सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३० आक्टो.) : अपघातस्थळी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणारे नवभारत प्रतिनिधी अमोल राऊत यांच्याशी राजुरा येथील एपीआय गोडसे व सोबत असलेल्या पोलीस चमूनी उर्मटपणे वर्तन केले. या पोलिस प्रशासनातील असभ्य वर्तणूक करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी काल शुक्रवारला पुरोगामी पत्रकार संघाने चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक यांच्याकडे एका लेखी निवेदनातुन केली आहे .
या बाबत असे कळते की गेल्या चार दिवसां पूर्वि राजुरा तालुक्याच्या ठिकाणापासून 3.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुमठाणा फाट्यावर दुचाकीचा दुर्दैवी एक अपघात झाला. या अपघातात दोन भावंडांपैकी एकाचा घटनास्थळीचं मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. सदरहु घटनेची माहिती हाेताच राजुराचे नवभारत प्रतिनिधी तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत यांनी राजुरा पोलिस स्टेशनला दूरध्वनी वरून माहिती देत आपली सहकार्याची भूमिका बजावली .इतकेचं नाही तर त्यांनी पोलिसचमू घटनास्थळी येईपर्यंत जखमीला उपचारार्थ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. एव्हढं सारं करुन देखिल राजुरा येथील एपीआय गोडसे सह आलेल्या पोलिस चमूने पाेलिस प्रशासनाला सहकार्य करणारे अमोल राऊत यांच्याशी विनाकारण हुज्जत घालत असभ्य वर्तणूक करत प्रशासनालाच मलिन केले आहे . यामुळे सर्व सामान्य माणसाशी पोलिसांची भूमिका व वर्तणूक किती असहाय आहे याचे यावेळेस प्रत्यक्ष दर्शन एपीआय गोडसे यांच्या वर्तणुकीतून द्रूष्टीक्षेपात पडले. पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून मालिन करणाऱ्या एपीआय व सोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी. जेणेकरून यानंतर अश्या प्रकारच्या असभ्य वर्तणुकीला अंकुश बसेल व सामान्य जनतेत पोलिस प्रशासनाबद्दल आपुलकीची व प्रेमाची भावना टिकून राहील. अशी देखिल मागणी याच निवेदनातुन करण्यांत आली आहे. निवेदन देतांना पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,विदर्भ उपाध्यक्ष मिलिंद नरांजे ,विदर्भ संघटक निलेश ठाकरे, तालुका अध्यक्ष चंद्रपूर मुन्ना तावाडे, तालुका संपर्क प्रमुख राजुरा तथा नवभारत प्रतिनिधी अमोल राऊत उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पोलीस महासंचालक यांनाही निवेदनच्या प्रति पाठविण्यात आल्या आहे.