पत्रकार कैलास ठेंगणे यांचेवर रानडूकाराचा हल्ला


सह्याद्री | चौफेर न्यूज 

मारेगाव : कुंभा येथील दै. सकाळचे बातमीदार तथा "विदर्भ सर्च न्यूज" नेटवर्क पोर्टलचे उपसंपादक कैलास नथ्थूजी ठेंगणे यांच्या धावत्या दुचाकीवर रानडुकराने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना आज गुरूवारला सकाळी साडे दहा च्या सुमारास ईसार पेट्रोल पंप पासून हाकेच्या अंतरावर राज्यमहामार्गावर घडली. 

सविस्तर असे की,कैलास ठेंगणे हे आज सकाळी कुंभा येथे शेतात मोपेड स्कुटीने जात असतांना राज्यमहामार्गावर करणवाडी मारेगावच्या मधात झुडपातून सैरावैरा आलेल्या रानडुकराने थेट वाहनावरील कैलास यांचेवर जबर हल्ला चढविला. काही कळण्यापूर्वी घडलेल्या घटनेने कैलास हे धाडकन खाली कोसळले.या घटनेत त्यांना हात, पायांना जबर इजा झाली. तात्काळ त्यांना प्राथमिक उपचारानंतर वणी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना हाताची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले असून,त्यांचेवर सायंकाळी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

दरम्यान, रानडुकर हल्ला व जखमी प्रकरणी वनविभाग प्रशासनास तक्रार दाखल करण्यात आली असून तात्काळ आर्थिक मदत प्रदान करण्याची मागणी पिडीताने केली आहे.
"मानवी हल्ल्या पाठोपाठ वन्य प्राण्यांचे हल्ले पत्रकारांवर होऊ लागल्याने पत्रकारांच्या सुरक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला असून,पत्रकार संरक्षण कायदा कागदावरच न असता खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अंमलबजावणी ची गरज असल्याचे मत सह्याद्री चौफेर न्यूजचे सर्वेसर्वा कुमार अमोल यांनी व्यक्त केले आहे."

"उन्हाळी शैक्षणिक शिबिर" हटवांजरी येथे


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : हटवांजरी येथे जीवनविकास माध्य.व उच्च माध्य.विद्यालय हटवांजरी येथील विद्यालयात दिनांक ०४ मे २०२२ ते ११ जून २०२२ पर्यंत सकाळी ७ ते ९ या दरम्यान संपूर्णपणे निःशुल्क "शैक्षणिक उन्हाळी शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.
    
कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षांमध्ये शाळा चालू बंद मुळे विद्यार्थाचे अतिशय शैक्षणिक नुकसान झाले. त्यातल्या त्यात शहरी भागामध्ये ऑनलाईन शिक्षण उपलब्ध झाले परंतु ग्रामीण व अतिदुर्गम भागात मोबाईल ची व तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे खेड्यात नावालाच शिक्षण झाले होते.
परंतु ग्रामीण भागात अशाप्रकारचा उपक्रम राबवून जी शैक्षणिक तूट झाली होती ती भरून काढण्यास अतिशय मोलाची मदत मिळेल.

अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे पालक व विद्यार्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे. जास्तीत जास्त या परिसरातील विद्यार्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व ताबडतोब आपली नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शालेय व्यवस्थापकाने केले आहे.
 
  
"कोविड-१९ च्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थाचा जो शैक्षणिक आलेख खाली गेला व अभ्यासापासून दूर झाले त्याकरीता या शैक्षणिक शिबिराद्वारे गुणवत्ता कौशल्य वाढवून अभ्यासात आवड निर्माण करण्याचा हेतू आहे."

- मुकेश महादेवराव महाडुळे मुख्याध्यापक
जीवनविकास माध्य.व उच्च माध्य. विद्यालय,हटवांजरी

शिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्त्याचे काम चालू करण्यासाठी दिले निवेदन


 
नितेश पत्रकार | सह्याद्री चौफेर 

झरी : मा.मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर असलेल्या शिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्त्याचे काम बंद असलेले त्वरित सुरू करा, अशी मागणी डोंगरगाव वासियांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली.

२०१९ ते २०२० या आर्थिक वर्षात मा.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सिंधीवाढोना ते डोंगरगाव अंतर ५ किलोमिटर रस्त्याचे काम मंजूर झाले,त्यानंतर कामाला सुरवात झाली. सदर मंजूर रस्त्यावर मुरूम व गिट्ठी चा एक थर टाकण्यात आला आणि काम बंद झाले. आता हे काम बंद होऊन जवळ जवळ तीन वर्ष झाले आहे.
रस्त्यावरील मुरूम व गिठ्ठी ची व्यवस्थित दबाई न झाल्याने व पाऊसामुळे टाकलेला मुरूम वाहून गेला. परिणामी रस्त्यावर फक्त गिठ्ठीच उरली आहे.

गावाचा मुख्य रस्ता असल्यामुळे गावकऱ्यांना या रस्त्यावरून दैनंदिन ये जा करणे कठीण झाले आहे. तीन वर्षे लोटूनही याकडे संबंधितांनी साधे लक्ष सुद्धा दिले नसल्याने शिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. दि. २४ मार्च २०२२ रोजी गावातील रहिवासी बाळा रूप पवार यांचा सदरील रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला आहे,अशाप्रकारे अनेक घटना या रस्त्यावरून ये जा करतेवेळी घडत आहे, अशा तक्रारी नागरिकांच्या आहे. तसेच या नंतर या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचाही मृत्यू झाल्यास किंवा दुखापत झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित विभागाची असेल आणि येत्या आठ दिवसात या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास संपूर्ण गावकरी याच रस्त्यावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा उपस्थित डोंगरगाव ग्रामवासीयांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदनद्वारे देण्यात आले.

निवेदन देते वेळी शिवसेना तालुकाध्यक्ष चंद्रकांत घुगुल यांच्या नेतृत्वात वासुदेव देठे,तेजस झाडे,रमेश जिवतोडे,गोपीचंद निखाडे,सूरज कष्टी,रामदास चारलिकर,विश्वास बल्की,तुकाराम नवले,यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यासह डोंगरगाव ग्रामवासी उपस्थित होते.


आटोला अपघात, दोन गंभीर जखमी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगावहून घुगलदरा येथे लग्न सोहळ्याला जात असतांना प्रवाशी आटो ला अपघात झाला. यात दोन गंभीर तर, चिमुकल्यांना किरकोळ मार लागला असून ही घटना आज (ता.27) एप्रिल रोजी मारेगाव यवतमाळ महामार्गांवरील खडकी (टेकडी) टर्निंग वर सकाळी ९:३० वाजता घडली.

प्राप्त माहितीनुसार मारेगावहुन नेहारे परिवार व इतर जण घुगलदरा येथे लग्न सोहळ्याला निघाले, सकाळचे साडे नऊ वाजले असतील या दरम्यान, आटो चालक मालक भूपेश वाडगुळे (40) रा.मारेगाव याला वाहन चालवताना अचानक झोप लागली असता आटोचे बॅलन्स बिघडले आणि आटो पलटी होऊन रस्त्याच्या कडेला आदळला यात मधुकर लसवंते (65) रा.पुलगाव जि. वर्धा, यांच्या पायाला जबर मार लागला. तसेच आटो चालक भूपेश वाडगुळे याला ही जबर गंभीर दुखापत झाली आहे. तर अदिती राऊत (7) रा. कळंब, दर्शक पवन नेहारे (2) रा. मारेगाव या लहान चिमुकल्यांना किरकोळ मार लागल्याची माहिती आहे. जखमीना मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून भूपेश याला यवतमाळ आणि मधुकर लसवंते यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

यावेळी रुग्णालयात बघ्याची  एकच गर्दी उसळली होती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र, झालेल्या अपघातात पत्रकार पंकज नेहारे यांचे मोठे बंधू पवन नेहारे यांचा मुलगा व सासरा यांचा समावेश आहे.
 

चिमडा नदीच्या पुलावरून वाहतूक सुरू करा-नगरसेवक सतीश बोम्मावार यांची मागणी


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : चंद्रपूर-गडचिरोली महा मार्गावरील चिमडा नदी वरील पुलाचे काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे काम पूर्णत्वास असल्याचे दिसत असून पुलावरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली आहे.

चंद्रपूर-गडचिरोली महामार्गाचे काम गेल्या 4 वर्षांपासून सुरू आहे सदर काम पूर्णत्वास झाले असल्याचे दिसत आहे.त्याच प्रमाणे चिमडा नदीवर सुरू असलेल्या पुलाचे बांधकाम अतिशय संथ गतीने करीत ते पूर्ण झाल्याचे दिसत आहे.सदर पुलाच्या बाजूने वाहतूक सुरू आहे मात्र त्या ठिकाणी रोजच अपघाताची मालिका सुरू आहे. त्यामुळे याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच धुळीने नागरिक बेहाल होत आहे.

त्या साठी चिमडा नदीवरील पुलावरून लवकरात लवकर वाहतूक सुरू करून प्रवाशांना प्रवास सुलभ करून द्यावे अशी मागणी सावली तालुका भाजपा महामंत्री तथा न.पं.नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राष्ट्रीय रस्ते महामार्ग बांधकाम विभाग ला पत्र पाठविले आहे.