सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्याच्या
गडचांदूर औद्याेगिक नगरीतील नागरिकांना माणिकगड कंपनीच्या प्रदूषणामुळे रोगराई व डस्टच्या त्रासाला गेल्या अनेक वर्षांपासून सामोरे जावे लागत आहे. याबाबत माणिकगड कंपनीने डस्ट कलेक्ट मशीन व इएसपी यंत्रणा दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दरम्यान महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू असताना विधानसभेत जिल्ह्यातील आमदारांकडुन हा प्रश्न चर्चेला जाईल असे वाटत हाेते. गडचांदूर येथील अनेक सजग नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांना होत असलेल्या प्रदूषण व गंभीर त्रासाबद्दल अवगत देखिल केले होते. दुर्दैव असे की, इतका गंभीर प्रश्न असून देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीने तो प्रश्न सभागृहात मांडला नाही.
जो पर्यंत विधायक मार्गाने प्रश्नाला वाचा फुटणार नाही तोपर्यंत माणिकगड प्रशासनाची मुजोरी थांबणार नाही. मात्र स्थानिक नेत्यांच्या पाठबळ असल्यामुळे ही कंपनी नागरिकांच्या आरोग्याशी बिनधिक्तपणे खेळत आहे.
एका बाजूने प्रदुषण विरोधात आवाज उचलायचा आणि दुसऱ्या बाजूने आपला आवाज न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधीचा प्रचार व प्रसार करायचा यातच नागरिकांचे अहित आहे. मुळात कंपनीच्या युनिट २ ला ना हरकत देण्यासाठी त्यावेळच्या ग्रामपंचायतीने ठराव पारित केला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. गावाच्या विकासासाठी कंपनीला कोणत्याही अटी वा शर्ती लागू दिल्या नाही. त्या वेळेस जर अटी शर्ती सत्ताधा-यांनी ठेवल्या असत्या तर गावातील अनेक कामे झाली असती तदवतचं प्रदूषण सुद्धा कमी झाले असते. सदरहु युनिट २ कार्यान्वित होताना सद्याचे आमदार हेच त्यावेळी आमदार होते. त्यामुळे जो पर्यंत आमदार हा प्रश्न मांडणार नाही तो पर्यंत नागरिकांचा प्रश्न सुटेल कसा व प्रदूषण नियंत्रण होईल कसे असा प्रश्न सतीश बिडकरसह नागरीक आता विचारू लागले आहे.