मारेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
            
मारेगाव : 14 एप्रिल 2025 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्य अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. 

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी सकाळपासून बौद्ध अनुयायी व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीयांनी मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलीत करीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, समता सैनिक दल व शहरातील तमाम मान्यवर, आंबेडकर अनुयायांनी वंदन करीत पोलीस निरीक्षक संजय सोळंखे यांचे हस्ते निळ्या ध्वजाचे धजारोहन करण्यात आले. यावेळी सामूहिक बुद्ध वंदनेने बाबासाहेबांना नमन करण्यात आले.

दुपारी विविध उपक्रम राबविण्यात आले. सायंकाळी ऐतिहासिक मिरवणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत शेकडो युवक, युवती, महिला व जेष्ठ नागरिकांनी फटाक्यांच्या रंगीबेरंगी आतिषबाजीचा धुराळा सह बँजो आणि डीजेच्या तालावर ठेका धरीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा जल्लोष साजरा करीत बाबासाहेबांना अभिवादन व बुद्धवंदनेने सांगता करण्यात आली.


शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांच्या स्वखर्चातून लाडक्या बहिणींना घडले 11 ठिकाणचे देवदर्शन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शिवसेना मारेगाव तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांनी ना.संजू भाऊ राठोड 'मंत्री' व्हावे यासाठी आपल्या परिवारासह अयोध्यामध्ये जाऊन साकडे घातले होते. त्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीत संजय राठोड हे विजयी झाले. या विजयानंतर महायुतीकडून त्यांना मंत्री पद मिळाले ते आता शासन दरबारी उत्तमरित्या आपला कार्यभार सांभाळत आहे. मात्र, याकरिता प्रभू श्री रामचंद्राची कृपा झाली, आपण बोललो होतो की, साहेब मंत्री झाले तर लाडक्या बहिणींना स्वखर्चाने देवदर्शनाला घेऊन जाणार आणि साहेब मंत्री झाले मागणी पूर्ण झाली म्हणून शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांनी स्वखर्चातून लाडक्या बहीनींना अयोध्या सह इतरही तिर्थयात्रा दि. 8 एप्रिल 2025 पासून सुरु केली होती. यात 72 महिला, 8 पुरुष आणि 4 लहान मुले होती. दरम्यान अकरा ठिकाणी देव दर्शन केले. एकूणच 3 हजार 500 किमी ची तीर्थयात्रेचा आनंददायी प्रवास पूर्ण करून आज गुरुवारी 3.15 ला सर्व महिला मंडळी मारेगावात पोहचल्या. यावेळी सर्व महिलांनी विशाल किन्हेकर यांचं औक्षण आणि शब्द सुमणांनी आभार मानण्यात आले. तर विशाल किन्हेकरांनी देखील भाऊंना साथ दिल्याबद्दल यावेळी सगळ्या लाडक्या बहीणींचे आभार मानले.

वणी जवळ सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप राज्याचे मोठे शहर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यात अगदी वणी शिरपूर रोडवर असलेल्या मंदर गाव शिवारात धंदर नावाने ओळखल्या जाणाऱ्या रीठाचा प्रा सुरेश चोपणे संशोधन करीत असून ते १८०० वर्षे दरम्यान महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप राज्यातील मोठे शहर असल्याचे पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. येथे सापडलेली नाणी आणि वस्तू ह्या त्याच काळातील आहेत असे प्रा चोपणे ह्यांचे म्हणणे आहे. परंतु पुरातत्व विभाग किंवा विध्यापिठाने सविस्तर संशोधन आणि उत्खनन केल्यास पुन्हा अनेक पुरावे बाहेर येतील. प्रा सुरेश चोपणे हे अधून मधून येथे पुरावे गोळा करीत होते, परंतु नुकतेच त्यांना येथील शेतकऱ्याकडून नाने आढळल्याने येथील इतिहासाचा काळ समजू शकला आहे...

येथे सातवाहन आणि पश्चिम क्षेत्रप राज्य इथे एका शेतकऱ्याकडे जपून ठेवलेल्या तांब्याच्या नान्यावरून तेथील राज्य आणि राजाचा काळ कळू शकला. ही नाणी इ सन ३ ऱ्या शतकातील पश्चिम क्षत्रप राजाची असून त्यांना ड्रेक्मा असे म्हटले जाते. इथे आढळलेले नाणे क्षत्रप भर्त्रदामन ह्या राजाचे आहे. भंडारा जिल्ह्यात पवनी येथे सुद्धा रुपीअम्मा नावाच्या शक क्षत्रप राज्याचे राज्य होते. ह्याच दरम्यान सातवाहन काळातील गावे सुद्धा चंद्रपूर आणि यवतमाळ परिसरात होती वानिजवळील कायर येथे केलेल्या उत्खननात सातवाहन काळातील पुरावे सापडली आहेत त्यामुळे इथेसुद्धा सातवाहन राज्य होते असे बहुतेक इतिहास अभ्यासकांचे मत आहे.
येथे आढळलेले पुरावे - धन्दर हे जवळ जवळ २ किमी परिसरात वसलेले गाव होते. मध्ये श्रीमंत लोकांची विटांची घरे तर सभोवताली मातीची लहान घरे होती. गावाला पाणी पुरवठा व्हावा म्हणून पूर्वेला आणि उत्तरेला दोन मोठे तलाव बाधले होते, ते आजही शाबूत आहेत. तलावाच्या बाजूला असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी दगडाचे चौरस उघडे पंचायत सभागृह, मृताना दफन केलेले स्थळ दिसतात. सर्वत्र मोठ मोठी फुटलेले रांजन, मटके, दिवे विखुरली दिसतात. काही विटा, काळ्या खडकाची पाटे-वरवंटे विखुरली दिसतात. अनेक काळ्या दगडांची गृह उपयोगी वस्तू, स्त्रियांच्या मुर्त्या गाय बैलांची हाडे सुद्धा मिळाली आहेत. येथील शेतकाऱ्याना आणि गावकऱ्याना क्वचित सोने चांदीची अलंकार, नाणी मिळाली असून बहुतेकांनी ती दडवून ठेवल्याने इतिहास पुढे येवू शकला नाही. येथील विटांचा आकार १० इंच लांब, ८ इंच रुंद आणि ३ इंच जाड आहेत, तसेच रांजण रुंदी २ फुट गोल जाडी १ इंच लांबी ५ फुट आकाराचे आणि लहान सुद्धा आहेत येथील स्त्री-पुरुष राजस्तानी पेहरावा सारखा लेहंगा, चोळी, मोठ्या बांगड्‌या आणि मातीचे मनी घालत असल्याचे मिळालेल्या मुर्त्यावरून आढळते. घरी गायी बैल पाळत असून आणि दूध, दही मोठ्या प्रमाणावर वापरत असत. येथी वस्ती खूप प्रगत नसली तरी त्या काळानुसार प्रगत आणि व्यवस्थित वसवविलेली होती.

वणीचा इतिहास - वणीचा इतिहास हा एक लाख वर्षाच्या पाषांनयुगापासून आहे. येथे मौर्य साम्राज्य हे इ.स २७२-२३१ पासून होते. सम्राट अशोकाच्या मृत्यू नंतर सातवाहन राजे सातकर्णी ह्यांचे येथे राज्य आले सातवाहन राज्यांच्या पराभव करून येथे सक-क्षत्रप राजे आले, त्यांचा राजा रुपीअम्मा होते. मंदर-धदर येथे त्यांचे नाणे सापडली आहेत. त्यानंतर इ. स. २७५-४०० दरम्यान वाकाटक साम्राज्यातील विन्ध्यशक्ती ह्या राजाचा काळ होता. पुढे चालुक्य आणि राष्ट्रकुट राजांचा काळ होता परंतु परिसरात फारसे पुरावे आढळत नाही. १० व्या शतकात वाकपती २ ह्यांचे राज्य होते तर १२ व्या शतकात विदर्भात देवगिरी च्या यादवांचे राज्य होते. आणि शेवटी ११,१२ व्या शतकानंतर गोंड राज्यांनी वनी परिसरात शिरपूर येथून एका गादीची सुरवात केली. अलीकडे १७ व्या शतकात रघुजी भोसले ह्यांचे राज्य होते, त्यांनी मंदर जवळ १७३४ मध्ये कान्होजी भोसले ह्यांना पकडून तुरुंगात डांबले.
आज ह्या परिसरात शेती असून ह्या रीठाचा मधील भाग १० फुट उंच आहे आणि त्यात त्यांची पडलेली घरे दबलेली आहेत. ह्या स्थळाचे उत्खनन झाल्यास अनेक वस्तू, नाणी, अलंकार आणि पुरावे आढळू शकतात. हे गाव जरी १८०० वर्षे जुने असले तरी नंतरच्या राज्यात सुद्धा टिकून राहिले असेल पुढे कुणा राज्यांच्या आक्रमनात हे गाव नष्ट केल्या गेले असून ते आज ओसाड रीठ राहिले आहे. बहुदा येथील काही लोकांनी स‌द्यांच्या मंदर येथे नवे गाव वसवविले असण्याची शक्यता आहे. आज येथून गेलेला राज्यमार्ग हा ह्या प्राचीन गावातून गेलेला आहे, त्यामुळे अनेक पुरावे सुद्धा नष्ट झाल्लेली आहेत. हे गाव प्राचीन जरी असले तरी तिथे मध्ययुगीन काळातील पुरावे सुधा सापडू शकतात. शासनाच्या पुरातत्व विभागाने किंवा नागपूर विध्यापिठाने इथे उत्खनन करण्याची गरज असल्याचे मत संशोधक प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केले आहे. ह्या संशोधनाचा रिपोर्ट ते पुरातत्व विभागाला आणि विध्यापिठाला पाठविणार आहेत.

मानव विकास मिशनचा निर्देशांक खालावला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : आदिवासी बहुल तालुका म्हणून मारेगाव तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे नागरिकांचा निर्देशांक वाढविण्यासाठी शासन सन 2010 पासून मानव विकास मिशन अंतर्गत मानवाच्या कल्याणासाठी विविध योजना राबवीत आहे.

मात्र, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे या अभियानाला राबवूनही त्याचे फलीत दिसून येत नाही. पूर्वीपेक्षा नागरिकांचे दरडोई उत्पन्न कमी झाले आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने सुविधा अभावी अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागत आहे. आरोग्यासोबत शिक्षणाचीही प्रश्न गंभीर आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आहेत पण शासनाकडे शिक्षण देण्यासाठी शिक्षक नाहीत. त्यामुळे अनेक शाळा विना शिक्षकाच्या असुन काही शाळा पट संख्येचे कारण पुढे करून बंद करण्यात आल्या आहेत.

यामुळे दोन्ही कारणाने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असताना दिसत आहेत. यासोबतच महिलांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर रित्या दिसत असुन गर्भवती महिलांची तपासणी वेळोवेळी होताना दिसून येत नाही. जोखमीच्या माताकडेही दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. मिशन अंतर्गत तपासणी केली जात नसून त्यांना मोफत औषधी पुरवठाही केला जात नाही. ग्रामीण रुग्णालयासह आरोग्य केंद्र व उपकेंद्र अंतर्गत रुग्णांना आरोग्य सेवा वेळेत पुरविण्यात येत नाही.

मारेगाव तालुक्यात आत्महत्यचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे. बेरोजगारी डोकं वर काढत आहे. यासोबतच कमिशन कमावण्याच्या नादात गावागावातील विकास कामाचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे मानव विकास मिशनाच्या कामाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय; नगराध्यक्षांना बहुमताने हटवणार...!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाची आजची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत गृह, महसूल, नगरविकास, विधी व न्याय, तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी संबंधित 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

एकनाथ शिंदे यांच्या खात्याचे 3 धडाकेबाज निर्णय

नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याची तरतूद मंजूर  
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.  
यानुसार, नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरीतील नगराध्यक्षांना बहुमताच्या आधारावर हटवता येणार आहे.  

‘अभय योजना’ लागू – मालमत्ता करावर दंड माफीची संधी

नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता करावर आकारलेला दंड अंशतः माफ करण्यात येणार आहे. कर वसुली सुरळीत करण्यासाठी ही अभय योजना लागू केली जाईल.  

मालमत्तेच्या हस्तांतरण नियमांमध्ये बदल
स्थावर मालमत्ता हस्तांतर प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी नियमात सुधारणा केली जाणार आहे.  
यामुळे नगरविकास विभागांतर्गत कामे वेगाने होणार आहेत.

• इतर 4 महत्त्वाचे निर्णय

विधी व न्याय विभाग
चिखलोली-अंबरनाथ (ठाणे) येथे दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन होणार. यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यात आली आहेत.

गृह विभाग
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार, कैद्याच्या कोठडीत मृत्यू झाल्यास कुटुंबाला भरपाई देण्याच्या धोरणास मंजूरी. यामुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळण्यास मदत होईल.

महसूल व वन विभाग
भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीवेळी योग्य मोबदला मिळावा यासाठी निर्णय. "भूमिसंपादनाचा योग्य मोबदला व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013" च्या कलम 30(3), 72 व 80 अंतर्गत व्याज दर सुधारण्यात आले. मोबदला वेळेवर मिळाला नाही, तर त्यावर अधिक व्याज मिळणार.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग
लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू होणार. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होईल.