रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकची वीज खांबाला धडक, खांबावरील डीपी जळाल्याने ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा झाला होता खंडित

                     
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी ग्रामीण रुग्णालय परिसरातील विद्युत डीपी बसविलेल्या विजेच्या खांबाला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने डीपी मधील रोहित्राने पेट घेतला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील विद्युत पुरवठा तब्बल तिन तास घंडीत राहिल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले. मागे वळण घेत असलेल्या ट्रकला साईड सांगणारा तेथे कुणीही नसल्याने चालकाचा अंदाज चुकला, व सरळ ट्रक डीपी बसवून असलेल्या वीज खांबाला धडकला. यात वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले असून विद्युत विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याने याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. 

काल २९ जानेवारीला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने ग्रामीण रुग्णालय परिसरात रेती खाली केल्यानंतर मागे वळण घेतांना अंदाज न आल्याने सरळ विजेच्या खांबाला धडक दिली. या विजेच्या खांबावर विद्युत डीपी बसवलेली होती. ट्रकच्या धडकेने विजेचा खांब क्षतिग्रस्त होऊन डीपी मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने डीपी मधील रोहित्रांनी पेट घेतला, व ग्रामीण रुग्णालयातील वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला. ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थी रुग्णांबरोबरच गंभीर आजाराचे रुग्णही भर्ती होते. त्याचप्रमाणे गरोदर व प्रसूती झालेल्या महिलाही ग्रामीण रुग्णालयात भर्ती होत्या. विजेचा प्रवाह खंडित झाल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय निवासस्थानाचे बांधकाम सुरु असून बांधकाम ठेकेदाराची रेती घेऊन आलेल्या ट्रक क्रमांक MH २९ BE ०६९२ ने मागे वळण घेतांना विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. विजेच्या खांबावर डीपी बसविलेली असल्याने ट्रकच्या धडकेने डीपी मध्ये शॉर्ट सर्किट होऊन रोहित्राने पेट घेतला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील विद्युत पुरवठा तब्बल तीन तासांपर्यंत बंद राहिला. ट्रकच्या धडकेमुळे डीपी जळाल्याने वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले असून याबाबत विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता सुदर्शन शंकरराव इवनाते यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. 

रेतीच्या जास्त चकरा लागाव्या म्हणून वाहतूकदार चालकांवर दबाव आणत असल्याने चालकांकडून निष्काळजीपणे वाहने चालविली जातात. जलद रेती खाली करून परत रेती घाटावर जाण्याकरिता चालक सुसाट वाहने चालवितात. रेती खाली करण्याकरिता वाहने मागे पुढे करतांना जराही खबरदारी घेतली जात नाही. ट्रक मागे घेतांना साईड ग्लास मधून किंवा गाडी खाली उतरून न बघता ट्रक चालक निष्काळजीपने वाहने हाताळत असल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात. ट्रक चालकांचे निष्काळजीपणे ट्रक चालविणे अनेक निष्पाप नागरिकांच्या जिवावरही बितले आहे. त्यामुळे निष्काळजीपणे वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांचा वचक असणे आता गरजेचं झालं आहे. आता यावर काय कार्यवाही होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनाथांचे छत्र हरपले - सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

नेवासा : महाराष्ट्राचं हृदय क्षणभरासाठी थांबलं एवढं प्रेम सिंधू ताईंनी त्यांच्या समाज कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिलं. आज महाराष्ट्र राज्यातील सर्व अनाथांचे छत्र हरपले आहे मात्र, माई च्या पावलांवर पाऊल ठेऊन पुढे देखील आम्ही माईचे समाजकार्य सुरूच ठेऊ असे प्रतिपादन सामजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक यांनी केले.

माई च्या निधनानंतर पहिल्यांदा वर्धा येथील माई च्यां निवस्थानी भेट दिली या वेळी त्या बोलत होत्या 

यावेळी ठक म्हणाल्या की संपूर्ण महाराष्ट्राची माई म्हणून जगप्रसिध्द असलेल्या सिंधू ताई सपकाळ ह्या मूळच्या वर्धा येथील. दर महिन्याला त्या त्यांच्या निवास्थानी येवून राहायच्या, त्यांना समाज कार्याची देवी म्हंटल तर वावंग ठरणार नाही. हजारो अनाथ लेकरांची माय म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ सिंधुताईंच्या जाण्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला पोरका झाला 
माझ्या माईच्या कार्याला शत शत नमन ...


"समाज कार्यात स्वहता चं संपुर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या माई च्या जीवनातील क्षण कधीही न विसरता येणारें आहेत माईच्या निवास्थानी भेट दिली असता मनं सुन्न झाले आहे माईचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू "

मंगलाताई ठक (सामजिक कार्यकर्त्यां)


शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी संपन्न

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक ३० जानेवारी रोजी राष्ट्पिता महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा श्री क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक मा श्री तामगाडगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मा मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक यांच्या हस्ते माल्यार्पण करून सर्वं शिक्षकांनी मौन पाळून अभिवादन केले. यावेळी शाळेतील सर्वं शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री बुजोने सर यांनी केले.

वणीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे

वणी : येथील आयकॅन अकॅडमी व उडाण फिजिकल करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी डॉ महेंद्र लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परिश्रम आणि जिद्द याची सांगड घालून कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होता येते हे डॉक्टर लोढा यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. प्रा. रवींद्र मत्ते यांनी यशाची चतूसूत्रे विद्यार्थ्यांना सांगितले. सबिया खान यांनीही आपले मत मांडले. यावेळी दोन्ही करिअर अकॅडमी संचालक सोपान लाड व गणेश आसूटकर तसेच अध्यक्ष स्थानी राजूभाऊ पहापळे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. समीउल्लाह खान (अबूजी) यांच्या स्मृतीला उजाळा देत झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोपान लाड यांनी केले. प्रसंगी सर्वं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या नंतर ज्या क्षेत्रात ते यशस्वी झाले त्या यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार मान्यवरांच्या व त्यांच्या आई वडिलांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये वैभव चौलमावार (TCS), तुषार डवरे (TCS), कु.शीतल ठाकरे (इमफोसिस), कु. खुशबू चचडा (SBI क्लर्क), अमरीन शेख (SSB) ,कु. रक्षा गिरडकर (मुंबई पोलीस), कु.पुजा गुरनुले (मुंबई पोलीस), संतोष मग्गीडवार (MSF), कु.मनीषा शिवारकर (MSF), कु. माधुरी कोवे (MSF), इत्यादी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर घुगरे यांनी केले तर आभार भगत यांनी मानले.
            

अमरावती पोलिस महानिरीक्षक पथकाच्या वणी येथील चार मटका अड्ड्यांवर व दोन सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर धाडी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी येथे अमरावती विभागाच्या पोलिस महानिरीक्षक पथकाने चार मटका अड्ड्यांवर व दोन सुगंधित तंबाखू विक्रेत्यांच्या गोदाम व दुकानावर धाडी टाकून लाखोंच्या मुद्देमालासह ३५ ते ४० आरोपींना अटक केली आहे. अमरावती पोलिस महानिरीक्षक कार्यालयाचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक पोलिस पथकासह अचानक वणी येथे धडकले. कुणाला काही न कळायच्या आत एकाच वेळी चार मटका अड्ड्यांवर त्यांनी धाडी टाकल्या. एवढेच नाही तर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांच्या घर, गोदाम व दुकानावर धाडी टाकून लाखो रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला. सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही केली. आज २९ जानेवारीला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अमरावती विभागाचं विशेष पोलिस पथक वणीत दाखल झालं, व त्यांनी वणीत चालणाऱ्या अवैध धंद्यांवर धाडसत्रच सुरु केलं. या धडक कार्यवाहीने कुठे पळापळ तर कुठे पाळण्याचीही वाट न मिळाल्याने मटका खेळणारे व खेळवणारे मोठ्या संख्येने पोलिसांच्या हाती लागले. आरोपींवर कार्यवाहीची प्रक्रिया सुरु असून मुद्देमालाची पडताळणीही पोलिसांकडून केली जात आहे. पोलिस महानिरीक्षक पथकाची वणीतिल ही पहिलीच कार्यवाही असल्याची चर्चा सुरु आहे. आता पर्यंतच्या या सर्वात मोठ्या व धडक कार्यवाहीने अवैध धंदेवाल्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.

वणी येथे सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर अमरावती पोलिस महानिरीक्षक पथकाने एकाच वेळी धाडी टाकल्याने चांगलीच खळबळ उडाली. एकता नगर, सिंधी कॉलनी व दीपक चौपाटी परिसरात सुरु असलेल्या मटका अंड्यांवर अमरावती येथिल विशेष पोलिस पथकाने धाडी टाकून जवळपास ३५ ते ४० जणांना अटक केली. यात मटकापट्टी फाडणाऱ्या व मटका खेळणाऱ्यांचा समावेश आहे. चार मटका अड्ड्यांवर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक मटका अड्डा तर नगर परिषदेच्या गळ्यात सुरु होता. त्या गाळ्याचे शटरच बंद करून पोलिसांनी आरोपींना पळवाट शोधण्याची संधीच दिली नाही. या मटका अड्ड्यावरून तब्बल सोळा आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाकी मटका अड्ड्यांवरून अटक करण्यात आलेल्या आरोपींचा आकडा अद्याप कळू शकला नाही. 

शहरात प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू अवैधरित्या काही व्यापाऱ्यांकडून विक्री केला जात असल्याचीही या विशेष पोलिस पथकाला माहिती असल्याने त्यांनी सिंधी कॉलनी येथिल व्यापाऱ्यांच्या घर, गोदाम व दुकानांवर धाडी टाकून सुगंधित तंबाखाचा मोठा साठा जप्त केला. अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. सर्वच आरोपींवर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असून जप्त केलेल्या मुद्देमालाचीही पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. जप्त केलेला मुद्देमाल लाखोंच्या घरात असून मुद्देमालाची निश्चित रक्कम अद्याप कळू शकलेली नाही. अमरावती पोलिस महानिरीक्षक पथकाची वणीतिल ही पहिलीच कार्यवाही असून या धडक कार्यवाहीने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलिस महानिरीक्षक कार्यालयाचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक गोवर हसन यांनी पोलिस पथकासह ही धडक कार्यवाही केली. अमरावती वरून पोलिसांचा मोठा फौजफाटा वणीला आला आहे.