मारेगाव मध्ये पोलिसांनी केले रूटमार्ट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : बकरी ईद आणि गुरुपौर्णिमेच्या सणाच्या पार्श्‍ववभूमीवर मारेगाव पोलिस निरीक्षक राजेश पुरी यांच्या नेतृत्वाखाली मारेगाव शहरातील मुख्य मार्गाने पोलिसांनी रुट मार्च काढला.

शहरात उत्सव काळात शांतता राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्ष राहत पोलिसांनी महत्वाच्या रस्त्यावरुन हा रुट मार्च काढला. आगामी बकरी ईद संबंधाने कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस स्टेशन मारेगांव शहर हद्दीतील मार्डी चौक, डॉ. आंबेडकर चौक, गौशिया मज्जिद व नगर पंचायत या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार व होमगार्ड रूटमार्च करीता आदिसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
 पोलिसांच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी रूट मार्च करून कोणत्याही परीस्थिला सामोरे जाण्यासाठी सज्ज असून कायदा व सुव्यवस्था चोख असल्याची ग्वाही त्यांनी या माध्यमातून दिली आहे. 


अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब विचारात घेऊन इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए), पुणे व पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इ. 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. सन 2023-24 ची इ. 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून प्रथम फेरीचे प्रवेश दिनांक 21 जून 2023 पासून सुरू करण्यात आले आहेत.

इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तथापि विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

बी.सी.झंवर/विसंअ/

टोमॅटो झाला लाल, भाव 100 रुपये किलोवर पोहोचले; जाणून घ्या...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सध्या भाजी मंडईतील टोमॅटोचे भाव लोकांना रडवणारे आहेत. देशातील अनेक भागात टोमॅटोचे भाव 100 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. घाऊक मंडईतही त्याचे भाव 60 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवडाभरात बाजारात टोमॅटोचे दर दुपटीने तर काही ठिकाणी त्याहूनही वाढले आहेत

टोमॅटो 60 ते 100 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे
सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटो त्याच्या गुणवत्तेनुसार 60 ते 100 रुपये किलोने विकला जात आहे. मध्य प्रदेशातही टोमॅटोचे दर 80 रुपये किलोवर पोहोचले आहेत. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, ओडिशा आणि छत्तीसगड या मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादक राज्यांमध्येही त्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

कुठे पाऊस तर कुठे उष्णतेचा परिणाम
एकीकडे बिपरजॉय वादळामुळे झालेल्या पावसाचा महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातसारख्या राज्यांतील टोमॅटो पिकावर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे बिहार आणि पश्चिम बंगालमधील कडाक्याच्या उष्णतेमुळे टोमॅटोच्या पिकावरही परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नुकसान झाले.

परिणामी, देशातील अनेक राज्यांतील मंडईंमध्ये टोमॅटोची आवक घटली, त्यामुळे दर रात्री गगनाला भिडले. दुसरीकडे पावसाला सुरुवात झाल्याने टोमॅटो पिकावरही परिणाम झाला. केवळ टोमॅटोच नाही तर मंडईतील इतर हिरव्या भाज्यांच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. तथापि, पुढील एक किंवा दोन महिन्यांत टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या नवीन मालाची आवक वाढेल तेव्हा काही राज्यांमध्ये दरात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.


आदिवासी साहित्य हे जगातील सर्वहारा माणसाच दुःख अधोरेखित करणारं साहित्य आहे - गीत घोष

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : आदिवासी साहित्य हे जगातील सर्वहारा माणसाच दुःख अधोरेखित करणारं साहित्य असून ते शोषित, पिढीत, आदिम मानवाचा हुंकार आणि त्याच्या स्वातंत्र्याचा प्रकाश आहे. असे मत दुसरे नवोदित साहित्य परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना प्रगतशील साहित्यिक व विचारवंत मा.गीत घोष यांनी मांडले ते विरांगना राणी दुर्गावती स्मृती पर्व निमित्ताने आयोजित दुसरी नवोदित आदिवासी साहित्य परिषदेमध्ये उद्घाटन सोहळ्यात मार्गदर्शक म्हणून आपले विचार मांडताना बोलत होते.

वसंत को.शेतकरी जिनिंग हॉलमध्ये झालेल्या या परिषदेच्या अध्यक्ष आदिवासी साहित्यिक कवि कुसूमताई अलाम, गडचिरोली ह्या होत्या, उद्घाटन आदिवासी साहित्यिक मा.प्रभू राजगडकर नागपूर यांनी केले तर मार्गदर्शक म्हणून आदिवासी साहित्यिक तथा संपादक गोंडवाना दर्शन, गडचिरोली, मा.दशरथ मडावी,आदिवासी साहित्यिक, यवतमाळ, मा.गीत घोष प्रगतशील साहित्यिक व विचारवंत, वणी, मा.निळकंठराव जुमनाके गुरुजी सं बिरसा मुंडा आ.पत.सं,यवतमाळ, मा.अशोकभाऊ नागभिडकर, संचालक वं.को.शेतकरी जि.प्रे.,वणी विनोद वाडेकर, मुंबई हे होते, विशेष अतिथी म्हणून मा.बि.डी. आडे, मा.ल.सू.राजगडकर, मा. एम.के.कोडापे,मा.पैकूजी आत्राम, डॉ. अरविंद कुळमेथे, डॉ. श्रीकृष्ण मडावी, मा.सुधाकर चांदेकर, मा.रमेश मडावी, मा.संतोष चांदेकर हे होते.

पुढे बोलतांना गीत घोष म्हणाले, साहित्य माणसाच्या समजेवर संस्कार करुन त्याच्या दृष्कोनात परिवर्तन घडवून आणत असते त्यामुळे साहित्य हे मानवी जाणीवाच प्रस्थापित व्यवस्थेशी झलेल हे एकप्रकारे युद्धच आहे. या परिषदेत आदिवासी स्त्री काल,आज आणि उद्या या विषयावर परिसंवाद ठेवण्यात आला होता.अध्यक्ष मा.प्रब्रम्हानंद मडावी, मुल,हे होते,विषयाचे वक्ते,मा.प्रा. शीतल ढगे, सुवर्णा वरखडे,या होत्या, परिसंवादाचे प्रास्ताविक छायाताई उईके यांनी केले, सूत्रसंचालन आशाताई कोवे (गेडाम) यांनी केले तर आभार रिनाताई आदे यांनी मानले.याच बरोबर कविसंमेलन देखील घेण्यात आले. कविसंमेलनाच्या अध्यक्ष मा.रजनीताई पोयाम ह्या होत्या, निवेदन विनोद आदे यांनी केले तर आभार दत्ताजी गावंडे यांनी मानले, या परिषदेचे बिज भाषण मा.माजी गटविकास अधिकारी, वणी यांनी केले.

प्रास्ताविक मा.वसंत कनाके सर मुख्य आयोजक न.आ.सा.परिषद यांनी केले, संचालन मा.रामचंद्र आत्राम, यांनी केले तर आभार मा.धनराज मेश्राम यांनी मानले.
ही परिषद यशस्वी करण्यासाठी अड.अरविंद सिडाम, दत्ताजी गावंडे, भगवान कुळमेथे, बेबिताई मेश्राम, आशाताई कोवे (गेडाम), रजनीताई पोयाम, मायाताई मरस्कोले, महेश आत्राम, शालिक कनाके, विनोद आले, लक्ष्मीताई धुर्वे, यांनी अथक परिश्रम घेतले.

शब्द पाळला : सिंधी महागांव येथील उपसरपंचांनी दखल घेऊन त्या रस्त्याची लावली विल्हेवाट


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : सरपंच उपसरपंचांनी दिलेला शब्द पाळला पाहिजेत अशी अपेक्षा होती, ती अपेक्षा मार्गी लागली. त्यामुळे प्रभागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले" - ही म्हण ज्या काळातील आहे तेव्हा बहुतेक खूपच सकारात्मक विचार असावेत कारण "जे बोलला आहे त्या प्रमाणे त्याने करून दाखवले तर त्याचे कौतुक करावे” असेच कार्य सिंधी येथील उपसरपंच यांनी प्रभातील नागरिकांची गांभीर्याने दखल घेऊन ते करून दाखवले आहे.
सिंधी महागांव गट ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 2 मधील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य होऊ घातलेल्या पावसाने निर्माण झाले होते. जनतेचे प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी सरपंच उपसरपंच सदैव तत्पर असून यांच्या विशेष प्रयत्नातून आज मंगळवारी मुरूम टाकून येथील नागरिकांची गैरसोयीना दिलासा मिळाला.

गावातील वार्ड क्र. 2 मध्ये जलमिशन अंतर्गत योजनेचे काही कामे सुरु असल्यामुळे, नुकताच पावसाने येथील नागरिकांची गैरसोय निर्माण झाली व त्यांच्या या समस्यांचे निराकरण करण्यात उपसरपंच तथा संचालक अविनाश लांबट यांच्या प्रयत्नाने सिंधी येथील शाळेपासून ते हनुमान मंदिर पर्यंत रस्त्यावर मुरूम टाकून अडचण दूर करण्यात आले. 

काम सुरू असतांना चांगल्या कामात अडचणी आणणाऱ्या काही विघ्नसंतोषीनी अडचणी आणण्याचं काम करू पाहतेय. परंतु यावर मात करीत सिंधी-महागांव च्या नागरिकांना दिलेला शब्द पाळला केला याचे समाधान आहे.
गावाच्या विकासासाठी साथ द्या

माझ्यावर विश्वास दाखवून गावातील विविध प्रश्नाबरोबरच सिंधी महागांवच्या विकासासाठी आमचे सर्व पदाधिकारी सदैव प्रयत्न करत आहोत, आपल्या सर्वांच्या सहकार्याने जनहितार्थ प्रश्न मार्गी लावता येईल. गावंच्या विकासाचे अजूनही प्रश्न बाकी आहेत. महागांव गट ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत अव्वल करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपसरपंच तथा संचालक अविनाश भाऊ लांबट यांनी केले.