शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्धीत येत असलेल्या परीसरात दिवसभर मटका, झंडीमुंडी, तीन पत्ती, गांजा विक्री चा महापूर वाहतो. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी अवैध व्यवसाय समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आदेशीत करावे, अशा आशयचे निवेदन राष्ट्रवादी (पवार गट) च्या वतीने वणी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ व आयुक्त अमरावती यांना देण्यात आले.  
शिरपूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका बाजार खुलेआम भरतोच कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भालर कॉलनी, तरोडा, सुंदर नगर,बेलोरा पुलिया, ढाकोरी, मुंगोली, शिंदोला, अभय फाटा, चारगाव चौकी येथे दिवसभर अवैध धंदे सुरू असुन अनेक ठिकाणावरून या ठिकाणी मटका, जुगार खेळण्यास नागरिक येथे येतात. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असून कास्तकार पैसे घेऊन येतात व मटका, जुगार, झंडीमुंडी खेळतात, यात ते संपूर्ण पैसा हारून जातात. त्यामुळे या परीसरात जोमात वाढलेला अवैध बाजार शिरपूर ठाण्याच्या हद्दीतून बंद व्हावा यासाठी वणी शहराध्यक्ष किशोर काळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (पवार गट) यांच्या नेतृत्वात मागणी करण्यात आली आहे. आजचा युवा वर्ग या अवैध मटका, जुगार, गांजा च्या व्यसनाने उध्वस्त होण्याच्या मार्गांवर असून याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न होत आहे. पोलीस कारवाई का होत नाही, पंरतु जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन करण्याचा विडा उचलला आहे. त्याला मात्र स्थानिक पोलीसांनी पाठ दाखविली आहे. रोज मजुरी, बांधकाम मजुर या ठिकाणी येवुन मटक्यावर आपले पैसे लावतात त्यामुळे आलेली सर्व मजुरी मटका चालविणाऱ्याला देवुन दारू ढोसुन घरी मुलाबाळांना मारहाण करण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहे. त्यामुळे शिरपूर ठाण्याच्या हद्दीतील अवैधरित्या मटका बाजार त्वरीत बंद करून बाजार पुन्हा सुरू होवु नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी विशेष उपाययोजना आखावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष किशोर काळे यांनी मागणी केली आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किशोर काळे युवा शहर अध्यक्ष, मुबीन शेख युवा जिल्हा उपाध्यक्ष, धनराज येसेकर, योगेश्वर चौधरी, शशिकांत चौधरी, प्रशील खाडे,आर्या राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

बिगर सातबारा शेतकरी संघटनेची नागपूर येथे बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नागपूर : राज्यातील दलीत आदिवासी समाजाच्या लोकांनी महसूल व वन जमिनीवर शेती प्रयोजनसाठी अतिक्रमण केलेले असुन दरवर्षी मशागत करून जीवनावश्यक जिन्नसाची पेरणी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात. परंतु तत्कालीन सरकारने 12 जुलै 2011 शासन निर्णय निर्गमित केल्यामुळे त्या शासन निर्णयामुळे राज्यातील दलीत आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी हया धोक्यात आल्या आहेत.

वर्षां नु वर्ष सदर जमिनीवर अवलंबून असलेल्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी जर निष्कासित झाल्या तर हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी लॉर्ड बुद्धा चे भैय्यासाहेब खैरकर यांच्या अध्क्षतेखालील तत्काळ नागपूर येथील नागभवन येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करून आंबेडकर चळवळीतले विचारवंत यांना निमंत्रित करून दलीत आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी धोक्यात आल्या असुन तात्काळ उपाययोजना करणे काळाची गरज असल्याचे सांगून लवकरच राज्यव्यापी परिषद नागपूर येथे आयोजित करून सरकारचे लक्ष्य केंद्रित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,असे मत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी बैठकीत व्यक्त केले असता बैठकीला अवरजून उपस्थित असलेले भंते हर्षबोधी यानी सांगितले की दलीत आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी जर धोक्यात आल्या असतील तर लवकरच उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या उपस्थित नागपूर येथे राज्यव्यापी परिषद घेण्यासाठी ठराव सर्वानुमते घेण्यात आला व एक शिषटमंडळ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती बैठकीत सांगीतली. 

यावेळी मानावी हक्क सुरक्षा दलाचे प्रदेश अध्यक्ष अशोक तिडके, बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे युवा नेते अजय भाऊ मंडपे, आंबेडकर विचारवंत पुरण मेश्राम, प्रेमलाल उके, भैय्यासाहेब खैरकर, सचिन मुन सहित शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे उपस्थित असुन पहिल्याच बैठकीत दलीत आदिवासी समाजाच्या लोकांना न्याय हक्कासाठी भंते हर्षबोधी यानी उपाय योजना सांगितल्यामुळे बैठकित बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून सर्वांनी आभार व्यक्त केले.





संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांचे निवेदन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचा खोळंबा सुरु आहे. संपूर्ण उन्हाळा ग्रामीण भागातील नागरिकांनी त्रास सहन केला. आता पावसाळा सुरु झाला असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साप, विंचू अशा सरपटणा-या प्राण्यांचा वावर असतो. रात्रीच्या वेळी हे प्राणी दिसत नसल्याने अनेकाना या प्राण्यांचा दंश होतो. प्रसंगी लोकांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे मंदर येथील रहिवाशांनी महावितरणच्या कार्यालयात संजय खाडे यांच्या नेतृत्वात अधिका-यांची भेट घेतली. यावेळी निवेदन देत विद्युत वितरण सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन देते वेळी गणेश, देवराव देऊळकर, किशोर बोढे, विजय परसुटकर, प्रतिक बुरडकर, गणेश निखार, अरविंद भट, प्रवीण उपे, संदीप गोपाळकर, संदीप निब्रड, बंडू उपरे, वैभव सोयाम, प्रवीण करडभुजे, आशिष बुच्चे, विजय बोढे, गुरुनाथ आडे, अल्ताफ शेख, अमोल चोपणे, संजय कापसे, महादेव बुचे यांच्यासह मंदर येथील रहिवासी उपस्थित होते.

अन्यथा कार्यालयावर धडक 
तालुक्यात मंदरच नाही तर उकणी, भालर, लाठी इत्यादी गावात देखील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. याबाबत अधिका-यांशी चर्चा केली आहे. त्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र समस्या सुटली नाही. किंवा रात्री लाईट गेल्याने सर्पदंशासारखा अनुचित प्रकार झाल्यास महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली जाईल. - संजय खाडे 

बसअभावी शालेय विद्यार्थ्यांची सहा किलोमीटर पायपीट


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : बसअभावी शालेय विद्यार्थ्यांना सहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्यामुळे महागांव बस स्टॉप ते सिंधी-महागावात बस फेरी सुरू करण्यात यावी, अशा आशयचे निवेदन आज (ता.२८) जून रोजी महागांव येथील उपसरपंचांनी वणी आगार प्रमुख यांना दिले. 

शासनाने विद्यार्थ्यांकरिता शिक्षण घेण्याच्या दृष्टीकोणातून शाळेत येजा करण्यासाठी मानव विकास मिशन ची बस सेवा विना मूल्य करण्यात आली आहे. या मानव विकास अंतर्गत ग्रामीण भागाला जास्त प्राध्यान देण्यात आले असून,आजही मात्र तालुक्यातील अनेक गावापर्यंत बस सेवा पोहचत नाही. अशीच काहींसी स्थिती महागांव येथे आहे. 

महागांव बस स्टॉप ते महागांव पर्यंत बस सेवा नसल्याने कुंभा भारत विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांना जाण्यासाठी बस अभावी पायपीट करावी लागत आहे. परिणामी सन २४-२५ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून उपसरपंच अविनाश लांबट यांनी मानव विकास मिशन व अहिल्यादेवी होळकर अंतर्गत महागांव ते महागांव स्टॉप पर्यंत बस सेवा तत्काळ सुरू करण्याची निवेदनातून मागणी केली आहे. निवेदन देताना सरपंच रामचंद्र जवादे (दापोरा गट ग्रामपंचायत) हे उपस्थित होते. 
 





देवतळे दाम्पत्यांचे सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मोठे यश मिळाल्यानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणूकीसाठी रणनिती आखणे सुरु केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातील गटाचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही अशी ताठ भूमिका घेतली आहे. त्याचा एक भाग म्हणून चंद्रपूरातील माजी जि.प. सदस्य डॉ. आसावरी देवतळे आणि त्यांचे पती विजय देवतळे यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कार्यवाही सुरु केली असून, त्याचाच एक भाग म्हणून देवतळे दाम्पत्यांचे निलंबन करण्यात आले आहे. विजय देवतळे यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तसेच 2023 मध्ये कृ.उ.बा. समितीच्या वरोरा निवडणुकीत भाजपासोबत हातमिळवणी करुन काँग्रेस उमेदवारांना पराभूत केले होते.

2024 च्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत देखील त्यांची भूमिका पक्षविरोधी होती. यासर्व बाबींचा विचार करुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने देवतळे दाम्पत्यांचे निलंबन केले आहे, असे पत्र त्यांना देण्यात आले आहे.