कोल्हापुरच्या मुंबईस्थित दोन समाजसेवकांचा बुलढाणा फिल्म सोसायटीतर्फे सन्मान


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
बुलढाणा, (ता.२९) : शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीतील भुदरगड या ऐतिहासिक तालुक्यातील बामणे या गावचे दोन अभ्यासु साहित्यिक समाजसेवक सुनिल बोरणाक आणि संदीप मेंगाणे यांना ह्या वर्षीचा बुलडाणा फिल्म सोसायटीचा अनुक्रमे समाज गौरव पुरस्कार २०२० आणि समाज रत्न पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 लहानपणापासूनच समाज सेवेची आवड असणाऱ्या दोघांनीही अनेक मंडळे, प्रतिष्ठान व मित्रांच्या मदतीने मदत कार्यात पुढाकार घेतला. राज्यस्तरीय शिवसह्याद्री प्रतिष्ठाण या राजकारण विरहित प्रतिष्ठान मार्फतही ते समाजकार्यात अग्रेसर आहेत.

गेली अनेक वर्षे आयुर्वेदिक मोफत आरोग्य शिबीर राबवणे, रक्तदान शिबीर राबवणे, काही शालेय उपक्रम जसे एक वही एक पेन जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना थोडी शैक्षणिक मदत मिळेल, ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून कचरा साफ करणे, गरजुंना मोफत अन्नधान्य वाटप, दाल खिचडी वाटप, कोरोना काळात सेफ्टी मास्क, अर्सेनिक गोळया, सॅनिटायजर, कोविड किट वाटप, झोपडपट्टी एरिया सॅनिटाईस करणे, खेड्यातील लोकांना शेतकरी मंडळ चालू करून देणे, महिलांचे - पुरुषांचे बचत गट चालू करणे व त्यांना कर्ज मंजूर करून देणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण देणे व मोफत शिलाई मशीन वाटप करणे, पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, वृक्षारोपण करणे, शासन आणि प्रशासनाच्या मदतीने रस्त्यांची डागडुजी करणे ह्या सारखी कामे सातत्याने ते सातत्याने करत आहेत.
त्यांच्या या सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी बुलढाणा फिल्म सोसायटी तर्फे सुनील बोरणाक यांना समाजगौरव तर संदीप मेंगाने यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचे सोसायटीचे अध्यक्ष भास्कर वाडेकर यांनी जाहीर केले आहे.

शेतमालकांकडून सालगड्याच्या पत्नीचा विनयभंग, घोडधरा येथील घटना


                        (संग्रहीत फोटो) 

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता.२९) : घोडधरा येथे शेतकामासाठी ठेवलेल्या माणसाच्या पत्नीवर मालकाने घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना शनिवार दि.२६ जुन रोजी दुपारी दोन वाजता घडली होती. 

माणूस शेतामध्ये काम करत असताना सालगड्याच्या घरी त्याचा डब्बा आणण्यासाठी गणेश आनंद जीवतोडे (४५) हा गेला असता, सालगड्याच्या पत्नीचा मोबाईल चार्जिंगला लावून असलेल्या खोलीमध्ये शिरून चार्जिंगला लावून असलेला मोबाईल काढुन घेतला. माणसाची पत्नी आपला मोबाईल मागण्यांसाठी गेली असता, तिला खाली पाडून विनयभंग केल्याची तक्रार पिडीत महिलेने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये सोमवार दि.२८ जुन रोजी सांयकाळी दाखल केली.

सदर तक्रारी वरुन संशयित आरोपी गणेश जीवतोडे रा.घोडधरा यांच्या विरुद्ध कलम ३५४/४५२/५०६ सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ कमी करा. - राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पार्टीचा आंदोलनाचा इशारा.


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (ता.२९) : देशासह राज्यात ही पेट्रोल डिझेल  व गॅसच्या दरवाढीचा भडका उडाला असून दिवसेन दिवस इंधन दरवाढ होतच चालली आहे. याचा फटका सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गास सुध्दा बसत आहे.पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने व खर्च झेपावत नसल्याने शेतकामास लागणारी यंत्रसामग्री ठप्प पडण्याची वेळ आली आहे.
 
एकीकडे गॅसचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकासह गोरगरीबांच्या झोपडीत दोन वर्षापुर्वी तोडलेल्या चुली परत चेततांना दिसू लागल्या आहेत.तर सिलेंडर हे शोभेची वस्तू बनून झोपडीत अडचण निर्माण करत आहेत.

या जुलमी केंद्र सरकारने गरीबांच्या झोडीत डोकावून गरिबींच्या नजरे पाहुन व शेतकर्‍यांचा शेतात गळत असलेल्या घामाची कदर करून तात्काळ इंधन आणि गॅसची दरवाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी महागांव तर्फे  रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारची राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


कुपनधारक धडकले महागांव तहसील कार्यालयावर

 
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
महागांव, (ता.२९) : महागांव येथील स्वस्त धान्य दुकानदारा कडुन शासकीय वेळेत धान्य मिळत नसल्याने रोजमजुरी करणार्‍या कुपनधारकांची कुचंबणा होत असल्याने संतप्त झालेल्या कुपनधारकांनी थेट तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार नामदेव इसाळकर यांचे समोर आपबीती मांडुन स्वत धान्य दुकानदारा विषयी तक्रार केली आहे.
 
संपूर्ण शहरात दोन स्वस्त धान्य दुकानाव्दारे धान्याचा वाटप केल्या जात होता. परंतु दोन्ही ही दुकाने भष्टाचाराच्या विळख्यात अडकल्या गेल्याने,मागील अनेक वर्षां पासून प्रभारी दुकानदाराच्या भरवशावर येथील कारभार चालत होता.
   
मागील काही दिवसांपासुन अंबोडा येथील महिला बचत गट हे दोन्ही दुकाने प्रभारावर चालवत होते.संपर्ण शहरास एकाच दुकानाव्दारे वाटप करताना तान पडत असल्याने दुसऱ्या एका दुकानास जोडण्यात आले होते.त्यांचे कडून शासकीय वेळे नुसार धान्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कुपनधारकांनी तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार यांना स्वत धान्य मिळत नसल्याची तक्रार केली आहे.


विठ्ठलवाडी येथील प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम थांबले, रस्ता अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२९) : विठ्ठलवाडी परिसरातून एस बी लॉन मार्गे वणी वरोरा रोडला जोडला जाणारा प्रमुख रस्ता अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. मागील दिड वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरु आहे. अतिशय संत गतीने या रस्त्याचे काम करण्यात आले.

खडीकरणाला वर्षभर लागले, आता डांबर पडायला पुढील वर्ष उजाडते की, काय असे वाटू लागले आहे. खनिज विकास निधी अंतर्गत या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पण आता निधी अभावी या रस्त्याचे काम रखडले असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे.

या रस्त्यावर आता ठिकठिकाणी पाणी साचत असून रस्त्यावर पडलेले गिट्टीचे ढिगारे वाहतुकीला अडथळे निर्माण करीत आहे. खडीकरण करण्यात आलेली गिट्टीही उखडू लागली असून रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर आता डांबर केंव्हा पडते, ही प्रतिक्षा येथील नागरिकांना लागली आहे.

विठ्ठलवाडी परिसरातून मुख्य मार्गाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीचे काम २०२० च्या एप्रिल, मे महिन्या पासून सुरु आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाची निविदा बांधकाम विभागाकडून काढण्यात आली. अगदीच बरसादीच्या तोंडावर हा रस्ता खोदण्यात आला. पावसाळ्याचे चार महिने हा रस्ता निव्वळ खोदून राहिला. परिसरातील नागरिकांचे या रस्त्याने जाणे येणे कठीण झाले. नागरिकांच्या घरासमोर पाण्याचे खळगे तयार झाले. रस्त्यालगत घरे असणाऱ्यांचे तर घराबाहेर पडणे कठीण झाले होते.

हिवाळ्यानंतर या रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. खडीकरणाचे कामही अत्यंत संत गतीने चालले. परंतु आता पर्यंत या रस्त्यावर डांबर पडले नाही. दुसरा पावसाळा सुरु झाला पण अजूनही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. आता पावसाचे पाणी या रस्त्यावर साचून राहते. पाऊस पडला की, या रस्त्याने मार्गक्रमण करणेच कठीण होऊन बसते. गिट्टीचे ढिगारे अद्यापही रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. खनिज विकास निधी अंतर्गत धडाक्यात या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. पण तडाक्यात हे काम पूर्ण करण्यात आले नाही. दिवाळी पासून निधी मिळालाच नसल्याने काम थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येते. आता हे रखडलेले काम केंव्हा पूर्ण होते, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

विठ्ठलवाडी वासियांचा संयम नेहमी कायम राहिला आहे, त्यामुळे येथील नागरिकांनी तक्रारी करण्याचे टाळले. पण आता कालावधी जास्तच होत असल्याची कुजबुज येथील नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. या रस्त्याचे दुरुस्तीकरणाचे काम मागील दिड वर्षांपासून सुरु आहे. आता तर डांबराच्या किमतीही वाढल्या असल्याने कंत्राटदार चिंतेत आले आहे. वेळेवर निधी न मिळाल्याने काम रखडल्या गेले. त्यावेळेस ज्या रेट मध्ये काम घेतले, तेंव्हा डांबराच्या किमती कमी होत्या. आता डांबराच्या किमती वाढल्याने कंत्राटदाराला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचेही बोलल्या जात आहे.

त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होण्याला आता किती कालावधी लागतो, कुणास ठाऊक. पण रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम अर्ध्यावर थांबल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.