पत्रकारांशी उर्मटपणे वर्तणूक करणाऱ्या एपीआय वर कारवाई करा - पुरोगामी पत्रकार संघाची मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० आक्टो.) : अपघातस्थळी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणारे नवभारत प्रतिनिधी अमोल राऊत यांच्याशी राजुरा येथील एपीआय गोडसे व सोबत असलेल्या पोलीस चमूनी उर्मटपणे वर्तन केले. या पोलिस प्रशासनातील असभ्य वर्तणूक करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी काल शुक्रवारला पुरोगामी पत्रकार संघाने चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक यांच्याकडे एका लेखी निवेदनातुन केली आहे .

या बाबत असे कळते की गेल्या चार दिवसां पूर्वि राजुरा तालुक्याच्या ठिकाणापासून 3.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुमठाणा फाट्यावर दुचाकीचा दुर्दैवी एक अपघात झाला. या अपघातात दोन भावंडांपैकी एकाचा घटनास्थळीचं मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. सदरहु घटनेची माहिती हाेताच राजुराचे नवभारत प्रतिनिधी तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत यांनी राजुरा पोलिस स्टेशनला दूरध्वनी वरून माहिती देत आपली सहकार्याची भूमिका बजावली .इतकेचं नाही तर त्यांनी पोलिसचमू घटनास्थळी येईपर्यंत जखमीला उपचारार्थ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. एव्हढं सारं करुन देखिल राजुरा येथील एपीआय गोडसे सह आलेल्या पोलिस चमूने पाेलिस प्रशासनाला सहकार्य करणारे अमोल राऊत यांच्याशी विनाकारण हुज्जत घालत असभ्य वर्तणूक करत प्रशासनालाच मलिन केले आहे . यामुळे सर्व सामान्य माणसाशी पोलिसांची भूमिका व वर्तणूक किती असहाय आहे याचे यावेळेस प्रत्यक्ष दर्शन एपीआय गोडसे यांच्या वर्तणुकीतून द्रूष्टीक्षेपात पडले. पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून मालिन करणाऱ्या एपीआय व सोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी. जेणेकरून यानंतर अश्या प्रकारच्या असभ्य वर्तणुकीला अंकुश बसेल व सामान्य जनतेत पोलिस प्रशासनाबद्दल आपुलकीची व प्रेमाची भावना टिकून राहील. अशी देखिल मागणी याच निवेदनातुन करण्यांत आली आहे. निवेदन देतांना पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,विदर्भ उपाध्यक्ष मिलिंद नरांजे ,विदर्भ संघटक निलेश ठाकरे, तालुका अध्यक्ष चंद्रपूर मुन्ना तावाडे, तालुका संपर्क प्रमुख राजुरा तथा नवभारत प्रतिनिधी अमोल राऊत उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पोलीस महासंचालक यांनाही निवेदनच्या प्रति पाठविण्यात आल्या आहे.

पव्वा! चढ्या दरात विकतो "येथील" परवाना धारक, उत्पादन शुल्क विभागाचे होत आहे दुर्लक्ष


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (३० ऑक्टो.) : माथार्जून येथील दारू च्या दुकानातून चढ्या दरात पव्वा विकला जात आहे. त्यामुळे तळीराम संतापले असून ओरडा ओरड करीत आहे.
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या माथार्जून येथील देशी दारूचे दुकान सुरु आहे. मधील काळात पाच वर्षे बंद होती, आता गेली तीन वर्ष झाली पुन्हा सुरु झाली असून या कठीण काळात परवाना धारक हा ज्यादा दाराने दारू विकत आहे. असे परिसरातील तळीरामांची तक्रार आहे.
विशेष उल्लेखनीय कि, अहो रात्र घरून दारू विकल्या जात असून ठरलेल्या वेळेवर दुकान सुरु न करता सकाळीच आठ वाजता दुकान सुरु होत असून देशी दारूच्या किंमतीत ही वाढ करून विकल्या जात आहे. प्रत्येक पव्यावर 10/20 रुपयाने चढ्या भावात विकल्या असून ही सर्व सामान्य जनतेची लूट होत असल्याचे बोंबाबोंब होत आहे. याकडे उत्पादन शुल्क विभागाचे ही दूर लक्ष होत असून या देशी दारू दुकानात बे हिसाब पैसे मोजावे लागत आहे. 60 रुपयांचा पव्वा 70 ते 80 रुपयाला तळीरामांना पव्वा विकल्या जात आहे. कामामुळं सीनभागाडा (थकवा) येतोय त्यामुळे दारू पितो, किंबहुना दारूची या अनेकांना लतही लागली. कित्येकांचे संसार उध्वस्त झाले आणि चा आहे. परंतु हा परवाना धारक काही च्या काही दरात दारू विकली जात आहे. अशी तळीरामात ओरड आहे. परिणामी सणासुदीच्या पर्वावर उत्पादन शुल्क विभागाने अशा बे हिसाबी विकणाऱ्या धारकांवर नियंत्रण ठेवावे व तळीरामांना प्रिंटेट किंमतीनुसार विक्री करण्याचे सक्त आदेश देण्यात यावे. अशी मागणी तळीरामातून होत आहे.
 

मूल शहरात अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑक्टो.) : काल शुक्रवारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे "वार्ड तिथे राष्ट्रवादी "या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या सुचनेच्या अनुषंगाने तथा बल्लारशहा विधान सभा क्षेत्राचे अध्यक्ष सुमित समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात मूल नगरीत एक बैठक घेण्यात आली.
सदरहु बैठक शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, व शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, ह्यांच्या प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक १४ येथे पार पडली.बैठकीत अनेक युवा कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. दरम्यान या वार्डातील अनेक युवकांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश केला.

पक्षप्रवेशा नंतर कार्यकर्त्यांची नविन वार्ड कार्यकारणी करण्यात आली.
        
आयाेजित बैठकीत विशाल श्रीकोंडावार, आशिष रामटेके, अमोल वाकडे, विनोद गुरनुले ,अंकित वन्नकवार, प्रदीप देशमुख, प्रकाश बावणे, प्रीतम भडके, जुगल भडके, दादू भडके, अमोल वाढई, गोलू ढोले, नयन भोयर, गणेश भोयर, कमलेश भोयर , तुषार शेंडे, विनोद गुरनुले, प्रणय घोगरे, नंदलाल भडके, कृष्णा वाढई, संदीप वाढई, थामदेव रामटेके, रसिक वाडगुरे, राजेश्वर मोहूर्ले, अमित गिरडकर, दीपक महाडोळे, नंदकिशोर शेंडे गणेश शेंडे, सुजल शेंडे राजू भोयर, अतुल मडावी , सुरज शेंडे,शंकर क्षीरसागर, गणेश गिरडकर, धनराज गिरडकर, जोगेश गिरडकर, राकेश कन्नाके ,कार्तिक शेंडे,सुमीत वासेकर,प्रवीण मडावी,अमोल वाढई, गुलशन रामटेके,सतीश गुरनुले,राजेश्वर मोहूर्ले, राजू बोळे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.
आगामी नगरपालिका निवडणूका सर्व शक्तीनिशी लढवू अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत समर्थ यांनी या बैठकीत दिली.

सुरजागड : ठिय्या आंदोलन !



               सुरजागड, ठिय्या आंदोलन !

२५ ऑक्टाेंबर पासुन सुरजागड खनिज प्रकल्पाच्या विरोधात एटापल्ली येथे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन वरवर पाहता आदिवासींचा हक्क, अधिकार यासाठी लढा आहे असे वाटत असले तरी आंदोलकांची या मागची काय भुमिका आहे हे समजुन घेतले पाहिजे.

या खदानीमुळे केवळ सर्व सजीव सृष्टीचे सौंदर्य, पर्यावरणाचे संरक्षण, विस्थापन, प्रदुषण, आरोग्य, विकास, रोजगार हे प्रश्न निर्माण होणार आहेत असे नव्हे तर आदिवासींची आयडेंटिटी नाकारणारा विकास आहे हे समजुन घेतले पाहिजे. इलाक्यातील हजारो आदिवासींनी का रस्त्यावर उतरावे? आपले घरदार मुले बाळ, गुरेढोरे, शेतीवाडी सारे सोडून झाडाच्या खाली चुली पेटवून खुल्या जागेवर थंडीमध्ये धरणीला पाठ टेकवावी व आकाशाकडे बघत आहेत ते का मुर्ख आहेत का? असे दुर्दैवी चित्र दिसत आहे यावर प्रसार माध्यमांनी सहकार्य केले पाहिजे. तसेच सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, अभ्यासू, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन शासन प्रशासनासोबत संवाद साधला पाहिजे.

आदिवासींसाठी असलेले संविधानातील हक्क, पाचवी अनूसूचि,स्वशासन चालवण्यासाठीचा पेसा कायदा याचा आधार घेत आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलकांची ही मागणी रास्त आहे की, नाही यावर खरे तर चर्चा होणे गरजेचे आहे. विकासाची नेमकी परिभाषा कोणती याची मांडणी होणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात वैचारिक भूमिका मांडली पाहिजे असे माझे ठाम मत आहे. इलाका गोटुल ने या संघर्षाची सुरवात केली. ज्याला मागासलेला म्हणतात तो अशिक्षित आदिवासी माणुस शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करतो आहे. हे वाखाणण्याजोगे आहे. खरं तर, गडचिरोली जिल्हा देशपातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या बाबींमुळे नावारुपाला आला आहे. त्यात काही बाबतीत अभिमानास्पद व काही बाबी दुःखपूर्ण आहेत. त्यातील अभिमानास्पद बाब म्हणजे मेंढा लेखा व देवाजी तोफा होय. सरकारचे प्रतिनिधी म्हणून रमेश जयरामजी स्वतः येऊन आदिवासींचे मायबाप होऊन घरपोच हक्क प्रदान केले. याचा गडचिरोलीचा देशपातळीवर गाजावाजा झाला . आणि म्हणूनच देशभरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी बहुसंख्येने मेंढा लेखा चे अनुकरण करण्यासाठी व शिकण्यासाठी गडचिरोलीत येतात. परंतु याच जिल्ह्यात मात्र संविधानातील आदिवासींचे हक्क पायदळी तुडवले जाताना दिसत आहेत.

वन विभागाने व शासनाच्या आदिवासी विभागाचे सहकार्याने दुर्गम भागातील आदिवासींना गॅस सिलिंडर वाटप केले आहे ते कशासाठी तर सरपणासाठी लागणारे लाकडे जंगलातून तोडून नेतात ते थांबले जावे व जंगल नष्ट होऊन जाऊ नये यासाठी ती योजना आखली होती आणि खदानीच्या रुपाने हजारो हेक्टर जमीनीवरी घनदाट जंगल कापून नष्ट होत आहे त्याबद्दल काहीही नियोजन नाही. कंपनीचे दलाल म्हणतात की, कंपनी यवतमाळ जिल्ह्यात जंगल उभे करणार आहे. ते आदिवासी जीवनमूल्ये, संस्कृती, रितीरिवाज परंपरा पण उभे करून देणार आहेत का? कोरोना काळात जीवन जगण्यासाठी निरंतर संघर्ष झाला. लाखो जीव ऑक्सीजन बेड न मिळाल्याने किड्यामुंग्या सारखे रस्त्यावर मेले आहेत. ग्लोबल वॉर्मिंग मुळे अमेरिका सारख्या अनेक देशात अभ्यास केला जात असतांना आदिवासी जीवनमूल्ये विश्वाला कसे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अशी आदिवासी जीवन पद्धती खदानीच्या अघोरी विकासात मुळासह खोदून नष्ट करत असतांना आदिवासींच्या अशा आंदोलनात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. जीवंत राहण्यासाठी आव्हान निर्माण झाले असतांना जनतेनी जागृत होऊन एकजुटीने सक्षमपणे व शांततेने लोकसहभाग वाढवला पाहिजे.

जिल्हा प्रशासनातील प्रमुख जिल्हाधिकारी हे आदिवासी बहूल जिल्ह्यात आदिवासीचे उपायुक्त असतात. त्यांना विषेश अधिकार आहेत. पोलिस प्रशासनाने त्यांना व आदिवासी विभागाला हाताशी घेऊन आदिवासींसोबत समन्वय साधला पाहिजे अशी अपेक्षा आहे. वनखात्यानेही आत्मपरीक्षण करावे आदिवासींसाठी वनविभागाचे नाते का जोडले गेले नाही? ते जोडले जावे. नेमके आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात त्यांचा संबंध अराजक शक्तीसोबत जोडुन प्रशासनाने आपली कमजोरी दाखवली आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या आदिवासी बहुल भागात लोकशाही कां सुदृढ होऊ नये याचे आकलन होत नाही. संपूर्ण देशभरातील डांबरी रस्ते खोदून सिमेंट रस्ते बनवले जातात. मेट्रो, उडाणपुल, बुलेटट्रेन, चौपदरी रस्ते याची जितकी आवश्यकता शासनाला वाटते तितकीच शिक्षण, आरोग्य, मुलभूत सुविधा, स्त्रिया व बालकांचे योग्य संगोपन, वृध्दाचे प्रश्न, दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांची सुविधा, सुरक्षा, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ची अधिकची यंत्रणा, अद्यावत आरोग्य सुविधा शाश्वत रोजगाराच्या संधी, सुरक्षा तळागाळात पोहचवण्यात याव्यात. कोणत्याही टाकावू बाबींवर अतोनात खर्च केला जातो पण, वन उपजावर प्रक्रिया करून अनेक वस्तू तयार करता येईल याच्या वर आधारित कौशल्य विकास आराखडा, प्रशिक्षण, निर्माण प्रक्रिया व बाजारपेठ उपलब्ध करता येईल. या जिल्ह्यात आदिवासी विकास विभाग म्हणजे जणु घाण्याला जुंपलेला बैल झाला आहे असे निदर्शनास येत आहे.

पोलिस प्रशासन व जिल्हाधिकारी यांची वनविभाग व आदिवासी विकास विभाग यांना घेऊन आम जनतेला दिलासा मिळेल व प्रशासन व शासन यांचे वर दृढ विश्वास होऊन विकासाच्या कामात गती देण्यासाठी प्रयत्न करावे. सुरजागड आंदोलनाची दखल घेऊन सरकारने आदिवासींचे मायबाप व्हावे एवढी मनापासून अपेक्षा आहे. तदवतचं सुरजागड व अन्य खाणी बाबत आदिवासी हिताचे बाजूने निर्णय घ्यावा. लोकशाही मार्गाने शांततामय आंदोलनाची आम्ही आदिवासी कधीही कास सोडणार नाही.
~ कुसुम अलाम 
आदिवासी सेवक तथा साहित्यिक गडचिराेली ९४२१७२८४८९

नियमाची पायमल्ली,पटवारी सदस्यांची दिशाभूल !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२९ ऑक्टो.) : तलाठ्यांच्या आर्थिक व सेवा विषयक मागण्यांसाठी इमाने इकबारे लढणारे तथा सेवेत असतांना शासनाविरुध्द आवाज बुलंद करणारे विदर्भ पटवारी संघटनेचे झुंजार नेते संघर्षी स्व.वि.म. उजवणे यांनी पटवारी संघटनेची मुहुर्तमेढ राेवत त्या संघटनेच्या शाखा प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरांवर सुरु केल्या हाेत्या.

विदर्भ पटवारी शाखेप्रमाणचे या देखील शाखांचे काम नियमानुसार व नियोजित वेळेनुसार व्हायला हवे. या भूमिकेशी ते नेहमीच कायम व प्रामाणिक राहिले हाेते. एव्हढेच नाही तर, विदर्भ पटवारी संघटनेच्या संपूर्ण ध्येय धाेरणानुसार आजपर्यंत चालणारी त्यांची कार्यप्रमाली सर्वांनी अनुभवली हाेती. परंतु अलिकडे त्यांनी संघटनेसाठी घालून दिलेल्या नियमांची अक्षरश: पायमल्ली करुन स्वमर्जीने निर्णय घेण्याची प्रथा सुरु झाली असुन, असाच एक प्रकार राजूरा उपविभाग पटवारी संघटनेकडुन राजूऱ्या नव्यानेच बांधलेल्या परस्पर गाळे विक्री प्रकरणात उघडकीस आला आहे. या बाबतीत राजेन्द्र पचारेसह अन्य सदस्यांनी विदर्भ पटवारी संघटनेचे केन्द्रीय अध्यक्ष नागपूर यांचेकडे लेखी तक्रार नाेंदविली आहे.
उपराेक्त संदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते की, राजूरा उपविभाग शाखेमधील सध्या कार्यरत असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव, या शिवाय जिल्हा अध्यक्ष जिल्हा सचिव व १३ सदस्य यांचे प्रमुख उपस्थितीत निव्वळ संदेशाच्या माध्यमांतुन दि.१९\१०\२०२१ ला तहसिल कार्यालय राजूरा येथील सभागृहात एक सभा पार पडली यात गाळे बाबत निर्णय हाेता. दरम्यान या पूर्वी दि.११\९\२०२१ राेजी पटवारी मागणी दिनामध्ये समाेरील गाळे किरायाने देण्याबाबत ठरले हाेते. ठरल्याप्रमाणे प्रथम दर्शनी दाेन गाळे अतिमहत्वाचे असुन ते रस्त्या लगतचे आहे. ते लिलावात देखील जाणारे हाेते. त्यासाठी निविदा काढायची असे सर्वानुमते ठरले हाेते. याच बांधकाम झालेल्या समाेरील गाळ्याची पगडी तीन लाख रुपये व मासिक किराया पाच हजार रुपये तर, मागील गाळ्याबाबत पगडी दाेन लाख व प्रतिमाह किराया तीन हजार रुपये ठरविण्यात आलेला हाेता. बांधकाम ठेकेदारास बांधकामाचे वाढीव रक्कम विस लाख रुपये देणे असल्यामुळे आठ लाख रुपये पगडी व उर्वरीत गाळे पुढील सभेत किरायाने देण्याचे ठरले हाेते. जमा सहा लाख पन्नास हजार रुपये त्यात आठ लाख रुपये अधिक जवळपास एकुण संघटनेकडे १५ लाख रुपये जमा हाेणार हाेते. एका सभेत काही जेष्ठ मंडळीनी निविदा सुचनेची जाहिरात देण्याबाबत (भाड्याने देण्याबाबत) सुचित केले हाेते त्यास सर्वांनी मान्य करत हाेकार देखील दिला. दि.१९\१०\२०२१ च्या सभेत चर्चा किंवा निर्णय हाेणार असे सर्व सदस्यांना वाटत हाेते. त्यामुळे गाळे किरायाने घेण्यांसाठी काही सभासद उपस्थित राहिले. परंतू १२३, १२४, १२५, व १२६ पैकी प्लाट क्रं.५५ क्षेत्र ३०० चाै.मी. वर नवीन बांधकाम निर्मिती करुन ग्राँऊंड लेवल वर तयार करण्यात आलेले १५ गाळ्यांपैकी समाेरचे दाेन गाळे उपविभाग शाखेचे सध्याचे कार्यरत असलेले अध्यक्ष व जिल्हा शाखेचे विद्यमान उपाध्यक्ष यांनी अन्य सभासदांची दिशाभूल व नियमांची पायमली करुन स्वता खरेदी करण्याबाबतचा परस्पर ठराव घेतला. तसेच या गाळ्या बाबतची बेसीक प्राईज ठरविण्यात आली नाही व त्याची प्रसिध्द सुध्दा देण्यात आली नाही. उपरोक्त सभेबाबत संघटनेच्या नियम २९ व ३० नुसार काेणतेही अनुपालन करण्यात आले नसुन स्वताच्या मर्जीतुन एक तर्फी निर्णय घेतला असा स्पष्ट आराेप राजेन्द्र पचारे यांनी आज बाेलतांना 
राजूरा मुक्कामी केला.

सदरहु बांधकामात गुंतविलेली रक्कम ही स्व.वि.म. उजवणे यांचे हयातीत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याच्या केन्द्रीय सभेत ठराव पारीत करुन संघटनेची राजूरा स्थित जुणी वास्तु नव लक्ष २५ हजार रुपयांत विक्री करुन ती रक्कम बंँकेत जमा करण्यांत आली हाेती. त्याच कालावधीत उजवणे हयातित असतांना केन्द्राध्यक्ष यांचे पुर्वसंमतीने १२३\१२४\१२५\१२६ पैकी प्लाट क्र.५५ क्षेत्र ३०० चाै.मी. खरेदी करण्यात आला. या मध्ये ख-या अर्थाने सेवानिवृत्त तलाठी, मंडळ अधिकारी सभासद, दिवंगत झालेले तलाठी बांधव व आज हयातीत असलेले पटवारी व मंडळ अधिकारी यांचा सिंहाचा व माेलाचा वाटा हाेता हे विसरता येण्या सारखे नाही. जमा झालेली गुंतवणूक रक्कम व त्याची जपणूक ठेवण्याचे काम त्यांनी आज पावेताे प्रामाणिकपणे केले. यांची कल्पना सर्वांनाच हाेती.
विद्यमान असलेले पदाधिकारी, अध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी व इत्तरांनी आपल्या स्वार्थापाेटी उपरोक्त भूखंडाची विल्हेवाट लावण्यांचे षडयंत्र रचले. हा प्रकार एकंदरीत दिशाभूल करणारा असून भविष्यात संघटनेत दुफळी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरहु संघटना ही नाेंदणीकृत असून सभेचे सर्वांना नाेटीसा देणे हे अनिर्वाय हाेते परंतु उपरोक्त काही ठराविक पदाधिकारी व सदस्यांनी सर्वांना विश्वासात न घेता मालमत्तेची पुर्णता विल्हेवाट लावली आहे.

अशा या प्रकारामुळे काही जुन्या व नव्या सदस्यांत नाराजीचा सुर उमटला असून, उपरोक्त प्रकरणात याेग्य चाैकशी व्हावी अशी अपेक्षा राजेन्द्र पचारेंसह अन्य काही सदस्यांनी व्यक्त केली आहे.