"स्व. राजकमलजी भारती कला,वाणिज्य महाविद्यालय आर्णी येथे पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन"

सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख 

आर्णी : गृह अर्थशास्त्र विभागातर्फे कमवा आणि शिका उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी साठी पुष्परचना सजावट आणि सादरीकरण या विषयावर प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन आर्णी येथील स्व राजकमल भारती कला, वाणिज्य महाविदयालयात करण्यात आले. 
सर्व प्रथम श्री दत्त प्रसादिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजयजी भारती यांनी कार्य शाळेला दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉक्टर आर. एम. तातेड यांनी गृह अर्थशास्त्र विषयाची उपयुक्तता स्पष्ट करताना पुष्परचना सजावट विद्यार्थिनींना रोजगार सक्षम बनवू शकतो असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. वानखेडे यांनी भारतीय संस्कृतीतील ललित कला व पुष्परचना यांच्यातील सहसंबंध लक्षात घेऊन आपल्या सुप्त कलागुणांना संधी द्यावी असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रा.डॉ.मनीषा क्षीरसागर यांनी पुष्प कला व मानवी जीवन यावर प्रकाश टाकला. द्वितीय सत्रात कुमारी प्रणाली अगलदरे यांनी कचर्‍यातून कला आणि पुष्परचना यांचे प्रात्यक्षिक दाखविले. 

कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात डॉ. तातेड यांनी स्वयंरोजगार याकरिता अशा प्रकारच्या कार्यशाळा उपयोगी असल्याने त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेकरिता प्रा. डॉक्टर मनीषा क्षीरसागर आणि गृह अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींनी प्रयत्न केले.

वरळी मटका अड्यावर छापा, चार जण ताब्यात

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : शहर पोलिसांनी येथील बाजार भागातील बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या मटका अड्यावर धाड टाकून मटका खेळवीणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई पाच ते सहा च्या वाजताच्या दरम्यान करण्यात आल्याचे समजते.
छाप्याची चाहूल लागताच मटका चालवीणाऱ्यात पळापळ सुरु झाली. अशातच चार जणांना मारेगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार मोहंमद जुबेर मोहंमद जावेद यांच्यासह सतिश महादेव कोराटे (५०), अंकुश कनाके (४८), श्रीकांत नेहारे (३०) सर्व रा.मारेगाव असे ताब्यात घेतलेल्यांची नाव आहे. या चार जणांच्या विरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
त्यांच्या कडून मटका खेळण्याचे साहित्य व रोख रक्कम असा २७२० असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मारेगाव एपीआय राजेश पुरी, जमादार आनंद,नितीन खांदवे,रौडी राठोड यांनी छापा मारून कारवाई केली.

ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार आनंद आलचेवर करित आहे. 

रेल्वेच्या जागेवरील घरे हटवू नये, राजूर ग्रामपंचायतेची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : राजूर येथिल रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून घरे बांधून रहात असलेल्या गोरगरीब मजुरांची घरे हटवून त्यांना बेघर करू नये, घरे हटवायचीच झाल्यास त्यांना इतरत्र जागा उपलब्ध करून देत त्यांचे पुनवर्सन करण्याची मागणी राजूर ग्रामपंचायतेच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. अतिक्रमित जागेवर निवास करणाऱ्या नागरिकांवर अन्याय होऊ नये, याकरिता राजूर ग्रामपंचायत सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे सरपंचा विद्याताई पेरकावार यांनी यावेळी स्पष्ट केले. 

रेल्वेच्या खुल्या जागेवर निवासस्थाने बांधून अनेक वर्षांपासून गोरगरीब मजूरवर्ग त्याठिकाणी वास्तव्याला आहे. वार्ड क्रमांक ४ मधील बहुतांश घरे अतिक्रमित जागेवर असून वार्ड क्रमांक ३ मधील काही वस्ती अतिक्रमित जागेवर वसलेली आहे. मागील काही महिन्यांपासून रेल्वेच्या जागेवर असलेली घरे हटविण्याच्या रेल्वेने हालचाली सुरु केल्या असून तसा फतवाही रेल्वे विभागाने काढला आहे. रेल्वेच्या अतिक्रमित जागेवर घरे बांधून रहात असलेल्या नागरिकांनाही रेल्वेने घरे हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या नागरिकांनी ग्रामपंचायतेकडे धाव घेतली असून घरे न हटवू देण्याबाबत ग्रामपंचायतेला निवेदने दिली आहेत. कोळसा साईडिंग व कोळसा यार्ड बांधण्याकरिता रेल्वे अतिक्रमणधारकांना हटवित असून त्याठिकाणी तयार करण्यात येत असलेल्या कोळसा साईडींगमुळे प्रदूषणात आणखी भर पडणार आहे. गोरगरीब मजूर व निर्वासित वर्ग त्याठिकाणी ४० ते ४५ वर्षांपासून वास्तव्याला असून रेल्वे त्यांना बेघर करू पहात आहे. त्याचा संसार उघड्यावर आणून त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण करू पहात आहे. राजकीय पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी गोरगरिबांची घरे हटवू नये म्हणून पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निवेदने दिली आहे. रेल्वेच्या अतिक्रमित जागेवरील मजुरांची घरे हटविण्यात येऊ नये, अशी मागणीही राजकीय नेत्यांनी रेटून धरली आहे. राजूर ग्रामपंचायतेनेही रेल्वेच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात त्यांची घरे हटवू नये म्हणून लोकप्रतिनिधींसह रेल्वे विभागाला निवेदने दिली आहेत. आता ग्रामपंचायतेने रहिवासी वस्ती हटवु नये म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना थेट निवेदन दिले आहे. रेल्वेच्या अतिक्रमीत जागेवरील वस्ती हटवायचीच झाल्यास त्यांना इतरत्र जागा उपलब्ध करून देत त्यांचे पुनवर्सन करण्याची मागणी ग्रामपंचायतेने निवेदनातून केली आहे. २०० ते ३०० घरांचे पुनर्वसन करण्याकरिता राजूर ग्रामपंचायतेकडे ग्रामपंचायतेच्या मालकीची व शासकीय अशी कोणतीही जागा उपलब्ध नसून शासन प्रशासनाने त्यांच्या पुनवर्सनाचा तिढा सोडवून त्यांची निवासस्थाने अबाधित ठेवावी. कारण स्वतः जागा खरेदी करून घरे बांधण्याची या गोरगरिबांची कुवत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये हीच ग्रामपंचायतेची मागणी असल्याचे सरपंचा विद्याताई पेरकावार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 

निवेदन देतांना सरपंच विद्याताई पेरकावार यांच्यासह उपसरपंच अश्विनी बल्की, चेतना पाटिल, नंदना देवतळे, पायल डवरे, विवेक निमसटकर, विजय प्रजापती, अशोक वानखेडे, डेविड पेरकावार, अनिल डवरे, कपिल मेश्राम, नानाजी शिवदास तथा वार्ड क्रमांक ४ मधील नागरिक प्रतिभा कांबळे, पौर्णिमा कोटरंगे, ताराबाई दोरखंडे, गिरजाबाई दुबे, निता कुळसंगे, सुप्रिया कांबळे आदी उपस्थित होते.

तूझ्या कालच्या वस्तीची आज कॉलनी झाली - शंकर घुगरे


"तुझ्या कालच्या वस्तीची
आज कॉलनी
झाली. 
माझी वस्ती,मात्र अजूनही
तशीच अंधारलेली
लाचार अर्ध पोटी उपाशी
निजलेली
भिजलेली
विझलेली!"

संदर्भ :
कवी म्हणतात, "काल जी तुझी वस्ती होती त्याची आज कॉलनी झाली आहे". आज बघता बघता झपाट्याने शहरीकरण वाढलं असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु आजही काही वस्त्या ह्या शहरीकरणाच्या कोसोदूरच आहे. तिथे अजूनही विकास नावाचं खेळणं खुळखुळत नसून अंधार गरीबी आणि लाचारीचे जीवन लोक आजही जगत आहे.
भारत विकसीत होतोय भारतातील श्रीमंत लोकं,महानगरे आहे. लोकं सर्वं तंत्रज्ञाना चा वापर करतात. भारतात मेट्रो आली आहे आणि आपल्या देशात आजही झोपडपट्टी मध्ये लोक राहतात तिथे गरीबांना दोन वेळेच जेवणाचा प्रश्न पडतो, अनेक भागात लोकं अन्याय सहन करतात,  बेरोजगारीने कळसच गाठला आहेत. असे लेखकांने आपल्या कवितेतून लोकं, वस्ती शहरीकरण, गरिबी, लाचारी व बेरोजगारी मांडली आहे.
  
कवी : शंकर घुगरे, वणी
संपर्क : 9657440743

सेवानिवृत्त प्राचार्याला ३६ लाख ८७ हजारांनी गंडविले, पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून घातला गंडा !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची मुद्दत भरल्याचे सांगून पॉलिसीचे पैसे मिळण्याकरिता थोडे फार चार्जेस लागतील अशा भूलथापा देत एका सेवानिवृत्त प्राचार्याला तब्बल ३६ लाख ८७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने गंडविल्याची तक्रार सेवानिवृत्त प्राचार्यांनी पोलिस स्टेशनला केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विद्यालयाचा प्राचार्य राहिलेला ज्ञानसंपन्न व्यक्ती भूलथापा व आमिषाला बळी पडून भविष्य निर्वाह निधी गमावून बसला याचेच आश्चर्य वाटते. 

मारेगाव येथील एका विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले व वणी वडगाव रोडवरील आनंद नगर येथे वास्तव्यास असलेले मारोती महादेव घागी (६७) यांना एचडीएफसी अँड मॅक्स लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने तब्बल ३६ लाख ८७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. पॉलिसी विड्रॉल करण्याकरिता थोडेफार चार्जेस लागतील अशा भूलथापा देऊन त्यांनी या सेवानिवृत्त प्राचार्यांच्या जमापुंजीलाच विड्रॉल करून घेतले. सहा जणांनी वारंवार फोन करून आधी पॉलिसीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून तर नंतर आयकर विभागाच्या कार्यवाहीची भीती दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मारोती घागी यांनी जवळपास २५ वेळा त्यांना बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्राचार्य पदावर राहिलेला उच्च शिक्षित व्यक्ती आमिषाला बळी पडून जीवनभराची जमापुंजी गमावून बसतो, ही चिंतनीय बाब आहे. बँकेकडून नेहमी सतर्कतेच्या सूचना दिल्या जातात. मग बुद्धिजीवी लोकं कसे काय ठगबाजांच्या आहारी जातात, याचेच नवल वाटते. ४ लाखाच्या इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम मिळविण्याकरिता या सेवानिवृत्त प्राचार्याने तब्बल ३६ लाख ८७ हजार रुपये चार्जेस म्हणून भरले आहेत. सहा जणांनी वारंवार फोन करून २७ ऑक्टोबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या काळात मारोती घागी यांच्या कडून २५ वेळा पैसे ट्रान्सफर करवून घेतले. ज्यावेळी त्यांना आमिषे व विविध करणे सांगून ठगविले जात होते, त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची शाहनिशा केली नाही. आता ३६ लाख ८७ हजार रुपयांचा ठगबाजांनी गंडा घातल्यानंतर मारोती घागी यांनी २७ जानेवारीला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ४२० व ६६(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास वणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.