उकणी कोळसाखाणीतील कोळसा तस्करीने त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्याही डोळ्यात घातले अंजन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वेकोलिच्या उकणी कोळसाखाणीतील त्या कोळसा तस्करीमुळे कोळसाखाणीतील व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अतिशय धाडसी पद्धतीने ही कोळसा तस्करी सुरु होती. कोळसाखाणीत ट्रक नेऊन बिनधास्त कोळसा भरून बाहेर पडणारे ट्रक कोळसाखाणीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडू नये, याचेच नवल वाटते. कोळसाखाणीतून कोळशाची तस्करी करतांना तस्करांनी दाखविलेल्या धाडसाला पाठबळ कुणाचं, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. वेकोलि मुख्य अधिकाऱ्याच्या कर्तव्यदक्षतेचा काही दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा झाला. रात्री बेरात्री हा अधिकारी कोळसाखाणींमध्ये धडकतो. कोळसाखाणीत कुठे काय सुरु आहे, याच निरीक्षण करतो. संपूर्ण कोळसाखाण पालथी घालून कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची परेड घेतो. कामचुकार अधिकारी व कर्मचारी या मुख्य अधिकाऱ्याच्या नजरेतून सुटत नाही. या अधिकाऱ्याच्या रात्रीच्या गस्तीने कोळसाखाणीतील कर्मचारी चांगलेच दणाणले. त्यामुळे सर्वच कर्मचारी जबाबदारीने कामे करू लागल्याचं श्रेय या अधिकाऱ्याला मिळालं. रात्रीचा शहंशाह म्हणून हा अधिकारी ओळखला जाऊ लागला. परंतु या कोळसा तस्करीने रात्री बेरात्री गस्त घालणाऱ्या या मुख्य अधिकाऱ्याच्या डोळ्यातही झणझणीत अंजन घातलं आहे. हा शहंशाह रात्री केंव्हाही गस्त घालत असतांना देखिल ही धाडसी कोळसा तस्करी व्हावी, याला या शहंशाहचं काय म्हणावं हेच कळत नाही. या शहंशाहचा खरंच कोळसाखाणींवर वॉच होता की, नुसती वाहवाही लुटण्यासाठी त्यांनी केलेली प्रसिद्धी होती, हे प्रश्न या कोळसा तस्करीमुळे उपस्थित होऊ लागले आहेत. वेकोलिच्या कोळसाखाणीवर बारीक लक्ष ठेवणारा व रात्री कोळसाखाणींमध्ये गस्त घालणारा शहंशाह असतांना देखील तस्करांनी कोळसा तस्करीचं केलेलं धाडस हा रात्रीच्या खेळाचा कोणता भाग होता, हे कळायला आता मार्ग उरला नाही. कोळसाखाणीतील सुरक्षा व्यावस्था भेदून सुरु असलेली ही कोळसा तस्करी तस्करांच्या आपसी मतभेदामुळे उघड झाल्याचा संशय खुद्द पोलिस अधिक्षकांनी व्यक्त केला. मग शहंशाहच्या नजरे आडून किती दिवसांपासून ही कोळसा तस्करी सुरु होती, हा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. 

कोळसाखाणीत रात्री बेरात्री धडक देऊन, कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारा हा अधिकारी प्रशंसनेस पात्र ठरला. कर्तव्यात कसूर करणाऱ्या व बेजबाबदारपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांची हा अधिकारी कसलीही गय करत नव्हता. बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर त्याने निलंबनाची देखील कार्यवाही केली. कोळशाचे उत्पादन वाढविण्याबरोबरच कोळसाखाणींतील योग्य व्यवस्थापणालाही या अधिकाऱ्याने प्राथमिकता दिली. या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात कोळसा उत्पादनातही मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येते. शिस्तप्रिय असलेल्या या अधिकाऱ्याने कोळसाखाणींतील कर्मचाऱ्यांनाही शिस्त लावून कामात शिस्तबद्धता आणली. कामचुकारपणाला त्यांनी पायबंद लावला. आपल्या अनोख्या कार्यशैलीने कर्व्यदक्ष ठरलेल्या या अधिकाऱ्याला शहंशाह ही उपाधी देखील मिळाली. रात्री बेरात्री खदानीत जाऊन कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण करणाऱ्या या अधिकाऱ्याची मात्र तस्करांनी धास्ती घेतली नाही. कोळसाखाणींमध्ये गस्त घालून संपूर्ण व्यवस्थेची झडती घेणाऱ्या या अधिकाऱ्याला एवढी मोठी ही सुरु असलेली कोळसा तस्करी का गवसली नाही, ही एकच चर्चा आता संपूर्ण तालुक्यातून ऐकायला मिळत आहे. कोळसाखाणींवर वॉच ठेवणारा हा कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी नाकावर टिच्चून होणाऱ्या कोळसा तस्करीवर मात्र वॉच ठेऊ शकला नाही, या चर्चेला आता उधाण आले आहे.

काेरपना महसुल पथकाची पहाटेला कारवाई -अवैध रेती वाहनाला पकडले !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : दिवस रात्र सुरु असलेल्या अवैध गाैण खनिजावर अंकुश व दंडात्मक कारवाया करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या अति दुर्गम भागातील काेरपना महसुल विभागाच्या पथकाने कंबर कसली असून नित्य नेमाने धडक कारवाया सुरु आहे.

या आधी काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे व महिला तलाठी रोशनी काेल्हे या शिवाय तलाठी अमाेल गाेसाई, विरेन्द्र मडावी, विशाल काेसनकर यांनी अवैध गाैण खनिज प्रकरणात धडक कारवाया केल्या आहे .अश्यातच आज शुक्रवार दि.२५ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजताच्या सुमारास परसोडा येथून अवैध रेती वाहतूक करणारे पंकज बावणे रा. कोरपना यांचे ट्रॅक्टर पकडण्यात आले असुन त्या वाहनाचा क्र.MH34AP3599 असा आहे हे वाहन अवैध रेती वाहतूक करीत असताना पथकास पहाटेला मिळाले. वाहन चालका कडे कोणताच रेती वाहतुकीचा परवाना नव्हता. रेती वाहनाचा जप्ती करून ते ट्रॅक्टर दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय येथे लगेच जमा करण्यात आले. उपराेक्त कारवाई काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यांत आली.

या महसुल पथकात प्रामुख्याने गडचांदुरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण,काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, तलाठी नामदेव मेश्राम, प्रदीप जाधव यांचा सहभाग आहे. सातत्याने महसुल विभागाच्या अवैध गाैण खनिज प्रकरणात या भागात धडक कारवाया सुरु आहे. हे विशेष! काल गुरुवारी गडचांदूरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण यांनी आवाळपूर बसस्टँड परिसरात अवैध मुरुमाचे एक वाहन पकडले.

सदरहु वाहन राजेन्द्र महादेव खेडेकर यांचे मालकीचे असल्याचे समजते.रात्रीच्या वेळेस काेरपना या भागात अवैध गाैण खनिज वाहतुक सुरु असुन महसुल पथकाच्याही कारवाया सातत्याने सुरु आहे.

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सिंधी येथील घटना

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील सिंधी (कुंभा) येथे आज संध्याकाळी सव्वा सात च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात शोककळा पसरली.

वैभव मारोती वैद्य (२८) असे गळफास घेऊन आत्महत्या केले लेल्या मृतकाचे नाव आहे. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. वैभव ची पत्नी गर्भवती होती. ती प्रसूतीसाठी माहेरी गेली होती. आज (ता.२४) गुरुवारी रोजी सकाळी मृतक वैभव हा शेतात कामाला गेला होता. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास तो घरी परत आला होता. घरी कुणीच नसल्याची संधी साधून त्याने घराच्या सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. सव्वा सात च्या जवळपास ही घटना वैद्य कुटुंबीयांच्या लक्षात आली. पोलीस पाटीलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याच्या पश्चात आई,वडील आणि पत्नी असा परिवार आहे. वैभवने आत्महत्या का केली सध्या तरी कारण समजू शकले नाही. 

घटनेचा तपास पोलीस करीत आहे. 

अचानक सोन्याला आली चकाकी, सोन्याच्या भावात झाली मोठी वाढ, एकाच दिवसात दोन हजार रुपयांनी वाढलं सोनं

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : सोन्याच्या भावात आज अचानक मोठी वाढ झाल्याने येणाऱ्या काही दिवसांत सोन्याचे दर गगनाला भिडतील ही चर्चा शहरात पसरल्याने नागरिकांनी सोने खरेदी करण्याकरिता सोने चांदीच्या दुकानात एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. आठ ते दहा दिवसांत सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सूतोवाच आज शहरातील सोना चांदीच्या दुकानदारांकडून ऐकायला मिळाले. सोन्याचे भाव भरमसाठ वाढणार असल्याच्या चर्चेने शहरात वादळ उठल्याने सोने खरेदी करण्याकरिता नागरिकांनी आज सोनाचांदीच्या दुकानांची वाट धरली. युक्रेन व रशिया मध्ये युद्ध छेडल्याचा संदर्भ या अचानक झालेल्या घसघशीत वाढीला दिला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्यास सोने खरेदी करतांना आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून नागरिकांनी ज्वेलर्समध्ये चांगलीच गर्दी केली. लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने या काळात सोन्याला मोठी मागणी असते. सोने खरेदी शिवाय लग्नच पूर्ण होत नसल्याने वाढणाऱ्या किमती लक्षात घेता आधीच सोने खरेदी करून ठेवलेले बरे, या कल्पलकतेतून आज शहरात सोने खरेदीला उधाण आले. सोन्याचे भाव एकाच दिवसात ५३ हजार ८०० रुपये प्रति तोळा झाल्याने सोन्याचे भाव वधारणार असल्याची चर्चा शहरात पसरली. आठ ते दहा दिवसांत सोने ५५ हजाराचा टप्पा पार करेल, ही शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकही सोने खरेदीवर तुटून पडले. १५ दिवसांआधी ५० हजार रुपये तोळा असलेलं सोनं मागच्या आठवड्यात ५१ हजार ८०० रुपये पर्यंत वाढलं. आज अचानक सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. ५१ हजार ८०० रुपये प्रति तोळा असलेलं सोनं सकाळी ५२ हजार ८०० रुपये व दुपार नंतर लगेच ५३ हजार ८०० रुपये प्रति तोळा पर्यंत वृद्धावलं. अशीच सोन्याच्या भावात वाढ झाल्यास येणाऱ्या काही दिवसांत सोन्याचे भाव गगनाला भिडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विकास कामांना गती

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून २३ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत तिन मोठ्या कामांना मंजूरी मिळाली आहे. यात वढा तिर्थक्षेत्र, संत जगनाडे महाराज समाधी स्थळ आणि ईरइ नदिचे सौदर्यीकरण आदि कामांचा समावेश असून १६८ कोटी रुपयांतून सदर क्षेत्रांचा विकास केल्या जाणार आहे.

विदर्भाचे पंढरपूर असलेल्या वढा तिर्थक्षेत्राला पर्यटनस्थळाचा दर्जा देत येथे विकास कामे करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून सातत्याने केली जात होती. याबाबत मुंबई स्तरावर त्यांचा पाठपूरावाही सुरु होता. तसेच संत जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाचा विकास करण्यात यावा या करिताही आमदार किशोर जोरगेवार आग्रही होते. इरई नदीचे खोलिकरण करुन तेथे सौदर्यीकरण करण्यात यावे या करिताही आमदार जोरगेवार यांचा पत्रव्यवहार सुरु होता. अखेर आता सदरहु सर्व कामांसाठी मोठा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. काल २३ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत सदर कामांना मंजूरी देण्यात आली आहे. यात वढा तिथक्षेत्राचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यासाठी ४४ कोटी, संत जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाचा पर्यटन विकास करण्यासाठी ७४ कोटी तर चंद्रपूर शहरालगत असलेल्या ईरइ नदीच्या खोलीकरण, सौदर्यीकरण, आणि संवर्धनाकरिता ५० कोटी रुपयांचा निधी घोषीत करण्यात आला आहे. त्यामूळे आता लवकर सदरहु सर्व ठिकाणांची कायापलट होणार असून पर्यटनास वाव मिळणार आहे. सदरहु कामांसाठी मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही सातत्याने पाठपूरावा केला होता. हे कामे करण्यात यावी या करीता त्यांचेही प्रयत्न सुरु होते. त्यामूळे हे कामे मंजूर केल्याबदल आमदार जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले आहे.