अखेर ट्रक चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वर्ध्यातून केली अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : मारेगाव तहसील कार्यालय परिसरातून चोरी गेलेला ट्रक तब्बल ४५ दिवसांनंतर स्था. गुन्हा शाखा पथकाने वर्धा जिल्ह्यातून जप्त केला आहे. ट्रक चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी ट्रकच्या मालकासह चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी घटनेमध्ये वापरलेली स्विफ्ट डिझायर कार आरोपींकडून जप्त केली.

ट्रक मालक शेख रोशन शेख अब्दुल (३५), प्रणय धनराज पोहणे (२४) दोघं रा. पालोती जि. वर्धा, शेख अफरोज शेख अब्दुल (३२), पवन देवराव किनाके (२३) दोघं रा. सालोड जि. वर्धा असे अटक करण्यात आलेले आरोपींचे नाव आहे. पोलिसांनी जप्त केलेले ट्रक क्रमांक (एमएच ३६-१६७५) किंमत अंदाजे २ लाख ५० हजार व स्विफ्ट डिझायर कार किंमत ३ लाख रु., तसेच ताब्यातील आरोपी मारेगाव पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकाते यांचे मार्गदर्शनात पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, निलेश निमकर, उल्हास कुरकुटे, रजनीकांत मडावी, सतिश फुके यांनी कर्तव्य बजावले.

वणीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सहात साजरी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त 01 ऑगस्ट रोजी शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
     
"जो कलावंत जनतेची कदर करतो, त्याचीच कदर जनता करते. हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. नैराश्य हे धारदार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते" असे एक ना अनेक विचार समाजाच्या विकासात्मक व प्रगतशील मार्ग गाठण्यास जगाला प्रेरित करणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज 1 ऑगस्ट 2024 ला सकाळी 9 वाजताच्या दरम्यान वणी येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे लोकशाहीर यांना मादगी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने तसेच मोची, मादगी, मादिगा, मादरू, महासंघाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. 
     
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचे काही प्रसंग सांगितले व मौलिक मार्गदर्शनही केले. यावेळी संस्थेचे सचिव तथा महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरज चाटे, सहसचिव तथा शहर अध्यक्ष रवी कोमलवार, अरुण एनपल्लीवार, सदाशिव मंगलपवार, किशोर मंथनवार, विजय आडराने आदी समाजबांधव उपस्थित होते.

मारेगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ; समाजसेवकांचा गौरव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सावित्रीबाई फुले गुण गौरव समिती तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे शंभराहून अधिक गुणवंतांचा सत्कार करण्यात येऊन सत्कारार्थी तसेच प्रशासनातील कर्मचारी व समाजसेवक यांनाही सन्मानित यावेळी करण्यात आला. 

सन २०२३-२४ या सत्रात १० वीच्या परिक्षेत ८० टक्के व १२ वी च्या परीक्षेत ६५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, उद्घाटन वर्धमान फाउंडेशन वणीचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को.ऑ.बँक संचालक विजय चोरडीया यांच्या हस्ते संपन्न झाले. उपस्थित विद्यार्थ्यांना तहसीलदार उत्तम निलावाड, गिरीश बोंन्डे नायब तहसीलदार मारेगाव, गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, कृषी अधिकारी संदिप वाघमारे, सेंट्रल बँक व्यवस्थापक आरीफ शेख, मंचकावर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणुन सेवानिवृत्त दुग्ध विकास विभागचे कार्यालय अधिक्षक श्रीराम कुमरे तर, स्वागताध्यक्ष म्हणून अ.भा.सं प. सचिव सुरेश लांडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन सरपंच तुळशिराम कुमरे, नगरपंचायत बांधकाम सभापती अंजुम शेख, या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विध्यार्थाना सत्कार करण्यात आला. तसेच आयोजीत या सन्मान सोहळ्यात वर्ष भरात उत्तम सेवा करणाऱ्या लोकसेवक व पदाधिकारी यांना सुध्दा सन्मानित करण्यात आले. यामध्ये समाजसेवक म्हणुन कोसारा येथील वृध्दाश्रमाचे अध्यक्ष जितेंद्र जाधव, पत्रकार कुमार अमोल, तलाठी जयवंत कनाके, पोलीस पाटिल प्रेमानंद गाणार, ग्रामसेवक विलास शिवरकर, अंगणवाडी सेविका दमयंती फुलझेले, उद्योजक तथा पर्यावरण प्रेमी राजु तुरणकर,संगीत कला विशारद रविकिरण घुमे, डॉ. कवि विनोद कुमार आदे ह्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी विद्यार्थी, पालक, तथा उपस्थीतासाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिभा तातेड समिती अध्यक्ष, सहआयोजन माणिक कांबळे पत्रकार यांनी केले. सुत्रसंचालन स्नेहलता चुंबळे,यांनी प्रास्ताविक तुळशिराम कुमरे,तर आभार प्रशांत भंडारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदेश तातेड, अविनाश किनाके, विजया दारूंडे, आनंद गव्हाणे ईत्यादीनी केले. कार्यक्रमात पालक, विद्यार्थी तथा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस आक्रमक,विविध मागण्या घेऊन सरकारला धरले धारेवर

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : नवनियुक्त वणी तालुका अध्यक्ष यांनी तालुक्यात वज्रमूठ बांधत तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या च्या संदर्भात काल बुधवार दि. 31 जुलै ला वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. 

सुरवातीला माजी आमदार श्री वामनराव कासावार यांचे अध्यक्षतेखाली पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला जिल्ह्यातून नेमलेले वणी ग्रामीण करीता निरीक्षक श्री. विजय पाटील, श्री. गौरीशंकर खुराणा, वणी शहर साठी श्री अरविंद वाढोनकर, श्री.महादेवराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीत सहा ठराव मंजूर करण्यात आले, त्यामध्ये 1) दि. 12 जुलै 2024 ला सरकारने विधिमंडळा समोर कॅग चा अहवाल मांडला त्यातून राज्यसरकार च्या गलथान कारभाराचे आर्थिक बेशिस्तिचे भयावहवास्तव समोर आले, त्या बाबतीत सरकारने हिशोब द्यावा. 2)तेलंगणा राज्या प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी. 3) स्व. गोपीनाथ मुंडे विमा शेतकऱ्यां प्रमाणे शेतमजुरांना लागू करावा. 4) कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथे समाजकंटकाद्वारे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस पक्षा कडून जाहीर निषेध करण्यात येत असून हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्यात यावी. 5) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. 6) ग्रामीण भागातील पांदण रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावण्यात यावे. सर्व ठराव पारित करण्यात आले. तसेच तालुका अध्यक्षांनी तालुका कमिटीची कार्यकारणी घोषित करून सर्व समावेशकाना सोबत घेतले. दि. 16 जुलै ते 22 जुलै 2024 दरम्यान तालुक्यातील खेड्या-खेड्यात चालणाऱ्या "शेतकरी न्याय" यात्रे संबंधी ची माहिती देण्यात आली. तसेच अ‍ॅड. विपलव तेलतुंबडे, हरिश्चंद्र पिदूरकर यांचा पक्षात प्रवेश घेण्यात आला.  दरम्यान,घेतलेल्या ठरावाच्या मागण्याचे निवेदन तहसीलदार वणी यांना देण्यात आले.

निवेदन देतेवेळी जिल्ह्यातून आलेले सर्व निरीक्षक, माजी आमदार वामनराव कासावार, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, शहराध्यक्ष डॉ. लोढा, शहर कार्याध्यक्ष अशोक पांडे, डॉ. मोरेश्वर पावडे, टीकाराम कोंगरे, आशिष खुलसंगे नरेंद्र पा. ठाकरे, विवेक मांडवकर, डॉ. भाऊराव कावडे, ओम ठाकूर, राजू कासावार, संजय खाडे, प्रशांत गोहोकार, उत्तम गेडाम, मंगल मडावी, राजेंद्र कोरडे, ता. महिला अध्यक्ष सुरेखा लोडे, शहर महिला अध्यक्ष श्यामाताई तोटावार, शालिनीताई रासेकर, ओबीसी सेलचे विकेश पानघाटे, सेवादलचे प्रमोद लोणारे, काजल शेख, नवनियुक्त सर्व पदाधिकारी, तालुक्यातील व शहरातील सर्व कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शामादादा कोलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त शामादादा कोलाम ब्रिगेड चे शिंदे सरकार कडे निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केळापूर : शामादादा कोलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध संघटनेच्या निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असताना शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ.इंदिरा बोंदरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केळापूर तहसील कार्यालय मार्फत निवेदन सादर करून शामादादा कोलाम यांच्या नावाने आदिवासी कोलाम समाज भूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार घोषित करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे.

सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, शामादादा कोलाम यांनी स्वतंत्रपूर्व काळात अन्यायाच्या विरोधात लढा दिला असुन तत्कालीन कार्यकाळात अनुसूचित जाती पैकी कोलाम जातीतील लढाऊ नेतृत्व म्हणून समाज हिताचे कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने आदिवासीं कोलाम समाज भूषण पुरस्कार घोषित करून द्यावा, अशी मागणी सहित आदिवासी समाजाच्या कब्जात असलेल्या जमिनी संरक्षनाकरिता शामादादा कोलाम आदिवासी भुमिहक्क आयोग स्थापन करण्यात यावे, अश्या विविध मागण्या शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असुन शामादादा कोलाम यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समाज हिताचे कार्य करणे हीच खरी आदरांजली अर्पण होईल असे, मत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.