वणी तालुक्यात ओव्हरलोड वाहतुकीला उधाण, बिनधास्त सुरु आहे ओव्हरलोड वाहतूक !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी येथून सर्रास ओव्हरलोड वाहतूक सुरू असून क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहतुकीमुळे नव्याने बांधलेले रस्तेही उखडू लागले आहेत. तालुक्यातील वांजरी व गौराळा येथिल लाइमस्टोनच्या खदानींमधून मुकुटबन येथिल बिर्ला सिमेंट कंपनीत ओव्हरलोड लाइमस्टोनची वाहतूक सुरु असतांनाही आरटीओ विभागाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. शहरातील वाहतूक विभागही आरटीओ विभागाकडे बोट दाखवून ओव्हरलोड वाहनांवर कार्यवाही करण्यास असमर्थता दर्शवित आहे. वणी मुकुटबन हा नव्यानेच तयार करण्यात आलेला रस्ता ओव्हरलोड वाहतुकीमुळे उखडू लागला आहे. वणी वरून मुकुटबन सिमेंट कंपनी व अडेगाव वरून राजूर चुना कारखान्यांमध्ये ओव्हरलोड वाहतूक सुरु असून क्षमतेपेक्षा अती जास्त वजन नेणाऱ्या वाहनांवर आरटीओ विभागाने धडक कार्यवाही करणेच बंद केल्याने वाहतूकदार निर्धास्त झाले आहेत. परिणामी नव्यानेच डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते अल्पावधीतच उखडू लागले आहेत.

काही महिन्याआधी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी ओव्हरलोड वाहनांची शोध मोहीम राबवून पासिंग क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कार्यवाही करायचे. त्यामुळे ओव्हरलोड वाहतुकीवर रोख लागली होती. वाहतूकदारही आरटीओच्या कार्यवाहीच्या धास्तीने ओव्हरलोड वाहतूक करतांना घाबरायचे. पण मागील काही महिन्यांपासून आरटीओचे ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले आहे. ओव्हरलोड वाहनांवरील कार्यवाहीच थंडबस्त्यात आली आहे. चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ वाहतूक पोलिसांचा पहारा असतो. तेथूनच ही ओव्हरलोड वाहने बिनधास्त वाहतूक करतात. पण वाहतूक पोलिस वाहनधारकांजवळ कांटा पर्ची व रॉयल्टी असल्याने आम्ही कार्यवाही करू शकत नसल्याचे सांगतात. या वाहनांवर कार्यवाही करण्याचे अधिकार आरटीओलाच असल्याचे सांगत आपले अंग काढून घेतात. प्रत्येक हप्त्याला वणी येथे आरटीओचा कॅम्प असतो. आधी कॅम्पमध्ये येणारे आरटीओ ओव्हरलोड वाहतूक होणाऱ्या मार्गावर गस्त घालून ओव्हरलोड वाहनांवर धडक कार्यवाही करायचे. पण आता ओव्हरलोड वाहनांवर तशी कार्यवाही होतांना दिसत नाही. पूर्वी कुणालाही सुगावा न लागू देता आरटीओ वणीला यायचे व पासिंग क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांची धरपकड करायचे. या वाहनांवर धडक कार्यवाही करायचे. पण आता आरटीओ अधिकाऱ्यांनी रस्त्यांवर गस्त घालणेच बंद केल्याचे वाहतूदर चांगलेच निर्ढावले आहेत. पासिंग क्षमतेपेक्षा १० ते १५ टन अतिरिक्त वजनाची मालवाहतूक सर्रास केली जात आहे. सिमेंट उपयोगी असलेल्या लाईमस्टोनची वांजरी व गौराळा येथून मुकुटबन येथील बिर्ला सिमेंट कंपनीमध्ये वाहतूक केली जाते. पासिंग क्षमतेपेक्षा अतीजास्त वजनाचा माल ट्रकांमध्ये वाहून नेला जातो. कित्येक ट्रकांच्या लिफ़्टरची चाके उचललेली असतात. काही वाहनांच्या लिफ्टरला तर टायरच लावलेले नसल्याचे पाहायला मिळते. उघडपणे ओव्हरलोड वाहतूक सुरु असतांनाही आरटीओ विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही, याचेच नवल वाटते. वार्षिक व मासिक हप्त्यांची जुनी परंपरा आजही चालूच आहे की काय, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. रस्त्यांची हालत खस्ता करणाऱ्या ओव्हरलोड वाहतूकीला आळा बसेल काय, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. ओव्हरलोड वाहनांवर आरटीओने धडक कार्यवाही करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 

त्याचप्रमाणे शहर व तालुक्यात टॅक्स, इन्शुरन्स व फिटनेस ची मुद्दत संपलेली वाहनेही कोळसाखाणी व कंपन्यांमध्ये मालवाहतूक करतांना दिसत आहेत. स्कॅनिंग करून वाहनांच्या कागदपत्रांमध्ये हातचलाखीने तारखा वाढविल्या जात आहे. कम्पुटरमध्ये स्वतःच स्कॅनिंग करून वाहतूकदार टॅक्स, इन्शुरन्स व फिटनेसच्या तारखा वाढवत असल्याचे धक्कादायक प्रकारही तालुक्यात सुरु आहेत. कागदपत्रांच्या तारखा वाढवून वाहनांना मालवाहतुकी करिता कोळसाखानी व कंपन्यांमध्ये परवानगी मिळविण्यात येते. शासनाचा विविध प्रकारचा वाहन कर बुडवून वाहनांची वाहतूक सुरु आहे. फिटनेस संपलेली वाहनेही बिनधास्त रस्त्यांवर धावत आहे. याकडेही आरटीओ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घ्या - आ. किशोर जोरगेवार यांची मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : ओमायक्रोनचा वाढता धोका व बंद असलेली बससेवा लक्षात घेता गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना केली आहे. सदरहु मागणीचे निवेदनही त्यांच्या वतीने देण्यात आले आहे.
    
कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमूळे सर्व महाविद्यालये बंद होती. मात्र शासन धोरणाप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस नियमितपणे सुरु होते. आता कोरोनाचा प्रसार मंदावल्याने महविद्यालय नियमित सुरु झाले असले तरी अजूनही वसतिगृह सुरु झालेली नाहीत. त्यातच महाराष्ट्र परिवहन सेवा खंडित असल्यामुळे बाहेरगावी असलेले विद्यार्थी अद्यापही महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहिलेले नाही. आता विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यास्थितीत राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रसार वाढत असून बहुसंख्य विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही तसेच नियमित बस सेवेचा अभाव, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, बंद वसतिगृह आणि अपूर्ण लसीकरण या सारख्या विविध समस्यांमुळे विद्यार्थांपुढे ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देण्यास अडचण निर्माण झालेली आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोंडवाना विद्यापीठातील सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी अशी मागणी सदरहु निवेदनाच्या माध्यमातून आमदार जोरगेवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज केली आहे.

मंजूर कामे तातडीने सुरु करा- यंग चांदा ब्रिगेडची मागणी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : शहरातील इंदिरा नगर येथील हनुमान टेकडी परिसरात नागरिकांच्या मागणी नंतर अनेक कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. परंतु प्रत्यक्षात अद्यापही सदरहु कामांना सुरूवात झालेली नाही. त्यामूळे मंजूर सर्व कामे तात्काळ सुरु करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या इंदिरानगर शाखेच्या वतीने करण्यात आली असून सदरहु मागणीचे निवेदन अतिरिक्त उपआयुक्त विपीन पाल यांचे मार्फतीने महानगर पालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना आज देण्यांत आले यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, नरेश मुलकावार, तापोश डे, हेरमन जोसेफ, शकील शेख, बंडू पटले, नितेश गवळे, फुलचंद पाटील, सिद्धार्थ मेश्राम, गणेश किन्निकर, नितेश बोरकुटे आदींची उपस्थिती होती.          
  
इंदिरा नगर परिसरातील हनुमान टेकडी येथे विविध समस्या आहेत. त्यामूळे या समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा अधिका-र्यांना वांरवार निवेदनही देण्यात आले आहे. याची दखल घेत मनपा उपायुक्त यांच्या मार्फतीने सदरहु परीसराची पाहणी करून अहवाल मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना सादर करण्यात आला होता. त्यानंतर १५ दिवसात सदरहु कामे सुरु करू असे मनपाच्या वतीने आश्वासित करण्यात आले होते. मात्र, आता 2 महिण्यांचा कालावधी लोटून सुध्दा मंजूर कामे सुरु झालेली नाही. त्यामूळे येथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची गांभिर्याने दखल परिसरातील मंजूर कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी सदरहु निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेड तर्फे करण्यात आली आहे.

आमदारांकडून गडचांदुरकरांची निराशाच झाली प्रदूषणाचा मुद्दा सभागृहात मांडलाच नाही


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : जिल्ह्याच्या
गडचांदूर औद्याेगिक नगरीतील नागरिकांना माणिकगड कंपनीच्या प्रदूषणामुळे रोगराई व डस्टच्या त्रासाला गेल्या अनेक वर्षांपासून सामोरे जावे लागत आहे. याबाबत माणिकगड कंपनीने डस्ट कलेक्ट मशीन व इएसपी यंत्रणा दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दरम्यान महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू असताना विधानसभेत जिल्ह्यातील आमदारांकडुन हा प्रश्न चर्चेला जाईल असे वाटत हाेते. गडचांदूर येथील अनेक सजग नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांना होत असलेल्या प्रदूषण व गंभीर त्रासाबद्दल अवगत देखिल केले होते. दुर्दैव असे की, इतका गंभीर प्रश्न असून देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीने तो प्रश्न सभागृहात मांडला नाही. 
जो पर्यंत विधायक मार्गाने प्रश्नाला वाचा फुटणार नाही तोपर्यंत माणिकगड प्रशासनाची मुजोरी थांबणार नाही. मात्र स्थानिक नेत्यांच्या पाठबळ असल्यामुळे ही कंपनी नागरिकांच्या आरोग्याशी बिनधिक्तपणे खेळत आहे. 

एका बाजूने प्रदुषण विरोधात आवाज उचलायचा आणि दुसऱ्या बाजूने आपला आवाज न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधीचा प्रचार व प्रसार करायचा यातच नागरिकांचे अहित आहे. मुळात कंपनीच्या युनिट २ ला ना हरकत देण्यासाठी त्यावेळच्या ग्रामपंचायतीने ठराव पारित केला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. गावाच्या विकासासाठी कंपनीला कोणत्याही अटी वा शर्ती लागू दिल्या नाही. त्या वेळेस जर अटी शर्ती सत्ताधा-यांनी ठेवल्या असत्या तर गावातील अनेक कामे झाली असती तदवतचं प्रदूषण सुद्धा कमी झाले असते. सदरहु युनिट २ कार्यान्वित होताना सद्याचे आमदार हेच त्यावेळी आमदार होते. त्यामुळे जो पर्यंत आमदार हा प्रश्न मांडणार नाही तो पर्यंत नागरिकांचा प्रश्न सुटेल कसा व प्रदूषण नियंत्रण होईल कसे असा प्रश्न सतीश बिडकरसह नागरीक आता विचारू लागले आहे.

ग्रामीण विभाग प्रगतीचे दालन- डॉ.अजिंक्य कोत्तावार


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : "ग्रामीण विभाग हा आपल्या प्रगतीला अडथळा नसून उलट तेथे असणाऱ्या समस्या याच आपल्या संशोधनाचा आधार असतात. मूलभूत संशोधन आणि त्याचे नाविन्यपूर्ण अविष्कार यातील फरक आपल्याला समजून घेता यायला हवा. आपल्या समोर असणाऱ्या समस्यांचे निरीक्षण करीत त्यात संधी होता यायला हवी आणि त्या मिळालेल्या संधीचे सोने करता यायला हवे. आपल्या स्वतःचे ध्येय निश्चित करून त्याला छोट्या छोट्या भागात विभाजित करीत सातत्यपूर्ण सुयोग्य शैलीने ते ध्येय साध्य करणे हाच यशाचा मार्ग आहे." असे विचार युवा शास्त्रज्ञ ज्ञान फाउंडेशन चे कार्यकर्ते डॉ. अजिंक्य कोत्तावार यांनी व्यक्त केले.
  
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिनर्जी या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमात इंवेंशन ते इनोवेशन याविषयी आवडते विद्यार्थ्यांची आभासी पद्धतीने संवाद करीत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ऍड लक्ष्मण भेदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी शिक्षण हे केवळ पैसा मिळवण्याचे माध्यम नसून इच्छाशक्ती आणि वेगळ्या प्रकारच्या प्रवासाची उर्मी आपल्याला संशोधनाचा आणि जीवनाचा आनंद प्रदान करेल असे म्हणत त्या विषयातील प्रत्यक्ष कृतिशील आदर्श म्हणून आजच्या वक्त्यांना आमंत्रित केले आहे हे अधोरेखित केले.

वक्त्यांचा परिचय करून देताना डॉ. मनोज जंत्रे यांनी कोत्तावार यांनी ५०पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मिळवलेले पुरस्कार, त्यांच्या नावावर असलेले ३४ पेटंट तथा ४००० वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी केलेले इनोवेशन यावर प्रकाश टाकला. 
आपल्या अभ्यासपूर्ण रेखीव आणि थेट संवाद साधणाऱ्या शैलीत डॉ. कोत्तावार यांनी बसच्या हवेवर मोबाईल चार्ज करणारे यंत्र, बायोडिझेल चा पहिला प्रयोग टेरेस गार्डन नळाचे पाणी वाचवणारे साधन अशा स्वतः केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंवेंशन आणि इनोव्हेशन मधला नेमका फरक सोदाहरण विशद करून दाखविला.
 
एका ग्रामीण भागातून आलेले स्वकर्तृत्वावर इतकी मोठी उंची गाठलेली आणि तरीही मातीशी जुळलेले व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या साठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात अध्यक्षीय मनोगतात एड. लक्ष्मण भेदी यांनी वक्त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. नीलिमा दवणे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. किसन घोगरे यांनी केले.