राज्य कर्मचारी वर्गांचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२९ : ऑक्टो.) : प्रलंबित मागण्या व NPS योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याकरीता आज शुक्रवार दिनांक 29 ऑक्टोंबर 2021 ला दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
             
यासाठी सांप्रत महाविकास आघाडी सरकारने
1) NPS योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करावी.
2)देशातील अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची शिफारस विधीमंडळाच्या ठरावाव्दारे केंद्र शासनाला केली आहे. महाराष्ट्र शासनाने सुध्दा अशी शिफारस तात्काळ करावी.
3) NPS धारक कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन आणि उपदान अनुज्ञेय करावे.
4)राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या 14 टक्के अंशदान रक्कमेची वजावट आयकरासाठी एकूण वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी आणि
5) ऑक्टोंबर 2005 पूर्वीच्या शासकीय सेवेचा राजीनामा देऊन नवीन सेवा स्विकारलेल्या तसेच नोव्हेंबर 2005 पूर्वी निवड होवून उशिरा नियुक्ती आदेश मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी परीभाशित पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देषाने हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

उपराेक्त ठिय्या आंदोलनाला अध्यक्ष म्हणून दिपक जेऊरकर, प्रमुख अतिथी म्हणून अरुण तिखे, अविनाश सोमनाथे, शालीक माऊलीकर, सुचिता धांडे व बंडु मेश्राम आदी मान्यवरांची उपस्थिती होती. चंद्रकांत कोतपल्लीवार, अमोल आखाडे, सिमा पॉल, राजु धांडे, अरुण तिखे, शालीक माऊलीकर, सुचिता धांडे, सुनिल दुधे व दिपक जेऊरकर आदींनी मार्गदर्शन केले. सदरहु ठिय्या आंदोलनाचे सुत्रसंचालन संतोष अतकारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत गहुकर यांनी केले.
             
पार पडलेल्या या आंदोलनात महसुल विभाग, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, कोषागार कार्यालय, वन विभाग, वस्तु व सेवा कर विभाग, भुमि अभिलेख विभाग, कृषी विभाग, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कर्मचारी, अभियांत्रिकी महाविद्यालय, भुविज्ञान-खनिकर्म विभाग, आरोग्य विभाग, पोलीस अधिक्षक कार्यालय कर्मचारी आदी विभागाचे कर्मचारी तसेच दिपक जेऊरकर, राजु धांडे, संतोष अतकारे, राजेश लक्कावार, राजेश पिंपळकर, श्रीमती सिमा पॉल, चंद्रकांत कोतपल्लीवार, श्रीमती रजनी आनंदे, अजय चहारे, संदीप गणफाडे, प्रशांत कोशटवार, अविनाश बोरगमवार, राजेंद्र समर्थ, गणेश मानकर, अतुल भिसे, शैलेंद्र धात्रक, प्रविण अदेंकीवार, अतुल किनेकर, अमोल अवधाने, मंगेश कोडापे, रविंद्र आमवार, श्रीकांत येवले, अतुल साखरकर, नितीन पाटील, श्रीमती एस.आर. माणुसमारे, अनंत गहुकर, महेश पानसे त्याचबरोबर विविध कार्यालयीन संघटनांनी आपला सक्रिय सहभाग दर्शविला होता.

माजी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश नेहारे काळाच्या पडद्याआड

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२९ ऑक्टो.) : सुरेश किसनाजी नेहारे  (६०) रा. मारेगाव यांचे अल्पशा आजाराने आज  १२.२० वाजताचे दरम्यान, निधन झाले. मारेगाव येथील सिंहझेप तथा मारेगाव वार्ता (पोर्टल) मराठी दैनिकाचे प्रतिनिधी पंकज नेहारे यांचे ते वडील होते.

श्री.सुरेश नेहारे हे मागील चार दिवसापूर्वी स्वगृही प्रसाधन गृहात पडले होते. त्यांना लगेच चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटर वर असतांना त्यांची प्राणज्योत मालविली.
सन १९८०-९० च्या दशकात त्यांनी राजकारणात उडी घेत शिवसेनेत प्रवेश केला होता. लगेच जिल्हा पक्ष प्रमुखांनी उभरता शिवसैनिक म्हणून सुरेश नेहारे यांच्यावर 'तालुका शिवसेना प्रमुख' म्हणून जबाबदारी सोपविली होती. तालुका शिवसेना प्रमुख म्हणून ते शिवसेनेचे मारेगाव तालुक्यातील प्रथम शिवसेनाप्रमुख होते. तालुक्यात शिवसेनेचा जन्म होताच सुरुवातीलाच तालुका प्रमुख होत त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. कालांतराने पक्षातील वैयक्तिक मतभेद व गटातटाने नेहारे यांनी माघार घेत राजकारणाला पूर्ण विराम दिला होता.

परिणामी आज अल्पशा आजाराने त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. सुरेश नेहारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड असा आप्तपरिवार आहे. 

लापता भिमराव पोतु टेकामचा "रेस्क्यू टीम" घेणार शोध


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२८ ऑक्टो.) : केळापूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील अर्ली पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळशेंडा या गावातील शेतकरी भीमराव पोतू टेकाम (६५) हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेला असता, शेजारील नाल्यांमध्ये शौचास बसल्या ठिकाणी अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली.

भिमराव वर वाघाने हल्ला तर केला नसेल ना! असा  संशय व्यक्त केला जात असून, पांढरकवडा पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कोळी साहेब, वनविभाग, अभयारण्य विभागाची टीम तसेच शेकडो गावकऱ्यासह शोध मोहीम राबवली असून, गेल्या आठ दहा तासापासून सात ते आठ किलोमीटरचे अंतर शोधले, परंतु भिमराव चा कुठेच शोध न लागल्याने आज रेस्क्यू टीम कडून शोध घेण्यात येणार असल्याचे समजते.
या शोध भूमीमध्ये पोलीस विभाग, वनविभाग व गावकरी यांच्या माध्यमातून शोधाशोध केली असता, भिमराव न सापडल्याने वाघाने हल्ला केला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
"गावकऱ्यांनी दिलेल्या माहितनुसार भिमराव टेकाम हा ईसम २७ ऑक्टाेंबर पासून बेपत्ता असल्याचे कळले त्या अनुषगाने जंगल व परिसरात शोध घेण्यात येत आहे. परंतु अजून पर्यंत भिमराव चा शोध लागलेला नाही."

~ महेश बाळापूरे
वनपरिक्षेत्र अधिकारी टीपेश्वर अभयारण्य

लोकमान्य टिळक महाविद्यालयातील लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद


• रासेयो व राष्ट्रीय छात्र सेना आणि नगरपरिषद वणी प्रशासनाचा संयुक्त उपक्रम


सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (२९ ऑक्टो.) : स्थानिक वणी दिनांक 22/10/2021 पासुन राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना व वनी नगर परिषद प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन कवच-कुंडल अभियाना अंतर्गत महाविद्यालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या मोहिमेला महाविद्यालयातील विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.
 या लसीकरण शिबिराला महाविद्यालयालतील प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे , राष्ट्रीय छात्र सेना चे ANO प्रा.डॉ. रवींद्र मत्ते रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ नीलिमा दवणे आणि प्रा. किशन घोगरे यांनी उपस्तीत राहून लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले. व शुभेच्छा देत महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.  
    
या लसीकरण मोहिमेला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेना स्वयंसेवक हे शिबिराच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत.

मारेगाव: वेगाव येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२९ ऑक्टो.) : मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील महिलेला सर्पदंश झाल्याने तिचा मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज गुरुवारला सायंकाळी ६ च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेने वेगाव सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
    
जिजा पुरोषात्तम माथनकर (५८) असे सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव आहे. सध्या कापूस वेचणीचा हंगाम असल्याने कापूस घेऊन महिला गोठ्याकडे आली. बैलांची व्यवस्था करीत असतांना गोठ्यातच जिजा ला सर्पदंश झाला. तातडीने तिला मारेगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.