अवैध रेती तस्करास महसूल विभागाचा परत एकदा दणका, काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारेंनी पाठलाग करुन अवैध रेतीचे ट्रॅक्टर पकडले !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गाैण खनिजावर अकुंश तथा दंडात्मक कारवायां करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना विशेष निर्देश दिले असुन राजूराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे व तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शना खाली काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे व काेतवाल रुपेश पानपाहटे यांनी काल गुरुवार दि.२७ जानेवारीला रात्रीला गुप्त माहितीच्या आधारे स्वताच्या जिवाची पर्वा न करता नामे प्रदीप मारोती कातकडे राहणार अंतरगाव बुजरुक यांचे अवैध रेतीचे M H34-AP 3276 या क्रंमाकाचे ट्रैक्टर पाठलाग करुन पकडले. विशेष उल्लेखनीय बाब अशी की रेतीने भरलेल्या ट्राँलीला काेणताही क्रमांक नव्हता .सदरहु ट्रॅक्टर पैनगंगा रेती घाटातून अवैध रेतीची वाहतूक करीत हाेता. उपरोक्त ट्रॅक्टरचा मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे व ,कोतवाल रुपेश पाहणपटे यांनी लगेच जप्तीनामा करून ताे ट्रॅक्टर काेरपना तहसील कार्यालय येथे काही कर्मचा-यांचे देखरेखेखाली दंडात्मक कारवाई साठी रवाना केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान या कारवाईची माहिती तातडीने राजेन्द्र पचारे यांनी तहसीलदार वाकलेकर यांना भ्रमणध्वनी वरुन दिली. उपरोक्त कारवाईत प्रकाश कामलवार व वाहन चालक सुरेश नागोसे यांनी माेलाचे सहकार्य केले. काेरपनाचे मंडळ अधिकारी पचारे यांच्या या धडक कारवायांमुळे या भागातील अवैध रेती माफियांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे. हे तितकेच सत्य आहे.या पूर्वी सुध्दा मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी अवैध गाैण खनिजाच्या बाबतीत धडक कारवायां केल्या आहे.काल केलेल्या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे.

ही कारवाई केली तेव्हा रेती तस्करांच्या पाळत ठेवणां-या व्यक्तिंना देखिल याचा थांगपत्ता लागला नाही. हे विशेष !

तलवार हातात घेऊन परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तलवार हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणाऱ्या उपद्रवी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रंगनाथ नगर परिसरात आरोपी हा हातात तलवार घेऊन दहशत पसरवीत असल्याची माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी लगेच रंगनाथ नगर येथे पोलिस पथक पाठवून शस्त्रासह आरोपीला ताब्यात घेतले. निलेश दुर्वास पाटिल (२३) रा. रंगनाथ नगर असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना आज २७ जानेवारीला दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली.  

रंगनाथ नगर येथे सार्वजनिक ठिकाणी एक उपद्रवी युवक हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी तत्काळ रंगनाथ नगर येथे पोलिस पथक पाठविले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना आरोपी हा हातात तलवार घेऊन परिसरात धुमाकूळ घालतांना आढळून आला. तलवारीसह परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील तलवार जप्त केली आहे. मुठीसह ८० सेमी लांबी असलेल्या या तलवारीची गोलाई ६८ सेमी एवढी आहे. स्वतःजवळ शस्त्र बाळगणाऱ्या आरोपी निलेश दुर्वास पाटिल याच्यावर पोलिसांनी आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याआधीही पोलिसांनी धारदार शस्त्रासह परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या तेथीलच एका आरोपीला अटक केली होती. चित्रपटांमधील भडक दृश्य बघून युवकांमध्ये टपोरीपणा वाढू लागला आहे. भाईगिरीचा आव आणून ते परिसरात दहशत निर्माण करू लागले आहेत. शस्त्रासह धुमाकूळ घालून चर्चेत येण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले आहेत. त्यांना कायद्याची भाषा समजविण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून तिसरा कुणी हातात शस्त्र घेऊन परिसरात धुमाकूळ घालण्याची हिम्मत करणार नाही. 

सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, स.फौ. डोमाजी भादीकर, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरिन्द्र कुमार भारती, संजय शेंद्रे, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली. पुढील तपास सुदर्शन वानोळे करीत आहे.

माणसाला माणूस जोडला की उत्तरे मिळतात - सारंग गोसावी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी :  " वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमधून रंगविल्या जाते किंवा समाज माध्यमातून पसरवल्या जाते तसे, दगडफेक, सैन्यविरोध, आतंकवाद एवढेच काश्मीरचे वास्तव नसून येथील सामान्य माणूस मनाने भारताशीच जोडलेला आहे. तो नित्य अडचणींशी झगडत आहे. आपला अविश्वास त्याला अधिक त्रास देणारा आहे. आपल्यापैकी जो कोणी तेथे जाऊन त्यांच्या जगण्याला सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करतो त्या प्रत्येकाला तेथे प्रचंड प्रेम मिळते. हाताला काम आणि डोक्याला शिक्षण अशा स्वरूपात त्या सामान्य माणसाला सहकार्य करत माणसाला माणूस जोडला तरच काश्मीर प्रश्न खऱ्या अर्थाने हाताळता येईल. राजकीय भूमिका आपल्या जागी आवश्यक कार्य करीत असती तरी आपल्या सगळ्यांना मानव संधानाचे हे कार्य निष्ठेने करायला हवे." असे विचार असीम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सारंग गोसावी यांनी व्यक्त केले.
   
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लोकनायक बापूजी आणि स्मृती व्याख्यानमालेच्या ५२ व्या वर्षी "काश्मीर प्रश्नी तरुणांचे योगदान एक असीम यात्रा !" या विषयावर आयोजित आभासी व्याख्यानात ते व्यक्त होत होते. 
     
याप्रसंगी संस्थेचे सचिव एड. लक्ष्मणराव भेदी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी सकारात्मक विचार आणि सुयोग्य नियोजन यांच्या आधारे किती सुंदर कार्य उभे करता येते? याचा वस्तुपाठ सारंग गोसावी यांच्या कार्यातून प्राप्त होतो हे अधोरेखित केले.
    
आपल्या अत्यंत संयमित, अनुभवाधिष्ठित निवेदनात सारंग गोसावी यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी काश्मीर मध्ये जाण्याचा निर्णय, त्यामागील प्रेरणा, तेथे गेल्यानंतर आलेले अनेक अनुभव, केलेले शैक्षणिक कार्य, बेकरींचे उभे केलेले जाळे, सामान्य माणसाची मिळणारी साथ, क्रिकेटच्या माध्यमातून सैन्य आणि नागरिक यांच्यात साधलेला दुवा, सेना अधिकाऱ्यांकडून मिळालेली अनमोल शाबासकी अशा अनेक गोष्टी उघडून दाखवत, उरी म्हणजे केवळ सर्जिकल स्ट्राइक नव्हे तर राष्ट्रीय भावनेने भारतासोबत भक्कमपणे उभे असलेले गाव ही ओळख जनमानसात व्हायला हवी असे कळकळीचे आवाहन केले.
   
संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला यांनी प्रकृती अस्वास्थ्य असूनदेखील कार्यक्रमात सहभागी होऊन सारंग गोसावी यांना वणीचे प्रत्यक्ष आमंत्रण दिले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव भेदी यांनी सारंग गोसावी यांचे काम प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे हे अधोरेखित करीत त्यांना आवश्यक ती प्रत्येक मदत देण्याचे अभिवचन दिले.
  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के यांनी केले.
कार्यक्रमाच्या तांत्रिक यशस्वीतेसाठी डॉ. गुलशन कुथे, डॉ. परेश पटेल जयंत त्रिवेदी तथा पंकज सोनटक्के इ. नी विशेष परिश्रम घेतले.

शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन भाजपचे गाव तिथं आंदोलन, ४ फेब्रुवारी पासून आंदोलनाला होणार सुरुवात

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान होऊनही तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले. शिंदोला व पुनवट या मंडळांचा अतिवृष्टीग्रस्त मंडळामध्ये समावेशच करण्यात आलेला नाही. आस्मानी संकटात शेतकरी पूर्णतः भरडला गेला असतांनाही शासन शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळ करीत आहे. आधी निसर्गाच्या लहरीपणामुळे व नंतर अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी देशोधडीला आला आहे. हातातोंडाशी आलेली पिकंही अतिवृष्टीमुळे हिरावली गेल्याने शेतकरी पुरता हादरला आहे. त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी शासन कृषी पंपाची वीज कापून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता भारतीय जनता पार्टी ४ फेब्रुवारी पासून वणी विधानसभा क्षेत्रात गाव तेथे आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

तालुक्यात ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं मोठं नुकसान होऊन शेतकरी चांगलाच आर्थिक अडचणीत आला आहे. हातातोंडाशी आलेली पिकंही अतिवृष्टीने हिरावून घेतली. आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आता सुलतानी संकटांचाही सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई तर मिळालीच नाही, उलट कृषी पंपाची वीज कापून शासन शेतकऱ्यांवर कहर ढाळत आहे. रब्बी पिकांच्या हंगामात थकबाकी वीज बिलाचं कारण समोर करून जबरन कृषी पंपाची विज कापली जात आहे. शेतात चणा व गहू ही पिकं डौलावर असतांना वीज वितरण कंपनी कृषी पंपाची वीज कापत असल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन ओलीताच्या वेळेलाच शेतातील कृषी पंपाची वीज कापली जात असल्याने पिकं करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे आधीच संकटात आलेल्या शेतकऱ्यांसमोर विद्युत विभाग आणखी संकटं निर्माण करू लागला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी शासन अन्यायकारक भूमिका घेऊ लागल्याने भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविणार आहे. ३० नोव्हेंबरला भाजपच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत निवेदन पाठविले होते. पण निवेदनाची दखलच घेण्यात न आल्याने भाजपच्या वतीने आता वणी विधानसभा क्षेत्रात गाव तिथं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ४ फेब्रुवारी पासून गावागावात आंदोलन करून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची विज कापण्यात येऊ नये, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील ९ मंडळामध्ये शिंदोला व पुनवट या मंडळाचा समावेश करणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देणे, कृषी पंपाचे भारनियमन रद्द करणे या मागण्याचा समावेश आहे. वणी, मोरगाव व झरी या तीनही तालुक्यात गाव तिथं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे विजय पिदूरकर, दिनकरराव पावडे, तारेंद्र बोर्डे, रवि बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे, बंडू चांदेकर, शंकर बांदूरकर उपस्थित होते.

जैताई मंदिराचे पुजारीसाधुबुवा संताने ह्यांना देवाज्ञा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : दि.२६ येथील जैताई मंदिराचे देवीचे परमभक्त पुजारी
साधुबुवा संताने ह्यांना गणराज्य दिनी रात्री ८ च्या सुमारास मंदिरातील त्यांच्या निवासस्थानी देवाज्ञा झाली.

गेल्या दोन महिन्यां पासून व्रुध्दापकाळामुळे ते आजारी होते. वर्धेला कन्या गीताकडे राहून औषधोपचार घेतल्यानंतर त्यांना आज सायं. ५ वाजता वणीला आणण्यात आले.

वणीला पोहचताच तीन तासानंतर हा देवीभक्त देवीचरणाशी कायमचा लीन झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी गीता, जावई,
नातवंड आणि त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक भाविक आहेत.
त्यांची अंत्ययात्रा मंदिरातून गुरुवार दि. २७ ला सकाळी ११ वाजता निघेल.