वणी बस स्थानकावर राजस्थानी महिला मंडळातर्फे 'पाणपोई' सुरु

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी :  रणरणत्या उन्हात वाटसरूंची तहान भागावी, यासाठी वणी बस स्थानकावर शहरातील राजस्थानी महिला मंडळातर्फे पाणपोईची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

नुकताच मार्च महिना लागताच नागरिकांना उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने बस स्थानकावर प्रवाशांची गर्दीही वाढली आहे. अशातच प्रवाशांची तहान भागवण्यासाठी बसस्थानकात 'पाणपोई' सुरु करण्यात आली. आज 4 मार्च रोजी वणी आगार प्रबंधक विवेक बनसोड, बस स्थानक प्रभारी लता मुळेवार, राजस्थानी महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा हेमलता झाबक, वर्तमान अध्यक्षा समता चोरडिया यांच्या हस्ते फीत कापून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी राजस्थानी महिला मंडळाच्या सदस्या तरुणा जैन, चंचल मुथा, सरोज भंडारी, स्नेहलता चुंबळे, पायल आबड़, ज्योति बोथरा, उषा कोठारी, कीर्ती सोनी, वि‌द्या मुथा, हेमा पोद्दार, आरती मुणोत, मधु कोचेटा उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन खुशाली गुप्ता यांनी केले तर प्रेक्षा कटारिया हिने मानले.

रेती अभावी रखडले घरकुलाचे काम; लाभार्थी सापडले संकटात!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : घरकुल धारकांना मोफत रेती मिळवून देणारा शासन आदेश सध्या तरी हवेत विरला असून रेती अभावी घरकुल बांधकाम रखडले असल्याने लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

एकीकडे केंद्र शासनाच्या वतीने गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकूल योजना राबवली जात आहे. पंतप्रधान घरकूल आवास योजनेअंतर्गत २०२४ ते २०२५ या वर्षामध्ये गरजू लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आले. मंजूर घरकुलांसाठी शासनाकडून प्रत्येक लाभार्थ्यांना ५ ब्रास रेतीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना अद्यापही रेती मिळाली नसल्याने घरकुलांचे काम अर्धवट पडले आहे.घरकुलाचे बांधकाम आपल्याला पूर्ण करणे आहे. त्यामुळे लाभार्थी आपले राहायचे कसेबसे मोडकळीस आलेले घर पाडून आपल्या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहेत. रेतीअभावी त्यांचे घरकुलाचे काम रखडलेले आहे.

घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी
गरजवंतांना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पंतप्रधान घरकूल आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे कामे मंजूर करण्यात आले आहेत. परंतु शासनाकडून मिळत असलेली ५ ब्रास रेती लाभार्थ्यांना मिळत नसल्यामुळे घरकुलाचे कामे रखडले आहे. त्यामुळे गवंडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून केली जात आहे

चोरीच्या रेतीला अधिकचे पैसे मोजावे लागतात
प्रशासनाने घरकूल लाभार्थ्यांची गंभीर बाब लक्षात घेऊन तत्काळ रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सध्या रेतीचा तुटवडा असल्याने चोरीच्या रेतीला अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. एकूणच रेती खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नागरिकांची मोठी लूट होत असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे.

मराठी भाषा दिवसेंदिवस समृद्ध होत आहे - स्तंभलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांचे प्रतिपादन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : खरं पाहता वारकरी संतांनी मराठीला समृद्ध केलं. संत नामदेव महाराजांनी सर्वांना कविता सहज लिहिता यावी म्हणून अभंग हा छंद दिला. महानुभव पंथातदेखील सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी मराठीचा आग्रह धरला. या सर्वांमुळेच मराठी भाषा दिवसेंदिवस समृद्ध होत आहे,असे प्रतिपादन स्तंभलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. श्री रामकृष्ण विवेकानंद मंडळात मराठी भाषा गौरवदिन साजरा झाला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका विजया देवाळकर होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक भगवान ठमके यांनी केले. यावेळी विचारपिठावर अनंत बेसेकर, भरत मालेकर, देवेंद्र राजगडकर, रवींद्र गुल्हाने हे शिक्षक उपस्थित होते.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, केवळ मराठीच नव्हे तर कोणत्याच भाषेत शुद्ध किंवा अशुद्ध हा प्रकार नसतो. ती एकतर प्रमाण असते किंवा बोली असते. माकडाचा माणूस झाल्यानंतर कितीतरी काळाने तो बोलायला लागला. मग त्याच्या लाखो वर्षानंतर लिपी आली. म्हणून आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे. कालांतराने लिहिणेही सहज होईल. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात विवेकानंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विजया देवाळकर यांनी आपली भूमिका मांडली. या भाषेला समृद्ध करण्यात कुसुमाग्रजांसह सर्वच मराठी लिहिणाऱ्यांचे खूप मोठे योगदान आहे. मराठीला समृद्ध करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. 

याप्रसंगी किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या प्रतिनिधींनी 'शेतकरी विरोधी कायदे' हे पुस्तक वाचनालयाला भेट दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, लिपिक अमर पेटकर आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेत. संचालन आणि प्रास्ताविक ग्रंथपाल सुरेंद्र विधाते यांनी केले. आभार शिक्षक देवेंद्र राजगडकर यांनी मानलेत.

बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौध्दांकडे सोपविण्यात यावे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : १९४९ चा बुद्धगया मंदीर कायदा रद्द करून बुद्धगया येथील महाबोधी महाविहार गैरबौद्धपासून मुक्त करावे, या विहाराचे व्यवस्थापन बौध्दांकडे सोपविण्यात यावे, अशा आशयचे निवेदन  उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत आज भारताचे राष्ट्रपती यांना देण्यात आले. 

जगातील सर्व बौद्ध धर्मियांचे महाबोधी महाविहार धार्मिक आदरनिय स्थळ असल्याने त्याचे व्यवस्थापन मात्र, अनेक वर्षांपासून बुध्दगया येथील महाबोधी महाविहार गैरबौद्धांच्या ताब्यात आहे. ते महाबोधी महाविहार फक्त आणि फक्त बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी जगभऱ्यातून होत असताना वणी येथील समस्त बौद्ध समाज बांधवानीही ती मागणी केली असून तेथील सुरु असलेल्या आंदोलनास समर्थनही दिले आहे.

बुध्दगया येथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्याने सम्राट अशोक यांनी निर्माण केलेले महाविहार बौध्दांच्या आस्थेचा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे हे महाविहार गैरबौद्धापासून मुक्त झालेच पाहिजे, अशा भावना निवेदन कर्त्यांकडून व्यक्त करण्यात आल्या.

निवेदनावर प्रशांत गाडगे, शिवाजी दुपारे, शिवकुमार कुशवाह, चंद्रकांत उपरे, राहुल कोलते, मंगेश वालकोंडावार, करण मेश्राम, इंद्रपाल वाघ, सुरज वानखेडे, नरेंद्र वाळके, दत्तप्रभू मत्ते, संगम खोब्रागडे, भाऊराव मजगावळी, सौ कांचन सिडाम, अतुल मेडपल्लीवार, मंगल मडावी, नरेंद्र गेडाम, शाकीर शेख, आतिष तुमराम, हरीश पाते, मारोती भोगेकर, चंदू मेश्राम, करण मेश्राम, आदींची स्वाक्षऱ्या आहेत. प्रशांत गाडगे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन दिले.

अरुण बिलोरिया यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : रविनगर येथील यशस्वी उद्योजक राजाभाऊ बिलोरीया यांचे लहान बंधू अरूण बिलोरीया यांचे सोमवारी नागपूरात उपचारादरम्यान रात्री साडे अकरा वाजता त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते 58 वर्षाचे होते.

मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी अचानक रात्री प्रकृती खालावली व त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच शहरात शोककळा पसरली आहे.

अरुण यांचे पाठीमागे पत्नी,एक मुलगा, एक मुलगी, व मोठा असा बराच आप्त परिवार आहे.
आज 4 मार्च रोजी दुपारी 2 वाजता त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.