धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केली अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणीत धारदार शस्त्र सोबत बाळगुन दहशत निर्माण करणे हे काही नवीन नाही असं म्हटलं तर वावगं नाही. या अगोदर सुद्धा धारदार शस्त्र सोबत बाळगत तरुणांनी वेगवेगळ्या परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच आज पुन्हा एका तरुणाने हातात तलवार घेऊन दहशत पसरवण्याऱ्याला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

शहरातील एस.पी.एम. शाळेच्या मागील पटांगणात आज शनिवारी २७ मे रोजी ही कार्यवाही करण्यात आली. राहूल संजय डबडे (२१) रा.इंदिरा चौक, वणी. असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.

एस.पी.एम. (SPM) शाळेच्या मागे खुल्या मैदानात एक तरुण हातात धारधार तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता, गुन्हे शाखेचे पोउनि योगेश रंधे हे पथकासह दाखल होऊन मैदानावरील पडीक विरान इमारतीमध्ये बसलेल्या तरूणाला ताब्यात घेऊन त्याचे जवळील धारदार तलवार जप्त केली. त्याचेवर शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास वणी पोलिस करीत आहे.

खासदार बाळू धानोरकर यांना पितृशोक; श्री नारायण आत्माराम धानोरकर यांचे दीर्घ आजाराने निधन

 
सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर तथा भद्रावती नगरपरिषदचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे वडील नारायण आत्माराम धानोरकर यांचे आज शनिवारी २७ मे रोजी सायंकाळी ५.३० नागपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. 

त्यांच्यावर नागपूर येथील अरिहंत हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. 

नारायण धानोरकर हे पेशाने शिक्षक होते. ते उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून भद्रावती येथील डिफेन्स जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यामागे दोन मुले खासदार बाळू धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुलगी सौ. अनिता बोबडे, स्नुषा आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह पत्नी वत्सला धानोरकर , नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

आज भद्रावती येथील घुटकाळा वार्डातील निवासस्थानी सायंकाळी ८ ते उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिवदेह ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या रविवार दिनांक २८ मे रोजी सकाळी ९ वाजता भद्रावती येथील जैन मंदिर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : शेतीमधील कामे संपल्यावर शेत मजुरांकडे कोणतीही कामे उपलब्ध राहत नाही. अशा वेळी त्यांना रिकामे राहावे लागते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येते. अशा बिकट प्रसंगी ग्रामीण मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चंद्रपुर जिल्ह्यात महत्तवाची भुमिका बजावत असून ग्रामीणांच्या उदरनिर्वाहास हातभार लावत आहे.

मनरेगा अंतर्गत वैयक्तीक व सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारची कामे हाती घेतल्या जाते, यामध्ये भूमिहीन शेतमजुर व अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर, शेततळे, मजगी, फळभाग, शेतबांध बंदीस्ती, बोळी खोलीकरण, नॉडेप, शौषखड्डे, गुरांचे गोठे, बॉयोगॉस, शेळी निवारा, कुकुटपालन शेड अशी विविध वैयक्तीक स्वरुपाची कामे व तसेच सार्वजनिक भौतिक सुविधांची मालमत्ता निर्माण करणारी कामे जसे गोडावुन, ग्रामपंचायत भवन, ग्रामसंघ भवन, शेत पांदन रस्ते, तलावतील गाळ काढणे, वृक्ष लागवड अशी अनेक कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेतली जातात. याकरिता ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कामाचे नियोजन अर्थिक वर्ष सुरु व्हायच्या आधीच करण्यात येते. सदर वार्षीक नियोजन आराखडा सर्वव्यापक व सर्वंकश बनविण्यावर जिल्हा परिषद चंद्रपूर प्रशासनांकडुन विशेष प्रयत्न केला जात आहे.
जास्तीत-जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे तसेच जिल्ह्यात नविन्यपुर्ण कामे करण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. यावर्षी ग्रामीण भागात खेळ प्रवृत्तीचा विकास करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील युवकांना सैनिक भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागात क्रिडांगण उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी प्रती तालुका पाच क्रिडांगणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देवुन एकूण ७५ कामे जिल्हयात एकाच वेळी मनरेगामधुन सुरु केली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात एक गोडावुन व ग्रामसंघ भवन तयार करण्याचे नियोजन केले आहे.

जिल्ह्याला मागील वर्षी केंद्र शासनाने ३५.२३ लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट दिले असतांना जिल्ह्याने ४९.६१ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती केली होती. चालू वर्षाकरिता केंद्राने ३७.५८ लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट दिले असतांना जिल्हा परिषदेतर्फे ५० लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचा प्रयत्न आहे.

मनरेगा कामांची नियोजनपूर्वक आखणी करून प्रभावी अंमलबजावणी केल्याने यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मजुरांनी हजेरी लावली आहे. मजूर उपस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्हा आज राज्यात द्वितीय स्थानांवर तर ग्रामपंचायत अंतर्गत कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातंर्गत सर्व तालुक्यामधील नरेगाच्या विविध कामावर आज रोजी ७१ हजार ६४३ एवढे मजूर काम करीत आहे. एकंदरीत मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी हजर राहून प्रभावी उपाययोजना राबवित असल्याचे दिसून येते. 

28 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
      
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मुकटा येथील एका 28 वर्षीय युवकाने विषारी द्रव्य प्राशन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रफुल उत्तम तुराणकर (28) असे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाने काल शुक्रवारी 26 मे च्या सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास विष प्राशन केले होते. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने चंद्रपूर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले होते, कालपासून त्याच्यावर उपचार सुरु असताना आज उपचारादरम्यान सकाळी 6 वाजताचे दरम्यान, त्याने अखेरचा श्वास घेतला.
   
अविवाहित प्रफुल हा पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करीत होता.गेल्या काही दिवसापासून तो नुकताच मुकटा येथे आई वडीला कडे आला होता. मात्र, दरम्यान त्याची मानसिक स्थिती चिंताग्रस्त असल्याचे जाणवत असताना त्यानी आई वडिलांना शेअर केली नाही. काल दि. 26 मे ला पुणे येथे परत जाणार होता. त्यामुळे आई त्यांचेसाठी डब्बा बनवून द्यायच्या कामात व्यस्त होती. तर वडील जनावरांना चारापाणी करायला गेले असताना प्रफुलने घरी असलेली विषारी द्रव्य प्राशन केले. एवढ्यात त्याला उलटी झाली या उलटीतून वास आल्याचे आईच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वडिलांना बोलावून प्रफुलला चंद्रपूर येथील खाजगी दवाखाण्यात भरती केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृतदेह चंद्रपूर येथून मूकटा येथे जन्मगावी आणवून येथेच त्याचा अंतसंस्कार करण्यात आला आहे.
 प्रफुलच्या मागे आईवडील,दोन भाऊ आणि आप्तपरिवार आहे.

मोहदा येथे आमदारांच्या हस्ते विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद यवतमाळ जल जीवन मिशन कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत मोहदा येथे (ता. वणी) नळ पाणी पुरवठा योजना करणे प्राकलित किंमत रु. ९९.२४५ लक्ष व आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर किंमत १० लक्ष नारायण राजुरकर ते कृष्णानपूर पांदन रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे,आ. संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन आ. संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते करण्यात आले.
मतदारसंघातील सर्व रस्त्यांचे नुतनीकरण आणि मजबुतीकरण करण्याचे ध्येय असताना यासोबतच मोहदा सह परिसरातील गावांच्या सर्व समस्या लवकरच सोडविल्या जातील अशी ग्वाही आ. संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी मोहदा दरम्यान अर्थसंकल्पीय कामे अंतर्गत ९९.२४५ लक्ष तथा १० लक्ष निधी मंजूर झालेल्या रस्ता कामाच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पं स माजी सभापती श्री संजय पिंपळशेंडे, तर प्रमुख उपस्थिती श्री दिनकरराव पावडे, श्री गजाननराव विधाते, सौ. वर्षा रवींद्र राजुरकर (सरपंच) आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री. सचिन ज्ञानेश्वर रासेकर (उपसरपंच), श्री, गणेश बोन्डे, ग्रा. पं सदस्य, श्री गजानन शेलवडे, ग्रा पं सदस्य, सौ. अर्चना गेडाम, ग्रा. पं सदस्या, सौं सीमा ढूमने, ग्रा पं सदस्या, सौं बेबीताई उईके, सदस्या, सौं शोभा टेकाम, सदस्या, सौं सुवर्णा बोन्डे सदस्या,आदीसह या कार्यक्रमाला समस्त गावकरी, मोहदावासी उपस्थित होते.