दसऱ्याला होणारा रावण दहन बंद करा - गोंडवाना गणतंत्र पार्टीचे निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मुल निवासी लोकांचे आराध्य दैवत महात्मा राजा रावण यांच्या पुतळ्याचे दहन प्रथा, दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी महोत्सव समजून केली जाते. ती प्रथाच बंद करा व असे करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल अशा आशयाचे निवेदन गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार जनार्धन खंडेराव यांना देण्यात आले.

महाराष्ट्रामध्ये जवळपास १.२० कोटी मुलनिवासी जनता असून राजा रावण हे मुलनिवासी लोकांचे आराध्य दैवत आहे. म्हणून भारतीय संविधान न्याय स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या मौलिक तत्वाचा अंगिकार प्रत्येक भारतीय करतो.
विश्वास,श्रध्दा व उपासनेचे स्वातंत्र्य मिळाले आहे. आदिवासी हा निसर्गपूजक आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये राजा रावणास अनन्य साधारण महत्व आहे.

भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून येथे प्रत्येक धर्माप्रती समानतेची वागणूक असतांना सुध्दा या देशातील करोडे गोंडी धर्मीय समूहातील लोकांच्या आदर्शाचे प्रतिक असलेले महात्मा राजा रावण यांची जाहीर विटंबना केली जाते. संविधानातील कलम २५ असे म्हणतो की, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत असे नमूद असतांना देशातील निवडक काही समुदायाकडून वाईट प्रथा दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात महोत्सव समजून साजरी केली जाते. हे आता थांबवावं आणि कोणत्याही धर्माच्या महात्म्याचा अनादर न करता आदरपूर्वक स्वीकार करावा अशी गोंगपा ची मागणी आहे.

महात्मा राजा रावणाचे खासगी जीवन फक्त ऐकण्यासारखेच नाही तर ते समजण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. जगाच्या इतिहासात एवढे भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व दुसऱ्या कुणाचे असेल असे वाटत नाही. अत्यंत धार्मिक वृत्तीचा त्याचा पाया होता. तो महान शिवभक्त होता. त्याला तपोबलाची पूर्ण जाण होती. निसर्ग नियमांच्या ते एकदम विरोधी होते.

यापूर्वी रावण दहन विरोधात नागपुर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. म्हणूनच रावण यांच्या प्रतीकात्मक दहण करणाऱ्यावर भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३, १५३ (अ), २९५, २९५ (अ), २९८ तसेच मुंबई पोलीस अधिनियम नुसार १३१, १३५ प्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल होते.

निवेदन देताना तुळशीराम मडावी ता. अध्यक्ष,
ज्ञानेश्वर येडमे, भाविक कोयचाडे, रुपेश दडांजे, मोरेश्वर गेडाम, मुन्ना सिडाम, अमर खैरे, राजेन्द्र उईके, नामदेव तोड़ासे, विजेंद्र मडावी, प्रा. शैलेश आत्राम, किशोर सुरपाम, श्री. एस. एम. सोयाम, मयूर मसराम, पुंडलिक गेडाम, व्हि. के. मेश्राम, पि राम सिडाम, विशाल परचाके, आदींची उपस्थिती होती.

जड अंतःकरणाने 'त्या' व्यवस्थापकावर करण्यात आला अंत्यसंस्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मौजा करणवाडी येथील लक्ष्मण रामचंद्र सिदूरकर हे पांढरकवडा येथील केशव नागरी पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सायंकाळी त्यांनी गावातील 60 फूट पाणी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली होती. आणि घटनेने वणी उपविभागात एकच खळबळ उडाली.

दरम्यान,मृतकाने सुसाईड नोट लिहून ठेवल्याने या घटनेला वेगळंच वळण आले आणि पत्नी व नातेवाईकांनी चक्क आरोपीना पकडल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यसंस्कार करण्यासाठी नकार देत सकाळपासून ग्रामीण रुग्णालयात वातावरण तापले होते. तत्पूर्वी गुरुवार ला गावातील विहिरीतून मृतदेह काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले, यावेळी घस्थनास्थळी अफाट जणसमुदाय त्यांना बघण्यासाठी जमा झाला होता.

या दुःखद घटनेतील मृतकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केला. शुक्रवारी दुपारी 1 वाजता शवविच्छेदन होऊन तसाच ठेवला होता, काही जवळच्या मंडळींनी घटनेसंदर्भात ठाणेदार यांना पाचारण करून विविधांगी चर्चा करत वातावरण निवळले. परंतु तीन दिवसाचा पोलिसांना अल्टीमेटम दिल्या नंतरच शुक्रवारी दुपारी 3.12 वाजेपर्यंत मृतदेह ताब्यात घेऊन लक्ष्मण च्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेत, गावाकडे करणवाडी कडे रवाना होत जड अंतःकरणाने लक्ष्मण यांचे पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.

मात्र, हे प्रकरण काही काळ शांत झाल्याचे चित्र जरी असले, तरी पत्नीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पतसंस्थेचे शाखा अध्यक्ष, सचिव, कार्यकारी अधिकारी तिघेही रा.वणी या तिघांनी संगनमत करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल त्यांच्या वर करण्यात आले. त्यामुळे पांढरकवडा पतसंस्थेत व्यवस्थापक असलेले लक्ष्मण सिदूरकर यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या सुसाईड नोट मध्ये नमूद संशायित आरोपीना पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे तगडे आव्हान आहे.

वेगाव येथे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कौशल्य युक्त महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत महाराष्ट्रात ५११ स्व.प्रमोदजी महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन दिनांक १९ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते आभासी पध्दतीने करण्यात आले.त्यात यवतमाळ जिल्ह्यातील विस केंद्रापैकी मारेगाव तालुक्यात वेगाव येथे सदर केंद्राचे उद्घाटन झाले.
      
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी वेगावच्या सरपंच सौ.उषाताई देरकर ह्या होत्या.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना सामाजिक कार्यकर्ते माधव कोहळे म्हणाले की,ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातुन मोफत विविध कौशल्य प्राप्त करुन विविध कंपन्यामध्ये कुशल कामगार म्हणून रोजगार प्राप्त करावा अथवा प्रधानमंञी रोजगार योजनेतुन सदतीस टक्के सुटीवर पंचवीस लाखापर्यंत कर्ज प्राप्त करुन व्यावसायिक व चांगले उद्योजक बनावे.

यावेळी मंचावर भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे,जेष्ठ नेते शशिकांत आंबटकर, मालाताई गौरकार, नरेश वाघमारे, मधुकर टोंगे, भाऊराव थेटे, मारेगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक जे.एन.गड्डमवार, वऱ्हाटे मॅडम, उइके मॅडम इत्यादी हजर होते.

कार्यक्रमाचे सुञसंचालन तथा प्रास्तविक कु.भाग्यश्री मेश्राम यांनी तर आभार कु.संहीता गाणार यांनी मानले.कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन ट्रुली युवर्स वेलफेयर सोसायटी यवतमाळ चे श्री.संदीप दुबे यांनी केले.

काल वणी बस स्थानक येथे आढळून आलेल्या महिलेची ओळख पटली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : गुरुवार दिनांक 19 ऑक्टोंबर रोजी दुपारी वणी बस स्थानकावर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. सदर महिलेला वाहतूक शाखेचे कर्मचारी प्रदिप भनारकर यांनी वणी ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मात्र मृतक महिला अनोळखी असल्याने पोलिसांना ओळख पटविण्यासाठी मोठे आव्हान होते, या घटनेची वार्ता पोर्टलच्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली. ती बातमी भोंगळे ले-आऊट मधिल ईश्र्वर गणपत वडस्कर (मूळ गाव मच्छिन्द्रा) या शिक्षकांनी वाचली व ते ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी त्या महिलेला ओळखले व त्यांनी तिच्या नातेवाईकांना माहिती दिली.

मृतक महिलेचे नाव रिता निलेश आसुटकर रा.हिवरा (मजरा) तालुका मारेगाव येथील असून हल्ली ती माहेरी पठारपूर येथे आईकडे वास्तव्यास होती. गुरुवारी ती आईला सांगुन वणी येथे आली होती. रात्री तीचे नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.

वणी-शिरपूर-शिंदोला रस्त्यावर आरटीओची धडक कारवाई

सह्याद्री चौफेर | राजू राजू डावे 

वणी: तालुक्यातील शिरपूर, शिंदोला रोडवर अवैधरित्या धावणारी ओव्हरलोड वाहने, हेल्मेट नसलेले चालक आणि फिटनेस, विमा, पीयूसी व इतर कागदपत्रे चुकविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. 

तालुक्यात नियमांना डावलून वाहतूक करणे, विना परवाना बाईक चालवीने यासारख्याचे प्रमाण वाढत आहे. बेधुंद धूम ठोकणाऱ्या व अवैधरीत्या ओव्हरलोड धावणारे वाहतूक यांच्या वर कारवाई चा बडगा उगारला जात आहे. दरम्यान, 50 चालकांवर श्वास विश्लेषक (अल्कोहोल टेस्ट) करण्यात आले. या कारवाईत 26 दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून 2 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एअर व्हेलॉसिटी टीमचे अधिकारी गणेश पवार, राहुल चौधरी, परेश गवसणे, अक्षय सोळंकी, सतीश टोळे, नितीश पाटोकर आणि चालक वांद्रे, तायडे यांनी ही कारवाई केली.