धनादेशाचा अनादर, 6 महिन्यांची शिक्षा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : हातउसणे घेतलेल्या रकमेची परतफेड न करता त्याऐवजी धनादेश देऊन अनादर झाल्याप्रकरणी स्वाती विकास बोबडे ह. मु डोंबिवली ईस्ट, जि. ठाणे यांना दोषी ठरवत येथील न्यायदंडाधिकारी निलेश वासाडे यांनी 6 महिन्यांचा कारावास व 5 लाख 20 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

शिक्षा झालेल्या स्वाती बोबडे हिने प्रवीण साधुजी भट रा. वणी यांच्याकडून हातउसणे पैसे घेतले होते. पैसे परत करतेवेळी भट यांना धनादेश दिला. परंतु तिच्या बँक खात्यात रक्कम नसल्याने धनादेश अनादर झाला. त्यामुळे प्रवीण भट यांनी न्यायालयात धाव घेत प्रकरण न्यायप्रविष्ट केले, न्यायाधीश नीलेश वासाडे यांनी साक्षपुरावे आणि युक्तिवाद ऐकून स्वाती विकास बोबडे हिला धनादेशप्रकरणी दोषी ठरवून सहा महिन्यांचा कारावास व रक्कम प्रवीण भट यांना अदा करण्याचा आदेश नुकताच दिला. फिर्यादीतर्फे अॅड. पी. एम. पठाण यांनी बाजू मांडली.

अवैध दारु विक्री बंद करा - गोंडबुरांडा येथील महिलांची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील गॉडबुरांडा येथे सुरु असलेली अवैध दारु विक्री कायमची बंद करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन आज सोमवारला असंख्य महिलांनी मारेगाव गाठून ठाणेदार जनार्धन खंडेराव यांना देण्यात आले.

गावात मागील चार-पाच महिण्यापासून कुंभा येथील एक प्रशांत नामक व्यक्ती अवैध दारु विक्री करीत आहे. सदर बाब पोलीस पाटील, सरपंच व तंटामुक्ती यांना सांगुन बैठक बोलावुन सविस्तर चर्चा करुन त्या दारु विक्रेत्याला समाजावून सांगण्यात सुद्धा आले. परंतु गावातील पोलीस पाटील, सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष यांचे सुध्दा तो ऐकायला तयार नाही. उलट "तुमच्याने जे होते ते करुन घ्या, मी माझे दारु विक्रीचा व्यवसाय बंद करणार नाही" असे बोलून अश्लिल शिवीगाळ करुन धमकी देत असतो. असे 'निवेदनात नमूद आहे.

पुढं असेही तक्रारीत म्हटलं आहे की, या अवैध दारु विक्रीमुळे गावात अशांतता निर्माण झालेली असून गावातील तरुण, होतकरु व्यक्ती व्यसनाधीन खूप झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असून गावात रोज झगडे भांडण सुरु असते. तसेच या दारु विक्रेत्याची हिंमत जास्तच वाढली असून सदर व्यक्ती हा धमकावत असतो. त्यामुळे सदर अवैध दारु विक्रेत्यावर योग्य ती कार्यवाही करुन त्वरीत येथील अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी गोंडबुरांडा येथील महिलांनी केली.

निवेदन देताना ग्रापं. सदस्य अनुसया शेडमाके, पौर्णिमा उरवते, चंदा जुमनाके, शांता आत्राम, कानाबाई शेंदरे, शिला आत्राम, कलाबाई टेकाम, बालीबाई आत्राम, शालीनी रामपुरे, शोभा आत्राम, अनिता आत्राम, रीना रामपूरे, जणाबाई आत्राम, लक्ष्मी आत्राम यांच्या सह असंख्य महिला उपस्थित होत्या.

शेतकरी कामगारांचे नेते कॉम्रेड शंकरराव दानव यांची प्रकृती खालावली परंतु स्थिर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. शंकरराव दानव ह्यांना दि. २७ ला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना सध्या व्हेंटिलेटर वर ठेवले आहे. परंतु तब्येत स्थिर असून तब्येत सुधारण्याची आशा केल्या जात आहे. इस्पितळात त्यांची मुले ॲड. राहुल, मिलिंद व सारिका तसेच पक्षाचे कुमार मोहरमपुरी, ॲड. दिलीप परचाके, मनोज काळे, नंदू बोबडे, मनीषा परचाके त्या ठिकाणी उपस्थित आहेत.

कॉम शंकरराव दानव ह्यांची संपूर्ण हयात शेतकरी,शेतमजूर, कामगार, दलीत, आदिवासी, महिला, विद्यार्थी व युवक ह्यांचा हक्कासाठी संघर्ष करण्यात गेली. वयाचा १५ व्या वर्षापासून स्वतःला चळवळीत झोकून दिले असून त्यांनी चालविलेल्या संघर्षातून अनेकांना चांगले जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात वन जमीन कसनाऱ्यांचे आंदोलन चालवून हजारो शेतकऱ्यांना हक्काची जमीन मिळाली आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. बांधकाम कामगारांचे संघटन बांधून त्यांना सुद्धा न्याय मिळवून दिले. प्रत्येक क्षेत्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्षात राहिल्याने जिल्ह्यात त्यांना बहुमान आहे. गेल्या ६० वर्षापासून चळवळीत राहिल्याने त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले तसेच त्यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार सुद्धा करण्यात आले होते. असे हे लोकनायक कामरेड शंकरराव दानव ह्यांची प्रकृती बिघडल्याचे कळताच जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस करीत लवकर बरे होण्याची कामना व्यक्त केली आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिव डॉ. अजित नवले, किसन गुजर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर, सिटू कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड हे सातत्याने विचारपूस करीत ते लक्ष ठेऊन आहेत. काम्रेड दानव आय सी यू मध्ये असल्याने त्यांना सर्व कार्यकर्त्यांना भेटता येऊ शकतं नसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना इस्पितळात येण्यापासून थांबविण्याची सूचना करण्यात आली आहे. असे असले तरीही आशा व गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सिटु संघटनेचा अनेक कार्यकर्त्या प्रामुख्याने उषा मुरके व प्रीति करमनकर यांचे समवेत तसेच मेटिखेडा येथील पक्षाचे अनेक कार्यकर्ते चंद्रपूर कडे येत आहेत. ह्यांना फक्त आपला प्रिय काम्रेड ह्यांना पाहायचे आहे व ते लवकर बरे व्हावे अशी कामना आहे.

कॉम्रेड शंकरराव दानव यांना हृदय विकाराचा झटका, प्रकृती स्थिर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चे यवतमाल जिल्यातील जेष्ठ नेते शेतकरी, शेतमजूरांचे व कामगारांचे तारणहार, शंकरराव दानव यांना आज रविवारी पहाटे हदय विकाराचा तिव्र झटका आला,असे वृत्त माध्यमातून समोर आले आहे.
त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील दवाखाण्यात भरती करण्यात आले होते व डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता ऑपरेशन यशस्विरीत्या पार पाडले असे त्यांचे चिरंजीव अ‍ॅड.राहुल व मुलगी सारीका यांनी माध्यमातून सांगितले व आता त्यांची प्रकृती स्थिर असुन अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निगराणी मधे त्यांचेवर उपचार सुरु आहेत, असेही माध्यमातून म्हटलं आहे.

महसूल प्रशासन वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पुढे; मात्र पोलीस प्रशासन कोल डेपोवर धजावण्यास का?पडतेय मागे...


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : सध्या देशी दारू, मटका, जुगार हे अवैध धंदे मागे पडले आहेत. मारेगाव तालुक्यात रस्त्याच्या कडेला मोजमाप घेऊन दुकानदारी थाटली जात असून यात अवैध 'कोल डेपो' हा नवा उद्योग सध्या कोसारा परिसरात जोमात चालू आहे. यात जिल्ह्याबाहेरील व्यावसायिकांची भागीदारी असल्याची समजते.

मागील वर्षी काही संघटना पक्षांनी तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी करून उपोषण करण्याचा ईशारा देखील दिला, तसेच लोकप्रतिनिधीने तर ठाणेदार यांना तंबीच देऊन, सांगितले की मारेगाव तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करा. मात्र, एवढं होऊनही पाणी मुरतेय कुठे हेच कळायला मार्ग नसून आजतागायत कोसारा येथील ठाण मांडून असलेला कोल डेपो यावर कुठलीही कारवाई नाही. महसूल प्रशासन वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पुढे; मात्र पोलीस प्रशासन कोल डेपोवर कारवाई करण्यास का? मागे पडतेय...हा संशोधनाचा विषय असून तालुक्यात महापूर आलेल्या अवैध व्यवसाय का 'क्लोज' होत नाही हा चिंतनाचा विषय आहे. परंतु सगळे मूग गिळून गप्प आहे, असे चर्चील्या जात आहे.

आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या या मारेगाव तालुक्यात स्थानिक बेरोजगारांना हाताला काम नाही ही वास्तविकता आहे. मात्र आंतरजिल्ह्यातील लोकांना तालुक्यात प्रशासनाच्या नाकावर टिचून कोळशाची हेरगिरी करताहेत हे नवलच म्हणावं. 'खाकी'चा रुबाब थंडावला की काय अशी दबक्या आवाजात चर्चा असून यावर वेळीच लगाम लावला गेला नाहीतर उद्या ह्यांच्याच मुजोऱ्या वाढून परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तूर्तास मारेगाव तालुक्यातील कोल डेपो या अवैध व्यवसायाला "अच्छे दीन" आल्याची जोरदार चर्चा जनमाणसात जोर धरत आहे.