सारंग बोथले मित्र परिवाराचे शाखा अभियंता यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कायर परिसरातील महावितरण कंपनीच्या जीर्ण झालेल्या विद्युत तारा मुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता बळावल्याबाबतचे निवेदन शाखा अभियंता मुकुटबन यांना 21 जून रोजी देण्यात आले. मात्र, अजूनही यासंदर्भात काही हालचाली झाल्या नसल्याने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभाराची प्रचिती सारंग बोथले मित्र परिवाराने आणून दिली.

कायर रोड मलकापूर परिसरातील वीजेच्या जीर्ण तारामुळे कधी जीवितहानी होईल याचा काहीही नेम नाही. याबाबत संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले,मात्र पावसाळा लागला; दोन दिवस लोटूनही महावितरण कंपनीकडून कोणतीही उपाययोजना करत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते सारंग बोथले यांनी सांगितले. आग्रहाची विनंती आहे की,त्वरित नवीन वीज तारा जोडणी करून पुढील अनर्थ टाळावा, अशी मागणी निवेदनातून लवकरात लवकर निकाली काढण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते सारंग बोथले यांचे नेतृत्वात शाखा अभियंता मुकुटबन यांना करण्यात आली.

निवेदन देतेवेळी अक्षय पुल्लेवार, पिंकू गोहोकार, सुरज पुल्लेवार, अनुप चटकी, गणेश देठे, सतीश मोहितकर, व सारंग बोथले मित्र परिवार उपस्थित होते.

वळण रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी गावाचा वळण रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. 

येथील गावाजवळील पूलाचे काम मागील चार महिन्यापासून संत गतीने चालू असल्याने गावाकऱ्यांना बाजूने जाण्यासाठी तयार केलेला वळण रस्ता पुराणे वाहून गेल्याची घटना घडली आहे. एकाच पावसात वळण रस्ता वाहून गेला. परिणामी गावातील नागरिकांना गावाबाहेर पडणे कठीण झाले असून जवळपासच्या चार ते पाच गावांचा संपर्क तुटला आहे.

वनोजा देवी मार्गावरील गावालगतचा वळण रस्ता दिनांक 22 जुन च्या रात्री आलेल्या पावसामुळे वाहून गेला आहे. हा वळण रस्ता इतका कमजोर आहे, की पहिल्याच पावसाने पूर्ण वाहून गेला. त्यामुळे नाल्या पलीकडील शेतकऱ्यांची पेरणीची कामे, विद्यार्थ्यांची शाळा, आरोग्याचा प्रश्न, दैनंदिन व्यवहार, शासकीय कामे अडली आहे. 

पावसाळा जवळ येत असल्यामुळे या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाची स्पीड वाढवण्यात यावी,पर्यायी मार्ग मजबूत करण्यात यावा, अशी मागणी कंत्राटदाराकडे अनेकदा वनोजा (देवी), येथील नागरिकांनी केली होती. परंतु, यांची दखल न घेतल्याने वळण रस्ता वाहून गेला,ही मानव निर्मित समस्या उभी झाली असून पर्यायी रस्ता प्रशासनाने त्वरित तयार करून द्यावा अशी मागणी वनोजा देवी येथील नागरिक करित आहे.

युवतीचे अंघोळ करताना मोबाईलने फोटो काढत होता, तेवढ्यात…

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आंघोळ करीत असलेल्या युवतीचे मोबाईलने फोटो काढत होता, तेवढ्यात तीची नजर त्याच्याकडे फिरकली आणि हा घृणास्पद प्रकार उजेडात आला. दिनांक 20 जूनला ही कार्यवाही करण्यात आली. मात्र,महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे वाढल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

सतेंद्र सुखरी प्रसाद (25) असे या आरोपीचे नाव आहे. ही घटना राजूर (कॉलरी) येथील आहे. तरुणी घरी स्नान करीत असतांना हा आरोपी बाथरूम जवळ आला, व छुप्या पद्धतीने तिचे भ्रमणध्वनी मध्ये शूट करू लागला. परंतु हे दुष्कृत्य करतांना या तरुणांवर तीची नजर फिरकली. तीने आरडाओरड करताच आरोपीने पोबारा केला.

तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. पालकांनी मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले. तीने पोलिसांसमोर घडलेला सर्व प्रकार सांगितला. फिर्यादीच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी सतेंद्र प्रसाद याच्या विरुद्ध भादंविच्या कलम 354 (सी), 354(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात दत्ता पेंडकर व जमादार अविनाश बनकर हे करीत आहे.

परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील जाचक अटी रद्द करा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : महाराष्ट्र शासन तर्फे विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती 'समान धोरण' नावाखाली घातलेल्या जाचक अटी शिथील करण्याबाबत राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा यवतमाळ तर्फे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
     
महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय वि‌द्यार्थीना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये 'समान धोरण' नावाखाली दि. 30/10/2023 रोजीच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे काढण्यात आलेल्या परीपत्रका नुसार जाचक अटी घातल्या आहेत. इ. 10वी, 12वी व पदवीला 75टक्के गुणांची अट घालतानाच शिक्षण शुल्काला 30 ते 40 लाखांची मर्यादा घातली आहे. यामुळे दलित वि‌द्यार्थांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न भंगले आहे. यापूर्वी परदेशी शिष्यवृत्तीचा संपुर्ण खर्च हा शासनाकडून उचलला जात होता. यामध्ये शिक्षण शुल्क, विमान भाडे, मासिक निर्वाह भत्ता आदींचा समावेश होता.

मात्र, आता मा. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने बहुजन समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी समान धोरण आखले आहे. त्यामुळे आताच्या परीपत्रकेनुसार पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी 30 लाख आणि पी.एच.डी. करिता 40 लाखांची मर्यादा घालण्यात आली आहे. वार्षीक 12 लाख रुपये निर्वाह भत्ता यातच समाविष्ट करण्यात आलेला आहे. अशा अभ्यासक्रमासाठी सध्या वि‌द्यापीठांचे शुल्क 65 ते 90 लाख असल्याने साहजिकच शासनाची शिष्यवृत्ती अपुरी पडते.

  तसेच 8 लाखांची उत्पन्न मर्यादा असणारा वि‌द्यार्थीच परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार असल्याने अशा उमेदवारांचे वार्षीक 50 लाखांचे शिक्षण शुल्क कुठून द्यावे, हा गंभीर प्रश्न आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यास पुढे पी.एच.डी साठी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही, असाही बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिकच सरकार 8 लाखांची उत्पन्न मर्यादा आणि 75 टक्के गुणांची अट घालून संविधानातील तरतुदींनाच बगल देत आहे.

या विषयाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय चर्मकार महासंघ विदर्भ प्रमुख संबा वाघमारे यांच्या आदेशाने जिल्हा यवतमाळ तर्फे वणी उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा यवतमाळ चे अध्यक्ष महेश लिपटे सर, वणी शहर अध्यक्ष प्रकाश राजूरकर, युवा जिल्हा उपाध्यक्ष आकाश डूबे, सदस्य योगेश सोनोने, अनिकेत वाघमारे, निलेश वाघमारे द्वारा अटी शिथिल करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

चक्क! तहसील कार्यालयाच्या प्रांगनातून जप्ती केलेले वाहन नेले चोरून

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : सिनेस्टाईलने पाठलाग करून तहसीलदार श्री उत्तम निलावाड साहेब यांनी पाच महिन्याअगोदर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना ट्रक वर जप्ती ची कारवाई केली होती. तोच ट्रक मारेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत तहसील प्रशासन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

मारेगाव तालुक्यात अवैध उत्खनन करून तस्करी करणाऱ्यांच्या वाळू चोराचे मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग निर्भीडपणे कंबर काम करित आहे. तहसीलदार उत्तम निलावाड हे आल्यापासून आतापर्यंत जवळपास 23 च्या वर वाहनांवर दंडात्मक कारवाया, आणि 4 वाहन धारक यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन मारेगांव येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर अमरावती विभागात तस्कराच्या मुसक्या व वाळू वर नियंत्रण मिळवण्यात मारेगाव महसूल विभाग प्रथमस्थानी आल्यामुळे साहजिकच मारेगाव महसूल विभागाचे पथक आणखीच ऍक्टिव्ह झाले आहे. मात्र,दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी जप्ती करण्यात आलेला ट्रक अज्ञाताने तहसीलमधून लांबवीला आहे.

मागील फेब्रुवारी महिन्यात अवैध वाळू उत्खनन करून वाळू भरलेला ट्रक क्र. (MH 36 - 1675) या वाहनावर तालुक्यातील मौजे महादापेठ येथे पाच किलोमीटर सिनेस्टाईलने पाठलाग करून पकडला होता. महसूल विभागाने सदरील वाहनातील वाळू तहसील कार्यालयाच्या कंपाउंडमध्ये जमिनीवर टाकून सदरचे ट्रक तहसील आवारात उभा करण्यात आला होता. सदर वाहनाबाबत दिनांक 07/02/2024 रोजी मा. उपविभागीय अधिकारी वणी यांना प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलेला आहे. मात्र, जप्तीच्या जाचक अटीने व  दंडात्मक कारवाईने मागील चार महिन्यापासून जप्त असलेले वाहन (ट्रक) तहसील कार्यालयाच्या समोर उभे लावलेले होते.

दरम्यान, 15 ते 17 जून 2024 या तीन दिवसाच्या सुट्ट्याचा कालावधीत अज्ञाताने हा उभा असलेला ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारातून चक्क! चोरून नेल्याची तक्रार महसूल विभागाने पोलिसात केली आहे. श्री. सतिष गुलाबराव सुरुळकर रा. 771, कबिर वार्ड न. 9 खापा तालुका सावनेर जि. नागपूर या मूळ मालकाचे वाहन असून ट्रकची किंमत रुपये 9,00000/- (अक्षरी नऊ लाख रुपये) आहे. मात्र, या आश्चर्यजनक घटनेने तालुक्यात पुरती खळबळ उडाली असून घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहे.