शिरपूर : काल झालेल्या अपघातातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर

वणी : खाजगी कंपनीच्या कामानिमित्त चंद्रपूरला जात असतांना मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात वांजरी (मजरा) येथील 2 युवक गंभीर जखमी झाले. ही घटना काल 28 जून दुपारी घडली होती. त्यापैकी एका युवकाचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश वांढरे (25) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
काल (28 जून) रोज मंगळवारला दुपारी खाजगी कंपनीचे मार्केटिंग काम करणारा युवक व त्याचा मित्र वणीहुन घुग्गुस मार्गे चंद्रपूर ला मोटारसायकल ने जात असतांना बेलोरा फाट्याजवळ दुचाकी क्र (MH 29 BA 8705) अनियंत्रित होऊन दोघेही गंभीर जखमी झाले होते. शिरपूर पोलीस स्टेशन ला प्रत्यक्षदर्शीनी माहिती दिली. तर काही नागरिकांनी त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. मात्र, यातील गणेश वांढरे याची प्रकृती चिंताजनक होती.
तालुक्यातील वांजरी येथील दोन युवक मोटरसायकलने चंद्रपूरला जात असतांना बेलोरा फाट्याजवळ त्यांच्या अपघात झाला. या अपघातात सचिन डोंगे (28) व गणेश वांढरे हे दोनही युवक गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ चंद्रपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. गणेश या युवकाची प्रकृती चिंताजनक होती. काल रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर सचिन डोंगे याचे वर उपचार सुरु आहे असे समजते.

गणेश याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे.

"रंगनाथ" च्या विजयानंतर शहरात एकच जल्लोष!

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : 26 जून रोजी श्री रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्थेची निवडणूक पार पडली. यात दोन गटात कमालीची चूरशी झाली. अनेकांना 35 टक्के मतदान झाल्याने विजयाची माळ कोणाच्या पत्यावर, अशी धाकधूक होती. मात्र मतदारांनी दहा बाय दहा व विस वर्षाची यशस्वी ही वाटचाल मनी बाळगून खातेदार, ठेवीदार सभासदांचे हित जोपासणाऱ्या नेतृत्वाकडे मतदारांचा कल झुकला, व जय सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला.
रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुकीतील विजयाची माळ अॅड. देविदास काळे यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ढोल पथकावर काळे समर्थक बेधुंद होऊन थिरकले. विजयी उमेदवारांची सजलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. 
विशेष म्हणजे, जय सहकार पॅनलच्या उमेदवारांनी संयमी प्रचार केला. अॅड. काळे यांचा पतसंस्थेच्या यशात असलेला महत्वाचा वाटा उमेदवारांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला. आजवर या पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहिल्या. यापुढेही ही पतसंस्था सुरक्षित हातातच रहावी म्हणून मतदारांनी अॅड. देविदास काळे यांच्यावरच विश्वास दाखविला. असे विजयी उमेदवार अरविंद ठाकरे बोलताना सांगितले आहे. पतसंस्थेच्या निवडणुकीत भरगोस मतांनी दिल्याबद्दल माझे सर्व हितचिंतक, माझे सहकारी व मतदार राजाचे मनापासून जाहीरपणे आभार अरविंद ठाकरे यांच्या वतीने मानण्यात आले.
एकंदरीत मतदारांनी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीचे मानकरी ठरलेल्या अॅड. काळे यांच्या नेतृत्वावरच पसंती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विजयानंतर जय सहकार पॅनलच्या समर्थकांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.

राजूर वासीयांचा 4 जुलै पासून बेमुदत 'रास्ता रोको'


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : राजूर रेल्वे च्या जागेवर स्थापन झालेल्या विविध कोळसा कंपन्यांच्या कोळसा सायडिंग रहिवासी क्षेत्राला लागून गावात असल्याने प्रचंड प्रदूषण निर्माण होऊन गावातील जनतेला विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. राजूर ग्रापं व प्र.नि. बोर्डाची परवानगी नसलेल्या ह्या अवैध कोळसा सायडिंग ला हटविण्यासाठी ग्रामवासीयांनी निवेदने व आंदोलन करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने दि.4 जुलै 22 पासून राजूर रिंग रोडवर राजूर बचाव संघर्ष समितीचे बॅनर खाली बेमुदत रास्ता आंदोलन करण्यात येणार आहे.
राजूर परिसरात तांत्रिक दृष्ट्या गावाचा सीमेत येत नसले तरीही गावाला लागून असलेल्या कोळसा वॉशरीच्या कोळसा सायडिंग राजूर गावात असल्याने रात्रंदिवस सुरू असलेल्या कार्यामुळे प्रचंड प्रदूषण निर्माण होत आहे. प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या कुठल्याही नियमाला किंवा निकषाला पूर्ण न करता व परवानगी न घेता मनमानी पद्धतीने इथे कोळसा सायडिंग सुरू आहे. त्याच प्रमाणे ह्या कोळसा सायडिंगवर कोळसा आणण्यासाठी मोठ्या जड वाहनांच्या उपयोग केल्या जात असून राजूर रिंग रोड ज्याची क्षमता 15 ते 20 टनाची असताना 50 टन कोळशाची वाहतूक केल्या जात आहे. ह्या प्रकरणी राजूर वासीयांनी राजूर बचाव संघर्ष समिती समिती स्थापन करून संबंधित विभागाला निवेदने देऊन एक दिवशीय रास्ता रोको करण्यात आले होते. यावेळेस रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या निकषाला पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेण्यात येईल असे आश्वासन दिले व सात दिवसांच्या अवधी मागितला. 7 दिवस पूर्ण होऊनही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.  
याच दरम्यान, राजूर बचाव संघर्ष समितीने राजूर ग्रापं मध्ये निवेदन देऊन ग्रामसभा घेतली व त्यामध्ये गावातील प्रदूषणाला कारणीभूत कोळसा सायडिंग, कोळसाडेपो हद्दपार करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच कोळसा वॉशरी सुद्धा गावाच्या सीमेपासून दूर नेण्याचा ठराव पारित करण्यात आला. राजूर ग्रापं ने सुद्धा कोळसा सायडिंग व कोल डेपो बंद करण्याची नोटीस संबंधितांना बजावण्यात आली. या संदर्भात समिती सदस्यांनी मा. जिल्हाधिकारी यांची भेट मा. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे उपस्थितीत घेऊन प्रश्न मांडला. जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वेक्षण करून कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. परंतु त्यावर अजूनही काहीही झाले नाही. 
एवढे सगळे कमी आहे की काय, पुन्हा रेल्वे व वेकोली प्रशासन नव्याने कोळसा सायडिंग उभारण्यासाठी गावातील वस्तीला विस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी रेल्वे व वेकोली प्रशासन गावकऱ्यांना नोटिसा बजावीत आहे. ह्या सर्व प्रकाराने गावात प्रचंड असंतोष पसरला असून गावकरी रेल्वे व वेकोली प्रशासनाचे दडपणाखाली आणि प्रदूषणाच्या छायेखाली जगत आहेत. गावकऱ्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. करीता राजूर वासी राजूर बचाव संघर्ष समितीचे चे बॅनर खाली येथील अवैध कोळसा सायडिंग जोपर्यंत हटत नाही किंवा हद्दपार केल्या जात नाही तोपर्यंत दि. 4 जुलै पासून बेमुदत रास्ता रोको केल्या जाणार आहे.
या बाबतीत सूचना देणारे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत दि. 28 जून रोजी राजूर बचाव संघर्ष समिती कडून देण्यात आले आहे. या वेळेस समितीचे माजी जि. प. सदस्य संघदीप भगत, डेविड पेरकावार, मो. अस्लम, कुमार मोहरमपुरी, सय्यद अशफाक, साजिद खान, अनिल डवरे, जयंत कोयरे, प्रवीण खानझोडे, मो. शरीफ, सावन पाटील, फिरदोस अली, आकाश हनुमंते, मो. खुसनुर आदी उपस्थित होते.

बंडखोर विरोधात संतप्त शिवसैनिकांचा जाहीर निषेध

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा मोठा गट फोडल्यानंतर शिवसैनिक कमालीचे संतप्त झाले आहेत. वणीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बंडखोर संदीपान भुमरे व तानाजी सावंत, माजी मंत्री संजय राठोड, यांचे विरोधात संतप्त शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला आहे.
जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक होऊन घोषणाबाजी करत राठोड यांचा निषेध करण्यात आला आहे.
आज 28 जून रोजी हजारों शिवसैनिक एकत्र येवून वणी येथील शिवतिर्थावर बंडखोर मंत्री व आमदार यांच्या विरोधात संतप्त निदर्शने आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी संजय देरकर, सुनील कातकडे, संजय निखाडे, दीपक कोकास, संजय आवारी, गणपत लेडांगे, शरद ठाकरे, महेश चौधरी, राजू तुराणकर, डॉ मस्की, प्रणिता घुगुल, डीमन टोंगे, यांच्या सह वणी विधानसभेतील पदाधिकारी व महिला आघाडी संघटिका उपस्थित होते. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त ११ ते १७ ऑगस्ट पर्यंत “हर घर झेंडा” सप्ताह – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या 15 ऑगस्ट रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने 11 ते 17 ऑगस्ट हे सात दिवस संपूर्ण जिल्हाभर “हर घर झेंडा” हा विशेष उपक्रम राबविला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. या विशेष उपक्रमासह भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व इतर कार्यालय प्रमुखांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने “हर घर झेंडा” या उपक्रमाच्या आयोजनाबाबत विविध निर्देश दिलेले आहेत. यानुसार संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक नागरिकांचा सहभाग घेऊन अधिकाधिक लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्याचा मनोदय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्राधान्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्वत:च्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालय, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्तभाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा यात महत्वाचा सहभाग राहील.
भारतीय ध्वज संहिता 2002 भाग 1 मधील परिच्छद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर / सूत / सिल्क / खादी कापडापासून बनविलेला असेल, असे नमूद केले होते. या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला असून सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क / खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतुदीनुसार आता तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल, असे केंद्रीय गृह विभाग यांच्या दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

हा अभिनव उपक्रम संपूर्ण जिल्हाभर यशस्वी व्हावा व प्रत्येक इच्छूक नागरिकांचा सहभाग यात नोंदविला जावा यादृष्टिने लवकरच स्वतंत्र ॲप विकसित करून त्यात प्रत्येकाला आपले नाव नोंदविता येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. याचबरोबर या उपक्रमात भाग घेणाऱ्या प्रत्येकांना याचे छायाचित्रण, चित्रफित, ध्वनीमुद्रण आदी केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाच्या amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करता येईल.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि प्रत्येक ग्रामपंचायती यांचा महत्वपूर्ण सहभाग राहील. यासाठी ग्रामपंचायतीबाबत कृती आराखडा, जिल्ह्यातील सर्व आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपविभागीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, रास्तभाव दुकान, शाळा-महाविद्यालय, पोलीस, परिवहन सुविधा, मनपा, नगरपरिषद, नगरपंचायत या सर्व विभागाशी सुवर्णमध्य साधून अधिक लोकसहभागावर भर देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी या बैठकीत दिले.