विरकुंड येथील प्रमुख रस्त्यावर निर्माण झाले आहेत मोठं मोठे खड्डे

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२७ जुलै) : वणी तालुक्यातील विरकुंड या गावातील प्रमुख रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी होत असतांना देखील लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची व्यथा गावकऱ्यांनी मांडली आहे.

 हे खड्डे आता अपघाताला कारणीभूत ठरू लागले आहेत. वणी वरून विरकुंडकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्यावरील बसस्थानकाच्या अगदी जवळच मोठं मोठे खड्डे तयार झाले आहेत. हाच रस्ता बोर्डा या गावाकडेही जात असल्याने या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्यांचा या खड्ड्यांमुळे चांगलाच मनःस्ताप होत आहे. हे खड्डे रहदारीला अडथळे निर्माण करत असून या खड्ड्यांमुळे कित्येक दुचाकीस्वारांचे अपघातही झाले आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे विद्यमान ग्रामपंचायत सदस्याच्या अगदी घरासमोरच असल्याने येथे दिव्याखालीच अंधार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. ग्रामपंचायत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. 

विरकुंड ग्रामपंचायत विकासकामे करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गावात नाल्या व रस्त्यांची मोठी समस्या आहे. गावाकडे येणाऱ्या व गावातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर पडलेले मोठं मोठे खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहे. या खड्ड्यांमध्ये गावातील घाणपाणी व पावसाचे पाणी नेहमी साचून राहते. रात्रीच्या वेळेला हे खड्डे दृष्टीस पडत नसल्याने या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात घडले आहेत. या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्यांना या खड्ड्यांमुळे मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्याच्या घरासमोरच मोठं मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दिव्याखालीच अंधार असतांना प्रकाशाची अपेक्षा तरी काय करावी अशा संतप्त प्रतिक्रिया गावातून ऐकायला मिळत आहे. या प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची अनेक महिन्यांपासून मागणी होत असतांना देखील लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

विकासकामांकरिता मिळालेला निधी जातो तरी कुठे असे प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागले आहेत. लोकप्रतिनिधींनी गावकऱ्यांच्या न कळतेपनाचा फायदा घेत थातुरमातुर विकासकामे करून स्वतःचाच विकास साधण्याकडे जास्त लक्ष दिले आहे. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून रस्त्यावर पडलेले खड्डे अद्यापही दुर्लक्षितच आहे. रस्त्यावर मोठं मोठे खड्डे निर्माण झाले असतांना देखील लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नसल्याने गाववासीयांमध्ये असंतोष खदखदत आहे. गावातील विकास कामांना प्राधान्य देऊन प्रमुख रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.