फिस्कीच्या जंगलात वाहतुकीची होते कोंडी, प्रवाशी त्रस्त

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी वणी जाणारा रस्त्यालगत असलेले फिस्की जंगल हे सध्या वाहतूक कोंडीचे कारण ठरत असून संबंधित मार्गाने जायचे असल्यास फिस्की जंगलात असलेला अरुंद रस्ता सर्वांसाठी डोकेदुखी चे कारण बनलेला आहे.

या मार्गाने जड वाहुतक म्हणून सिमेंट, कोळसा, रेतीचे ट्रक जास्त प्रमाणात वर्दळ सुरू असते शिवाय महत्वाचे म्हणजे सदर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. वनविभागाकडून रस्त्याची परवानगी न मिळाल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे जड वाहनांना क्रॉस करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत असून ह्या अरुंद रस्त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला उतरून तर, कधी कडेला फसून रस्ता जाम होतो,त्यामुळे या मार्गाने दैनंदिन खासगी व शासकीय येरजाऱ्या करणाऱ्यांना या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडीमुळे हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी प्रवाशांना कित्येकदा तासंतास येथील वाहतूक कोंडीने कामावर, घरी वेळेवर पोहचणे शक्य होत नाही ताटकळत बसाव लागत आहे. असे सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसूटकर यांनी सांगितले.

नागपूर येथील कॅन्सर रूग्णालय लवकरच सुरू करणार - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली.

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय लवकर उभारण्यासंदर्भात विधानसभा सदस्य समिर मेघे यांनी प्रश्न उपस्थित केला.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, नागपूर येथे शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्यासाठी २०१८ मध्ये २३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. सन २०१९ ला बांधकामाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आणि सन २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले त्या कालावधीत राज्य सरकारने बांधकामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या काळात हे काम बंद होते. सध्या हे काम नागपूरचीच एनआयटी ही संस्था करत असून या संस्थेने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. हे काम दोन महिन्यात सुरू होणार आहे.

कॅन्सर रूग्णालय उभारण्यासाठी लागणारा खर्च तसेच यंत्रसामग्रीसाठी खरेदी करण्यात येईल व लवकरात लवकर हे कॅन्सर रूग्णालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात दिली.

बालाजी सुवर्णकार वाचक मित्र शिक्षक पुरस्काराने सन्मानित


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : येथील श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील सहशिक्षक श्री बालाजी सुवर्णकार यांना चला कवितेच्या बना अंतर्गत वाचक संवाद २६१ मध्ये मध्ये त्यांनी सन १९८८ पासून आजतागायत उदगीर शहरात शैक्षणिक सामाजिक धार्मिक इत्यादी कार्यात सहभागी होऊन उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना व मर्यादित ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी चालू असलेल्या जागतिक कीर्तिच्या वाचक संवादात नोंदवत असलेली त्यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण असून वाचन संस्कारा संदर्भात देत असलेले योगदान ना बद्दल वाचक मित्र पुरस्कार प्राध्यापक संधी कर व सेवानिवृत्त शिक्षक तथा योगाचार्य शिवमूर्ती भातांब्रेकर सर व आनंद कदम यांच्या उपस्थितीत वाचक मित्र पुरस्कार २०२२ देण्यात आला.

सुवर्णकार बालाजी यांना हा वाचक मित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दैवज्ञ सोनार संघाचे राज्याध्यक्ष दिलीप महत्कर अमरावती व दैवज्ञ सोनार युवक मंडळ सेवाभावी संस्था नांदेड चे राजू आंबेकर, दैवज्ञ सोनार एकता संघ पुणे चे पदाधिकारी मधुकर टोंपे, नामदेव सुवर्णकार व संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघाचे उदगीर चे अध्यक्ष सचिन पोद्दार उपाध्यक्ष विजय पेनुरकर, कोषाध्यक्ष राजेंद्र रत्नपारखी, सहसचिव एकनाथ रत्नपारखी व दैवज्ञ सोनार युवक मंडळाचे अध्यक्ष अच्युत पंडित, उपाध्यक्ष भागवत पोद्दार व इतर सर्व पदाधिकारी तसेच बारा बलुतेदार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर दापकेक, परभणीचे प्राध्यापक अतुल काटकर यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले असून बालाजी सुवर्णकार यांचे वाचक शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आयजीच्या दौऱ्यानंतरही अशीच शिस्त कायम राहील काय, शहरातील अनियंत्रित वाहतुकीला नियम लागतील काय !

प्रशांत चंदनखेडे | सह्याद्री चौफेर 

वणी : दुचाकी व चार चाकी वाहनांनी नेहमी वेढुन राहणाऱ्या रस्त्याने आज मोकळा श्वास घेतल्याचे पाहायला मिळाले. पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय व न्यायालयाकडे जाणारा हा रस्ता आज अगदीच खुला वाटत होता. नेहमी रस्त्याला घेरून राहणारी वाहने रस्त्यापासून दूर अगदीच शिस्तीत लावली जात होती. मार्गक्रमण करतांना आज जराही अडथळे निर्माण न झाल्याने नागरिकांनाही कौतुकास्पद वाटत होतं. दुचाकी व चार चाकी वाहनांचा रस्त्याच्या भोवती असणारा गराडा आज मात्र दिसून आला नाही. कार्यालयीन कामाकरिता येणाऱ्या नागरिकांना त्यांची वाहने अगदीच शिस्तीत लावण्याची ताकीद देण्यात येत होती. एरव्ही शासकीय वाहनांना अडथळे निर्माण होत असतांनाही कधी कार्यालयीन परिसरात वाहने उभी करतांना शिस्त लावण्यात आली नाही, ती शिस्त आज कटाक्षाने पाहायला मिळाली. कारण होते अमरावतीचे पोलिस उप महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या वार्षिक निरीक्षण दौऱ्याचे. आयजींचा आज निरीक्षण दौरा असल्याने पोलिसांनी आज चांगलीच खबरदारी घेतली. रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी राहणार नाही याची दक्षता घेतली. पोलिसांमध्येही आज शिस्त दिसून येत होती. कामात शिस्तबद्धता दिसावी याचा पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केला. पण ही शिस्त आयजीच्या दौऱ्यापूर्तीच राहील की कायमस्वरूपी, या चर्चेला आज शहरात उधाण आले होते. 

मागील काही महिन्यांपासून वाहतूक विभागाने शहरातील वाहतुकीच्या समस्येकडे पुरते दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात वाहतुकीचा कोंडवाडा झाला आहे. वाहतुकीची समस्या खूपच बिकट झाली आहे. शहरातील वाहतुकीने अगदीच बकाल रूप धारण केलं आहे. अनियंत्रित वाहतुकीवर पोलिसांचं नियंत्रणच उरलेलं नाही. अनियंत्रित वाहतुकीमुळे नागरिकांचं रस्त्यांनी मार्गक्रमण करणं कठीण झालं आहे. वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून शहरात वाहतूक सुरु आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर नेहमी जाम लागताना दिसतो. शहरातून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरु आहे. पोलिसांच्या डोळ्यादेखत जड वाहने शहरातून जाणे येणे करतात. ट्रक व ट्रेलर सारखी मोठी वाहनेही शहरातून जातांना दिसतात. टोल नाका वाहचविण्याकरिता टिळक चौक ते इंदिरा चौक मार्गे ब्राह्मणी फाटा हा जड वाहनांचा नेहमीचा मार्ग झाला आहे. टिळक चौक ते टागोर चौक मार्गे दिपक चौपाटी ते लालगुडा चौपाटी हा मार्ग वाहतुकीने नेहमी गजबजलेला असतो. खाती चौक ते गांधी चौक मार्गावर नेहमी वाहतुकीचा जाम लागताना दिसतो. रस्त्यांवर नियमबाह्य पद्धतीने उभ्या असलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळे निर्माण होण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने, हातगाड्या, साहित्य ठेवण्याकरिता रस्त्यापर्यंत वाढवलेली दुकाने यामुळे रस्ते अरुंद झाल्याने नेहमी वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. शहरातील काही रस्ते तर वाहने उभी करण्याचे मैदान बनले आहे. हा रास्ता आहे की, वाहने पार्किंग करण्याची जागा हेच कळत नाही. टिळक चौकाव्यतेरिक्त अन्य चौकात वाहतूक पोलिसांची उपस्थितीच दिसत नाही. अंतर्गत रस्त्यांवरून सुसाट वाहने चालवली जातात. दुचाकींवर ट्रिपल सिट बसणं आता नित्याचाच झालं आहे. दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीकडेही सपशेल दुर्लक्ष केलं जात आहे. वाहतूक पोलिस फक्त शहराबाहेरील वाहतूक नियंत्रित करण्यावर भर देत आहे. ब्राह्मणी फाटा, लालगुडा चौपाटी, वरोरा टी-पॉईंट, चारगाव रोड, संविधान चौक, वरोरा रोड, मुकुटबन घोन्सा टी-पॉईंट, मुकुटबन रोड ही वाहतूक पोलिसांची वाहने चलान करण्याची नेहमीची ठिकाणे झाली आहेत.शहरातील वाहतुकीच्या समस्येकडे मात्र वाहतूक पोलिसांनी कायम दुर्लक्ष केलं आहे. मागील काही महिन्यात तर वाहतुकीला कुठलीच शिस्त उरली नसल्याचे पाहायला मिळत आहे. ऑटो धारकांनी तर रोडचा मालकीहक्क मिळविल्यागत रोडचा ताबा घेतला आहे. रस्त्यांवर मानमर्जीने कुठेही ऑटो उभे केले जातात. प्रवासी वाहतूक करणारी खाजगी वाहनेही रस्ता वेढुन तासंतास उभी असतात. पेट्रोल पंपांवर नेहमी ट्रकच्या रांगा लागलेल्या असतात. डिजल भरण्याकरिता रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी वाहने लावली जातात. डिजल भरण्याकरिता रांग लावून उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे तर कित्येक छोटे मोठे अपघात झाले आहेत. शहरात छोटे मोठे अपघात तर आता नित्याचेच झाले आहेत. नियमांची पायमल्ली करून शहरात वाहतूक सुरु आहे. वाहनधारकांचे वेगावर नियंत्रण राहिले नाही. तरुण मंडळी स्टंटबाजी करत शहरातून सुसाट वाहने चालवितात. वाहतुकीच्या समस्येने बकाल रूप धारण केले असतांनाही वाहतूक पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा दिसून येत नाही, याचेच नवल वाटते. शहराबाहेरील वाहतूक नियंत्रणाकडेच त्यांची कर्तव्यनिष्ठा असल्याचे पाहायला मिळते. आयजीच्या दौऱ्यानिमित्ताने जी शिस्तबद्धता पाहायला मिळाली, ती शिस्त कायमस्वरूपी शहरातील वाहतुकीला लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

शौचास गेलेल्या मुलीवर दिवसाढवळ्या अत्याचार, घटनेने उडाली एकच खळबळ

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटना प्रचंड वाढल्या असून दिवसागणिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील कुंभा येथील एका अल्पवयीन मुलीवर वासनेने पिसाटलेल्या एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतात शौचास गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर वासनांध युवकाने झडप घातली, व तिला आपल्या वासनेचा शिकार केले. वासनेने पिसाळलेले हे नराधम महिला व मुलींच्या आब्रूचे लचके तोडू लागले आहेत. दिवसा ढवळ्या मुलींवर अत्याचार करण्याइतपत या नराधमांची मजल वाढली आहे. माणसात जनावरी प्रवृत्ती वाढू लागल्याने मुलींचे एकटे घरून बाहेर पडणे धोकादायक झाले आहे. या नराधमांना कायद्याची भीती न उरल्याने ते चांगलेच निर्ढावले आहेत. शौचास गेलेल्या मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी काही तासांतच मुसक्या आवळल्या असल्या तरी मुलींच्या आब्रूवर हात घालण्याचे धाडस करणाऱ्या या विकृतांना कायद्याचा धडा शिकविण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी अतिजलद तपास करून शहाबाज शेख शब्बीर (२७) रा. माता नगर राळेगाव या नराधमाला व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे. 
कुंभा येथील अल्पवयीन मुलगी जवळच असलेल्या शेतशिवारात शौचास गेली होती. दरम्यान त्याच मार्गाने प्रवास करणाऱ्या एका विकृताची नजर त्या मुलीवर पडली. मुलगी एकटीच शौचास जात असल्याचे पाहून त्याच्यातली वासना जागी झाली. त्याने तिचा पाठलाग करून तिला आपल्या वासनेचा शिकार बनविले. आरोपी सोबत असलेला विधिसंघर्षग्रस्त बालक रस्त्याची निगराणी करत होता. मुलीवर अत्याचार केल्यानंतर दोघांनीही दुचाकीने पळ काढला. अचानक घडलेल्या घटनेने मुलगी चांगलीच हादरली. तिने घरी येऊन वडिलांसमोर आपबिती कथन केली. या घटनेने तिचे कुटुंबही पुरते हादरले. परिसरातही या घटनेने खळबळ उडाली. वडिलांनी मुलीला घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले, व पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जलद तपास केला, व राळेगावच्या दिशेने पाळलेल्या आरोपींना राळेगावातून तत्काळ अटक केली. आरोपी शहाबाज शेख शब्बीर याच्या विरुद्ध पोलिसांनी भादंवि च्या कलम ३७६, ३७६(२)(J) व सहकलम ४,६,८ बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करित आहे.