चिंचमंडळ येथील शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील दापोरा शिवारातील उपाश्या नाला ओलांडून जाताना एका शेतकऱ्याचा पाण्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. मेघश्याम नारायण वासाडे रा. चिंचमंडळ (वय 58) असे पाण्यात बुडून मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही धक्कादायक घटना आज सोमवारला सकाळी 11 वाजताचे दरम्यान घडल्याने चिंचमंडळ येथे शोककळा पसरली आहे.

तालुक्यात मागील काही दिवसापासून संततधार पाऊस सुरु असतांना सर्वत्र नदी नाले तुडुंब भरून पूर वाहत आहे. अशातच मेघश्याम वासाडे हे आपले पशुधन घेवून शेतात जात होते. दापोरा समोरील उपाश्या पुलावरून शिवपांदन रस्त्याने शेतात जात असताना पाणी ओलांडून पशुधन घेवून ते पाण्यात बुडाले अशी माहिती मिळताच तहसीलदार उत्तम निलावाड व त्यांची टीम तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन नाल्याच्या पाण्यात बुडालेल्या शेतकऱ्याचा शोध घेतला घटनास्थळीच तो इसम मृतावस्थेत सापडला. 

गावाशेजारील माणूस पाण्यात बुडाल्याने नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. शेतकरी अखेर सापडला अशी तूर्तास माहिती आहे. मात्र, पावसात अशावेळी नागरिकांनी पूर असलेले पुल, नदी नाले ओलांडून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार उत्तर निलावाड यांनी यावेळी केले आहे. 

चक्काजाम आंदोलन तूर्तास मागे, रस्त्याच्या कामाला झाली सुरुवात...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मोहदा, केशवनगर, वेळाबाई फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सोमवारी (ता.२९) रोजी वेळाबाई फाट्यावर स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी चक्काजाम आंदोलन करणार होती. मात्र,संबंधित विभागाने कामाला सुरुवात झाली असून यासंदर्भात पत्र प्राप्त झाल्याने तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले असे सामाजिक कार्यकर्ते तथा मोहदा स्टोन क्रेशर धारक नवीन अग्रवाल यांनी माहिती दिली.
तालुक्यातील केशवनगर ते वेळाबाई फाटा ते आबई फाटा रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. येथील नागरिकांना नमूद रस्त्यावर प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तसेच नवीन अग्रवाल यांनी हा रस्ता व्हावा यासाठी पाठपुरावा संबंधित विभागाकडे २६ जुलै रोजी केला होता. त्यामुळे सदर रस्त्यावर करावी लागणारी तारेवरची कसरत आणि स्थानिकांना होणारा नाहक त्रास, ही बाब लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागा (PWD) ने आज (२८) पासून केशवनगर ते वेळाबाई फाटा ते आबई फाटा पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. आणि सदर लांबी जुलै २०२४ च्या अर्थ संकल्पामध्ये मंजूर असून सदर काम निविदा स्तरावर आहे. व येत्या २० दिवसात नवीन कामाला सुरुवात होईल, त्यामुळे उदयाचे चक्का जाम आंदोलन स्थगित करावे असे पत्र वेळाबाई/मोहदा ग्रामपंचायतला प्राप्त झाले आहे. सरपंचा सौ.रंजना बांदूरकर (वेळाबाई), सरपंचा सौ.वर्षां राजूरकर (मोहदा) यांच्या सह गावाकऱ्यांच्या मागणीला यश आले आहे. 
सतत दुर्लक्ष करणाऱ्या विभागाला अखेर जाग आली असून आज रोजी कामाला सुरुवात झालेली आहे. याबाबत समाधान आहे, येजा करणाऱ्याकडूनही दिलासा व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उद्या सोमवार (ता.२९) रोजी नियोजित "चक्काजाम आंदोलन" तूर्तास स्थगित करण्यात येत आहे, असे मोहदा येथील स्टोन क्रेशर धारक नवीन अग्रवाल वर उपसरपंच सचिन रासेकर यांनी सांगितले. आमची समस्या प्रशासन दरबारी पोहचवली यासाठी 'सह्याद्री चौफेर'चे वर प्रशासनाचे आभार...

 

हातावरची मेहंदी सुकण्यापूर्वीच तीने मृत्यूला कवटाळले

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : लग्नानंतर मेहदीचा रंगही तिच्या हातातून उतरला नव्हता, आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 4 वाजता वणी शहराल गतच्या लालगुडा परिसरात असलेल्या सबा कॉलनीत उघडकीस आली. देवयानी नीरज चट्टे (24) असे मृत विवाहिताचे नाव आहे. पोलिसांना मृतकाच्या खोलीतून 15 पानी सुसाईड नोटही सापडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या नीरज बबनराव चट्टे यांनी काही महिन्यांपूर्वी सबा कॉलनीत घर घेतले होते. ज्यामध्ये तो आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. लग्न 29 जून रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील देवयानी मनोहर बावणे हिच्यासोबत वणी येथील जगन्नाथ महाराज देवस्थानात सामाजिक रितीरिवाजानुसार पार पडला. लग्नानंतर अवघ्या 4-5 दिवसांनी देवयानी आपल्या माहेरी गेली होती, असे सांगितले जाते. गुरुवारीच देवयानीचे आई-वडील, बहीण आणि भाटव्याने तिला वणी येथे तिच्या सासरच्या घरी आणून सोडले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी नीरज आणि आपल्या कामावर निघून गेला. त्यावेळी नीरजचे वडील आणि आजारी आई घरी होते. सासू आणि सासऱ्यांसोबत सकाळचे जेवण करून देवयानी वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी नीरजच्या आईला वरच्या खोलीत काहीतरी पडल्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. सर्वांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता देवयानीची खोली आतून बंद होती. आरडाओरडा करूनही देवयानीने दार उघडले नाही तेव्हा शेजारच्या एका मुलाने लोखंडी सब्बलने दरवाजा उचकटून आत डोकावले तर देवयानी पंख्याला लटकलेली दिसली. घटनेची माहिती मिळताच देवयानीचा पती नीरज घरी पोहोचला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह पंख्यावरून उतरवून पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. 

घटनेची माहिती दिल्यानंतर मृत देवयानीचे आई-वडील व इतर नातेवाईकही रात्री वणीत पोहोचले. शनिवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत महिलेने सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

अंध आणि दृष्टीहीनासाठी काम करणं हेच खरे लोकप्रतिनिधित्व - अध्यक्ष विजय चोरडिया

 सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : मनुष्याने स्वतःच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे. मात्र, समाजातील ईतर दुर्बल समाजाच्या व्यथांची जाणीव राखून त्यांच्या समस्या व मूलभूत सोयींकरिता सदैव प्रयत्नशील असावे. एक जबाबदार नागरिक म्हणून राजकीय,सामाजिक कार्य करित असताना समाजातील अंध आणि दृष्टीहीनासाठी दृष्टी देऊन त्यांच्या जगण्याला पंख देणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व किंबहुना सामाजिक उत्तरदायित्व होय,असे प्रतिपादन स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी केले. ते स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन, वणी तर्फे आयोजित जैताई मंदिर येथील मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप वर आरोग्य तपासणी शिबीरात बोलत होते.
आयोजित शिबिर कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ. चौधरी, राहुल मुंजेकर (औषधी विभाग), बजरंग दलचे जिल्हा संयोजक विशाल दुधबळे, श्री.जोशी, श्री. मुन्ना तुगनायत, श्री. माधवजी सरपटवार हे उपस्थित होते. 
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी राजकारणात तर आहेच, पण शेवटी राजकारणात असले तरी जन सेवा, हे माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून मी सतत असे सामाजिक, जनहितार्थ उपक्रम राबवत असतो, त्यासाठी तुम्ही सहभागी होऊन यशस्वी करता हे मी माझं भाग्य समजतो, यासाठी तुम्हा मायबापांचे धन्यवाद...तुमचा आशीर्वाद सतत पाठीशी राहूद्या, असेच कार्य पुढेही सुरू राहील. अशी ग्वाही दिली.
शिबिरामध्ये जवळपास 900 रुग्णांनी लाभ घेतला असून यात बीपी, शुगर, हृदय, डोळे तपासून घेतले आहे. तसेच शेकडोच्या वर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठविण्यात आले. या मोफत शिबिराला यशस्वीरित्या चोरडिया हॉस्पिटल, वणी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी पार पाडले. यावेळी विजय चोरडिया मित्र परिवार तथा वणी विधानसभा क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परवा वेळाबाई फाट्यावर "चक्का जाम आंदोलन"


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील मोहदा, केशवनगर ते वेळाबाई फाटा, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा अशी मागणी येथील गावकऱ्यांनी 12 जुलै रोजी निवेदनातून केली होती. मात्र, संबंधित विभागाने दुर्लक्ष करत केराची टोपली दाखवल्याने आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणत प्रशासनाच्या विरोधात सोमवार दि.29 जुलै'ला "चक्का जाम आंदोलन" करण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांना पुन्हा देण्यात आले. 
मोहदा,केशवनगर ते वेळाबाई फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत अनेकदा निवेदन दिली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे याप्रकरणी आता मोहदा,केशवनगर, वेळाबाई व या परिसरातील सर्व गावकरी आक्रमक झाली आहे. त्यांनी वेळाबाई फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
मा.जिल्हाधिकारी, विद्यमान आमदार वणी, पोलीस स्टेशन शिरपूर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर, सार्वजनिक बांधकाम विभाग, वणी यांना माहितीस्तव निवेदन सादर करण्यात आले असून आम्ही रस्त्यावर उतरून "चक्का जाम आंदोलन" करू असा पुन्हा ईशारा देण्यात आला आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासनाची जबाबदारी असेही निवेदनात नमूद केलं आहे. यावेळी तीनही गावातील प्रमुख पदाधिकारी वर ग्रामस्थ उपस्थित होते.
वणी तालुक्यातील मोहदा,केशवनगर ते वेळाबाई मार्गाची अवस्था अतिशय वाईट आहे. गाडी व पायदळ चालणे सुद्धा कठीण झालेले आहे. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होत असून दैनंदिन कामकाजाला मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर वेळाबाई बस स्टॉप समोर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.असे आमच्या प्रतिनिधीला निवेदनकर्त्यांनी सांगितले.