पावसाळा तोंडावर, शाळा परिसरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या फेफरवाडा येथील जिल्हा परिषद शाळा लगत शेणखताचा ढिगारा स्थानिकांकडून साठवल्याने या शाळा परिसरात मोठी दुर्गंधी पसरण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. यामुळे या अंगणवाडी व शाळेकरू विद्यार्थ्यांना याचा त्रास होईल असे बोलल्या जात आहे.


पावसाळ्याचे दिवस तोंडावर आहे, यातून दुर्धंधी निर्माण होवून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल. जि प शाळा शेजारी कंपाउंड लगत शेणखत असल्याने या परीसरात अस्वच्छता पसरली असून या साठलेल्या शेणखतामुळे दुर्गंधी निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याची ओरड आहे.


गावातील विद्यार्थ्यांसह लहान बालकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे यावर प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आहे.

शेतकरी समन्वय पॅनलचे दहा संचालक विजयी

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील हिवरा (मजरा) विविध कार्यकारी सहकारी संस्थाचा कार्यकाळ सम्पूष्टांत आल्यामुळे सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम पार पडला. या निवडणुक मैदानात शेतकरी समन्वय पॅनल व शेतकरी विकास पॅनल आमने सामने उभे होते. चुरशी च्या सामन्यात शेतकरी समन्वय पॅनलचे १० तर शेतकरी विकास पॅनलचे ३ संचालक विजयी झाले आहे.

तालुक्याचे लक्ष लागलेल्या हिवरा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल दि. २७ मे च्या सायंकाळी सात वाजता जाहिर करण्यात आला. ही निवडणुक अत्यंत चूरशीची झाली. या निवडणुकीत शेतकरी समन्वय पॅनलचे विरोधात शेतकरी एकता पॅनल आमने सामने उभे करण्यात आले होते. दोनही पॅनलसाठी ही निवडणुक अस्तित्वाची मानली जात होती. त्यामुळे या निवडणुकीला परिसरात चांगलाच रंग चढला होता. तालुक्यात पार पडलेल्या आता पर्यंतच्या निवडणुकीचा "धुरळा" काही ठिकाणी अविरोध तर,काही ठिकाणी दोन पॅनल मध्ये टक्कर होऊन एका पॅनल चे संपूर्ण संचालक विजयी,तर दुसऱ्या पॅनलचा धुव्वा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. मात्र, सोसायटीत अनपेक्षित निकाल लागला आहे. यामध्ये शेतकरी समन्वय पॅनल चे १० संचालक विजयी झाले असून, क्रास वोटिंग मध्ये शेतकरी एकता पैनलचे ३ संचालकानी विजयाची मुसंडी मारली आहे.
शेतकरी समन्वय पॅनल च्या विजयी संचालकामध्ये इतर मागास प्रवर्गातून शरद ताजने, सर्व साधारण गटातून शंकर भोयर, मनीष कापसे, छत्रपती ठावरी, मुरलीधर ताजने, घनश्याम ढवस, बालाजी आस्कर, पंढरी येवले, महिला प्रतिनिधी गटातून सिंधु भोयर, अनुसूचित जाती, जमाती गटातून महादेव कुमरे, या १० संचालकाचा समावेश आहे. तर शेतकरी एकता पॅनलचे विट्ठल ठावरी, चंद्रकला ठावरी, गजानन कपाळे या तीन विजयी संचालकाचा समावेश आहे.
या निवडणुकीत बाबा भोयर, पुरुषोत्तम बुट्टे, जीवन काळे, अनता निब्रड, राजू चाभारे, देवराव आवारी, अरुण आस्कर, नामदेव भोंग, विनोद धोबे, राजु आसकर, रमेश ढोके इत्यादी प्रमुखानी विजयासाठी परिश्रम घेतले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डी. आर. इंगोले, गणेश डाखरे यांनी काम पाहिले.

महागाई विरोधात माकप चे वणीत आंदोलन

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : दि.३१ मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने  येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करित केंद्र सरकार ची महागाई च्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

महागाई देशात सतत नव नवे उच्चांक गाठत असल्याने जनतेचे कंबरडे मोडले आहे. कोट्यवधी लोक दारिद्र्यात ढकलले जात असून, त्यांच्या उपासमारीने तडफड होऊ लागली आहे. तसेच केंद्र सरकारने नोकरी भरती बंद करून खाजगीकरणाचे धोरण स्वीकारल्याने बेरोजगारीने कळस गाठला असल्याने गरिबांच्या दैन्यात वाढ झाली आहे. ह्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून ताबडतोब महागाई कमी करून सर्व रिक्त पदे भरण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन देशव्यापी आंदोलन करण्यात आले.
मागील वर्षभरात पेट्रोलियम पदार्थाच्या किमती ७० टक्के, भाजीपाल्याच्या २० टक्के, खाद्यतेलाच्या ३३ टक्के, डाळीच्या ८ टक्के वाढल्या आहेत. याकरिता या आंदोलनात १) पेट्रोलियम पदार्थावरील सर्व चार्ज मागे घ्या,
२) सार्वजनिक वितरण व्यवस्थे मार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू डाळी आणि खाद्यतेलाच्या पुरवठा झाला पाहिजे,
३) आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा ७५००/- हस्तांतरित करा,
४) मनरेगा योजनेच्या तरतुदीत वाढ करून शहरी भागाकरिता कायदा लागु करा,
५) बेरोजगारी कमी करण्यासाठी सर्व रिक्त जागा भरा,
६) सर्व बँकेमार्फत शेतकऱ्यांना चालू हंगामासाठी पीक कर्जाचे ताबडतोब वाटप करा आदी व अन्य मागण्या यावेळी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आल्या. 
कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. दिलीप परचाके यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 
यावेळी कॉ. कवडू चांदेकर, गजानन ताकसांडे, मनोज काळे, सुधाकर सोनटक्के, किसन मोहूर्ले, शिवशंकर बांदूरकर, रामभाऊ जीड्डेवार, ऋषी कुळमेथे, नंदू बोबडे आदी उपस्थित होते.

आरटीओंनी घेतली सर्व कर्मचाऱ्यांची झाडाझडती


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : यवतमाळ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सोमवारी जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच दुसऱ्या दिवशी सुध्दा अर्धे अधिक कर्मचारी हजर नव्हते त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुध्दा सरपंच यांचे कडून जिल्हाधिकारी यांना तक्रार देण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची दखल घेतल्यानंतर प्रभारी आरटीओंनी सर्व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. व सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली.

सोमवारी अहेरअल्ली येथील सरपंच हितेश राऊत यांनी प्रतीकात्मक आंदोलन करीत अधिकाऱ्यांच्या खुर्च्याना हार घातला. नंतर या खुर्च्या जिल्हाधिकारी कार्यालयात नेल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी निवेदन दिले. सरपंच राऊत यांना त्यांची मागणी गांभीर्याने घेण्याची ग्वाही दिली. शिवाय शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्च्या भेट म्हणून स्वीकारण्याचे कुठलेही प्रावधान कायद्यात नाही. त्यामुळे या खुर्च्या साभार परिवहन विभागाला परत करण्यासही त्यांनी सांगितले. अखेर सरपंच राऊत यांनी समजूतदारी घेत त्या खुर्च्या साभार स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पोहोचत्या केल्या.
सोमवारी झालेल्या या आंदोलनाचे मंगळवारी पडसाद आरटीओ कार्यालयात पाहावयास मिळाले. मंगळवारी सुध्दा सकाळी ११ वाजेपर्यंत निम्मे पेक्षा कमी कर्मचारीच हजर होते. दुसऱ्या दिवशी सुध्दा सरपंच यांचे कडून जिल्हाधिकारी यांना तक्रार देण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची दखल घेतल्यानंतर प्रभारी आरटीओंनी सर्व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. लेटलतिफ अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. याशिवाय मंगळवारी कार्यालयात उशिरा पोहोचलेल्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक , मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसात खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. तर सहायक परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांनी किरकोळ रजेचा अर्ज २६ मे रोजी आवक केला होता. तो अर्ज परिवहन अधिकाऱ्याकडे ३१ मे रोजी सादर झाला. ही बाब कार्यालयीन शिस्तीला अनुसरून नसल्याचा ठपका ठेवत त्यांनाही शोकॉज नोटीस बजावण्यात आली आहे.
आरटीओ कॅम्प ठेवण्याचे निर्देश :

झरी जामणी या आदिवासीबहुल तालुक्यात आरटीओचा एकही कॅम्प घेतला जात नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन करण्यात आले होते. अखेर या आंदोलनाला यश मिळाले असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी २४ जून रोजी झरीजामणी येथे आरटीओ कॅम्प ठेवण्याचे निर्देश दिले आहे. त्याची प्रत सरपंच हितेश राऊत यांना देण्यात आली आहे.


मारेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कायापालट

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : पशुसंवर्धन विभाग, जि.प. यवतमाळ अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ मारेगाव ही जवळपास ६० वर्ष जुनी इमारत आहे.

तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे पशुपालकांची वर्दळ इतर दवाखान्यापेक्षा जास्तीच असते. त्यामुळे येथील खात्याचे नवीन रुजू झालेले डॉ. आकाश राठोड पशुधन विकास अधिकारी गट अ, मारेगाव यांनी स्वतःच्या प्रयत्नशील स्वभावाने व कुठल्याही निधीची वाट न बघता स्वखर्चाने आपली जवाबदारी समजून स्वखर्चाने इमारती चा कायापालट केलेला आहे. सदर कार्यसाठी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ सर (मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यवतमाळ) डॉ. क्रांती काटोले मॅडम (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, यवतमाळ), डॉ. बालाजी जाधव, डॉ. मंदार मराठे यांचे कडून प्रेरणा मिळाल्याचे डॉ. आकाश राठोड यांनी सांगितले.
              (६० वर्ष जुनी इमारतचे छायाचित्र)

सदर ठिकाणी उत्तम पशुवैद्यकीय सेवा व पशुपालकांना मार्गदर्शन मिळत असल्याने मारेगाव परिसरातील शेतकरी बांधवाने डॉ. आकाश राठोड यशस्वी प्रयत्नाबाबत सर्वदूर कौतुक सुमने उधळत आहेत.