकृत सदस्य म्हणून मान्यता

सह्याद्री न्यूज : कुमार अमोल 
       
मारेगाव : मारेगाव नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसची सर्वाधिक प्रतिष्ठेची व विजयाची सर्वाधिक खात्री असलेल्या जागेवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये सेवानिवृत्त तहसीलदार व शहर कांग्रेसचे अध्यक्ष निष्ठावंत शंकरराव मडावी अल्प मताने नगरपंचायत निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या अनेक नेत्याना व कार्यकर्त्यांना अतीव दुःख झाले होते. 
त्यामुळे ही भरपाई भरून काढावी अशी मागणी निवडणुक निकालाच्या दिवसापासून कांग्रेस पक्षात जोर पकडू लागली. त्यातच जे निवडून आले ते सर्व नवीन पहिल्यांदाच निवडून आलेले, प्रशासनाचा अनुभव नसलेले त्यातच नगराध्यक्ष पदाची चालून आलेली संधी गमावल्याने आणि पक्षाचा आदेश झुगारून काही सदस्य गैरहजर राहिल्याने पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले ही बाब पक्षश्रेष्टीच्या कानावर पडली आणि आता सभागृहात काँग्रेस ला शिवसेना,बीजेपी समोर आव्हान उभे करणारा आपली प्रभावीपणे,अभ्यासपूर्ण मांडणारा अनुभवी,निष्ठावान,प्रामाणिक व्यक्तीलाच स्वीकृत सदस्य पदी पाठवणे अत्यावश्यक आहे यावर पक्षश्रेष्ठीचे एक मत झाले आणि आज काँग्रेसच्या नेत्यांनी शंकरराव मडावी यांची स्वीकृत सदस्य म्हणून मान्यता देऊन त्यांच्या हातून गेलेल्या संधीची भरपाई अशा प्रकारे करून दिली.

काँग्रेस श्रेष्ठींनी आज त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नगरपंचायती मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली व काम करणार्‍या प्रामाणिक सामान्य कार्यकर्त्यांची सुद्धा पक्ष दखल घेऊन त्यांचा सन्मान करतो हे दाखवून दिले. शंकरराव मडावी हे सेवानिवृत्त तहसीलदार आहे त्यामुळे प्रशासनाचा पूर्ण अभ्यास असणारे,अत्यंत संयमी,शांत स्वभावाचे,प्रामाणिक कार्यक्रते म्हणून त्यांची संपूर्ण तालुक्यात ख्याती आहे. मागील ५ वर्षात बिरसा फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी केलेले समाज कार्य तसेच कोरोना काळात मारेगाव शहरासाठी मोफत उपलब्ध करून दिलेली रुग्णवाहिका यामुळेच त्यांची निवड स्वीकृत सदस्यपदी झाल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलल्या गेले.

चिंचमंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

चिंचमंडळ : कुळवाडी भुषण, बहुजनांचे प्रतिपालक, जाणते राजे, श्रीमंतयोगी, श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव शिवजन्मोत्सव समिती, चिंचमंडळ येथे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ. वैशाली परचाके होत्या, प्रमुख अतिथी म्हणून श्री. खेकारे सर, (मुख्याध्यापक, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, चिंचमंडळ), श्री. जवादे सर (मुख्याध्यापक, जि. प. शाळा, चिंचमंडळ), श्री. प्रफुल विखनकर (उपसरपंच) व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पाहुणे उपस्थित होते.

शैलेश कवाडे याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे रांगोळीतून सुंदर प्रतिमा साकारली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चौधरी सर यांनी केले, प्रास्ताविक गंभीर कवाडे तर आभार प्रदर्शन सौरव सातपुते याने केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शिवजन्मोत्सव समितीचे अतुल पचारे, अनिकेत झाडे, नितेश राऊत, वैभव सोनटक्के, शुभम पालकर, वासू विखनकर, निखिल शिवरकर यासंह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

वनोजा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील वनोजा (देवी) येथे छ. शिवाजी महाराज जयंती संपन्न झाली.

गेल्या चारशे वर्षा पासून संघर्षाची, स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची प्रेरणा देत आहे त्या महाराजांच्या तेजपुंज प्रतिमेचे मनसेचे रोशन शिंदे सर्कल प्रमुख व प्रवीण राजूरकर मनसे कार्यकर्ते यांनी पूजन करून माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी रोशन शिंदे, अशोक बरडे, राजू सोनटक्के, विठ्ठल बोढे, प्रवीण राजूरकर, अर्चना सोनटक्के आदीं उपस्थित होते.

हटवांजरी (पोड) येथील गावाकऱ्यांनी दिले मारेगाव तहसील कार्यालयाला निवेदन


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील हटवांजरी (पोड) येथील गावाकऱ्यांनी एका शेतकऱ्यांकडून अडथळा निर्माण केला जात असल्याने रस्त्याचे बंद पडलेले काम सुरु करण्यासंदर्भात व डीलर वर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मारेगाव तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालयाला देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले की, मौजा हटवांजरी व हटवांजरी ते हटवांजरी (पोड) कडे जाणारा डांबरीकरण मंजूर रस्ता चे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांचेकडून काम पूर्ण करण्यात येत आहे. परंतु या रस्त्यालगत असलेले 1,2,3,4 चे शेतजमीनदाराकडून वारंवार शेत मोजणीचे कारण देत बांधकामात अडथळा निर्माण करीत असल्याचे गावाकऱ्यांचे म्हणणे आहे. ३० ते ४० वर्षांपासून वहीवाट असलेल्या रस्त्यावरून हटवांजरी पोडावरील आम्ही ग्रामस्थ येणे जाणे करीत आहे. सदर रस्त्याशिवाय आम्हा गावाकऱ्यांना येण्या जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. त्यामुळे गैर अर्जदार यांचेकडून वारंवार एकच कारण देत कामात अडथळा निर्माण केल्या जात असल्याने संबंधित विभागाने हा अडथळा दूर करून सदर रस्त्याचे बांधकाम सुरु करण्यात यावे. तसेच हटवांजरी पोड वासियांचे या डीलर करून राशन बंद करण्याची भाषा केली जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे त्याचे वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रमोद मेश्राम, बापूजी कुमरे, संदीप आत्राम, सुनील टेकाम, सुरेश आत्राम, गणेश आत्राम, सुभाष आत्राम, दिनेश आत्राम, दादाजी आत्राम, राजू मेश्राम, पांडुरंग आत्राम, पोटू तुमराम, परसराम ठक, राजू पारखी, मारोती आत्राम यांनी केली आहे.