बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करा - मनसे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी तालुक्यात विनापरवाना व परराज्यातील बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कठोर कारवाई कर 'मकोका' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच तालुक्यात बोगस बियाणे विक्रीला पूर्णपणे बंदी घालण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी करत आहेत. याच संधीचा गैरफायदा घेत काही कृषी केंद्र चालक परराज्यातील व विना परवाना असलेल्या बोगस बियाण्यांची विक्री करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असून त्यांच्या शेती उत्पादनावरही नकारात्मक परिणाम होत आहे. अनेकदा बोगस बियाण्यांमुळे पेरणी वाया जाते आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशाच काही बोगस बियाण्याची विक्री जिल्ह्यात होत असल्याने जिल्ह्यात मनसेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. यावर अंकुश मिळण्यासाठी मनसेने ठिकठिकाणी निवेदने व आंदोलने केली. तर दरवर्षी मनसेकडून यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते. याच पार्श्वभूमीवर काल कृषी विभागाने धाड सत्र चालू करत राळेगाव, बाभुळगाव, मारेगाव या तालुक्यातील विविध कृषी केंद्रावर छापे टाकून बोगस बियाणे जप्त केले.  या प्रकारच्या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे, मनसेने याकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे. अशा कृषी केंद्र चालकांवर केवळ दंड आकारून किंवा सामान्य गुन्हे दाखल करून फायदा होणार नाही, असे मनसेचे म्हणणे आहे. या गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत. यासाठी 'मकोका' कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे अशा संघटित गुन्हेगारांवर अंकुश ठेवता येईल.

मनसेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. कृषी विभागामार्फत तालुक्यातील कृषी केंद्रा मधून बोगस बियाणे तपासणी करण्यासाठी नमुने गोळा केले जाऊन ते तपासणीसाठी पाठविले जातात परंतु त्याचा कोणताच अहवाल प्राप्त होत नाही किंवा तो जाहीर केला जात नाही. त्यामुळे बोगस बियाणे उत्पादन व विक्रीस कृषी विभागाचा पाठिंबा असल्याचे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले. त्यामुळे याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली. बोगस बियाणे विक्री थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने अधिक कडक तपासणी मोहीम राबवावी, अशी सूचनाही मनसेने केली आहे.
असे न झाल्यास व तालुक्यात बोगस बियाणे विक्री आढळ्यास यासाठी कृषी विभाग पूर्णतः जबाबदार असल्याचे ग्राह्य धरून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून जन हिताचा मुद्दा असल्याने न्यायालयात जन हित याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आली. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, व स्थानिक कृषी विभागाला पाठविण्यात आली. 

यावेळी मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शंकर पिंपळकर, गोविंदराव थेरे, विलन बोदाडकर, रमेश पेचे, परशुराम खंडाळकर, दिलीप मस्के,विठ्ठल हेपट, प्रविण कळसकर, अतुल काकडे, मंगेश येटे, सूरज काकडे, धीरज बगवा, योगेश माथनकर, गणेश धांडे, कृष्णा कुकडेजा, गौरव धांडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहक भरती त्वरीत करा - राजु धावंजेवार

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहक भरती त्वरीत करण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या वतीने राज्य परिवहन मंत्र्याकडे करण्यात आली आहे. 
महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षापासून चालक-वाहक भरती करण्यात आलेली नाही. सर्व आगारामध्ये चालक वाहकांची कमतरता आहे. महाराष्ट्रात सर्व आगारात लालपरी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. परंतु चालक वाहकांची कमतरता असल्यामुळे बऱ्याच फेऱ्या रद्द कराव्या लागतात. त्यामूळे प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. सद्याच्या परिस्थितीत शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांकरीता सुरू असलेल्या बसेस बंद आहे. तसेच पुढच्या महिन्यात शाळा पूर्ववत सुरू होणार असल्यामुळे चालक व वाहक कमी पडणार आहे. 
संपूर्ण महाराष्ट्रात चालक- वाहक पुढच्या महिन्यात सेवानिवृत्त होणार आहे. नबिन बसफेऱ्या प्रत्येक आगारात सुरू झाल्या परंतु चालक- वाहक नसल्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. करिता मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने आपणांस नम्र विनंती करण्यात येते की, महाराष्ट्रात चालक -वाहक भरती त्वरीत करण्यात यावी. अशाप्रकारचे निवेदन मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या नेतृत्वात परिवहन मंत्र्याकडे पाठविण्यात आले आहे.

पाथरीत बोगस बियाणे विक्रेत्यावर कारवाई

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील पाथरी येथे एका शेतात कृषी विभागाने कारवाई करीत 15 बोगस बियानाचे पॉकेट व दोन दुचाकी सह एकूण 2,38,515/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कृषी विभागाच्या या कारवाईने बोगस बियाणे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहेत. 

कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाथरी येथील बंडू संभाजी पेचे यांच्या मालकीच्या शेतात बोगस बियाणे विक्रीकरिता असल्याचे समजले, यावरून कृषी विभागाने पाथरी येथील शेतात धाड टाकीत गॅलेक्सी हायपर कॉटन हायब्रीड सीड्स बोगस बियानाचे 15 पॉकेट व दोन मोटारसायकली अंदाजे किं. 2,38,515/- रुपयाचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. तीन पॉकेट बीज परीक्षणाकरिता नागपूर येथे पाठवण्यात आले. 

याप्रकरणी संशयित आरोपी सम्राट पेचे वर बियाणे अधीनियम 1968 चे कलम 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 नुसा लेबलमध्ये उत्पादक व त्याचे गुणवत्तेसाठी जबाबदार उत्पादकाचा उल्लेख नसल्याने सदर नियमांचे उल्लंघन केले आहे. (2) विना परवाना बियाणे साठवणुक व विक्री केल्याने बियाणे कायदा 1966 चे कलम 7 चे व (3) महाराष्ट्र कापुस बियाणे कायदा (पुरवठा, वितरण, विक्री व किंमतीचे निश्चीतीकरण याचे विनीयमन) 2009 व 2010 चे उल्लघन केले आहे. 3) (Genetic Engineening Approval Committe) GEAC च्या मान्यतेचा उल्लेख नसल्याने पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 7,8,15 (1), 15(2), 16(1) अन्वये तरतुदीचे उल्लघन केले आहे, 

त्यामुळे बंदी असलेले बियाणे शेतकऱ्यांना अनधिकृतपणे विक्री करण्याचे उद्देशाने आणल्याने भा. न्या.सं. कायदा 2023 चे कलम 318(4), 3(5) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी पसार झाले आहेत. सदरची कारवाई पंचायत समिती मारेगावचे कृषी अधिकारी संदीप वाघमारे, तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले, सहायक पोलीस निरीक्षक अजय वाढवे, स्था.गु. शा. चे सुधीर पांडे, सलमान शेख, रजनीकांत मडावी, नरेश राऊत यांनी केली आहे.

संजय खाडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साधेपणाने साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शेतकरी व कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी मंदिर येथील वसंत जिनिंगच्या सभागृहात हा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 80 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला तर महिला उद्योजक्ता शिबिरात मोठ्या संख्येने बचत गट, स्वयंरोजगार करण्यास इच्छुक महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना मान्यवरांच्या हस्ते बी-बियाणे कीटचे वाटप करण्यात आले. अभिष्टचिंतन सोहळ्याचे अध्यक्ष विश्वास नांदेकर होते तर उद्घाटक विजय मुकेवार होते. एपीआय सीता वाघमारे, नरेंद्र ठाकरे इत्यादी मान्यवरांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने झाली. मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर लगेच महिला उद्योजक शिबिराला सुरुवात झाली. शिबिरात नाबार्डचे जयंत सोनटक्के व गणेश आत्राम यांनी महिलांना बचत गटासाठी असलेले विविध लघूउद्योग, कर्जवाटप इत्यादींची माहिती दिली. या कार्यक्रमानंतर आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना बी-बियाणे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होत्या. यासह ग्रामीण रुग्णालयात फळवाटप वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी लाईफलाईन नागपूरच्या टीमने सहकार्य केले. 

या सोहळ्याला प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, प्रशांत गोहोकार, राजाभाऊ पाथ्रडकर, वंदना आवारी, साधना गोहोकार, आशा टोंगे, अर्चना बोदाडकर, काजल शेख, विजया आगबत्तलवार, शारदा ठाकरे, रवि कोटावार, राजू अंकतवार, अशोक चिकटे, तेजराज बोढे, अनिल भोयर , सुनिल वारारकर, जयसिंग गोहोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे फाउंडेशनची चमू तसेच जय जगन्नाथ मल्टिस्टेट व श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले.


तलावात बुडून इयत्ता आठवीत शिकणाऱ्या बालकाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगांव : तलावात बुडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी नऊ वाजता घडली. चौदा वर्षाचा मुलगा, राकेश मोहन आत्राम रा.कुटकी (ता. हिंगणघाट, जि वर्धा) असं त्या तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. 

माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील पाझर तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला. तो कुटकी येथून शाळेच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील आजोबांकडे (रामदास मडावी) आला होता. 

आज रविवारी बैलाला पाणी पाजण्यासाठी तो गेला होता, बैल पाणी पीत असतांना एका म्हैस ने बैलास धडक देत राकेशच्या हातातील कासरे सुटले व राकेश हा पाण्यात पडला. काठावरील खोल खड्यात इयत्ता आठव्या वर्गात शिकणाऱ्या बालकाचा दुर्देवी अंत झाला. या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.