सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

सह्याद्री न्यूज नेटवर्क |

मुंबई, (ता. २८) : सरपंच परिषद मुंबईच्या एका १४ सदस्यीय शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सोमवारी (दि २८ जून) भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून गावाचा विकास होण्यासाठी उपलब्ध निधी केवळ विकास व पायाभूत सुविधा यांवर खर्च करण्यात यावा, मुंबई येथे सरपंच भवनाची निर्मिती करण्यात यावी तसेच कोरोनामुळे निधन झालेल्या राज्यातील ३५ पेक्षा अधिक सरपंचांच्या कुटुबिंयाना आर्थिक मदत देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

यावेळी सरपंच परिषद मुंबईचे विश्वस्त अविनाश आव्हाड, राजाराम पोतनिस, आनंद जाधव तसेच अश्विनीताई थोरात यांसह सहा महिला सरपंच देखिल उपस्थित होते.

कुलरचा शॉक लागून सहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, दहेगाव येथील घटना

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता.२७) : वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव येथील एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा कुलरला करंट लागुन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज २७ जुन रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान घडली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहेत.

सौरभ रंजित भोसले (६) रा.पारधी बेडा दहेगांव ता.राळेगांव असे त्या चिमुकल्याचे नाव असून,घटनेच्या वेळी आई वडील व बहिण हे सर्व जण शेतात कामाला गेले होते. दरम्यान, तो घरी एकटाच असल्याने सकाळी नऊ वाजता दरम्यान जेवन आटोपल्यानंतर कुलरच्या बाजुला असलेल्या स्टिलच्या गुंडातून पाणी घेत असताना कुलरचा जोराचा करंट लागला. दरम्यान,या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळताच त्याला तातडीने उमरी येथील रुग्णालयात भर्ती केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असुन, दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील कोदुर्ली श्रीरामपूर येथे अशीच घटना घडली होती.त्या घटनेत दोन लहान चिमुकल्यांचा जीव गेला होता. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

राजश्री शाहू महाराज जयंती निमीत्त धारूर येथे रक्तदान शिबीर संपन्न

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
धारूर, (ता.२७) : येथे छञपती राजश्री शाहू महाराज जयंती निमीत्त धारूर येथील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आले असून या निमीत्त आयोजित रक्तदान शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळला. या  शिबीरात ११ रक्तदात्यानी स्वंयस्फूर्तीने रक्तदान केले.

धारूर येथे छञपती राजश्री शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे वतीने विवीध विवीध सामाजीक उपक्रम राबवून हि जयंती साजरी करण्यात आली. राजश्री शाहू महाराज जयंती निमित्ताने जागतिक रक्तदान दिनाचे औचीत्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन माजी नगराध्यक्ष अर्जूनराव गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी काँग्रेस आय चे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर चव्हान, पञकार अनिल महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर, नगरसेवक बालाजी चव्हान, सामाजिक कार्यकर्ते अमरजीत तिवारी, जयंती चे संस्थापक अध्यक्ष बंडोबा सांवत, उत्सव समिती अध्यक्ष शरद सांवत, विजय लोखंडे आदिंच्या  उपस्थितीत करण्यात आले. या रक्तदान शिबीराला  कोरोना संकटाचे सावट असतांना देखील उस्फूर्त प्रतिसाद मिळला. यावेळी ११ रक्तदात्यानी रक्तदान केले असून अंबाजोगाई येथील शासकीय रक्तपेढीला रक्तदान करण्यात आले.

यावेळी रक्तपेढीचे डॉ.प्रियंकी गवई, शशीकांत पारखे, जगदीश रामदासी, शेख बाबा, बालाजी पडगी यांनी शिबीराला विशेष सहकार्य केले. तर या शिबीराच्या  यशस्वीतेसाठी शरद सांवत, बलभीम मुंडे, मदन नाटकर अजित शिनगारे, विजय सांवत बबलू सांवत, तानाजी मोरे आदीनी परीश्रम घेतले.

सिंचन प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल जलसंपदामंत्री पाटील व पालकमंत्री चव्हाण यांचे आ. केराम यांनी मानले आभार


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
किनवट, (ता.२७) : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या किनवट, मारेगाव व धनोडा येथील उच्च पातळी बंधारा प्रकल्पास तत्वतः मंजूरी देवून मान्यता दिल्याबद्दल आमदार भीमराव केराम यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आ.भीमराव केराम यांनी आभार मानून नागझरी प्रकल्पाची उंची वाढविणे, रखडलेला उनकेश्वर येथील प्रकल्प पूर्ण करा वा व लघुसिंचन तलावाच्या कालव्यांची दुरुस्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली. 
          
नांदेड येथील नियोजन भवनात शनिवार (दि.26) रोजी झालेल्या बैठकीत किनवट-माहूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन देऊन नागझरी मध्यम प्रकल्प सांडणव्यायाची उंची वाढविणे,उनकेश्वर उच्च पातळी बंधारा प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यतेस विशेष बाब अंतर्गत मंजुरी मिळवून देणे,लघु प्रकल्पा कालवा दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देणे आदी महत्वपूर्ण मागण्या केल्या.

याबाबत सविस्तर असे की, किनवट तालुक्यातील नागझरी मध्यम प्रकल्पाचे काम सन १९८६ ला पुर्ण झाले असून या प्रकल्पाची साठवण क्षमता ६.०० द.ल.घ.मी. आहे. सदरिल प्रकल्पात किनवट शहरास पिण्याच्या पाणीसाठी १.०० द.ल.घ.मी. आरक्षित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामास पाणी मिळत नाही. सदरिल प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात पुर्ण संचयपातळी पेक्षा जास्त भुसंपादन केलेले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यायाची उंची ०.६० मी. ने वाढविल्यास अतिरिक्त भुसंपादन करण्याची गरज नाही. पाणीसाठा वाढुन शेतकऱ्यांना उन्हाळी हंगाम घेणे शक्य होईल. तेव्हा नागझरी प्रकल्पाच्या सांडव्याची उंची ०.६० मी. ने वाढवून देण्याची मागणी केली आहे. 

निवेदनातील दुसरी मागणी अशी की, उनकेश्वर येथे उच्च पातळी बंधाऱ्याचे कामास मंजुरी प्राप्त झाली असून, या प्रकल्पाचा पाणी वापर ९ .६९ द.ल.घमी. असून या प्रकल्पावर आतापर्यंत ५५.०० कोटी खर्च झालेला आहे. या प्रकल्पाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता मापदंडात बसत नसल्यामुळे प्रलंबीत आहे. परंतु या प्रकल्पावर ५५.०० कोटी खर्च झाल्यामुळे व पुर्ण झाल्यास सिंचनामुळे या तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा विकास होईल. त्यामुळे या प्रकल्पास विशेष बाब म्हणून सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ही बाब त्यांनी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली. 
          तिसरी मागणी ही की, किनवट-माहूर मतदार संघातील पुढील लघुसिंचन तलावाच्या कालव्याची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे :
१)पिंपळगाव लघुसिंचन तलाव-या तालावाचे कालव्या वरील बांधकामे ४० वर्षे जुनी असून पुर्णपणे पडलेली आहेत. दुरुस्तीशिवाय सिंचन करणे अशक्य झाले आहे. तरी त्वरीत निधी उपलब्ध करुन बांधकामे पुर्ववत करण्यास्तव आदेशित करावे.
२) पालाईगुडा बृहत ल.पा.तलाव - या तलावाच्या लाभक्षेत्रात भाग -१ (चाऱ्याचे काम) झाले नसल्यामुळे फक्त कालव्यालगतच्या शेतांना पाणी मिळत आहे व उर्वरित शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. तरी त्वरीत चाऱ्याचे काम करण्यास्तव आदेशित करण्यात यावे.
३) मांडवी बृहत ल.पा.तलाव - या प्रकल्पाचे कालवे खडकाळ भागातून जात असल्याने पाण्याचा पाझर घेऊन शेवटच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही . तरी कालव्यास आवश्यक असलेले अस्तरीकरण करण्याचे आदेशित करावे. या मागण्या पूर्ण करून माझ्या आदिवासी डोंगरी मतदार संघाला बारमाही हिरे राहण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.

आज दुपारी आलेल्या पाऊसाने तालुक्यात समाधान

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता.२७) : राळेगाव तालुक्यात आज दु.४ वाजता पासून पावसाला सुरुवात झाली. बळीराजाला चांगल्या दमदार पाऊसाची अपेक्षा होती. ती आज आलेल्या टपोऱ्या थेंबाच्या या पावसाने त्याला पूर्णत्व मिळाले. या आधी एकाच दिवशी सव्वीस मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली होती. नंतर पेरणीच्या कामाला गती आली. 

आज दुपारी अचानक आभाळ भरून आले व पावसाला सुरुवात झाली. कपाशी, तूर, सोयाबीन करीता या पावसाची गरज होती. सध्या जमिनीतील बियाणे अंकुरणे सुरु असून, त्यावर पावसाच्या सिडकाव्याची नितांत गरज होतीच. आज झालेल्या पावसाने आता शेती कामाला गती येणार असून, तालुक्यात आलेल्या पावसाने समाधान व्यक्त  होत आहे.