प्रेस क्लब पांढरकवडाची कार्यकारिणी जाहीर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा : प्रेस क्लब पांढरकवडा या पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी प्रविण पिन्नमवार तर सचिव पदी रवि वल्लमवार याची येथील शासकीय विश्राम गृहात घेण्यात आलेल्या एका विशेष सभेत अविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार संभा मडावी होते.जेष्ठ पत्रकार अशपाक खान,रवि वल्लमवार यांनी प्रविण पिन्नमवार यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचविले तर योगेश मडावी,गणेश सामजवार यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्व सदस्यांनी एकमताने अध्यक्षपदी प्रविण पिन्नमवार यांची अविरोध निवड केली.पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सामाजिक,शैक्षणिक उपक्रम राबविण्यासोबतच पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्षानी दिले.

सदर सभेत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.त्यात उपाध्यक्षपदी सफी खान,कोषाध्यक्षपदी योगेश मडावी यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून संभा मडावी,अशपाक खान,तनविर शेख,संतोष मग्गीडवार,गणेश सामजवार,वाजीद कुरेशी यांची निवड करण्यात आली.

युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांच्या प्रयत्नाने अपघातग्रस्तांना मिळाली आर्थिक मदत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : काल शुक्रवारी वणी वरून वैयक्तिक काम आटोपून गावाकडे परततांना मोटरसायकल ला हायव्हा ट्रकने धडक दिल्याने तालुक्यातील ब्राह्मणी येथील दोन जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना दिं. 28 फेब्रुवारी ला सकाळी साडे दहा च्या दरम्यान घडली होती. 

यात महादेव उपरे (45) व महादेव मंगाम (55) यांना गंभीर इजा होऊन हात फ्रॅक्चर झाला असे समजते. त्यांना सर्वप्रथम वणी येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूरला त्यांना हलविण्यात आले, तेथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सदर अपघात भयावह होता असे प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात येत होते.

या घटनेची माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख तथा शिववाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांना कळताच त्यांनी अपघातग्रस्तांची लगेंच भेट घेऊन विचारपूस केली व त्यांची हालचाल घेत माहिती जाणून घेतली. दरम्यान,वाहन क्रमांक (एम एच ४० सीएम ५१५९) याजकडून पिडीत अपघातग्रस्ताना मदत देण्यास मालक टाळाटाळ करत असल्याचीही कळल्यानंतर अजिंक्य शेंडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह संबंधित कोलवाशरी अधिकाऱ्यांशी अपघात ग्रस्तांची परिस्थिती समजावून सांगत कोल प्रशासनाला धारेवर धरले व त्यांना आर्थिक मदत करण्यास भाग पाडले. यांच्या प्रयत्नाने अपघातग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली, पीडिताकडून त्यांच्यासह संपूर्ण कार्यकर्त्यांचे आभार मानले जात आहे. 

यावेळी योगेश उपरे, यश खामणकर, रुपेश उपरे, सुजित काळे, रमेश डाखरे, अक्षय आवारी, प्रीतम राजगडे, नागेश काकडे, हनुमान आवारी, गणेश काळे, विवेक राजगडे, बीटा राजगडे, मनोज वाकटी, कुंदन पेंदोर आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

अन्न विषबाधा उद्रेक नियंत्रणासाठी दक्षता बाळगावी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : सार्वजनिक कार्यक्रमात आयोजित महाप्रसादासह सामुदायिक भोजनामध्ये अन्न विषबाधा उद्रेकाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. त्यामुळे अशा घटनाच्या नियंत्रणासाठी स्थानिक प्रशासनासह नागरिकांनी दक्षता बाळगावी असे, आवाहन मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी प्रसिध्दी पत्रकातुन केले आहे. 

गाव पातळीवर सार्वजनिक कार्यक्रमात महाप्रसाद सह सामुदायिक भोजनाने होणाऱ्या विषबाधेला आळा बसविण्याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना सध्याच्या काळात आयोजित होत असणाऱ्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये महाप्रसाद किंवा सामुदायिक जेवण यांचे सेवन केल्यामुळे अन्नविषबाधेचे उद्रेक मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्याकरिता तालुक्या आरोग्य अधिकारी यांना पुर्व सुचना देणे करिता व अन्नविषबाधेच नेमक कारण शोधण्याकरिता पत्रकाद्वारे कळविले असुन अन्नविषबाधेस कारणीभुत बाबी, बाधित व्यक्तीमध्ये आढळणारी लक्षणे, या वर उपाय करणे, जबाबदार व्यक्ती किंवा संस्था यांची माहिती, उपाययोजना व कार्यवाही याची माहिती घेणे या सुचना करण्यात आल्या आहे. 

या पार्श्वभूमीवर विषबाधा चा उद्रेक होऊ नये म्हणून त्यावर उपाययोजना करण्याकरिता सतर्क राहून विषबाधेवर हव्या त्या उपायोजना कराव्या व विषबाधेला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करून विषबाधावर आळा घालावा व तो अहवाल सादर करावा या करिता जिल्हा आरोग्य विभागांकडून तालुका आरोग्य विभागाला सुचना करण्यात आल्या आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्यांचे कैवारी होते- प्रा. डॉ. करमसिंग राजपूत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य नाचण्यासाठी नाही तर वाचण्यासाठी आहे. त्यांचे सर्वसमावेश कार्य इतके मोठे आहे की, ते खऱ्या अर्थाने विश्व रत्न आहेत. बाबासाहेबांना दलितांचे कैवारी म्हटल्या जाते. पण त्यांच्या कृतीतून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दलितांपेक्षा इतर समाजातील गोरगरीब पुरुष व महिलांचा जास्त विचार करून काम केले आहे. त्यामुळे ते सर्वसामान्यांचे कैवारी होते असे प्रतिपादन येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. करमसिंग राजपूत यांनी केले. 
       
संस्कार भारती, जैताई मंदिर आणि सागर झेप बहुउद्देशीय संस्था, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने द्वारे आयोजित भारत माता पूजा उत्सवात युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर जैताई मंदिरात ते दिनांक 25 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैताई मंदिराचे अध्यक्ष माधवराव सरपटवार हे होते. अतिथी म्हणून संस्कार भारतीच्या संध्या अवताडे या उपस्थित होत्या. 
     
आपला विषय मांडताना डॉ. राजपूत म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी देशाची घटना तयार करतांना अनुसूचित जातीच्या कलमाआधी इतर मागासवर्गीय समाजासाठीच्या कलमांचा अंतर्भाव केला. सरकार मध्ये मिळालेल्या अधिकाराचा उपयोग करून शेतकरी, नोकरदार, महिला, कामगार यांच्यासाठी भविष्याचा विचार करून निर्णय घेतले, कायदे केले. हिंदू कोड बिल व ओबीसी आयोगासाठी तत्कालीन सरकारने केलेल्या चालढकलीचे विरोधात मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे बाबासाहेब हे दूरदृष्टीचे युगपुरुष होते. 
       
या प्रसंगी आयोजक संस्थेकडून भावी पिढीचे भविष्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक तेजस्विनी गव्हाणे, द्वितीय कांचन गुरनुले, तृतीय तर्फीया अन्सार शेख, व चतुर्थ क्रमांक झिनथ अन्सार शेख यांनी मिळविला होता. त्यांच्यासह इतर 6 स्पर्धकाना प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आली. व यातील पहिल्या दोन क्रमांकाच्या स्पर्धकांना पुन्हा या मंचावरून भाषण देण्याची संधी देण्यात आली. 
      
अध्यक्षीय भाषण करताना माधव सरपटवार युगपुरुष डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची महती विषद केली. कार्यक्रमाचा आरंभ सुप्रिया केदारने सादर केलेल्या खरा तो एकची धर्म या साने गुरुजींच्या गीताने सुरु करण्यात आला. प्रास्ताविक प्रवीण सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया केदार यांनी तर पाहुण्यांचा परिचय व आभार कार्यक्रमाचे आयोजक सागर मुने यांनी मानले. 

कार्यक्रमाची सांगता विजय गंधेवार प्रस्तुत महाराष्ट्र गीताने करण्यात आली. बंधू भगिनींची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. राजू खुसपुरे, उम्हाकांत म्हसे, पंढरीनाथ सोनटक्के, अर्पित मोहुर्ले, संस्कार भारती समिती अध्यक्ष रजनी पोयाम, राजू तुराणकर, मनोज उरकुडे, बाळू हेडाऊ, प्रज्वल ठेंगणे, उमेश पोद्दार, शेखर वांढरे, घनश्याम आवारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

वणी तालुका अध्यक्षपदी हरीष पाते यांची निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भीम आर्मी संघटनेच्या वणी तालुका अध्यक्षपदी माजी अध्यक्ष हरीष पाते यांची निवड करण्यात आली आहे. सर्वसामान्य, शेतकरी, मजूर, विद्यार्थ्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे विरोधात राष्ट्रीय आझाद समाज पार्टीच्या वतीने वरीष्ठ पातळीवरुन न्याय मिळवून देणारी भीम आर्मी संघटनेची चळवळ उभी करण्यात आली आहे. या चळवळीची शाखा तालुका पातळीवरुन कार्यान्वीत करण्यासाठी वणी तालुका राष्ट्रीय आझाद समाज पार्टीच्या भीम आर्मी संघटनेची कार्यकारणी गठीत करण्यात आली असुन वणी तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते हरीश पाते यांची निवड करण्यात आली आहे. भीम आर्मीचे वणी विधानसभा अध्यक्ष श्री. रवींद्र मेश्राम यांनी निवडीचे पत्र नवनिर्वाचीत अध्यक्ष हरीष पाते यांचेकडे सुपूर्द करुन पुढील शाखा विस्तारीत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 
"भीम आर्मीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करण्याचा माझा निर्धार आहे. बहुजन समाजातील लोकांमध्ये विश्वास निर्माण करून संघटनेला अधिक बळकट करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल." असे हरीश पाते यांनी सांगितले.