वणी जवळ सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप राज्याचे मोठे शहर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यात अगदी वणी शिरपूर रोडवर असलेल्या मंदर गाव शिवारात धंदर नावाने ओळखल्या जाणाऱ्या रीठाचा प्रा सुरेश चोपणे संशोधन करीत असून ते १८०० वर्षे दरम्यान महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप राज्यातील मोठे शहर असल्याचे पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. येथे सापडलेली नाणी आणि वस्तू ह्या त्याच काळातील आहेत असे प्रा चोपणे ह्यांचे म्हणणे आहे. परंतु पुरातत्व विभाग किंवा विध्यापिठाने सविस्तर संशोधन आणि उत्खनन केल्यास पुन्हा अनेक पुरावे बाहेर येतील. प्रा सुरेश चोपणे हे अधून मधून येथे पुरावे गोळा करीत होते, परंतु नुकतेच त्यांना येथील शेतकऱ्याकडून नाने आढळल्याने येथील इतिहासाचा काळ समजू शकला आहे...

येथे सातवाहन आणि पश्चिम क्षेत्रप राज्य इथे एका शेतकऱ्याकडे जपून ठेवलेल्या तांब्याच्या नान्यावरून तेथील राज्य आणि राजाचा काळ कळू शकला. ही नाणी इ सन ३ ऱ्या शतकातील पश्चिम क्षत्रप राजाची असून त्यांना ड्रेक्मा असे म्हटले जाते. इथे आढळलेले नाणे क्षत्रप भर्त्रदामन ह्या राजाचे आहे. भंडारा जिल्ह्यात पवनी येथे सुद्धा रुपीअम्मा नावाच्या शक क्षत्रप राज्याचे राज्य होते. ह्याच दरम्यान सातवाहन काळातील गावे सुद्धा चंद्रपूर आणि यवतमाळ परिसरात होती वानिजवळील कायर येथे केलेल्या उत्खननात सातवाहन काळातील पुरावे सापडली आहेत त्यामुळे इथेसुद्धा सातवाहन राज्य होते असे बहुतेक इतिहास अभ्यासकांचे मत आहे.
येथे आढळलेले पुरावे - धन्दर हे जवळ जवळ २ किमी परिसरात वसलेले गाव होते. मध्ये श्रीमंत लोकांची विटांची घरे तर सभोवताली मातीची लहान घरे होती. गावाला पाणी पुरवठा व्हावा म्हणून पूर्वेला आणि उत्तरेला दोन मोठे तलाव बाधले होते, ते आजही शाबूत आहेत. तलावाच्या बाजूला असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी दगडाचे चौरस उघडे पंचायत सभागृह, मृताना दफन केलेले स्थळ दिसतात. सर्वत्र मोठ मोठी फुटलेले रांजन, मटके, दिवे विखुरली दिसतात. काही विटा, काळ्या खडकाची पाटे-वरवंटे विखुरली दिसतात. अनेक काळ्या दगडांची गृह उपयोगी वस्तू, स्त्रियांच्या मुर्त्या गाय बैलांची हाडे सुद्धा मिळाली आहेत. येथील शेतकाऱ्याना आणि गावकऱ्याना क्वचित सोने चांदीची अलंकार, नाणी मिळाली असून बहुतेकांनी ती दडवून ठेवल्याने इतिहास पुढे येवू शकला नाही. येथील विटांचा आकार १० इंच लांब, ८ इंच रुंद आणि ३ इंच जाड आहेत, तसेच रांजण रुंदी २ फुट गोल जाडी १ इंच लांबी ५ फुट आकाराचे आणि लहान सुद्धा आहेत येथील स्त्री-पुरुष राजस्तानी पेहरावा सारखा लेहंगा, चोळी, मोठ्या बांगड्‌या आणि मातीचे मनी घालत असल्याचे मिळालेल्या मुर्त्यावरून आढळते. घरी गायी बैल पाळत असून आणि दूध, दही मोठ्या प्रमाणावर वापरत असत. येथी वस्ती खूप प्रगत नसली तरी त्या काळानुसार प्रगत आणि व्यवस्थित वसवविलेली होती.

वणीचा इतिहास - वणीचा इतिहास हा एक लाख वर्षाच्या पाषांनयुगापासून आहे. येथे मौर्य साम्राज्य हे इ.स २७२-२३१ पासून होते. सम्राट अशोकाच्या मृत्यू नंतर सातवाहन राजे सातकर्णी ह्यांचे येथे राज्य आले सातवाहन राज्यांच्या पराभव करून येथे सक-क्षत्रप राजे आले, त्यांचा राजा रुपीअम्मा होते. मंदर-धदर येथे त्यांचे नाणे सापडली आहेत. त्यानंतर इ. स. २७५-४०० दरम्यान वाकाटक साम्राज्यातील विन्ध्यशक्ती ह्या राजाचा काळ होता. पुढे चालुक्य आणि राष्ट्रकुट राजांचा काळ होता परंतु परिसरात फारसे पुरावे आढळत नाही. १० व्या शतकात वाकपती २ ह्यांचे राज्य होते तर १२ व्या शतकात विदर्भात देवगिरी च्या यादवांचे राज्य होते. आणि शेवटी ११,१२ व्या शतकानंतर गोंड राज्यांनी वनी परिसरात शिरपूर येथून एका गादीची सुरवात केली. अलीकडे १७ व्या शतकात रघुजी भोसले ह्यांचे राज्य होते, त्यांनी मंदर जवळ १७३४ मध्ये कान्होजी भोसले ह्यांना पकडून तुरुंगात डांबले.
आज ह्या परिसरात शेती असून ह्या रीठाचा मधील भाग १० फुट उंच आहे आणि त्यात त्यांची पडलेली घरे दबलेली आहेत. ह्या स्थळाचे उत्खनन झाल्यास अनेक वस्तू, नाणी, अलंकार आणि पुरावे आढळू शकतात. हे गाव जरी १८०० वर्षे जुने असले तरी नंतरच्या राज्यात सुद्धा टिकून राहिले असेल पुढे कुणा राज्यांच्या आक्रमनात हे गाव नष्ट केल्या गेले असून ते आज ओसाड रीठ राहिले आहे. बहुदा येथील काही लोकांनी स‌द्यांच्या मंदर येथे नवे गाव वसवविले असण्याची शक्यता आहे. आज येथून गेलेला राज्यमार्ग हा ह्या प्राचीन गावातून गेलेला आहे, त्यामुळे अनेक पुरावे सुद्धा नष्ट झाल्लेली आहेत. हे गाव प्राचीन जरी असले तरी तिथे मध्ययुगीन काळातील पुरावे सुधा सापडू शकतात. शासनाच्या पुरातत्व विभागाने किंवा नागपूर विध्यापिठाने इथे उत्खनन करण्याची गरज असल्याचे मत संशोधक प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केले आहे. ह्या संशोधनाचा रिपोर्ट ते पुरातत्व विभागाला आणि विध्यापिठाला पाठविणार आहेत.