विरकुंड येथील प्रमुख रस्त्यावर निर्माण झाले आहेत मोठं मोठे खड्डे

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२७ जुलै) : वणी तालुक्यातील विरकुंड या गावातील प्रमुख रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी होत असतांना देखील लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची व्यथा गावकऱ्यांनी मांडली आहे.

 हे खड्डे आता अपघाताला कारणीभूत ठरू लागले आहेत. वणी वरून विरकुंडकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्यावरील बसस्थानकाच्या अगदी जवळच मोठं मोठे खड्डे तयार झाले आहेत. हाच रस्ता बोर्डा या गावाकडेही जात असल्याने या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्यांचा या खड्ड्यांमुळे चांगलाच मनःस्ताप होत आहे. हे खड्डे रहदारीला अडथळे निर्माण करत असून या खड्ड्यांमुळे कित्येक दुचाकीस्वारांचे अपघातही झाले आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे विद्यमान ग्रामपंचायत सदस्याच्या अगदी घरासमोरच असल्याने येथे दिव्याखालीच अंधार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. ग्रामपंचायत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. 

विरकुंड ग्रामपंचायत विकासकामे करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गावात नाल्या व रस्त्यांची मोठी समस्या आहे. गावाकडे येणाऱ्या व गावातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर पडलेले मोठं मोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहे. या खड्ड्यांमध्ये गावातील घाणपाणी व पावसाचे पाणी नेहमी साचून राहते. रात्रीच्या वेळेला हे खड्डे दृष्टीस पडत नसल्याने या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात घडले आहेत. या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्यांना या खड्ड्यांमुळे मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्याच्या घरासमोरच मोठं मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दिव्याखालीच अंधार असतांना प्रकाशाची अपेक्षा तरी काय करावी अशा संतप्त प्रतिक्रिया गावातून ऐकायला मिळत आहे. या प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची अनेक महिन्यांपासून मागणी होत असतांना देखील लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

विकासकामांकरिता मिळालेला निधी जातो तरी कुठे असे प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागले आहेत. लोकप्रतिनिधींनी गावकऱ्यांच्या न कळतेपनाचा फायदा घेत थातुरमातुर विकासकामे करून स्वतःचाच विकास साधण्याकडे जास्त लक्ष दिले आहे. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून रस्त्यावर पडलेले खड्डे अद्यापही दुर्लक्षितच आहे. रस्त्यावर मोठं मोठे खड्डे निर्माण झाले असतांना देखील लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नसल्याने गाववासीयांमध्ये असंतोष खदखदत आहे. गावातील विकास कामांना प्राधान्य देऊन प्रमुख रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

कोकण पूरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे वणीकरांना केले मदतीचे आवाहन

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (२७ जुलै) : कोरोना महामारी नंतर आता महाराष्ट्रात महापुराने थैमान घातले आहे. सगळीकडे आहाकार माजला आहे. पुरामध्ये कोकणात जवळ जवळ सर्वच घरातील सर्व साहित्य वाहून गेले.

पूरग्रस्तांची जगावं की मरावं अशी अवस्था झाली. अशावेळी पूरग्रस्तांना आपल्या लोकांना आपल्या मदतीची गरज आहे. फुल ना फुलाची पाकळी म्हणून जमेल तेवढी मदत करा. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे राज्य उपाध्यक्ष राजू भाऊ उंबरकर यांनी तालुक्यासह वणीकरांना करण्यात येत आहे.

मदतीचे स्वरूप : पिण्याचे पाणी, अन्नधान्य, खाद्यपदार्थ, औषधे, सॅनिटरी नॅपकिन सॅनिटायजर, मास्क व इतर गृहपयोगी वस्तू देण्यात यावे.

मदत जमा करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा, ९६६५१११९३३, ९०४९३४३९९९, ९८२२०९७१५४, ७३५०५०३४१९ तसेच मनसे रुग्ण सेवा केंद्र वणी जिल्हा यवतमाळ येथे ही आपली मदत जमा करू शकता. 
        

शिक्षक समितीचा वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

सह्याद्री न्यूज : विवेक तोडासे 
मारेगाव, (२७ जुलै) : राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक बाबतीत लढणारी एकमेव शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचा ५९ वा वर्धापन दिन मारेगाव पंचायत समिती च्या प्रांगणात गटविकास अधिकारी मनोहर नाल्हे, गट शिक्षण अधिकारी शेख लुकमान, प्रभारी विस्तार अधिकारी शिक्षण प्रदीप रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी सल्लागार विठ्ठलराव ठावरी, कार्याध्यक्ष माणिक नाईक, अशोक चटप, बाबाराव ढवस, सीताराम मारबते, पुरुषोत्तम हलगरे, हिरामण आगे, हरेश होटे, संदीप गोहोकार, विजय झाडे, सचिव रणजित ठावरी, विपीन मुस्कावार, विनोद ढोणे, साधनव्यक्ती निलेश आत्राम, सेवकदास नरांजे, व शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू , झरी तालुक्यातील मार्की (खु.) येथील घटना

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२७ जुलै) : झरी तालुक्यातील मार्की (खु.) येथील शेतकऱ्याचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना काल २६ जुलैला घडली. दत्ता विश्वनाथ थेरे (५०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारादरम्यान सदर शेतकऱ्याचा मृत्यू झाला. 
दत्ता थेरे हा शेतकरी आपल्या शेतात काम करीत असतांना त्याला १९ जुलैला सर्पदंश झाला. त्यानंतर तत्काळ त्याला वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सेवाग्राम येथे उपचार सुरु असतांना काल २६ जुलैला त्याचा मृत्यू झाला. दत्ता थेरे हा अल्प भूधारक शेतकरी होता. शेतीच्या उत्पन्नातून तो आपल्या परिवाराचा उदर्निवाह करीत होता. त्याचा असा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्याच्या पच्छात पत्नी व अविवाहित मुलगा असा आप्त परिवार आहे. एका मुलीचे लग्न झाले असून ती सासरी नांदत आहे. 
सध्या शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतकरी शेत पिकांच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. पावसाळ्यात सापही बिळा बाहेर निघत असून खाद्याच्या शोदात त्यांचा शेत शिवारात संचार सुरु असतो. अशातच शेतात कामे करणाऱ्यांचा त्यांना स्पर्श झाल्यास ते दंश करतात, व त्यात शेतकरी व शेत मजुरांचा नाहक बळी जातो. शेतात कामे करतांना साप चावल्याने शेतकरी व शेत मजुरांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे करतांना शेतकऱ्यांनी सावधानी बाळगणे अत्यंत जरुरीचे झाले आहे.

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे मागणी

सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (२७ जुलै) : तालुक्यातील मागील काही दिवसांत अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे सदर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे केलेली आहे.
       
कोरपना तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व सोयाबीनच्या पिकाला प्रचंड मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, शेतकरी वर्ग फार मोठ्या संकटात असून त्यांना सदर बाबींचा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाईची अत्यंत आवश्यकता असून शासनाने त्वरित शेतकऱ्यांना मदत करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामळे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे सदर शेतातील पिकांचे तात्काळ पंचनामे होऊन आर्थिक मदत मिळावी याकरिता निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.
     
आपण सदर प्रकरणाबाबत संबधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन याबाबत आवश्यक कार्यवाही करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी माहिती यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी दिली.