राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या विभागीय सचिव पदी मुस्कान सैय्यद यांची निवड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दि. २३ ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय सैनिक संस्था महाराष्ट्र राज्य सचिवालयाच्या वतीने कार्यकारिणी विस्तार कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्रीय सैनिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक कर्नल तेजेंद्रपाल त्यागी (वीरचक्र) यांच्या संमतीने महाराष्ट्र राज्याचे महासचिव हरिश्चंद्र राठोड यांच्या हस्ते राज्य व विदर्भस्तरीय नवीन कार्यकारणी घोषित करून नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. यामध्ये अमरावती विभागासाठी विभागीय सचिव म्हणून मुस्कान जलील सैय्यद यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय सैनिक संस्थेमध्ये कार्य करत असताना युवकांमध्ये सैनिकी गुणांचा प्रसार करून त्यांना राष्ट्र सेवेत कार्य करण्यासाठी प्रेरित करणे, माजी सैनिक व शहिदांच्या प्रति सन्मानाबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करणे, युवकांमध्ये राष्ट्राप्रति प्रेम आणि सन्मान रुजवणे हे सर्व कार्य राष्ट्रीय सैनिक संस्था करीत असते.राष्ट्रीय सैनिक संस्थेत १,००,००० लाखाहून जास्त सदस्य संपूर्ण भारतात कार्यरत आहेत. यावेळी नियुक्त पदाधिकारी यांनी राष्ट्रसेवेत कार्य करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महासचिव श्री. हरिश्चंद्र ब. राठोड यांनी केले.

महिला बचतगटांना धान्य प्रक्रिया उद्योगासाठी गोदाम उभारणार – पालकमंत्री संजय राठोड यांचा पुढाकार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : घराचे अर्थचक्र सांभाळणाऱ्या महिलांना उद्योग सक्षम करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांना धान्य प्रक्रिया उद्योगासाठी गोदाम आणि कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी दिली.

नेर तालुक्यातील कारखेडा, सातेफळ आणि घारेफळ येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पणावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, बचत गटातील महिलांच्या मानधनात वाढ केली आहे. कुटुंबाचा कणा असलेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी प्रभाग संघातील महिला बचत गटांना प्रक्रिया उद्योगांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला. या महिला बचत गटांना गोदाम आणि कार्यालय बांधकामासाठी निधी देण्यात येणार आहे. याशिवाय उमेदचे ग्रामसंघ, माविमच्या बचत गटांना देखील उद्योग उभारण्यासाठी निधी देण्याचा मानस असल्याचे पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले.

या योजनेंतर्गत सातेफळ येथे महिला बचत गटासाठी धान्य प्रक्रिया उद्योग गोदाम बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते करण्यात आले.

आज मारेगाव येथे ओबीसी सभेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कुणबी जात प्रमाणपत्र हे मराठा समाजाला देण्याचा निर्णय सरकारने घातला आहे. हा निर्णय मागे घेण्यासाठी ओबीसी महामोर्चाचे नियोजनाकरिता आज दि.5 नोव्हेंबर ला दुपारी 12 वाजता येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती च्या हॉल मध्ये सभा आयोजित करण्यात आली. या होणाऱ्या सभेला मारेगाव तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील सध्याची ओबीसी ची स्थिती अत्यंत बिकट आहे. अशातच राज्य सरकारने नुकताच घेतलेला निर्णय ओबीसी समाजासाठी आज आणि उद्याच्या भविष्यासाठी अडसर ठरणार आहे. त्यामुळे ओबीसी बांधवानी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे आणि आरक्षण बचाव करण्याची हीच ती वेळ आलेली आहे. असे समितीकडून सांगण्यात येत आहे. सरकार च्या त्या निर्णयाविरोधात संपूर्ण ताकदनिशी महाराष्ट्रात कधी झाला नाही एवढा लढा "ओबीसी महामोर्चा" यवतमाळ जिल्ह्यात झाला पाहिजे, त्या करिता सर्वांनी आपापला पक्ष तूर्तास बाजूला ठेवत, सभेला एकत्रित उपस्थिती दर्शवावी. असे देखील आवाहन ओबीसी कृती समन्वय समिती, मारेगाव च्या वतीने केले आहे.

या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी श्री. प्रदीप वादाफळे, श्री. शैलेश गुल्हाने, श्री. महाडोळे, श्री. तीखे साहेब, फेंडर सर, श्री.राजू देशमुख, श्री. रमेश ठाकरे, ॲड. राजेन्द्र महाडुळे, श्री. खरोडे सर, श्री.राजाभाऊ पोटे, श्री. साहेबराव जूनघरे, श्री.सतीश भोयर हे सर्व यवतमाळ ओबीसी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती समिती च्या वतीने देण्यात आली आहे. 

कानडा येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांची दांडी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : विविध कार्यालयातील कर्मचारी आपल्या कार्यालयाला दांडी मारताना आपण बघितले वाचले आहेत. परंतु शाळेचे शिक्षक दांडी मारताना आपल्या फार कमी निदर्शनास येते. मात्र मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कानडा येथील शिक्षकांनी आज कोणालाही न कळवता चक्क शाळेला दांडी मारल्याचा हा धक्कादायक प्रकार येथील जि प शाळेत उघडकीस आला आहे.

मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद कानडा शाळांमधील आज सर्व विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत हजर झाले. मात्र,रोज शिक्षक वर्ग हजर राहणारे आज एकही हजर नसल्याची बातमी सरपंच सुषमा रुपेश ढोके यांना समजली. दरम्यान, विद्यार्थी शाळा बाहेर फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली असता त्यांनी स्वतः शाळेला जाऊन भेट दिली. यावेळी एकही शिक्षक शाळेत असल्याचे निदर्शनास आले नसून याबाबत पंचायत समिती कार्यालयाला त्यांनी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे सरपंचांनी 'सह्याद्री चौफेर' बोलताना सांगितले. त्यानंतर पार्डी येथील एक शिक्षक निते सर म्हणून हे दुपारी 12.40 ला कानडा शाळेत दाखल झाले. मात्र, गैरहजर राहणाऱ्या व मर्जीने शाळेत हजर होणाऱ्या शिक्षकांवर कारवाई व्हावी यासाठी सरपंच सौ सुषमा ढोके यांनी शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षाना अवगत करित आज शिक्षक गैरहजर असल्याचा अहवाल तयार केला असल्याची माहिती आहे.

तालुक्यात शैक्षणिक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षकच गैरहजर राहत असेल तर शिक्षण विभागाची यंत्रणा किती जागृत आहेत, अशी खंत महिला सरपंच ढोके यांनी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्याकडून त्यांच्या वर कारवाईचा बडगा जरी उगारला जात असला, तरी विद्यार्थ्यांना असे वाऱ्यावर सोडणाऱ्या यंत्रणा काय करतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. येथील कर्तव्यदक्ष सरपंचा सौ सुषमा ढोके यांनी एक ते चार पर्यंत वर्ग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात तूर्तास खंड पडू नये म्हणून स्वतः सावित्रीबाईची भूमिका निभावत विद्यार्थ्यांचा 'क्लास' घेतल्याने त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.


माझे कार्य अभिनंदनीय जरी आले तरी शाळेवर शिक्षक गैरहजर राहणे हे मला कदापि न पटणारे आहे. त्यांच्या वर कारवाई कडक व्हावी या मताची मी असून, संबंधित विभागाने तत्काळ पुढील पाऊल उचलावे.

- सुषमा रुपेश ढोके 
सरपंच ग्रामपंचायत कानडा, पं. स. मारेगाव 

त्या रस्त्यासाठी वणीत ह्यांचे समाधी आंदोलन

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शहरातील विविध मार्गाची दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र, महत्त्वाचे कार्यालयासमोरील असलेला मुख्य रस्ता हा मागील दोन वर्षांपासून दयनीय अवस्थेत आहे. सदर रस्ता दणदणीत करण्यासाठी संबंधित विभागाच्या कार्यालयास मागणी करून सुध्दा प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर काल (ता.२ नोव्हें) रोजी आर.टी.आय. कार्यकर्ता दादाजी पोटे यांनी वणी तहसील कार्यालयासमोर खोल खड्डा खोदून समाधी आंदोलन करण्यात आले.

शहरातील मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती कार्यालय, पोलिस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पोलिस कर्मचारी वसाहत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालय, या महत्त्वाच्या कार्यालयासमोरील मुख्यता रस्ता मागील दोन ते तीन वर्षांपासून दयनीय अवस्थेत आहे. रस्त्याची चाळणी होऊन ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सदर रस्त्यावरुन येरजाऱ्या करणाऱ्या जेष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास नाहक सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी दरवर्षी सामाजिक कार्यकर्ते पोटे यांची मागणी आहे. 

परिणामी संबंधित विभागाने या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष देवून हा रस्ता अखेरच्या घटका मोजत असताना तातडीने रस्त्याची दुरुस्त करून नागरिकांना हा मुख्य मार्ग सुकर करावा, अशी मागणी दादाजी पोटे यांनी केली आहे. विशेष उल्लेखनीय की, त्यांनी ह्या रस्त्यासाठी अनेक आंदोलने केली. मागील वर्षी लोटांगण आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले तरी सुद्धा शासन प्रशासनाने सदर रस्ता दुर्लक्षित करून आजतागायत रस्ता नादुरुस्त आहे. त्यामुळे पोटे यांनी अखेर काल "समाधी आंदोलन" करून प्रशासनाचे पुन्हा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून, या आंदोलनाला कितपत यश येत,याकडे वणीकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.