पक्ष प्रवेशाने गाजला अभिष्टचिंतन सोहळा, डॉ. महेंद्र लोढासह शेकडोंनी घेतला काँग्रेसमध्ये प्रवेश


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : यवतमाळ जिल्हा हा राजकारणासाठी अत्यंत पोषक असा जिल्हा आहे. जिल्ह्याचा अध्यक्ष कधी प्रदेश अध्यक्ष होऊन जातो, कळतच नाही. न जानता न मागता यवतमाळ जिल्ह्याला काहीही मिळून जातं. याच उत्तम उदाहरण म्हणजे संध्याताई सव्वालाखे या आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्यानंतर त्या महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आहेत. तसेच दुधात साखर पडावी तसे आमदार वजाहत मिर्जा हे विदर्भाचे सुपुत्र पहिल्यांदा वक्फ बोर्डाचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्हा व विदर्भात काँग्रेसचा भक्कम पाया तयार झाला असून येणारी निवडणूक ही काँग्रेसचीच राहणार आहे. सध्याचे दिवस काही चांगले नाहीत. विषारी असे हे दिवस आहेत. देशात विषारी विषमता माजली आहे. एकेकाळी ब्रिटिशांचे गुलाम असणारे लोक आता देशातील जनतेला गुलाम करू पाहत आहे. जाती धर्माचं राजकारण करून देशात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. निवडणुकी लढवताना जाती धर्माचा आधार घेतला जात आहे. काँग्रेसने कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही. आपला धर्मनिरपेक्ष बाणा जोपासून ठेवला. सर्वांनाच सामान संधी दिली. महिलांनाही सामान वागणूक दिली. त्यांनाही राष्ट्रपती पदापर्यंतचा सन्मान मिळवून दिला. असा हा समविचारी धोरणाचा काँग्रेस पक्ष असून या पक्षाने नेहमीच जनकल्याणाचा विचार केला आहे. आज जी विषारी विचारसरणी पसरविली जात आहे, त्या विषमता पसरविणाऱ्या विचारसरणीलाच सत्तेतून हद्दपार केले पाहिजे, असे खणखणीत विचार महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य अभिष्टचिंतन व पक्ष प्रवेश सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना व्यक्त केले. वसंत जिनिंग येथे हा अभिष्टचिंतन व पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बाळूभाऊ धानोरकर हे होते. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणातून भाजपवर करकचून टीका केली. जाहिरातींवर भरमसाठ खर्च करून देशाची तिजोरी या सरकारने रिकामी केली आहे. चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखवून अत्यंत वाईट दिवस या सरकारने आणले आहेत. महागाई व बेरोजगारीमुळे जनता बेजार झाली आहे. पूजापाठ करणारे सत्तेत आले असून त्यांनी जाती धर्माचं राजकारण करण्यापलीकडे दुसरे काहीही केले नाही. देशाची संपत्ती भांडवदारांच्या घशात घालण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी सुरु केलं आहे. साडेसात वर्षात भाजप सरकारने देशाला साडेसाती लावली आहे. या सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्यांमुळे झालेल्या शेतकरी आंदोलनात ७५० शेतकऱ्यांना वीरमरण आले. भरमसाठ आकारलेल्या जीएसटी मुळे छोट्या व्यापाऱ्यांवर अवकळा आली. हातांना कामे उरली नाही, नवीन उद्योग निर्माण झाले नाहीत. वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ म्हणणारं हे सरकार बेरोजगारांच्या फौजा तयार करू लागलं आहे. म्हणूनच आता यांच्या भुलथापांवर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे नागरिक आता काँग्रेसकडे वळू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेले यश, हे नागरिकांची काँग्रेसप्रती असलेली विश्वासाहर्ता असल्याचे बाळूभाऊ धानोरकर यांनी आपल्या अनोख्या शैलीत बोलतांना म्हटले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी वामनराव कासावार यांनी नेहमी महिलांचे संघटन मजबूत करण्यावर भर देत महिलांना जोडून ठेवण्याची शैली त्यांना अवगत असल्याचे गौरव उद्दगार काढले. तसेच त्यांनी पंतप्रधान यांच्या महिलांविषयीच्या आक्षेपार्य वक्तव्याचा यावेळी निषेध केला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके, वाजहत मिर्जा यांनीही आपल्या भाषणातून हास्याचे फुलोरे फुलवितांनाच वामनराव कासावार यांच्या जीवनातील काही आव्हानात्मक व गंमतीजंमतीचे किस्से सांगितले. तसेच काँग्रेसला गळतीतून सबळतीकडे नेण्याची सर्वांचीच जबाबदारी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी मंचकावर काँग्रेसचे राहुल ठाकरे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, अरुणाताई खंडाळकर, ऍड. देविदास काळे, नरेंद्र ठाकरे हे विराजमान होते. प्रास्ताविक प्रा. टिकाराम कोंगरे यांनी केले. कार्यक्रम तब्बल दोन तास उशिरा सुरु झाल्याने उपस्थितांमध्ये नाराजी दिसून येत होती. यावेळी डॉ. महेंद्र लोढा यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा त्यांचा निर्णय अतिशय योग्य असून आता काँग्रेसमध्ये स्थिर रहा असा उपदेश काँग्रेस नेत्यांनी आपल्या भानातून त्यांना दिला. विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचे स्वागत व नगर पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार तब्बल एका तासापर्यंत चालला. त्यामुळे दूरवरून आलेल्या नागरिकांकरिता ठेवण्यात आलेल्या दुपारच्या जेवणाला सायंकाळ झाली. वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभिष्टचिंतन व पक्षप्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

भुरट्या चोरांचा धुमाकूळ सुरूच, एसटी डेपो मधिल लोखंडी साहित्य केले लंपास

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहर व तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट चांगलाच वाढला असून या भुरट्या चोरांची नजर आता एसटी डेपो मधील लोखंडी साहित्यावर पडली आहे. वणी एसटी डेपोच्या खुल्या वर्कशॉप मधील लोखंडी साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. वर्कशॉप मधिल बसचे लोखंडी स्पेअर पार्ट्स व तांत्रिक दुरुस्तीचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार आगार व्यवस्थापकांनी पोलिस स्टेशनला केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ जानेवारी ते २३ जानेवारीच्या रात्री दरम्यान घडली असून २४ जानेवारीला दुपारी १.३३ वाजता पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली आहे.

मागील अडीज महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे डेपोमध्येही सन्नाटा पसरलेला आहे. बहुतांश एसटी बसेस या आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा आता एसटी डेपोकडे वळविला आहे. डेपो मधील बसचे लोखंडी पार्ट्स व बसच्या दुरुस्ती करिता उपयोगात येणारे लोखंडी साहित्य चोरी करण्याचा सपाटाच चोरट्यांनी लावला आहे. एसटी डेपोमध्ये चार सुरक्षा रक्षक तैनात असतांना देखील त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून चोरटे आपला डाव साधत आहे. चार दिवसांत चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीचे पार्ट्स व ईतर लोखंडी साहित्य लंपास केले आहे. गेअर बॉक्स उतरविण्याकरिता वापरण्यात येणारी घोडी दोन, लोखंडी पट्टी एक, हब ड्रम एक, टायर डिक्स व रिंग तथा लोखंडी वस्तू असा एकूण १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केल्याची तक्रार वणी आगाराचे व्यवस्थापक सुमेध सखाराम टिपले (३९) रा. वासेकर ले-आऊट यांनी पोलिस नोंदविली आहे. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.

कृषी पंपांचे वीज कट करणे त्वरीत बंद करा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिला आंदोलना चा इशारा


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : आधीच कर्जाच्या खाईत पोहोचलेल्या, ओल्या दुष्काळामुळे उत्पन्नाची साधी अर्धी सरासरीही न ओलांडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीपंपांची विजतोडणी विज मंडळाकडून केली जात आहे. ही विजतोडणी त्वरीत थांबवण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने तहसीलदार मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.
    
सध्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे वीजेचे थकीत देयके आहेत. मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येत आहेत. या संकटांचा सामना करतांना शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहेत. अशातच आता या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडणी वीज मंडळातर्फे सुरू आहेत. यावर्षी ओल्या दुष्काळामुळे सोयाबीनचे उत्पन्न घटले. कपाशीचे उत्पन्नही अर्ध्यावर आलेले आहेत. अशातच आता शेतकऱ्यांनी काही भर भरून काढण्यासाठी शेतामध्ये चणा, गहू आणि भाजीपाला यांची लागवड केली आहे. आता हंगाम बहरत असतांना वीज मंडळातर्फे शेतकऱ्यांची विजतोडणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांसमोर एक नवेच संकट समोर उभे ठाकले आहे. जर विजमंडळातर्फे ऐन रब्बी हंगामात विजतोडणी केली तर शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचेसुद्धा नुकसान होऊन शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटल्या जात आहेत. त्यामुळे ही विजतोडणी त्वरीत थांबवावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष भारत मत्ते, नगरसेवक हेमंत नरांजे, उपाध्यक्ष दयाल रोगे, शहराध्यक्ष शेख चांद, नागेश रायपुरे, जिजाताई वरारकर, नितीन वाढई, सुरेश महाकुलकर, गजानन रासेकर, अभिजित जुमडे, विवेक मस्की, दशरथ बोढाले, अतुल पचारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतुक, काेरपना महसुल पथकाने केली जप्तीची कारवाई !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गाैण खनिजावर अंकुश व दंडात्मक कारवायां करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे तथा अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी जिल्हाभर महसुल विभागाचे फिरते पथक निर्माण केले असुन, त्याच अनुषंगाने राजु-याचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे तथा तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शनाखाली काेरपना मंडळाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे महसुल विभागाचे पटवारी प्रभाकर कुडमेथे, व काेतवाल नंदु कुडमेथे यांनी रविवार दि.२३ जानेवारीला मध्यरात्री वनाेजा येथील पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या एका ट्रॅक्टरव्दारे रेतीची वाहतुक करतांना रंगेहात पकडल्याचे वृत्त आहे.

गुप्त माहितीच्या आधारे व स्वताच्या जिवाची पर्वा न करता या महसुल पथकाने ही धडक कारवाई केली रात्रीचा फायदा घेत काही रेती तस्करांनी अवैध रेती नेण्याचा सपाटा काेरपना भागात लावला हाेता. या पथकाने सदरहु ट्रॅक्टरचा रितसर जप्तीनामा करीत त्याच रात्री ते ट्रॅक्टर दंडात्मक कारवाईसाठी काेरपना तहसील कार्यालयात जमा केले असल्याचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी आज प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले. जप्तीतील क्टर मालकाचे नाव भारत रामचंद्र रागीट असून अवैध रेतीची वाहतुक वाहन चालक संदीप कुडमेथे हा करीत हाेता. या पूर्वी सुध्दा मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी अवैध गाैण खनिजाच्या बाबतीत धडक कारवाया केल्या आहे.

मध्यरात्री केलेल्या कारवाईमुळे रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

 

गोवंश जनावरांची तस्करी व गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचे धाडसत्र, शिरपूर व वणी पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : कत्तली करिता गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या ९ तस्करांना शिरपूर पोलिसांनी सापळा रचून अतिशय शिताफीने अटक केली. शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतून लगतच्या प्रांतात गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकं तयार करून शिरपूर बसस्थानक, चेंडकापुर फाटा व कायर मार्गावर सापळा रचून ९ पिकअप वाहनांमध्ये निर्दयीपणे कोंबून येत असलेल्या २५ गोवंश जनावरांची तस्करांच्या तावडीतून सुटका करित तस्करांची टोळीच जेरबंद केली. या धाडीत पोलिसांनी २५ गोवंश जनावरांसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कार्यवाहीमुळे गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. काल २३ जानेवारीला वणी पोलिसांनीही मोनिनपुरा व रजानगर येथे धडक कार्यवाही करून ३७० किलो गोवंश जनावरांचे मांस जप्त केले. ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून ठाणेदारांसह पोलिस पथकाने रजानगर व मोमीनपुरा येथे धाडी टाकून गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विकणाऱ्या सात जणांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या जवळून ५१ हजार ८०० रुपये किमतीचे ३७० किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले. गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विकणाऱ्या व गोवंश जनावरांची कत्तली करिता तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून वणी व शिरपूर पोलिसांनी दोन दिवसांत दोन धडक कारवाया केल्या आहेत. वणी पोलिसांनी गोवंश जनावरांचे मांस विकणाऱ्या सात तर शिरपूर पोलिसांनी गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या नऊ आरोपींना जेरबंद केले आहेत. 

शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतून लगतच्या प्रांतात कत्तली करिता मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी २३ जानेवारीला रात्री पोलिस पथकं तयार करून शिरपूर बसस्थानक, चेंडकापुर फाटा व कायर मार्गावर सापळा रचला. रात्री दरम्यान शिरपूर बसस्थानक येथे २ पिकअप वाहने, चेंडकापुर येथे सात पिकअप वाहने व कायर मार्गावर एक पिकअप वाहन अडविण्यात आले. या आठही मालवाहू वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये गोवंश जनावरे आढळून आली. आठ पिकअप वाहनांमध्ये तब्बल २५ गोवंश जनावरे निर्दयीपणे कोंबून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ८ पिकअप वाहने व २५ गोवंश जनावरे असा एकूण ४२ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनिल देविदास आत्राम (२७) रा. कायर, सचिन महादेव थेरे (३८) रा. कुंड्रा, अमित गजानन पोटे (२१) रा. सुरला, अफनल बेग अफसर बेग (३६) रा. कायर, भोलाराम सुरेश पडोळे (२५) रा. डोर्ली, विश्वजित विलास ताजने (२५) रा. बाबापुर, भरत पिदूरकर (२८) रा. सुरला ता. वरोरा, नितीन राजेंद्र नरोटे (२७) ऐरव्हा ता. जिवती, बालाजी थोरात (२७) रा. डोंगरगाव ता. झरी या नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

वणी शहरातील मोमीनपुरा व रजानगर परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी पोउपनि शिवाजी टिपूर्णे व प्रवीण हिरे यांच्यासह पोलिस पथकाला घेऊन मोनिनपुरा व रजानगर येथे धाड टाकली असता काही ईसम गोमांस विक्री करतांना आढळून आले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी टाकलेल्या संयुक्तिक धाडीत ३७० किलो गोमांस किंमत ५१ हजार ८०० रुपये एवढा मुद्देमाल जप्त करून मो. नासिर अब्दुल रशीद (५१), मो. अनिस अब्दुल रशीद (४८), मो. कैसर अब्दुल अजीज कुरेशी, मो. पाशा अब्दुल अजीज कुरेशी (३८), मो. ऐजाज अब्दुल अजीज कुरेशी (४९), अब्दुल वासे अब्दुल वाहिद (२३) सर्व रा. मोमीनपुरा, मो. ईस्तेयाक अब्दुल वहाब कुरेशी रा. रजानगर या सात आरोपींना अटक केली. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सदर दोन्ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलिप पाटिल भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात वणीचे ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी व शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी आपापल्या पोलिस पथकासह केली.