Showing posts with label विदर्भ. Show all posts
Showing posts with label विदर्भ. Show all posts

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

नागपूर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह सिंचन, उद्योग, नदीजोड प्रकल्प, पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांचा लेखाजोखा आणि विकसित, समतोल, सर्वांगिण महाराष्ट्राचा आराखडा मांडण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या अधिवेशनात विविधांगी चर्चेच्या माध्यमातून १७ विधेयके मंजूर करण्यात आली असून जनसुरक्षा विधेयकाबाबत सर्वांना आपले म्हणणे मांडता येण्यासाठी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर नागपूरच्या विधिमंडळ परिसरातील हिरवळीवर मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासह शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. या अधिवेशनात मांडलेल्या ३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवण्या मागण्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या योजना यापुढेही सुरु ठेवण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपत्ती बाधीत ५५ हजार संत्रा शेतकऱ्यांना १६५ कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. कापसाला बोनस देण्यात आला आहे. सोयाबीनची विक्रमी खरेदी करण्यात आली असून १२ जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरु राहणार आहे. बाजारात कापूस आणि तुरीचे खरेदी दर जास्त असल्याने शेतकरी आपला माल बाजारात विकत आहेत. विविध माध्यमांतून पिकांना सहाय्य करण्यासह शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आशियाई विकास बँकेबरोबर प्रकल्प करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाला ०.७२ टक्के व्याजदराने २० वर्षांसाठी ३५८६ कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. ‘मित्रा’ संस्थेच्या माध्यमातून एक हजार लोकसंख्येवरील गावांना काँक्रीट रस्त्याने जोडणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण, बांबू अभियान यासारख्या उपक्रमांना देखील आशियाई विकास बँक मदत करणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात सर्वासामान्य माणसांच्या आयुष्यात बदल घडविणारे अनेक निर्णय घेतले आहेत. आता आमची जबाबदारी आणखी वाढली असून सर्वसामान्यांच्या-मायभगिनींच्या प्रगतीसाठी, रक्षणासाठी यापुढेही एक टीम म्हणून काम केले जाणार आहे. या अधिवेशनात नागरिकांच्या, राज्याच्या चौफेर विकासाचा संकल्प करण्यात आल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले आहे.

या परिषदेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई, संजय राठोड, आशिष जयस्वाल, नितेश राणे आदी उपस्थित होते.

आश्वासने पूर्ण होणार;योजना बंद होणार नाहीत..महाराष्ट्र आता थांबणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

नागपूर : राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला. राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने व आत्मविश्वासाने विधानसभेत स्पष्ट केले.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात 1 जुलै 2022 पासून 3 लाख 48 हजार 70 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून यामुळे 2 लाख 13 हजार 267 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात 10 मोठ्या प्रकल्पांना आपण मंजूरी दिली असून यामध्ये 2 लाख 39 हजार 117 कोटींची गुंतवणूक तर 79 हजार 720 इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. विदर्भातील 47 मोठ्या प्रकल्पात 1 लाख 23 हजार 931 कोटींची गुंतवणूक होऊन 61 हजार रोजगार निर्मिती, मराठवाड्यात 38 प्रकल्पात 74 हजार 646 कोटी गुंतवणूक व 41 हजार 325 रोजगार निर्मिती आणि उर्वरित महाराष्ट्रात 136 प्रकल्पात 1 लाख 49 हजार 493 कोटींची गुंतवणूक होऊन 1 लाख 10 हजार 588 रोजगार निर्मिती होत आहे. यामुळे महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. छ. संभाजीनगर, जालना या ठिकाणी देखील उद्योगाचे जाळे विकसित होत आहे. राज्यात वसुलीबाजांना थारा दिला नाही तर राज्याच्या प्रगतीचा वेग दुप्पट होईल. अशा वसुलीबाजांवर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा संविधानानुसार दिला. यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी निधी मिळणार आहे. तसेच विद्वानांना दोन पुरस्कार मिळणार आहेत. प्राचिन ग्रंथांचा अनुवाद करण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नांसह आपण आपली भाषा रूजविणार आहोत. आता न्यायालयाती निवाडे मराठीत उपलब्ध करण्यास सुरूवात होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी गेल्या अडिच वर्षात 167 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे 25.21 लक्ष हेक्टर जमिन सिंचनाखील येणार आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला असून नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना आणि जलसिंचन प्रकल्प यासाठी उपयुक्त आहे. वैनगंगा-नळगंगा, नारपार-गिरणा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे असे नदी जोडप्रकल्प मार्गी लावणार असल्याने विकासाला गती मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पिकाला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नदीजोड प्रकल्प महत्वाचे आहेत. यासाठी राज्य शासनाने जल आराखडा तयार केला आहे. राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहत देण्यात असून यामुळे देखील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

मेट्रो प्रकल्प गतीमान
मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये मेट्रोच्या कामाला अधिक गती देण्यात आली आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. मुंबईत मेट्रो टप्पा ३ चे काम अंतिम टप्प्यात असून बीकेसी ते कुलाबा ही नवीन लाईफ लाईन होणार आहे. 17 लाख प्रवाशी प्रवास करणार आहेत. मे २०२५ पर्यंत ही लाईन खुली होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांकडून वीज बील घेणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत ६६७ मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांकडून विजेचे बिल घेणार नाही. ९ लाख कृषीपंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मागेल त्याला सौरपंप आम्ही देणार असून ३ महिन्यात कनेक्शन देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2030 साली राज्यात 52 टक्के उर्जा अपारंपरिक स्रोतातील असेल असेही त्यांनी सांगितले.

वाढवण बंदर विकासाचे केंद्र
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पालघर येथे ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर करण्यात येत आहे. हे बंदर जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठं असून वाढवण बंदरामुळे अनेक फायदे होणार. राज्याच्या देशाच्या विकासात वाढवण बंदरचे मोठे योगदान राहणार असून यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नाशिक येथे आय टी पार्क
नाशिक येथे आय टी पार्क विकसित करण्यात असून या कामासाठी वास्तू विषारदाची नेमणूक झाली आहे. लवकरच येथे अद्ययावतआयटी पार्क निर्माण केला जाईल.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील जनतेने मोठ्या आत्मविश्वासाने जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करून राज्याला विकासात प्रथम क्रमाकांवर कायम ठेवूया.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासाची दिशा आणि दृष्टीकोन स्पष्ट करताना सरकारच्या पुढील वाटचालीबाबत मनोदय अशा ओळीतून आपली भूमिकाच मांडली...

या ओळी पुढीलप्रमाणे...

महाराष्ट्र आता थांबणार नाही...

सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...

उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...

रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...

विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...

जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही...

पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार आनंदाचा शिधा देईल आधार उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही...

लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही...

असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही...

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करणारे ‘मिशन ई सुरक्षा’; राज्य महिला आयोग आणि मेटा यांचा संयुक्त उपक्रम

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नागपूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यभरातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी ‘मिशन ई सुरक्षा’ उपक्रम हाती घेतला असून नागपुरातील वनामती सभागृहात गुरुवार (दि.14) रोजी दुपारी 2 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध महाविद्यालयातील ५०० विद्यार्थी सहभागी होणार असून मेटाचे तज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सध्या इंटरनेट हे दुधारी अस्त्र झाले आहे. त्याचे अनेक फायदे असताना, काही चुकीच्या प्रवृत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर मुली, महिलांना सायबर माध्यमातून आर्थिक फसवणूक, छळ, ट्रोलिंग, सेक्सटॉर्शन याला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार टाळण्याकरिता तसेच भविष्यात सायबर सुरक्षित होण्याकरिता याचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींनी सायबर सुरक्षित होण्याकरिता घ्यावयाची काळजी, कायद्यातील तरतूदी, यंत्रणांची मदत याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमाबाबत बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, महाविद्यालयीन मुली सायबर फसवणुकीला बळी पडल्याच्या अनेक तक्रारी माझ्यासमोर राज्यभरातून येत असतात. अशावेळी काय करावे हे मुलींना कळत नाही, कुठे दाद मागावी हे न कळल्याने मुली सहन करत राहतात. अनेकदा आपल्याकडूनच अधिकची माहिती सोशल मीडियात गेल्याने ही फसवणूक होण्याचे प्रकार होत असतात. अशावेळी घ्यावयाची काळजी, चुकीची घटना घडल्यास मदत मिळण्यासाठी असलेल्या यंत्रणा यांची माहिती राज्यातल्या प्रत्येक मुलींपर्यंत पोहोचावी यासाठी आयोगाने मेटाच्या सहकार्याने मिशन ई सुरक्षा उपक्रम हाती घेतला आहे.

मुलीचे लग्न झाले असले तरी तिला वडिलांच्या जागी मिळणार नोकरी - अनुकंपा नोकरीबाबत हायकोर्टाने दिला हा महत्वाचा निकाल


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

काही वर्षांपूर्वी एका घटस्फोटित महिलेने वडिलांच्या जागेवर अनुकंपा नोकरी मिळावी म्हणून रेल्वेकडे अर्ज केला. पण घटस्फोटित असल्यामुळे नोकरी देता येणार नाही, असे रेल्वेने सांगितले. पण एका केंद्रीय मंत्र्याने रेल्वेला सरकारी नियमाची आठवण करून दिली. या नियमानुसार, मुलगा, मुलगी, विवाहित मुलगी, घटस्फोटित मुलगी यांचा अनुकंपा तत्वावर नोकरीचा अधिकार आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. न्यायालयाने विवाहित मुलीला नोकरीचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये काम करणाऱ्या राजू उसरे यांचा 2020 साली मृत्यू झाला. त्यांना पत्नी आणि दोन विवाहित मुली आहेत.

आई आणि मोठ्या बहिणीकडून सहमती घेऊन लहान मुलगी खुशबू चौतेल यांनी अनुकंपा आधारावर नोकरीसाठी अर्ज केला. परंतु, ऑगस्ट 2021 मध्ये वेकोलिद्वारा अर्ज नाकारण्यात आला. नॅशनल कोल वेज अ‍ॅग्रिमेंटमध्ये विवाहित मुलीला अनुकंपा आधारावर नोकरी देण्याची तरतूद नसल्याचे कारण वेकोलितर्फे देण्यात आले.

अर्ज नाकारल्यावर खुशबू यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. अ‍ॅड. अनिल ढवस यांनी खुशबूच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. अ‍ॅड. ढवस यांनी छत्तीसगड उच्च न्यायालयातील आशा पांडे विरुद्ध कोल इंडिया प्रकरणाचा दाखला देत विवाहित मुलीला नोकरी नाकारणे असंवैधानिक असल्याचे सांगितले.

लग्न झाले असले तरीही
मुलीचे लग्न झाले तरी तिचा वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर मिळणाऱ्या नोकरीवर पूर्ण अधिकार आहे. विवाहित मुलीला अनुकंपा आधारित नोकरी नाकारणे असंवैधानिक आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.


जनमन : 'गाव' हाच खरा 'देव' !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी जवळपास अडीच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने केली आहे. पिढीसाठी हा वारसा सुरक्षित ठेवला पाहिजे, हे खरेचा परंतु सामान्य जनतेच्या भल्यासाठी प्राथमिकता काय असावी, निधीवाटपाचा प्राधान्यक्रम कसा असावा, कुठल्या बाबतीत आवश्यकता आणि किती प्रमाणात व्यवहार्यता आहे, याचेसुद्धा भान ठेवणे महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेचे आहे.
ग्रामीण भागातील वास्तव तीर्थक्षेत्रांपेक्षा महत्त्वाचे आहे. चिखलमय पाणंद रस्ते, खेड्यांना जोडणारे अरुंद रस्ते, नद्यांवरील पूल, सरकारी अंगणवाडी शाळांच्या जीर्ण इमारती, खेळांच्या मैदानाचा अभाव खस्ताहाल ग्रामीण दवाखाने, सुसज्ज अभ्यासिकांचा अभाव हे गावातले वास्तव आहे. तलाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारती, छोटी धान्य कोठारे, छोटी धरणं, स्वच्छ पाणीपुरवठा, सांस्कृतिक सभागृह, शेतकरी प्रशिक्षण केंद्रे, जनावरांचे
दवाखाने, ग्रामस्वच्छता, नदी स्वच्छता इत्यादी या आणि अशा अनेक बाबतीत ग्रामीण निधी उपलब्ध करून समस्या सोडविणे काळाची गरज आहे. पीकविमा, नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई वेळेत न मिळणे, गावात आणि शेतीला नियमित वीजपुरवठ्याचा अभाव यांसारख्या अनेक समस्यांनी ग्रामीण भाग ग्रासलेला आहे. तरुण पिढी नाईलाजाने शहराकडे धाव घेते आहे, व्यसनाधिता, गुन्हेगारी वाढते आहे. मायबाप सरकारने आधी या समस्या सोडवाव्यात आणि नंतर सावकाश धार्मिक पर्यटन करावे, ही ग्रामीण जनतेची कळकळीची विनंती आहे.

~प्रा. डॉ. विलास डोईफोडे,
सावनेर 

तरुणांनो सावधान! आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ व्हायरल, दगडफेक केली तर 'या' कलमांनुसार आयुष्यभर नोकरीची संधी मिळणार नाही...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आजकाल सोशल मिडियाचाही वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडीओ शेअर करणे, व्हायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र अशा पोस्ट केल्याने आयुष्यभरासाठी नोकरीतून हात धुण्याची वेळ येऊ शकते.

शासकीय, खासगी नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्राची (character certificate) गरज असते. यासाठी गुन्हा दाखल नसला तरच नोकरी मिळते, मात्र एका आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओने तरुणांना कायमचे नोकरीतून हात धुण्याची वेळ येऊ शकते. तसेच दंगलीच्या काळात दगडफेक करणाऱ्यांना तर तुरुंगाची हवा खावी लागली आहे. जीवनात आलेल्या नोकरीच्या संधीवरही पाणी सोडावे लागले आहे. 

या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो

कलम ४२७ : जाळपोळ करणे, सार्वजिनक शांतता भंग करणाऱ्यांवर ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला जातो.

कलम १८८ : सार्वजनिक ठिकाणी तोडफोड करणे, पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार कारवाई केली जाते.

कलम १४४ : बेकायदेशीरपणे जमाव एकत्र करणे, कायद्याचे उल्लंघन करणे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात येते.

कलम १५३ : एखाद्या मुद्यावर भडक भाषण देणे, तापलेल्या प्रकरणाला आणखी तापविण्यासाठी भाषण करणाऱ्यांवर २५३ अन्वये गुन्हा दाखल होतो.

कलम ३५३ : शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३५३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येतो,

कलम १०९ : समाजात अपप्रेरणा, चिथावणी, भडकावणी, दंगलीला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कलम १०९ अन्वये कारवाई करण्यात येते.


दुखते कोणाच्या पोटात; अन् दवा कोणाच्या ओठात?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या काही कमी नाही. नोकरीस्तव एका पदासाठी हजारो युवक आणि युवती तुटून पडत आपके नशिब अजमावताना दिसतात आहेत. कित्त्येक सरकारी विभागांत तर पैशांच्या उलाढालीच्या शर्यती लागल्याचे दृश्य बघावयास मिळत आहेत. शासनाच्या सर्वच विभागात रिक्त पदांचे डोंगरच्या डोंगर दत्त म्हणून उभे ठाकलेले आहेत.

आपली लाडकी मुले उच्चशिक्षित राहूनही ती रोजी, मजुरी, नोकरीच्या शोधात शहर, गाव, रानोमाळ वणवण भटकत आहेत. कोणी मिळेल ते काम इच्छा नसतानाही करू लागले आहेत. कोणी गावातील शेळ्या, मेंढ्या, गाई, गुरे जंगलात नेऊन चारण्यात, तर कोणी छोट्याशा चहा टपरीवर वा नामांकित होटेलात उष्टी प्लेट्स, कपबश्या विसळण्यातही धन्यता मानून घेत आहेत. हे काय कमी आहे की काय? १०० रू. रोजीसाठी आपले शिक्षण, योग्यता, पदव्या सारे काही बासनात गुंडाळून ठेवून मुठभर अन्न व वितभर कपड्यांसाठी राब राबत आहेत. या भयंकर परिस्थितीची सरकारच्या वतीने कोणालाच काय शरम, दया, माया येत नाही; साधे सोयरसुतक वाटत नाही. पुरोगामी म्हणून मिरविणाऱ्या महाराष्ट्रात याचेच मोठे नवल वाटतेय ! शासनाकडून या सावळा गोंधळाचे परिपत्रक दि. ७ जुलै २०२३ रोजी जारी करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषद शाळांत पुढील पंधरा दिवसांत कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यात यावी, असेही त्यात नमूद केले आहे. या शिक्षकांना मासिक २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळेच राज्य सरकारने हा हास्यास्पद अजब निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे; आहे की नाही गम्मत ! सेवानिवृत्त शिक्षकांच्या तात्पुरत्या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे ठेवली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हे पात्र तथा इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून नियुक्ती आदेश देतील.

शिक्षकांच्या नियुक्तीची तेवढेच सर्व प्रक्रिया आयुक्तांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे. कंत्राटी शिक्षकांना नियुक्त वाटलीच नसती. करताना शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर करारनामा करावा लागणार आहे. नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, नोकरीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी काही तरतुदी केल्या आहेत.

सरकारी सुपिक डोक्यातील भन्नाट कल्पना अशी की, हल्ली राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या १८ हजार ४६ जागा रिक्त आहेत. राज्यातील सर्व धन्यवाद ! शाळा मागील जून महिन्यातच सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची रामनगर पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे. नियोजित शिक्षक भरतीसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याचे शासनाच्या चटकन लक्ष्यात आले आहे. ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे आततायीपणे भरण्यात येत आहेत.

हीच भरती बेरोजगार युवकांमधूनही घेता आली असती. समाधान जनतेच्या मुखमंडलांवर झळकताना दिसले असते. अशी हास्यास्पद गोष्ट वाटलीच नसती.

मी मधुमेह आजाराने त्रस्त असल्याने योग्य प्रकारे सेवा बजावू शकत नाही आणि धडपडणाऱ्या एका युवकास आपली जागा लवकर रिक्त व्हावी म्हणून मी आठ वर्षाचा सेवाकाळ शिल्लक असूनही जुलै २०२० मध्येच स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. माझ्या दयाळू मायाळू सेवानिवृत्त शिक्षक बांधवांनी आमच्या बेरोजगार मुलांचा सकारात्मक विचार डोळ्यासमोर ठेवून भरतीप्रक्रियेवर एकजुटीने बहिष्कार घालावे, असे माझे वैयक्तिक मत आहे. सविस्तर लक्षपूर्वक वाचल्याबद्दल

- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
वॉ.न. २०, गडचिरोली,

शेतकऱ्यांनो ! आता एका रुपयात काढा पीकविमा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

भारतामध्ये आता सर्वात सोपा ‘पीक विमा’ हा महाराष्ट्र शासनाने केला आहे. ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतले आहे. त्यांनी बँकेमध्ये जाऊन एक साधा अर्ज करणे आहे. तर ज्यांनी कर्ज नाही घेतले आहेत त्यांनी सेतू केंद्रामध्ये जाऊन अर्ज करावयाचा आहे. 31जुलै ही शेवटची तारीख असून विम्याची रक्कम शासन भरणार आहे. यासाठी कर्जदार, गैरकर्जदार यांच्या बँक अकाउंट मधून फक्त एक रुपया विम्यासाठी कपात होणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याच्या आवाहन प्रशासनाने केले आहे.

‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत 31 तारखेपर्यंत पिक विमा काढण्यासाठी शासकीय कर्मचारी शेतकऱ्यांना गृहभेटी देत आहेत ज्यांची शेतजमीन स्वतः कसत नसतील. ठेक्याने दिले असेल. किंवा अन्य कोणी वाहत असेल. त्या सर्वांनी यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.अल निनोचा प्रभाव लक्षात घेता कोरडवाहू शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांची अनिश्चिती झाली आहे शेतकरी पिक विमाची रक्कम भरत नसल्यामुळे ही पिक विमा शेतकऱ्यांना मिळत नव्हता. त्यासाठी शासनाने यामध्ये पुढाकार घेतला असून अर्थसंकल्पात तरतूद करून शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम शासनाने स्वतः भरली आहे. त्यामुळे फक्त सेतू केंद्र किंवा बँकेपर्यंत शेतकऱ्याला जायचे असून 31 तारखेपर्यंत हे काम कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी पूर्ण करावे आपला पीक विमा केल्याची खातरजमा करणे आवश्यक आहे.

विविध नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. मागील वर्षात राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असतांना नोव्हेंबर 2021 ते मे 2022 दरम्यान 130 कोटी 88 लक्ष व जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीतील नुकसानीसाठी फेब्रुवारी 2023 पर्यंत 7,133 कोटी 19 लक्ष रुपयांची मदत शासनाने मंजूर केली. यावेळीही राज्यशासनाने पुढाकार घेत राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिकविमा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 30 मे रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे.

एक रुपयात पीकविम्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनातच अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ही घोषणा अंमलात आणण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या वाट्याला येणारी प्रधानमंत्री पीक विमा हप्त्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

यासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पात 3312 कोटी रक्कमेची विशेष तरतूदही केली आहे. ही योजना सुरवातीला खरीप व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.

गारपीट, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ आदी नैसर्गिक आपत्तींमुळे शेतपिकांची हानी होऊन दरवर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. बी-बियाणे, खते, मजुरी व शेतीपुरक साधनसामग्रीवर शेतकऱ्यांनी पुंजी खर्च केलेली असते, प्रसंगी बहुतांश शेतकऱ्यांनी यासाठी कर्ज देखील घेतलेले असते. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीसाठी आर्थिक जुळवाजुळव, कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जाची परतफेड आदी अडचणी निर्माण होतात. यातून अनेक शेतकऱ्यांकडून आपले जीवन संपविण्याचे टोकाचे निर्णय घेण्यात आले आहे. अशा संकटसमयी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र शासनाने जानेवारी 2016 पासून ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ सुरू केली आहे. याच जोडीला राज्यातील शेतकऱ्यांना पीकनुकसानीपासून चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासनाने या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला आहे. ---

शासनाने एक रूपयात पीकविमा देण्याचा वेगवान निर्णय घेतांना गतिमान शासनाचा परिचय करून देत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचा संदेश दिला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीकविम्यासाठीचा खर्च लागणार नाही. यासोबतच त्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीकनुकसानीची देखील चिंता राहणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना कामात गती मिळेल तसेच उत्पन्न वाढीसाठी शेतात नवनवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांच्या चिंतामुक्तीसोबतच त्यांच्या आनंदाचा व प्रगतीचा ठरेल.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत अधिसूचित केलेल्या पिकांचे नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेत पिकानुसार शेतकऱ्यांना संरक्षीत रकमेच्या विहित टक्के रकम विम्याचा हप्ता म्हणून भरावी लागत होती. ही रकम आता शासनाद्वारे भरण्यात येणार आहे.

सन 2021-22 मध्ये पीकविमा योजनेत एकूण 96 लाख 38 हजार शेतकरी सहभागी झाले होते. त्यांचेसाठी शासनातर्फे 5179 कोटी 61 लाख विमा हप्ता मंजूर करण्यात आला तर 64 लाख 45 हजार लाभार्थी शेतकऱ्यांना 3484 कोटी 32 लाखाचे नुकसान भरपाई दावे मंजूर करण्यात आले. तसेच 2022-23 च्या खरीप हंगामात 96 लाख 61 हजार शेतकरी योजनेत सहभागी झाले होते, त्यासाठी शासनाने4414 कोटी 63 लाख विमा हप्ता मंजूर केला. तसेच 63 लाख 40 हजार लाभार्थी शेतकऱ्यांना 2228 कोटी 38 लाख रकमेचे अंतरिम नुकसान भरपाई दावे मंजूर केले आहेत.

पिकविमा योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके आणि नगदी पिकांना विमा संरक्षण दिलं जातं. यात पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत कीड रोग, अपूरा पाऊस, पूर, पावसातील खंड, दुष्काळ, अवकाळी पाऊस आदी हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे अधिसूचित पिकांच्या उत्पादनात घट वा नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाते. यासोबतच पीक कापणी, काढणी पश्चात सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकांचेही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षणाची तरतूद आहे.

या योजनेसाठी शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून पिकविम्यासाठी आपली नोंदणी करावयाची आहे. यातून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई होणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी अस्मानी संकटापासून चिंतामुक्त होईल यात शंका नाही.

असा करा अर्ज
पिकविमा संरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत पिक विमा साठी अर्ज करावा. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सातबारा/खाते उतारा, बँक पासबूक, आधार कार्ड व घोषणापत्रासह बँक, आपले सरकार केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्रावर अथवा http://pmfby.gov.in या पीक विमा पोर्टलवर दि. 31 जुलै पर्यंत नोंदणी करावी.

- गजानन जाधव,
माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर.

समृद्धी महामार्गावरील खासगी बस अपघातातील २५ जणांवर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजानजीक शनिवारी, दि. १ रोजी खासगी प्रवासी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांवर आज दि. २ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता हिंदू स्मशानभूमीत एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री गिरीष महाजन यांनी अग्नि दिला.

यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रामदास तडस, आमदार आकाश फुंडकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी सहमती दिल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. यात तेजस पोकळे वर्धा, करण बुधबावरे वर्धा, वृषाली वनकर पुणे, शोभा वनकर पुणे, ओवी वनकर पुणे, ईशान गुप्ता नागपूर, सुजल सोनवणे यवतमाळ, तनिषा प्रशांत तायडे वर्धा, तेजस्विनी राऊत वर्धा, कैलास गंगावणे पुणे, कांचन गंगावणे पुणे, सई गंगावणे पुणे, संजीवनी शंकरराव गोटे वर्धा, सुशील खेलकर वर्धा, झोया शेख नागपूर, रिया सोमकुवर नागपूर, कौस्तुभ काळे नागपूर, राजश्री गांडोळे वर्धा, मनीषा बहाळे वाशिम, संजय बहाळे वाशिम, राधिका महेश खडसे वर्धा, श्रेया विवेक वंजारी वर्धा, प्रथमेश प्रशांत खोडे वर्धा, अवंती परिमल पोहणेकर वर्धा, निखिल पाते यवतमाळ यांच्यावर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. श्री. महाजन म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असून शब्दांमध्ये सांत्वन करता येणे शक्य नाही. आज दुःखाचा डोंगर कोसळला असताना नातेवाईकांनी संयम दाखवून दुःखाला सामोरे जात आहे. अपघातातील केवळ चार मृतदेहांची ओळख पटली आहे. मात्र २१ मृतदेहांची ओळख पटली नसल्याने सर्व नातेवाईकांनी सहमती दिली असल्याने एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शासनातर्फे शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली. अंत्यसंस्कार करण्यात आलेल्यांच्या सर्व कुटुंबियांना अस्थी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे या अस्थींचे विधिवत विसर्जन करावे. कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. यापुढे असे अपघात होणार नाहीत, यासाठी कडक कारवाई करण्यासोबतच कठोर पावले उचलण्यात येतील.

यावेळी खासदार रामदास तडस यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या. उपस्थित नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीकडून खोटे धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील बोडखा (मोकाशी) येथील शेतकऱ्याची वाळली हळद खरेदी करून खोटे धनादेश दिले व त्यांची आर्थिक फसवणूक केली त्यामुळे विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे वर फौजदारी गुन्हा करा व सर्व शेतकऱ्यांच्या हळद या मालाची उर्वरित रक्कम मिळवून देऊन शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या विदर्भ एग्रो सोल्यूशन कंपनीचे नोंदणी (लायसन्स) रद्द करा अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. 

बोडखा या गावांतील जवळपास ३५ शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारी वाळलेली हळद दिनांक १२/०४/२०२२ ला योग्य भाव ठरवून व वजन करून वाळलेली हळद कंपनीने घेतली व अॅडव्हान्स म्हणुन प्रत्येकी पन्नास हजार आर. टी. जि. एस. व्दारे दिले. उर्वरीत रक्कमेचे धनादेश दिले मात्र, ते धनादेश शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४५ दिवसांनी लावले असता कंपनी संचालकांच्या बँक खात्यात कोणतीही रक्कम नसल्यामुळे दोनदा चेक बॉन्स झाले, दरम्यान विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे यांच्याकडे शेतकरी भेटीला गेले असता व वारंवार त्यांना विनंती केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन शेतकऱ्यांना कार्यालयातून हाकलून दिले.
कंपनी संचालकांना माहीत होते की, बँकेत चेक वटविल्या जाणार नाही. तरी सुद्धा जाणून बुजून व त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, दरम्यान एक वर्ष लोटून सुध्दा मालाची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी शेतीचे हंगामात शेतीची मशागत कशी करावी व शेतात पेरणी कशी करावी. हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जर शेतात माल न पेरल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, प्रसंगी ते टोकाची भूमिका घेऊ सुद्धा शकतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आरोपी विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीचे संचालक प्रकाश लोखंडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून शेतकऱ्यांचे उर्वरित पैसे परत मिळवून द्यावे. अन्यथा शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या केल्यास शासन व पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा जनआक्रोश संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अमोल बावणे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, बोंडखा गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मेश्राम यांच्यासह पिडीत शेतकरी विलास तुराळे, पुनेश्वर तुराळे, उत्तम तुराळे, प्रल्हाद मेश्राम, देविदास हुलके, किसना चिडे यांनी दिला आहे. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : भारत हा तरुणांचा देश आहे. कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहते. त्यामुळे देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करतानाच, विद्यापीठाने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यात उपजीविकाक्षम कौशल्य निर्माण करावे, असे प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या हस्ते येथील पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षान्त समारंभात 249 संशोधकांना आचार्य पदवी, गुणवंतांना 119 सुवर्णपदके, 23 रौप्यपदके आणि 25 रोख पारितोषिके, तसेच 46 हजार 144 विद्यार्थ्यांना पदवी व 236 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठाकडून प्रक्रिया होत असल्याबाबत राज्यपाल श्री. बैस यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, येत्या काळातील विविध क्षेत्रांच्या गरजा ओळखून त्यानुरूप विद्यार्थ्यांत कौशल्य विकास घडविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय आकांक्षेनुसार देशाला विकासाच्या शिखरावर नेणारी संशोधक व व्यावसायिकांची पिढी यातून घडेल. विद्यार्थ्यांनी केवळ ‘नोकरी शोधणारे’ न होता ‘नोकऱ्या निर्माण करणारे’ बनावे अशा उद्यमशीलतेचा विकास या धोरणातून होईल.

नैतिक मूल्यांचे वर्धन व संस्कृतीचे आकलन वाढविण्यासाठीही धोरण उपयुक्त आहे. धोरणाच्या अंमलबजावणीमुळे आधुनिक शिक्षणाच्या नव्या पर्वाचा आरंभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा पुरस्कार केला. खऱ्या अर्थाने ते स्वच्छ भारत अभियानाचे जनक आहेत. त्यांच्या नावे स्थापित विद्यापीठाने राज्यात सर्वात स्वच्छ महाविद्यालये व स्वच्छ विद्यापीठाचे उदाहरण निर्माण करावे. संत गाडगेबाबा यांनी समाजाला अंत्योदयासाठी 'दशसूत्री' दिली. आम्हा सर्वांसाठी ती मार्गदर्शक आहे.

विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे ‘नॅक मूल्यांकन’ करून घ्यावे. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठाने योगदान द्यावे. किमान दहा गावे दत्तक घेऊन तिथे परिवर्तनासाठी प्रयत्न करावेत. या कामात विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे जेणेकरून त्यांच्यात वास्तव व सामाजिक परिस्थितीबद्दलची जाणीव विकसित होईल, असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. येवले यांनी प्रास्ताविकात सांगितले.

समारंभापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे राज्यपालांना पोलीसांतर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी
आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी , पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन आदींनी स्वागत केले.

वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपुर : जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्‍यक्ष ठिकाणी पंचनामे करून तात्काळ आपद‌्ग्रस्तांना मदत करण्याचे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

या वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी, नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. यांसदर्भात नुकसानीचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावे व नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी रविवार दि. ११ रोजी तातडीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होईल सामाजिक उपक्रमांनी साजरा


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मंगळवार, दिनांक १३ जून रोजी वाढदिवस असून यानिमित्त वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.

वरोरा-भद्रावती विधानसभा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कार्यालय 'शिवालय' येथून सामाजिक उपक्रमांची सुरुवात शिवसैनिकांच्या उपस्थितीत होणार आहे. 

यावेळी शिवसेना पूर्व विदर्भ संघटीका तथा प्रवक्ता प्रा.सौ. शिल्पाताई बोडखे, पूर्व विदर्भ संघटक सुरेशजी साखरे, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, चंद्रपूर जिल्हा संघटीका सौ. नर्मदा दत्ता बोरेकर, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजने, वरोरा-भद्रावती विधानसभा समन्वयक ज्ञानेश्वर डुकरे, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरीकर, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल या सर्व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थीती राहणार असुन दि. १३ जूनला सकाळी वरोरा-भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर कॅन्सर व गंभीर आजारांच्या गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

या निमित्ताने वरोरा व भद्रावती तालुक्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गाव शाखांचे उद्घाटन कार्यक्रम तथा युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्य होणाऱ्या सामाजीक तथा पक्ष सघंटन कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जेष्ठ शिवसैनिक खेमराज कुरेकार, प्रशात कारेकर, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, भद्रावती तालुका युवासेना प्रमुख राहुल मालेकर, भद्रावती बाजार समिती उपसभापती आश्लेषा जिवतोडे, त्रिशूल घाटे, बंडू पाटील नन्नावरे, प्रदीप महाकुलकर, बळीराम चवले, वैभव डहाणे, निखील मांडवकर यांनी केलेले आहे.

यावेळी शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रिदवाक्य ८० टक्के समाजकारण व २०टक्के राजकारण यास अंगिकारून व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे तथा युवा नेते आदित्य साहेब ठाकरे यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून शेकडो युवा शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने शिवसेनेत प्रवेश घेत आहेत.

कोरपना तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा : झाड कोसळून महिलेचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कोरपना : तालुक्याला शनिवारी दुपारी प्रचंड वादळी पावसाचा तडाखा बसला. दरम्यान वडगाव येथे झाड कोसळून महिलेचा मृत्यू झाला. 
वडगाव येथील शेतात कामाला गेलेल्या वैशाली गोवर्धन उरकुडे (वय 35) या महिलेवर झाड कोसळून जागीच मृत्यू झाला. गुलाब जिवतोडे यांच्या शेतात सरकी टिबायला सदर महिला गेली होती. काल दि.10 जून रोजी दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे ती झाडाखाली थांबली तेव्हा झाड कोसळून तिचा मृत्यू झाला.

47 डिग्री सेल्सिअस तापमान मध्ये बी आर एस ला प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : भारत राष्ट्र समिती चा प्रचार व पक्ष नोंदणी रथ विधानसभा राजुरा 70 मध्ये 47 डिग्री सेल्सिअस तापमानात खेडो पाडी जातो. अनेक गावात भारत राष्ट्र समिती च्या पक्ष नोंदणी साठी गावकरी उन्हात उभे राहून गावात स्वागत करतात.
   
भारत राष्ट्र समिती चे तेलंगाना चे लोकप्रिय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ह्याचे आभार व अभिनंदन करण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनता उत्सुक असल्याने चित्र ग्रामीण भागात बघायला मिळत आहे. सर्व गोष्ठी नी परिपूर्ण असलेले महाराष्ट्र राज्य हे स्थापन होऊन अनेक काळ झाला तरी मूलभूत सोयी पासून येथील जनता वंचित आहे असे दिसून येते. त्या उलट परिस्थिती के चंद्रशेखर राव ह्यांनी आपल्या राज्यात जनतेला दिली आहे.

 तेलंगाणा मधील सर्व सुविधा महाराष्ट्रात लागू करणार हे जेव्हा मला माहिती झाले तेव्हा पासून आम्ही उन्हाची तीव्रता न बघता प्रत्येक गावात भारत राष्ट्र समिती चा झेंडा रोवायला सज्ज झालो आहोत. जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघून आम्हाला उन्हातही थंडी वाजते असे मत आंनदराव अंगलवार, संतोष कुळमेथे, सन्नी रेड्डी, अजय सकीनाला, रेशमा चव्हाण, मीनाक्षी मून,ज्योती नले, अनसुर्या नुती,ह्यांनी बोलून दाखविले.

'आम्हाला अन्न हवे, तंबाखू नाही ' या WHO च्या थीमवर मूर्ती येथे तंबाखू विरोधी जनजागृती !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जि.प. उच्च प्राथमिक शाळा मूर्ती , पंचायत समिती राजुरा तर्फे मूर्ती येथे 'We need food, not Tobacco - आम्हाला अन्न हवे, तंबाखू नाही ' या जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी दिलेल्या थीमवर आधारित तंबाखू विरोधी जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला. त्यात चित्र, पोस्टर्स, कथा, घोषवाक्ये व बॅनरच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी आणि उपस्थित जनतेला तंबाखूच्या भयावह दुष्परिणामाविषयी रंजकपणे माहिती देण्यात आली. मूर्ती येथील उपक्रम प्रमुख विषय शिक्षक मनिष अशोकराव मंगरूळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.    
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मूर्ती येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिथुन मंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ज्ञानेश्वर डाखरे, ममता शालिक लांडे, सदस्या, शाळा व्यवस्थापन समिती मूर्ती, कल्पना गंगाधर कोडापे , सदस्या, शाळा व्यवस्थापन समिती मूर्ती, संजय बोबाटे सर, आनंदराव डाखरे , लताबाई देवगडे , गंगाधर कोडापे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
     
तंबाखूयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आणि तंबाखू विषयक भयावह सद्यस्थिती व विद्यमान कायदे, तंबाखू सोडण्याचे उपाय व निरोगी जीवनाचे फायदे प्रमुख मार्गदर्शक तथा उपक्रम प्रमुख शिक्षक मनिष अशोकराव मंगरूळकर यांनी पटवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
      
तंबाखूचे सेवन केल्याने शरीरातील विविध भागात जसे- तोंड , घसा, स्वरयंत्र, फुफ्फुस, आतडे, मूत्राशय, गर्भाशय इत्यादी भागात कर्करोग होत आहेत. संपूर्ण जगात तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रूग्ण आपल्या भारतात आढळून येत आहेत आणि तंबाखू ही या सर्व रोगांची जननी आहे. भारतात दरवर्षी जवळपास १० लक्ष लोकांचा मृत्यू तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या रोगाने होत आहे. तरीही आज संपूर्ण भारतात २८.६ टक्के प्रौढ व्यक्ती तंबाखूचे सेवन करत आहेत, तर  महाराष्ट्र राज्यात प्रौढ व्यक्तीचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास २६.६ टक्के आहे. मुलांचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास ५.१ टक्के युवक (१३ ते १५ वयोगट) हे तंबाखूचे सेवन करत आहेत. सिगारेटच्या धूम्रपानामुळे हवा दूषित होते आणि तंबाखू सेवन केल्याने वातावरण प्रदूषित होते. त्यामुळे आपले जवळचे नातेवाईक सुद्धा बाधित होतात. 'तंबाखू सोडा आणि नाती जोडा ' तसेच 'आरोग्याचा पहिला धडा, तंबाखूला 'नाही' म्हणा ' हा मोलाचा सल्ला उपक्रम प्रमुख शिक्षक मनिष मंगरूळकर यांनी उपस्थितांना पटवून दिला.

खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत लोकप्रिय खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना त्यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले होते. शासनाच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर लोकसभेच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार मुकुल वासनीक व आमदार सर्वश्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन राऊत, सुनिल केदार, अनिल देशमुख, आशिष देशमुख, किशोर जोरगेवार आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आपल्या शोकभावना व्यक्त करताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरचे युवा लोकनेते खासदार बाळू धानोरकर सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारे नेते होते. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आक्रमकपणे काम केले. आपसात चांगला संवाद असलेल्या या नेत्याचे अकाली निधन हे दु:खद व वेदनादायी असून यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. ते आपल्याला सोडून गेले याचे सर्वांच्या मनात प्रचंड दुःख आहे. धानोरकर परिवाराच्या दु:खात आपण सहभागी असून त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना इश्वरचरणी करत असल्यांचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
दिवंगत खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बाळु धानोरकर यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हानी झाली असून चंद्रपुरच्या या ढाण्या वाघाला, दिलदार व्यक्तमत्व व लढवय्या नेत्याला मानाचा मुजरा करत असल्याच्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी संपूर्ण शासकीय इतमामात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज धानोरकर परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी दिवंगत खा. धानोरकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, तसेच सामाजिक व राजकीय पदाधिकारी नरेशबाबू पुगलिया, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, रामु तिवारी, प्रकाश देवतळे, देवराव भोंगळे यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नागरीकांनी पुष्पचक्र अर्पण केले. दरम्यान त्यांच्या अंतयात्रेला हजारोंच्या संख्यने नागरिक उपस्थित होते.


मोठी बातमी: खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर आपली अमीट छाप उमटविणारे व अगदी कमी कालावधीत सर्वोच्य राजकीय कामगिरी करणारे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे आज दिनांक 30 मे रोज मंगळवार ला दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये रात्री 2.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

आज दिनांक 30/05/2023 ला मंगळवार ला त्यांचा मृतदेह एअर एम्बुलन्स न्यू नागपूर ला व नंतर वरोरा येथे आणण्यात येणार आहे व त्यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी 2.00 वाजेपासून ते 4.00 वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे अशी माहिती विशेष सूत्रांकडून मिळाली आहे.

त्यांच्या पश्चात आ.पत्नी, आई, भाऊ, दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे. या दुःखद घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात शोककळा पसरली.

खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा राजकीय प्रवास 
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 48 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्का करणारा प्रवास होता.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.

2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.



आदिवासी भागातील जल, जंगल, जमीन कवितेच्या केंद्रस्थानी यावेत- मालती सेलमे


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : निसर्ग आणि मानव यांचा अन्योन्य संबंध आहे. आदिकाळात माणूस जंगलाच्या सानिध्यात राहिला आणि जंगलाच्या सोबतीनेच जगाला. सध्या या जंगल संस्कृतीपुढे वेगवेगळी आव्हाने उभी ठाकली आहेत. ही संस्कृती संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे थांबवायचे असेल तर आदिवासी भागातील जल, जंगल आणि जमीन कवितेच्या केंद्रस्थानी यायला हवीत असे उद्गार गडचिरोली येथील सुप्रसिद्ध कवयित्री मालती मडावी सेलमे यांनी काढले.

शेगांव (बु) ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरी कवितेवर बोलू काही या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संवादक म्हणून प्रसिद्ध कवयित्री गीता रायपुरे देव्हारे यांनी भूमिका पार पाडली. अध्यक्षस्थान चंद्रपूरचे कवी प्रदीप देशमुख यांनी भुषविले. याप्रसंगी बदलापूर येथील प्रसिद्ध समीक्षक डॉ. संदीप भेले, कवितेच्या घराचे कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे, खेमजई येथील उपसरपंच चंद्रहास मोरे, कवी विवेक पत्तीवार उपस्थित होते. कवितेविषयी गीता देव्हारे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मालती सेलमे म्हणाल्या, जंगलची संपत्ती गोळा करीत आम्ही वाढलो, झाडे, झुडपे, जंगल, वेली हे सर्वच आमच्या सगेसोयऱ्यांसारखेच आहेत. आमच्या भागात सोईसुविधा नसल्यामुळे खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. आज आम्ही शहरात राहतो. नागरी जीवन व त्यातील धुसमट पाहून मन दुःखित होते. असे सांगून त्यांनी आदिवासी संस्कृतीची विविध वैशिष्टये सांगितली. या प्रसंगी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी निसर्गाचा वेध घेणाऱ्या विविध कविता सादर केल्या. 'ह्या हिरव्या पांदणवाटा ओढती माझे पाय', पावसा ये जरा जरा, संविधान गीत, रमाईचे महात्म्य सांगणारी कविता, बालमनाच्या वेध घेणाऱ्या कविता अशा अनेक कविता सादर करून मुलाखतीत रंगत आणली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे चंद्रहास मोरे म्हणाले, कवीने सामाजिक भान ठेवून कवितेतून प्रकट झाले पाहिजे, समाजाला सोडून कवितेचा विचार होऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी कवितेच्या घरातील विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमोद नारायणे यांनी केले, तर आभार डॉ. संदीप भेले यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाला विकास अधिकारी विद्याधर वैद्य, खेमजई येथील ग्रामपंचायत सदस्य धनराज गायकवाड, कवी राजू मांडवकर उपस्थित होते.

यशस्वितेसाठी कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर, संकल्पनाकार किशोर पेटकर, सूर्यकांत पाटील, भारत रामटेके, माविम सहयोगीनी रंजू रामटेके, वनिता माकोडे, गीता फुलकर, सावित्री सीएमआरसी सचिव वंदना वाढई , सुधा भोज, मंदाताई वैद्य, प्रियंका नागदेवते, विकास ग्रुपचे अमोल दातारकर, धर्मराज लोडे तसेच सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


खासदार बाळू धानोरकर यांना पितृशोक; श्री नारायण आत्माराम धानोरकर यांचे दीर्घ आजाराने निधन

 
सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर तथा भद्रावती नगरपरिषदचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे वडील नारायण आत्माराम धानोरकर यांचे आज शनिवारी २७ मे रोजी सायंकाळी ५.३० नागपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. 

त्यांच्यावर नागपूर येथील अरिहंत हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. 

नारायण धानोरकर हे पेशाने शिक्षक होते. ते उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून भद्रावती येथील डिफेन्स जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यामागे दोन मुले खासदार बाळू धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुलगी सौ. अनिता बोबडे, स्नुषा आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह पत्नी वत्सला धानोरकर , नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

आज भद्रावती येथील घुटकाळा वार्डातील निवासस्थानी सायंकाळी ८ ते उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिवदेह ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या रविवार दिनांक २८ मे रोजी सकाळी ९ वाजता भद्रावती येथील जैन मंदिर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.