सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
काल २९ जानेवारीला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने ग्रामीण रुग्णालय परिसरात रेती खाली केल्यानंतर मागे वळण घेतांना अंदाज न आल्याने सरळ विजेच्या खांबाला धडक दिली. या विजेच्या खांबावर विद्युत डीपी बसवलेली होती. ट्रकच्या धडकेने विजेचा खांब क्षतिग्रस्त होऊन डीपी मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने डीपी मधील रोहित्रांनी पेट घेतला, व ग्रामीण रुग्णालयातील वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला. ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थी रुग्णांबरोबरच गंभीर आजाराचे रुग्णही भर्ती होते. त्याचप्रमाणे गरोदर व प्रसूती झालेल्या महिलाही ग्रामीण रुग्णालयात भर्ती होत्या. विजेचा प्रवाह खंडित झाल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय निवासस्थानाचे बांधकाम सुरु असून बांधकाम ठेकेदाराची रेती घेऊन आलेल्या ट्रक क्रमांक MH २९ BE ०६९२ ने मागे वळण घेतांना विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. विजेच्या खांबावर डीपी बसविलेली असल्याने ट्रकच्या धडकेने डीपी मध्ये शॉर्ट सर्किट होऊन रोहित्राने पेट घेतला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील विद्युत पुरवठा तब्बल तीन तासांपर्यंत बंद राहिला. ट्रकच्या धडकेमुळे डीपी जळाल्याने वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले असून याबाबत विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता सुदर्शन शंकरराव इवनाते यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
रेतीच्या जास्त चकरा लागाव्या म्हणून वाहतूकदार चालकांवर दबाव आणत असल्याने चालकांकडून निष्काळजीपणे वाहने चालविली जातात. जलद रेती खाली करून परत रेती घाटावर जाण्याकरिता चालक सुसाट वाहने चालवितात. रेती खाली करण्याकरिता वाहने मागे पुढे करतांना जराही खबरदारी घेतली जात नाही. ट्रक मागे घेतांना साईड ग्लास मधून किंवा गाडी खाली उतरून न बघता ट्रक चालक निष्काळजीपने वाहने हाताळत असल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात. ट्रक चालकांचे निष्काळजीपणे ट्रक चालविणे अनेक निष्पाप नागरिकांच्या जिवावरही बितले आहे. त्यामुळे निष्काळजीपणे वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांचा वचक असणे आता गरजेचं झालं आहे. आता यावर काय कार्यवाही होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.