ब्राह्मणी येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील ब्राह्मणी या गावातील एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास शेतात गेलेल्या या युवकाने स्वतःच्याच शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. वडिलांना तो शेतात पडून दिसल्याने त्यांनी अन्य शेतकऱ्यांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितीन महादेव मंगाम (२७) रा. ब्राह्मणी असे या विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरुष असलेल्या या युवकाने अचानक आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या युवकाचे लग्न जुळले होते, व साखरपुडाही झाला होता. पण बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला. तो सकाळी शेतात जातो म्हणून घरून निघाला. त्याच्या मागोमाग वडीलही शेतात गेले. वडिलांना तो शेतात निपचित पडून दिसला. वडिलांनी तत्काळ त्याला अन्य शेतकऱ्यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. त्याच्या या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या पच्छात आई, वडिल व मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली हे अद्यापही कळू शकले नाही. 

पोलिस त्या दिशेने तपास करित आहे.

लिखीत आश्वासनाने चौथ्या दिवशी उपोषणाची सांगताआरोग्य केंद्रातील सर्व रिक्त पदे भरणार


(मुकूटबन : जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण व तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम उपोषणकर्त्यांना फ्रुटी मँगो ज्यूस पाजून उपोषणाची सांगता करताना.)


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : मुकूटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २३ पदे रिक्त असून, ही २३ रिक्त पदे न भरल्यामुळे मंगळवार (ता. २१) पासून ज्येष्ठ पत्रकार रफीक कनोजे व समाजसेवक नारायण गोडे हे मुकूटबन येथे आमरण उपोषणास बसले होते. या उपोषणाची सांगता शुक्रवार (ता. २४) संध्याकाळी सहा वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांचे हस्ते निंबु शरबत पाजून समाप्ती करण्यात आली.

तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम व तहसीलदार गिरीश जोशी यांनी मुकुटबन येथे (ता. २२) उपोषणकर्त्यांना भेट घेऊन, आपण उपोषण सोडावे अशी विनंती केली. जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी सुध्दा व्हॉट्स अपद्वारे पत्र पाठवून (ता. २० व २३ ला) उपोषणकर्त्यांना उपोषणापासून प्ररावृत्त व्हावे अशी विनंती पत्राद्वारे केली. परंतु उपोषणकर्त्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. जोपर्यंत २३ रिक्त जागा भरण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही यावर ठाम होते.

त्यानंतर कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तीवारी यांनी मुकूटबन येथील रिक्त पदाचा प्रश्न मुख्यमंत्र्याच्या दरबारी मांडला तसेच अर्चना पाटील डायरेक्टर आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांचेशी संपर्क साधून चर्चा केली. आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी मुंबई येथील अधिवेशनात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन देऊन चर्चा केली. या सर्वांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेशी चर्चा करून उपोषणाच्या चौथ्या दिवशी (ता. २४) शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण व त्यांची जिल्हा चमू यांनी मुकूटबन येथे उपोषण मंडपला भेट दिली. त्यांनी उपोषणकर्त्या सोबत चर्चा करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांच्या समस्या जाणून घेतल्या. चर्चे अंती एक आरोग्य अधिकारी व दोन आरोग्य सेवकांची स्थायी स्वरूपाची नेमणूक करण्यात आली. तसेच झरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक औषधी निर्माण अधिकारी, एक प्रयोग शाळा तंत्रज्ञ व एक लिपिक यांची आठवड्यातून तीन दिवसासाठी नेमणूक मुकूटबन येथे करण्यात आली. व उर्वरित पदे लगेच अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात येईल त्या भरतीतून ता. ५ जानेवारी २०२२ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र मुकूटबन येथील सर्व रिक्त पदे प्रथम प्राधान्याने व त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र शिबला येथील रिक्त पदे भरण्यात येईल असे लिखीत आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी दिले. या सर्व बाबी ज्येष्ठ पत्रकार रफीक कनोजे व समाजसेवक नारायण गोडे यांनी मान्य केल्या. यावेळेस मुकूटबनचे सरपंच मिना आरमुरवार, उपसरपंच अनिल कुंटावार, तहसीलदार गिरीश जोशी, तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम, गट विकास अधिकारी गजानन मुंडकर, भालचंद्र बरशेट्टीवार, जगदीश आरमुरवार, सुरेश मानकर, रमेश उदकवार, खुपिया पोलीस संजय खांडेकर, नागेश अक्केवार, संजय आकीनवार, शेख शरीफ शेख कासम हे उपस्थित होते.



राजूर येथील युवकाच्या खुनाचा पोलिसांनी अति शीघ्र लावला छडा, चार मारेकऱ्यांना केली अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : सात दिवसांपूर्वी खुनाच्या झालेल्या घटनेने राजूर (कॉ.) हे गाव परत एकदा चर्चेत आले. प्रेम संबंधातून राजूर (कॉ.) येथील युवकाची त्याच्याच प्रियसीने हत्या घडवून आणल्याचे पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत उघड केले. एका चुन्याच्या भट्ट्यावर काम करणाऱ्या विवाहित महिलेबरोबर त्या युवकाचे सूत जुळले होते. बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्या त्यांच्या प्रेम संबंधाची परिसरातही चर्चा होती. विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवणारा तो युवक नंतर तिच्याच नातलगांना खटकू लागला. कारण तिचा भटवाही (बहिणीचा नवरा) तिच्यावर भाळला होता. भटव्याचीही साळीवर वाईट नजर होती. अशातच त्या दोघांच्या मिलनस्थळी भाटवाही धडकल्याने प्रियकर व भाटव्यात चांगलीच जुंपली. प्रियकर व भाटव्यात उफाळलेला वाद पाहून प्रियसीने वडील व मामालाही घटनास्थळी बोलावून घेतले. मग काय सर्व नातलग झाले एक, व प्रियकराचाच केला गेम. महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या युवकाला सर्वांनी मिळून यमसदनी धाडले. त्यात प्रियसीनेही हातभार लावला. प्रियकराच्या खुनात हात रंगविलेल्या प्रियसीसह पोलिसांनी तिचा भाटवा, तिचा बाप व तिचा मामा यांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

अतिशय गुंतागुंतीचे असलेल्या या खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी छडा लावला. एपीआय माया चाटसे यांनी कुशलतापूर्वक तपास करून खुनाच्या या रहस्यावरून पडदा उठवला. सुरुवातीपासूनच पोलिसांना युवकाची हत्या झाल्याचाच संशय होता. पोलिसांनी तेथे राहणाऱ्या काही मजुरांना तत्काळ चौकशी करीता ताब्यात घेतले. तेवढ्यात शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात अतुल सहदेव खोब्रागडे (३९) याचा गळा लावल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर पोलिसांनी तपासाला गती देत संशयितांची कसून चौकशी केली. सुरुवातीला सोनू राजू सरावणे (२५) हिने आपला भाटवा हर्षद अंबादास जाधव (४५) याच्या मदतीने प्रियकर अतुल खोब्रागडे याचा खून केल्याचे सांगितले. नंतर त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसांचा पीसीआर घेण्यात आला. पीसीआर दरम्यान सोनू सरावणे हिने सत्य हकीकत पोलिसांसमोर मांडली. अतुल खोब्रागडे व तिच्यात अनैतिक संबंध होते. ते भाटव्याला खटकत होते. ज्यादिवशी अतुल व सोनू ज्याठिकाणी भेटले, त्याच ठिकाणी सोनूचा भाटवाही आला. त्यांचे मिलन पाहून त्याचा चांगलाच पहारा चढला. त्याने अतुलशी वाद घालायला सुरुवात केली. वाद विकोपाला जाऊ लागल्याने तिने मदना जि. वर्धा येथून तिचे वडिल राजेश आनंदराव वाघमारे (४१) व मामा शंकर नत्थूजी वरघणे (३८) यांना बोलावून घेतले. त्यानंतर सर्व नातलग एक झाले, व त्यांनी अतुल खोब्रागडे याला गळा दाबून जिवानिशी ठार मारले. अतुल खोब्रागडे याची हत्या केल्यानंतर लगेचच वडिल व मामा चारचाकी वाहनाने मदना जि. वर्धा येथे निघून गेले. सोनू सरावणे हिने दिलेल्या बायनावरून पोलिसांनी २६ डिसेंबरला वडिल व मामला अटक केली. २० डिसेंबरला राजूर (कॉ.) परिसरातील चुना भट्ट्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या निवासस्थानासमोर राजूर (कॉ.) येथील वार्ड क्रं. ३ मध्ये राहणाऱ्या अतुल खोब्रागडे याचा मृतदेह आढळून आला. यानंतर ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे यांनी योग्य दिशेने तपास करित युवकाच्या मृत्यूचे रहस्य उलगडले. पोलिसांनी प्रियसी सोनू राजू सरावणे (२५) रा. राजूर (कॉ.), हिच्यासह हर्षद अंबादास जाधव (४५) रा. वार्ड क्रं. ३ राजूर (कॉ.), राजेश आनंदराव वाघमारे (४१) रा. मदना जि. वर्धा, शंकर नत्थूजी वरघणे (३८) रा. मदना जि. वर्धा यांना अतुल खोब्रागडे याच्या खून प्रकरणात अटक केली असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, सपोनि माया चाटसे, परि. पोउपनि आशिष झिमटे, स.फौ. प्रभाकर कांबळे, नापोकॉ अविनाश बानकर, उमा कऱलूके, अमोल नुनेलवार, अमोल अन्नेरवार, शंकर चौधरी, राहुल बोन्डे, यांनी केली. पुढील तपास सपोनि माया चाटसे करित आहे.

"आरोग्यमिञ" आरोग्य कार्डचा जनतेंनी लाभ घ्यावा !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळ,चंद्रपुर तसेच परिवार विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत सोमवार दि.२७डिसेंबरला जिल्हा परिषद शाळा चुनाळा येथे आरोग्य मित्र हेल्थ कार्डच्या कँप घेण्याबाबत एक महत्वपूर्ण चर्चासञ आणि हेल्थ कार्ड काढण्याचा शुभारंभ करण्यात आला. आरोग्यमिञ या कार्डमुळे चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यातील नामांकीत खाजगी हॉस्पीटलमध्ये बहुतांश प्रमाणात सवलत व सुट दिल्या जाते. ग्रामीण तथा शहरी भागातील जनतेला आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन या निमित्ताने आयाेजकांकडुन करण्यांत आले.

या वेळी सरपंच बाळनाथ वडस्कर पोलीस पाटील निमकर, साईबाबा इंदुरवार मुख्याध्यापक जि. प. शाळा चुनाळा, आरोग्य केंद्र चुनाळाच्या अंगणवाडी सेवीका व आशासेवीका मंदा धुर्वे, सोनाली वांढरे, वंदना वांढरे, वसंता मारपेली, चांदेकर वैद्यकीय अधीकारी, अशोकजी अंबागडे, सौरभ मादासवार , प्रशिल भेसेकर व इतर शिक्षकगण उपस्थित होते.

मोमीनपुरा येथे बालकांवर द्रव्य फेकण्याचे प्रकार सुरूच, तीन दिवसांत तीन चिमुकल्यांवर फेकल्या गेले द्रव्य

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहरातील मोमीनपुरा येथिल रहिवासीयांमध्ये धास्ती पसरविण्याच्या उद्देशाने एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीकडून एक विचित्र प्रकार घडविला जात आहे. येथील चिमुकल्या मुलांच्या अंगावर विशिष्ट प्रकारचे द्रव्य फेकून दहशत पसरविण्याचा प्रकार मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरु आहे. चिमुकल्यांवर विशिष्ट द्रव्य फेकणारा व्यक्ती अद्याप कुणाच्या नजरेत पडला नसून या अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहे. पण त्याच्या या विकृत मानसिकतेमुळे मोमीनपुरा येथिल रहिवासी मात्र कमालीचे वैतागले आहेत. २६ डिसेंबरला सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास एका सहा वर्षीय बालकावर द्रव्य फेकल्याची घटना ताजी असतांनाच आज आणखी एका चार वर्षाच्या मुलावर द्रव्य फेकल्या गेल्याने जनप्रक्षोभ उफाळून आला. २५ डिसेंबरलाही एका चिमुकलीवर द्रव्य फेकल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारे जनमानसात चीड निर्माण करणारे विकृत कृत्य करणारा तो व्यक्ती आहे तरी कोण, या एकाच चर्चेला सध्या शहरात उधाण आले आहे. 
मोमीनपुरा येथील चिमुकल्या बालकांवर द्रव्य फेकणारा विकृत व्यक्ती नागरिकांच्या रोषाचे तर पोलिसांच्या डोकेदुखीचे कारण ठरू लागला आहे. कुणाच्याही न कळत चिमुकल्यांवर द्रव्य फेकून तो पळ काढत असल्याच्या घटनेने सध्या रान उठवले आहे. या व्यक्तीचा पोलिस कसून शोध घेत असून नागरिकही आता त्याच्या पाळतीवर आहेत. २५ डिसेंबरला एका चार वर्षाच्या बालिकेवर, २६ डिसेंबरला सहा वर्षाच्या बालकावर तर आज २७ डिसेंबरला परत चार वर्षाच्या बालकावर एका अज्ञात व्यक्तीकडून द्रव्य फेकण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटना घडवून हा विकृत मानसिकतेचा व्यक्ती चर्चेचे बनू लागला आहे. या द्रव्यामुळे कुणालाही दुखापत झाली नसली तरी असे करण्यामागची त्याची मानसिकता काय, याचा शोध घेणे आता जरुरीचे झाले आहे. समाजात विद्रोह निर्माण करू पाहणाऱ्या या विकृताला लवकरात लवकर पकडणे गरजेचे झाले आहे. त्याच्या या विकृतीमुळे परिसरात दहशत पसरली असून पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी चिंता निर्माण झाली आहे. बालकांवर द्रव्य फेकून चर्चेचा विषय बनू पाहणाऱ्या या व्यक्तीला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.