सोमवार पासून ६ जिनिंगवर होणार सीसीआयची कापूस खरेदी,जिनिंग मध्येच होणार ऑनलाईन नोंदणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील सी सी आय कापूस खरेदी उद्या सोमवार पासून तब्बल ६ जीनिंगवर सुरू होणार आहे. व त्याच ठिकाणी शेतकऱ्यांची ऑनलाईन अत्यावध प्रणालीची पूर्तता करण्यात येणार आहे. यासाठी सीसीआय व कृषी उत्पन्न बाजार समितीकडून युद्ध पातळीवर काम चालू असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व सीसीआयचे केंद्र प्रमुख हेमंत कुमार ठाकरे यांनी दिली आहे. 

बुधवारी २७ डिसेंबर रोजी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआयच्या अधिकाऱ्याना सोबत घेवून बैठक घेतली. यात कापूस खरेदीबाबत अत्यावध प्रणालीसाठी लागणारे टोकण बंद करून सरळ कापूस खरेदी करून तिथेच त्यांची अत्यावध नोंदणी करण्यासाठी ठरले होते. 

वणी येथे केवळ ३ जीनिंग मध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. तर केवळ २ संगणकावर कृ.ऊ. बा.स. मध्ये अद्ययावत (ऑनलाईन) नोंदणी सुरू होती. त्यासाठी अगोदर शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीकरिता टोकण देण्यात येत होते. टोकण घेवूनही शेतकऱ्यांची अद्ययावत (ऑनलाईन) नोंदणी प्रलंबित पडत होती. शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास कमी करण्यासाठी आ. संजय देरकर यांनी टोकण पद्धत बंद करण्याचे सुचवले व सीसीआय सोबत करारनामा झालेल्या सर्व जिंनिंगमध्ये कापूस खरेदी करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यासाठी आदेशित केले होते. यावरून बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीसाठी अतिरिक्त दोन सेंटर सुरू करण्यात आली असून असे चार सेंटरवर नोंदणी सुरू करण्यात येईल असे झाडे यांनी सांगितले होतं.

सीसीआय कडून वणी येथील एस.बी., महाविरा, साईकृपा, राजा, गुलाब, नगरवाला अश्या ६ जिनिंग धारकांकडून कापूस खरेदीसाठी करारनामा करण्यात आला आहे. परंतु केवळ आळीपाळीने ३ जीनिंगमध्ये खरेदी सुरू होती. ती उद्या सोमवार पासून ६ ह्या केंद्रावर खरेदी सुरू करणार आहे. दररोज ४०० ते ५०० वाहने कापूस खरेदी केल्या जाणार आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर सीसीआय व कृ.ऊ.बा.स. कडून व्यवस्था केली जाणार आहे.

ऑनलाईन नोंदणीसाठी लागणारे टोकण पद्धत आज पासून बंद करण्यात आली आहे. परंतु ऑनलाईन पद्धत करणे अनिवार्य आहे. 

ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून टोकण देण्यात येत होते. आणि दररोज केवळ ५० वाहने कापूस खरेदी केल्या जात होते. ते टोकण बंद करून सरळ खरेदी सुरू असलेल्या केंद्रावर ऑनलाईन करून कापूस भरलेली वाहने काटा करून पावती देण्यात येणार आहे. कापसाचा चुकारा जमा करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी आधारकार्ड, लिंक असलेले बँक खाते पुस्तक, ७/१२ व २०२४ -२५ चे पेरावे पत्रक असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर ज्यांच्या नावाने ७/१२ आहे ते किंव्हा त्यांच्या रक्त मासातील व्यक्ती उपस्थित असणे अनिवार्य आहे. 


सरकारचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी: संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मुंबई :
महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले. २८८ पैकी महायुतीला तब्बल २३५ जागा मिळाल्या. एवढे प्रचंड बहुमत मिळूनही महायुतीला मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवून सरकार स्थापन करता आले नाही. त्यामुळे राज्यात नवे सरकार कधी स्थापन होणार? आणि नव्या सरकारचा मुख्यमंत्री कोण असणार? याची राज्यातील जनतेला कमालीची उत्सुकता लागलेली आहे.
मुख्यमंत्रिपद मिळत नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यामुळे ते महायुतीची महत्वाची बैठक असलेल्या दिवशीच त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी निघून गेल्याच्या बातम्याही आल्या. त्यामुळे महायुतीत सगळे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून नव्या सरकारच्या शपथविधीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

'राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी... विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरूवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे,' असे बावनकुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महायुतीच्या नव्या सरकारबाबत नवी दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत गुरूवारी बैठक झाली. तीन तास चाललेल्या या बैठकीत महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप याबाबत सहमती झालेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागण्यांमुळे भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी साधी बैठकही होऊ शकलेली नाही.

अशातच आता खात्रीलायक सूत्रांकडून एक बातमी पुढे येत आहे. भाजप पक्षश्रेष्ठी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकनाथ शिंदेंचीच वर्णी लावण्याची शक्यता आहे.

सौ.मनिषा तिरणकर यांना राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार जाहीर


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : जिल्ह्यासह महाष्ट्रभर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रुग्णहक्क संरक्षण समिती संस्था महाराष्ट्रच्या वतीने ३० नोव्हेंबर २०२४ ला राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला आहे.यात सौ.मनिषा तिरणकर, राज्याध्यक्ष अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषद यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर रुग्णांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या हितासाठी कार्य करणारी सामाजिक संस्था, रुग्णहक्क संरक्षण समिती महाराष्ट्र जिल्हा परभणीच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आरोग्य, सांस्कृतिक, पत्रकारिता, बचतगट, क्रीडा, इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २१ समाज सेवकांचा संविधान सन्मान गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यात सौ.तिराणकर ह्यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय क्षेत्रात काम केल्याबद्दल हा पुरस्कार सन्माननीय मान्यवर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

हा सन्मान गौरव सोहळा शनिवार दि.३० नोव्हेंबर २०२४ ला पत्रकार भवन एसपी आफिस समोर बसमत रोड परभणी इथे पार पडणार आहे.

आज वणी येथे संविधान दिनानिमित्त जाहीर व्याख्यान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी एस.बि.लॉन वणी येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. प्रकाश सिरसाट जेष्ठ आंबेडकरी विचारवंत, छत्रपती संभाजी नगर,तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. प्रमोद हेरोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर, प्रा.तक्षशिल सुटे, आनंद निकेतन विद्यालयात वरोरा हे भारतीय संविधान, निर्मितीचा इतिहास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भुमिका व भारतीय संविधान, अनु,जाती जमाती व ओ.बि.सी.समाजापुढील आव्हाने या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे, आवाहन आयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान प्रबोधन परीक्षा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्य "जागर संविधानाचा अभियान" अंतर्गत बौध्द स्मारक समिती, चिंचमंडळ द्वारा आयोजित "संविधान प्रबोधन परीक्षा" 26 नोव्हेंबर ला घेण्यात आली.

संविधानाप्रती जनजागृती करिता आपले हक्क व मूलभूत अधिकाराविषयी ओळख होऊन त्या विषयी विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा त्याकरिता जागर संविधानाचा अभियान अंतर्गत समिती द्वारे आदर्श हायस्कुल मार्डी व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय चिंचमंडळ येथील विद्यार्थ्यांना संविधानातील प्रमुख कलमे व विविध माहिती असलेले पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते. त्याच पुस्तकावर आधारे ही संविधान प्रबोधन परीक्षा घेण्यात आली.
    

संविधान दिनी सर्वप्रथम बौ. स्मा. समिती चे अध्यक्ष ज्ञानेश्वर देठे यांच्या अध्यक्षतेत तथा सचिव राजेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधान व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या संविधान प्रबोधन परीक्षेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये सहभागी शाळा आदर्श हायस्कुल मार्डी येथील वर्ग 8 वी ते 10 वी चे 110 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय चिंचमंडळ येथील 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामधून निवड झालेल्या प्रत्येकी शाळेतील विद्यार्थ्यांना 4 पारोतोषिक, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात येणार आहे.

या प्रबोधन परीक्षा करिता मुख्याध्यापक श्री. ढुमणे सर व मुख्याध्यापक श्री. रमेश खेकारे सर तसेच सचिव राजेश कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने, विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभागाने पार पडली.

या परीक्षेला पर्यवेक्षक म्हणुन गंभीर कवाडे, विजय कवाडे, सुरेश कवाडे, ईश्वर दुपारे, शैलेश कवाडे यांनी कार्यभार पाहिला. ही परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता दोनही शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.