स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - MPSC परीक्षा मध्ये होणार मोठे बदल


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे , महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गांसाठी घेण्यात येणाऱ्या भरतीप्रक्रियेमध्ये आता विविध बदल करण्यात आले आहेत. 

पहा कसे आहेत बदल :

या बदलांमध्ये आता राजपत्रित गट अ आणि गट ब सर्व पदांसाठी एकच पूर्व परीक्षा होईल. राजपत्रित गट अ आणि गट ब पदांसाठी पारंपरिक किंवा वर्णनात्मक मुख्य परीक्षा असेल.
अराजपत्रित गट ब आणि गट क पदांसाठी एकच पूर्व परीक्षा आणि त्यासाठी मराठी इंग्रजी सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी वर आधारित गट ब आणि क साठी वेगवेगळ्या मुख्य परीक्षा होतील. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणीत qualifying साठी 70 मार्क असतील.  

 याव्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेले हे बदल 2023 पासूनच्या परिक्षांपासून लागू होणार आहे. त्यामुळे आता फक्त 2 पूर्व परीक्षा होतील. सर्व मुख्य परीक्षा स्वतंत्र होतील. 
 एक राज्य एक परीक्षा 1 राजपत्रित गट अ आणि ब ( सर्व मुख्य परीक्षा - लेखी ), 2 अराजपत्रित गट ब आणि क (सर्व मुख्य परीक्षा - MCQ).अगोदर 4 पूर्व परीक्षा होत आता 2 पूर्व परीक्षा होतील. भविष्यात खुप पदे आयोगाच्या कार्यकक्षेत येणार आहेत त्यामुळे आयोगाने हे पाऊल टाकले आहे.

दरम्यान मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा देखील पर्याय असेल. त्यानंतर संबंधित संवर्गासाठी निवडप्रक्रिया राबवण्यात येईल. 2023 पासून MPSC मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. 


चाणी,पाथ्रड देवी येथील कराटेपटू राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यातील चाणी, पाथ्रड देवी येथील विद्यार्थ्यांनी कराटे स्पर्धेत राज्यस्तरावर उत्तम कामगिरी पार पाडली आहे. या कामगिरीची दखल घेत खेळाडू आणि प्रशिक्षकांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्काराने नवी मुंबईत सन्मानित करण्यात आले.
नवी मुंबईत छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यामध्ये चाणी येथील प्रशिक्षक रामराव राठोड यांना क्रीडारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर प्रतीक्षा अमोलकर, प्रणय आडे, हर्ष चव्हाण, (यश आमझरे यांना राज्यस्तरीय व विभागीय स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळाले) संदीप पवार, प्रीतम बटे, संदीप पवार, आतिश नेमाडे, शैलेश गडमडे, समृद्धी राठोड, सेजल राठोड यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी नवी मुंबईचे एसईपी राज खतिब, ब्रिगेडर सावंत, आमदार नंदा म्हात्रे, आमदार संदीप नाईक, अभिनेते बलराज माने उपस्थित होते. गावातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल पंचायत समितीचे माजी सभापती पंढरीनाथ गुल्हाने, सरपंच गजबे, उपसरपंच गजानन गुल्हाने, माजी सरपंच, विठ्ठल उके, प्रशिक्षक देवराज शिंदे आणि पालकांनी कौतक केले आहे.

साहेब महा पुरामुळे आम्हा शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे; तात्काळ मदत द्या - वनोजा येथील पीडित शेतकऱ्यांची मागणी


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : "मुख्यमंत्री साहेब, या आलेल्या महा भयावह पुरामुळे आमच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे आमच्या जीवन जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे आम्ही पूर्णत: खचलेलो आहोत, महापुरामुळे झालेल्या शेती व शेतीशी निगडीत नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईची तात्काळ मदत द्यावी अशी आर्तहाक मागणी वनोजा येथील पीडित शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांना निवेदनातून करण्यात आली. यावेळी नितेश वनकर, 
प्रशांत भंडारी, गुलाब बरडे, बंडू टोंगेदिपक ढवस आदीची उपस्थिती होती.
मागील विस दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वनोजा विभागात मोठ्या प्रमाणात हजारो हेक्टर पाण्याखाली आल्या आहे. या महापुरामुळे झालेल्या शेतातील कापूस, तुर, सोयाबीन, ज्वारी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांना प्रती एकर अंदाजे रु. ८०,००० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतातील हिरवागार शेतमाल सडला, जनावरांचा चारा (कुटार, कडबा कुट्टी) व बांधावरचा चाराही सडला आहे. 
पावसाळ्यात कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात बैलबंडी जात नसल्याने शेत शिवारात साठवणूक केलेले सर्व रासायनिक खते पुराने वाहून गेले आहे. त्याचसोबत शेतात असलेले सर्व अवजारे इ. साहित्यही पुराने वाहुन गेले आहे. पुराचे पाणी गावात शिरलेल्यामुळे शेतकरी व शेतमजुराचे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शिवाय शेतात असलेल्या जलसिंचनाच्या विहीरीमध्ये पूर्णतः गाळ साचल्यामुळे पूर्ण विहीरी मातीने बुजलेल्या व खचलेल्या आहे. त्यामुळे भविष्यात ओलीताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा या अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मागील वर्षी सुद्धा वनोजा (देवी) मंडळाला मागील वर्षी अतिवृष्टीतून वगळल्या गेले आहे. आणि या वर्षी महापूराने अतिवृष्टी ने झोडपल्याने शेतकरी, शेतमजूर व मक्तेदारीने करणारा भूमिहीन हा आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना तात्काळ शासनाच्या मदतीचा गरज आहे.
पूर ओसरला, पावसाने उसंत घेतली. मात्र शेतकरी मोठ्या आर्थिक विवंनचणेत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होतेय त्यामुळे आम्हा आपत्तीग्रस्त पीडित शेतकऱ्यांची दखल घेवून येथील नुकसान ग्रस्ताना न्यायाची आस लागली असून विशेष पॅकेज देण्यात यावे अशी मागणी आहे. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास वनोजा येथील शेतकरी शेतमजूर सर्व गावकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसून आंदोलन करू यास होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार असेल. तूर्तास या मागणीकडे पीडित शेतकऱ्यांसह व गावाकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

गावाच्या विकासासाठी आराखडा तयार करून अपेक्षित कामे त्वरित करा- बोपापुर (बाळापूर) ग्रामस्थांची ग्रामसेवकाला केली मागणी


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : मौजा बोपापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालयासाठी तार कपांउड व फेवर ब्लॉक बसविण्यासंदर्भात वैभव मिलमिले, माजी सरपंच विलास नैताम व ग्रामस्थांनी (15 वित्त आयोगातून) गाव विकासाकरिता सचिवांना काम त्वरित मंजूर करून आणण्याबाबतची मागणी निवेदन देवून करण्यात आली.                       
सतत च्या पावसाने शाळेच्या पटांगणात चिखलाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना एका वर्गातून दुसऱ्या वर्गाकडे जाण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे ग्रामसेवकांनी शाळा व ग्रामपंचायत करिता तार कंपाउंड, शौचालयाचा आराखडा तयार करून त्वरित ही कामे मंजूर करून आणावी अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे. 
शाळा हे विद्येचे मंदिर आहे आणि त्या विद्या मंदिराची  अवस्था बिकट असून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ आणखीन निर्माण व्हावी म्हणून शाळे ची इमारत प्रशस्थ असणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळेला व ग्रामपंचायतीला अपेक्षित कामे त्वरित मंजुर करून आणावे यासाठी  ग्रामसेवकाला निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाची दखल घेवून सदरील कामे मंजूर करून त्वरित कामे सुरु करण्यात यावे, असे न झाल्यास आम्ही गावकरी या संदर्भात आंदोलन करू असा ईशारा जनसेवक वैभव मिलमीले व माजी सरपंच विलास नैताम आणि ग्रामस्थ यांनी निवेदनातून दिला आहे.
दिलेल्या निवेदनावर सह्या करणारे वैभव मिलमीले, विलास नैताम, अमोल पेन्दोर, केवलदास मडावी, सुनिल पेन्दोर, भारत जुमनाके, अमोल आवारी, बंडु चांदेकर, शत्रु चिकराम, जिवन कोडापे, अविनाश मडावी, हर्षल पेन्दोर, निळकंठ मडावी, देविदास मडावी, प्रज्वल मडावी यांच्या आहे.

अनिलचा विजेच्या धक्क्याने तर, मधूची विहिरीत आत्महत्या

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : आज शहरात दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने मारेगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. कान्हळगाव रस्त्या लगत वास्तव्यास असलेला अनिल आत्राम (28) यास कुलरचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज रोजी सोमवारला दुपारच्या सुमारास घडली. अनिल याच्या पाठीमागे आई, पत्नी, भाऊ, बहीण असा बराच मोठा आप्त परीवार आहे. तूर्तास अनिलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात आहे.

तसेच शहरातील लोढा हॉस्पिटल या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी मधु झिंगट सहारे (37) रा.देवरी, तालुका साकोली जिल्हा भंडारा हा कुटुंबासोबत एक महिन्यापूर्वी आला असता, 29 जुलै रोजी कोणाला न सांगता अचानक गायब झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यास शहरातील व देवरी येथे शोध घेतला. मात्र त्याचा शोध लागला नाही.
त्यामुळे 29 जुलै रोजी मारेगाव पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. आज दि.1 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या सुमारास मारेगाव शहरातील जुने न्यायालय परिसरातील एका विहिरीत मधू यांचा मृतदेहच आढळून आला. या दोन्ही घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

या दोन्ही घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.