नात्याचं भावबंध सांगणारी मर्मस्पर्शी नाट्यकृती, 'क्षण..एक पुरे'


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : भावनिक गुंतागुंत, कौटुंबिक अडचणी, त्यात प्रेयसीचा हट्टीपणा या साऱ्या प्रश्नाभोवती फिरणारी 'क्षण..एक पुरे' ही मर्मस्पर्शी नाट्यकृती वणीच्या कलावंतांनी चंद्रपूर येथे सादर केली.
 
वैभवशाली सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या वणीच्या कलावंतांनी नुकतेच राज्य हौशी नाट्य स्पर्धेत चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात 'क्षण.. एक पुरे' हे दोन अंकी दर्जेदार नाटक सादर केले. लेखिका डा. माणिक वड्याळकर यांच्या सशक्त लेखणीतून साकारलेल्या या नाटकाची वणी येथील प्राचार्य हेमंत चौधरी यांनी निर्मिती केली. 
           
मोठया भावाच्या निधनानंतर वैधव्य आलेली वहिनी,तिची चिमुकली मुलगी,जर्जर म्हातारपण आलेले वडील यांची मोठी जबाबदारी खांद्यावर असलेला चाळीशी पार पडलेला नाना उर्फ जय. कौटुंबिक जबाबदारी मध्ये गुरफटत जाणाऱ्या जय ची प्रेयसी तृप्ती ही खूप हट्टी असते. ती जय कडे लग्नाचा तगादा लावते. आपल्यामुळे आपल्या मुलाचे लग्न होत नाही आहे हे समजुन-उमजून जय चे वडील प्राण त्यागतात.या सर्व दुःख विवनंचनात जय ला पक्षाघात होतो.अश्या मर्मस्पर्शी पटकथा मध्ये वणीच्या कलावंतांनी आपल्या कसदार अभिनयाने जीव ओतला. सर्व अभिनेत्यांनी रसिकांना अक्षरशः भुरळ घातली.
     
प्राचार्य हेमंत चौधरी हे आपल्या विनोदी भूमिके बद्दल सर्वपरिचित आहेत,मात्र या नाटकात त्यांनी आपली ही रूढ झालेली चाकोरी मोडीत काढली. नाना उर्फ जय या धीरगंभीर भूमिकेत त्यांनी आपली अभिनय प्रतिभा सिद्ध करीत सर्वांना चकित केले. विशेषतः वयाच्या ७२ व्या वर्षी अशोक सोनटक्के यांनी जय च्या वडिलांची आव्हानात्मक भूमिका आपल्या दमदार अभिनयाने लीलया पार पाडली.

दिग्दर्शक शुभम उगले यांच्या या नाट्यकृती मध्ये सौ.मीना गिरीश वानखेडे,उमाकांत म्हसे,प्रा.सौ सीमा किशोर सोनटक्के,कु.राधा किशोर सोनटक्के,स्वप्नील दहिवलकर यांनी उत्तम अभिनय करून आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला.
कथेला साजेसं संगीत देण्याचे काम अजित खंदारे यांनी पार पाडले. प्रत्येक प्रसंगाला उठावदार व जिवंत करण्यासाठी केविद्रनाथ बारसागडे यांनी उत्तम प्रकाश योजना आखली. नेपथ्यकार निलेश कुंभारे यांचे रंगमंच उभारण्यात मोलाचे योगदान राहीले. अनिता अशोक सोनटक्के यांनी रंगमंच सजावट केली. वेशभूषा सौ.प्रणिता हेमंत चौधरी यांनी तर रंगभूषा वैभव अरुण चौधरी यांची होती. केशभूषा मनू गिरीश वानखेडे यांनी केली. अंजना उत्तम बहुउद्देशीय संस्था. चिखलगाव (वणी) तर्फे हे नाटक सादर करण्यात आले.

उल्लेखनीय म्हणजे वणीमध्ये एकेकाळी समृद्धशाली नाट्यपरंपरा होती. कालांतराने ती लोप पावत गेली. मात्र पुन्हा एकदा येथील रंगमंच चळवळीला नवीन उभारी देण्याचे काम प्राचार्य हेमंत चौधरी व त्यांची चमू करीत आहे, हे निश्चितच एक आशादायी चित्र आहे.

शिपाई संवर्गातील पदाेन्नतीसाठी उर्वरीत असलेली १५ टक्के पदभरती तातडीने करा - चंद्रपूर जिल्हा काेतवाल संघटनेचीे मागणी !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : शिपाई संवर्गात पदाेन्नतीकरीता उर्वरीत असलेली १५ टक्के पदभरती तातडीने करा अश्या आशयाची मागणी महाराष्ट्र काेतवाल संघटना जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष प्रदिप मेश्राम, सचिव चिदानंद सिडाम, भूतपूर्व जिल्हाध्यक्ष उमेशकुमार अलाेणे, माजी राज्य संघटक प्रकाश चेपूरवार, कोषाध्यक्ष प्रशांत वाघमारे व अन्य पदाधिका-यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे कडे आज सोमवार दि.२८ फेब्रुवारीला एका लेखी निवेदनातुन केली आहे.

दरम्यान काेतवाल संघटनेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यां साेबत या रास्त मागणी संदर्भात चर्चा देखिल केली असल्याचे समजते. काेतवालांचे मानधनात वाढ करण्याबाबत शासन निर्णय क्र.बैठक २०१६ / प्र.क.५८१ / ई-१० दि. ६\२\१९ नुसार महसुल विभागांतर्गत असणा-या गट 'ड' च्या प्रथम नियुक्तीच्या पदापैकी नियमित पदांमधुन ४० टक्के काेतवालांसाठी राखीव ठेवण्यात यावीत,सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यांत यावे असे नमुद करण्यांत आलेले आहे. त्याच अनुषंगाने सन २०२१ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील काेतवाल संवर्गातुन शिपाई संवर्गात पदाेन्नती करतांना ४० टक्के ऐवजी २५ टक्क्यानुसार पदाेन्नती करण्यांत आली आहे. अजून १५ टक्के पदभरती शिल्लक आहे. विशेष म्हणजे शिपाई पदाची अनेक पदे चंद्रपूर जिल्ह्यात शिल्लक असल्याचे जिल्हा काेतवाल संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याच संदर्भात एक निवेदन राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थाेरात यांना पाठविण्यात आले असल्याचे काेतवाल जिल्हा संघटना अध्यक्ष प्रदिप मेश्राम यांनी आज या प्रतिनिधीशी बाेलतांना एका भेटीत सांगितले.

तालुक्यातील झोला येथे शिवसेना प्रणित युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन, युवासेनेचा उपक्रम युवकांचे संघटन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्याने शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोर्चेबांधणीला लागले असून पक्षीय बळ वाढविण्याकरिता गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हा उपक्रम शिवसेनेने हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिवसेना प्रणित युवासेनेने तालुक्यातील झोला या गावात युवासेनेची नवीन शाखा तयार केली असून नुकताच या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवून अनेक सामाजिक प्रश्न व समस्यांना वाचा फोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पक्षांनी त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन पदाला साजेशे कार्य करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. आता त्यांनी पक्ष बांधणीला प्राधान्य देत, युवा वर्गाला संघटित करून गावांमध्ये युवासेनेच्या शाखा तयार करणे सुरु केले आहे. तालुक्यातील झोला येथे युवासेनेची कार्यकारणी गठीत करण्यात आली असून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सह उद्घाटक म्हणून युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व संजय देठे उपस्थित होते. संजय देरकर यांनी रिबीन कापून झोला येथील युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन केले. यावेळी गावातील अनेक युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शाखा उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे डॉ. जगन जुनगरी, भगवान मोहिते, प्रविण खानझोडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. शिवसेना ते युवासेना पक्षबांधणीसाठी युवकांचे योगदान महत्वाचे असते, असे गौरव उद्गार यावेळी संजय देरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला गावकऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. युवासेनेच्या झोला शाखेचे शाखा प्रमुख म्हणून राजू मेश्राम यांची तर उपशाखा प्रमुख निलेश मूर्तिकार, सचिव अमोल सूर यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष बांधणीबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. शाखा उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता रोहित घोडाम,लक्ष्मण घोडाम, हरी सुर, रवि मेश्राम, रोशन पढाल,गणेश मेश्राम,गजानन आत्राम,मंगेश आत्राम,पिंटू सुर,मिथुन मेश्राम,शुभम बावणे,मोहन ठाकरे,मयूर मूर्तिकर,आदित्य मूर्तिकर,देवानंद कनाके,गजानन कनाके,विजू रासेकर,शेखर मत्ते,दिनेश निंदेकर,सचिन मेश्राम,पिंटू तलांडे,सुरज मेश्राम,रुपेश मेश्राम,वैभव आंबेकर,अमोल बावणे यांनी सहकार्य केले.

तुटणाऱ्या लग्नाच्या मुकूटबन पोलिसांनी बांधल्या रेशीम गाठी


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : पोलीसाचे नाव येताच सर्व सामान्यांच्या मनात धडकी भरते. पोलिसांची प्रतिमा जनतेच्या मनात तितकीशी चांगली नाही. मात्र मुकूटबन पोलिसांचं सामाजिक रुप पाहायला मिळालं. जवळपास मोडलेलं लग्न पोलिसांनी परत जुळवून वधू वराच्या रेशीम गाठी बांधल्या. त्यामुळे मुकूटबन पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे. 

झरी जामणी तालुक्यातील लहान पांढरकवडा येथील बौध्द समाजाचे पंचफुलाबाई राजू आनंदराव वाळके यांची द्वितीय कन्या सपना व मारेगाव तालुक्यातील आकापुर येथील भावनाताई गौतम डेपुटी भरणे यांचे चिरंजीव प्रकाश या दोन्ही परिवारात दोन महिन्यांपूर्वी लग्नाचे नाते जुळले होते. काही पारिवारिक कारणांमुळे हे नाते तुटण्याच्या मार्गावर आले. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत वितुष्ट निर्माण झाले. वडील हयात नाही मुलीच्या आईची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. लग्न मोडले तर मुलीचे काय होणार, या भीतीने त्यांची चिंता वाढली. त्यानंतर मुलीकडील आप्त संबंधातील माणसे घरी बैठक घेऊन बसले. यानंतर मुलीची आई पंचफुलाबाई, मुलगी सपना, सरपंच मधुकर राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, अनिल पावडे व नातेवाईक शनीवारी (ता. २६) मुकूटबन पोलीस ठाण्यात पोहोचले. 

सपनाची आई पंचफुलाबाई वाळके हिने आपली कैफियत ठाणेदार अजीत जाधव व पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान यांचे समोर मांडली. कैफियत ऐकल्यानंतर ठाणेदार अजीत जाधव यांनी मारेगाव तालुक्यातील आकापुर येथील भरणे परिवाराला मुकूटबन ठाण्यात येण्यास सांगितले. हे दोन्ही परिवार एकत्र आल्यानंतर प्रकाश व त्यांच्या कुटुंबियाची ठाणेदार अजीत जाधव व पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान यांनी दुपारी १२:०० ते ६:०० वाजेपर्यंत दोन्ही परिवाराचे समुपदेशन करून समजूत काढली. अखेर नवरदेव प्रकाश व भरणे परिवार तयार झाले. दुसरे दिवशी विवाहाचा विधी उरकण्याची तयारी सुरू झाली. या कार्यास लागणारा सर्व खर्च मुलामुलींना कपडे, मंगळसूत्र, जोडवे, हारतुरे, मिठाई व अल्पोपहारचा खर्च वाळके परिवार कडून करण्यात आला. शेवटी दोन्ही पक्षाच्या वऱ्हाडीच्या साक्षीने रविवारी संध्याकाळी ७:३० वाजता लहान पांढरकवडा येथे वधू मुक्कामी मंडपात विवाह सोहळा पार पडला. 

बौध्द समाजाचे रितिरिवाज प्रमाणे मंगलाष्टके झाली, फुलांच्या अक्षता पडल्या, दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ टाकली. हा अविस्मरणीय प्रसंग मुकूटबन पोलिस ठाण्याचे ठाणेदार अजीत जाधव व पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान यांच्या समुपदेशन ने पार पडला. पोलीस उप निरीक्षक अनिल सकवान, पोलिस कर्मचारी मंगेश सलाम, दिलीप जाधव, संदीप बोरकर, संजय खांडेकर, संदीप कुमरे, सरपंच मधुकर राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, व दोन्ही पक्षाकडील वऱ्हाडांच्या साक्षीने वधू-वर लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले.

वणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनसोबत माजी आमदार प्रा.राजुभाऊ तोडसाम यांनी साधला संवाद


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : वणी येथे काल दि.२७  ला सायंकाळी विदर्भातील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदीवासी सेल चे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार प्रा.राजुभाऊ तोडसाम यांनी वणी येथील कार्यकर्त्यांची विश्राम गृहामध्ये भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस च्या नवीन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना काम कसे करायचे आहे यांची रुपरेषा समजावुन सांगीतली. पक्षाचा कार्यकर्त्यांनी फक्त लोकांपर्यंत जाऊन त्यांची अडचणी समजुन घ्या आणि त्या लोकांचे काम पुर्ण करुन द्या, तेच लोक तुम्हाला मोठे करणार आहे, मोठे असलेल्या लोका पेक्षा सर्व सामान्य लोकांना पदे द्या, जबाबदारी घ्यायची व पक्षाच्या धोरणात्मक संघटन बांधणीकडे जास्तीत जास्त लक्ष घाला व येणा-या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी पुर्ण ताकदीने मैदानात उतरणार आणि नगर पालिका, जिल्हा परिषद साठी आपण सर्वानी आतापासून कंबर कसायची आहे, प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांना मोठे करा, पक्षाकडुन पाहीजे ती मदत आपणास मिळणार असल्याचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत बोलताना सांगीतले. काम करत असतांना काही अडचण आली तर मी आपल्या सोबत आहे, तसेच जिल्ह्याचे नेते, मा.संदीप भाऊ बाजोरीया साहेब, आमदार नाईक साहेब, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील आहे. आणि काम करणा-या कार्यकर्त्यांसोबत पक्ष खंबीरपणे उभा रहाणार अशी ग्वाही प्रा.तोडसाम यांनी दिली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी वणी विभागातील काही मुद्यांवर चर्चा केली. त्यांचासोबत महेश पिदुरकर, कपील कुंटलवार, अक्षय चन्ने, हेमंत गावंडे युवक तालुकाध्यक्ष, मनोज वाकटी शहराध्यक्ष युवक, रामकृष्ण वैद्य, इमदास पकाले, वैशाली तायडे, संदेश तिखट, प्रणय बल्की, सचीन चव्हाण, रानु तुमराम, हार्दिक उरकुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.