आज 1 वाजता जाहीर होणार निकाल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 वीचा निकाल केव्हा लागणार या बाबत पालकांबरोबरच विद्यार्थ्यांना सुद्धा प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून उद्या 2 जून 2023 रोजी 10 विचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2023 मध्ये घेतलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल उद्या दि. 2 जून शुक्रवार रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची घोषणा राज्य मंडळाने केली असून पालक आणि विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
असा पाहा 10 वीचा निकाल SSC Result

■ सर्वप्रथम मंडळाच्या अधिकृत वेबसाइट -
mahresult.nic.in किंवा http://sscresult.mkcl.org किंवा https://ssc.mahresults.org.in वर लॉग-इन करा.
■ नंतर महाराष्ट्र SSC निकाल २०२३ या लिंकवर जा.
■ त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव लिहा.
■ त्यानंतर लॉगिन करून तुमचा १०वीचा निकाल तपासा लक्षात ठेवा
■ निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे तुमचं हॉल तिकीट नंबर असणे आवश्यक असणार आहे.
■ त्यानंतर तुमचा रोल नंबर / सीट नंबर नीट टाईप करणे आवश्यक आहे.
■ तुमच्या आईचे नाव हे इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे.
■ त्यानंतर येणारं बेसिक बेरीज / वजाबाकीचं गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.

शेतकऱ्यांनी आरोग्यदायी उत्पादनावर भर दयावा- सुनील निकाळजे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी इतर पिकाच्या लागवडी प्रमाणे आरोग्यदायी तृण धान्य उत्पन्नावर भर द्यावा असे आवाहन मारेगावचे कृषी अधिकारी सुनील निकाळजे यांनी केले आहे.

खरीप हंगाम 2023-24 यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने घेतलेल्या विशेष मुलाखती मध्ये ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की दरवर्षी शेतकऱ्यांचा कल हा पौष्टिक तृणधान्य पिका ऐवजी कापूस पिका सह इतर पिका कडे दिसून येत आहे. या बाबीचा परिणाम राष्ट्रीय अन्न सुरक्षे सह मानवी समूहाच्या आरोग्यदायी जीवनावर झालेला आहे.त्यामुळे आपल्या आरोग्यदायी जीवनाच्या सरक्षणासाठी यंदाच्या सन 2023-24च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी तृणधान्य लागवडीवर भर दयावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा कडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियातर्गत पौष्टिक तृण धान्य पीकाच्या मिनी किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शंभर टक्के अनुदान तत्वावर देण्यात येणाऱ्या तृण धान्य वितरणा मध्ये ज्वारी, बाजरी, कुटकी, राजगिरा, कोधो, राळा इत्यादी कडधान्याचा समावेश असणार आहे.योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात सहभागी होऊन यशस्वी करावे, मागील हंगामात कापूस उत्पादना वर परिणाम झाला आहे. मार्केट मध्ये भावात झालेली घसरण पाहता यंदा 600हेक्टर कापूस पेरा कमी होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.45हजार 500हेक्टर एकून लागवडी खालील क्षेत्र आहे.

मागील वर्षी 32हजार हेक्टर क्षेत्र हे कापूस लागवडी खालील होते. यंदा 500-600 हेक्टर कापूस लागवड कमी होऊन सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढेल अशी शक्यता आहे. मात्र पौष्टिक तृणधान्य लागवडी कडे दरवर्षी शेतकरी दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे अन्न सुरक्षेच्या दृष्टीने गभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी आरोग्यदायी उत्पन्नावर भर देण्याची गरज आहे.

तालुक्यात कडक्याच्या उन्हातही शेती मशागतीच्या कामांना वेग

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आगामी खरीप हंगामात पेरणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे करण्यावर भर दिल्याचे दिसुन येत आहे. तालुक्यात मागिल वर्षी प्रमाणे यंदाही कापसाची जास्त लागवड करण्यात येत असल्याचे खरीपाच्या नियोजनावरुन दिसुन येते.

गेल्या महिण्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाउस पडल्याने शेती मशागतीच्या कामास यावर्षी उशिर झाला आहे. जमीनीची धुप होण्याकरीता शेतकऱ्यांच्या वतीने शेतात नांगरणीचे काम सुरु आहे. यामध्ये पारंपारीक बैलगाडी पेक्षा ट्रॅक्टरव्दारे नांगरणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

मागिल वर्षी एका एकरचे नांगरणीचे दर 500 ते 600 रुपये होते. यावेळी मात्र, त्यात 200 रुपयांनी वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. तालुक्यात मागिल वर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाला जोरदार फटका बसला होता. 



खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत लोकप्रिय खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना त्यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले होते. शासनाच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर लोकसभेच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार मुकुल वासनीक व आमदार सर्वश्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन राऊत, सुनिल केदार, अनिल देशमुख, आशिष देशमुख, किशोर जोरगेवार आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आपल्या शोकभावना व्यक्त करताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरचे युवा लोकनेते खासदार बाळू धानोरकर सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारे नेते होते. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आक्रमकपणे काम केले. आपसात चांगला संवाद असलेल्या या नेत्याचे अकाली निधन हे दु:खद व वेदनादायी असून यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. ते आपल्याला सोडून गेले याचे सर्वांच्या मनात प्रचंड दुःख आहे. धानोरकर परिवाराच्या दु:खात आपण सहभागी असून त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना इश्वरचरणी करत असल्यांचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
दिवंगत खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बाळु धानोरकर यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हानी झाली असून चंद्रपुरच्या या ढाण्या वाघाला, दिलदार व्यक्तमत्व व लढवय्या नेत्याला मानाचा मुजरा करत असल्याच्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी संपूर्ण शासकीय इतमामात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज धानोरकर परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी दिवंगत खा. धानोरकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, तसेच सामाजिक व राजकीय पदाधिकारी नरेशबाबू पुगलिया, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, रामु तिवारी, प्रकाश देवतळे, देवराव भोंगळे यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नागरीकांनी पुष्पचक्र अर्पण केले. दरम्यान त्यांच्या अंतयात्रेला हजारोंच्या संख्यने नागरिक उपस्थित होते.


नगर परिषदेच्या चुकीच्या धोरणाचा युवासेनेच्या वतीने जाहीर निषेध


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : नगर पालिकेने वित्तीय वर्ष 2023 व 2024 मध्ये पाणिकरात 50 रुपये दरमाह वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा ठराव 23 फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आला. आता वणीकरांना पाणीकरात 600 रुपये वार्षिक भुदंड सहन करावा लागणार आहे. परिणामी शहरातील दूषित पाणीपुरवठा व पाणीकरात केलेली वाढ तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी युवासेनेच्या वतीने मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. 

शहरातील अनेक प्रभागात मागील वर्षी तीन दिवसातून पाणी एकदाच येते. म्हणजे महिण्याला फक्त 10 दिवस पाणी येते वर्षाच्या 365 दिवसात काही नागरीकांना 120 दिवसच पाणी मिळत आहे. मात्र, पाणी कर पुर्ण वर्षाचा भरावा लागत आहे. हा सदर नागरीकांवर अन्याय आहे.
परिणामी शहराच्या अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने जनतेच्या आरोग्याशी व जीवाशी न.प. ने जो खेळ सुरू आहे तो त्वरित थांबवावा याबाबत पाण्याचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्याचे पाणी तपासणी नमुने अहवाल पाठवून तपासणी करण्याची मागणी युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांनी केली आली. "जर दररोज पाणीपुरवठा झाला तर वाढीव पाणी कर भरण्यास हरकत नव्हती, मात्र तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असेल तर एका वर्षात फक्त तीन महिण्याचाच कर लावणे गरजेचे आहे". परंतु नगर परिषद वर्षभराचा कर घेत आहे या चुकीच्या धोरणाचा युवासेना जाहीर निषेध करते व नगर परिषदेविरुद्ध असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेत आहे.

या आंदोलनात वणीकर जनता नगर परिषदेचा पाणीकर भरणार नाही. व रस्त्यावर उतरून नगर परिषदेच्या वाढीव कराचा निषेध करणार व युवासेना यासाठी पुढाकार घेऊन कुणीही वणीकर नगर परिषदेचा पाणीकर भरणार नसल्याचे पत्रकही जनतेत वाटप करून याबाबतची जगजागृती करणार आहे. जर नगर परिषदेचा कर्मचारी किंवा अधिकारी जनतेच्या घरी जाऊन पाणीकर भरण्याबाबत बळजबरी करीत असेल तर त्याच्यासोबत तोंडी वाद झाल्यास यास प्रशासन जबाबदार राहील असा दमही देण्यात आला आहे. यावेळी करण नागपुरे, प्रितम वांधरे, चेतन उलमाले यांची उपस्थिती होती.