श्री. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेला उज्ज्वल भविष्य – डॉ. भालचंद्र चोपणे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी , राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय व छत्रपती शाहू महाराज आय टी आय यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्षिक स्नेहसंमेलन संस्कार २०२५ चे उद्घाटन डॉ. श्री. भालचंद्र चोपणे माजी कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेत श्री. किशोर गज्जलवार गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी यांच्या हस्ते दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी पार पडले. 

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा. ओमप्रकाश चचडा, संचालक मंडळाचे सदस्य तसेच इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कॉलेज मारेगाव चे प्राचार्य मा. डॉ निलेश चचडा, संचालक मंडळाचे सदस्य मा. विक्रांत चचडा, राजश्री शाहू महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय पारखी, छत्रपती शाहू महाराज आय टी आय चे प्राचार्य आकाश कांबळे व वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य प्रफुल महारतळे यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शाळांचा वार्षिक अहवाल सादर करीत असतानाच संस्कार हे केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता हे विचारांचे अंतर्मुख करणारे संमेलन असल्याचे प्रतिपादन डॉ. निलेश चचडा यांनी केले. कार्यक्रमाच्या उद्घाटकीय भाषणाद्वारे मा. किशोर गज्जलवार यांनी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनात वार्षिक स्नेसंमेलनाचे अनन्यसाधरण महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र चोपणे यांनी श्री. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचा आजपर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख करीत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखीत गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रदान करण्याकरिता सतत प्रयत्नरत असल्याने या संस्थेला उज्वल भविष्य असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

संस्कार २०२५ अंतर्गत वक्तृत्व ,गीत गायन, नृत्य,रांगोळी, फुलसजावट,फॅशन शो,पोस्टर मेकिंग ,वेशभूषा विविध रंगारंग कार्यक्रम व विविधक्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेद्वारा दिला जाणारे पुरस्कार स्वर्गीय हंसराज जी चचडा आर्यभट पुरस्कार कु. आर्या मत्ते, कु. हर्षदा आवारी व स्वरा मुळेवार यांना तसेच स्वर्गीय कल्पना चावला पुरस्कार कु. रूषाली खारकर व हर्षदा आवारी यांना व स्वर्गीय श्री नंदकिशोर जी चचडा स्मुर्ती पुरस्कार चेतन बोढाले व वैभव आवारी आणि एच एस सी मेरीट अवॉर्ड कु. काजल कोचर या विद्यार्थ्यांना मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन सौ. प्रनोती खडसे व तेजस्विनी झाडे यांनी संयुक्तरित्या केले व आभार प्रदर्शन प्रफुल महारतळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना परिश्रम घेतले.

पत्रकार दिन सार्वजनिक रित्या साजरा का होत नाही?

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : वर्षभर लोकांनाच प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करण्यासाठी धडपडणाऱ्या, न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करणाऱ्यां,पत्रकारांना खरच समाजात काही स्थान आहे का?एका दिवसासाठी तरी त्याच्या विषयी कोणताच पुढारी, पक्ष कार्यकर्ते, सामान्य माणुस तरी कृतज्ञता व्यक्त करतो का?तर या प्रश्नाचे उत्तर साधारणपणे नाहीच असेच आहे. मात्र अपवाद वगळता काही बांधवानी मला सकाळ पासुनच शुभेच्छा दिल्या त्या बद्दल त्यांना मी धन्यवाद देतो,आभार पण मानतो की समाजात अजुनही सुज्ञ आणि जागरुक नागरिक आहेत ज्याच्यामुळे आमच्या लेखणीला बळ मीळते आहे. पण अपवाद वगळता मात्र सर्वसाधारणपणे जो अनुभव आला त्याबद्दल काही तरी लिहीले पाहीजे म्हणुन हा लेखप्रपंच आहे.जेव्हा केव्हा एखाद्या प्रकरणाला वाचा फोडायची आहे,चळवळीचा संदेश समाजा पर्यंत पोहचवायचा आहे अशावेळी माध्यमाची आठवण झाल्या शिवाय पुढाऱ्याला राहात नाही.पिडीताच्या समस्या लावुन धरायच्या आहेत अशा वेळी पुढाऱ्या पेक्षा केवळ पत्रकार जास्त जवळचा वाटतो, समस्याग्रस्त अडचणीत सापडला असेल तो आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असेल मध्यस्ती करायची असेल अशा वेळी आठवण होते ते केवळ पत्रकाराचीच, निवडणुका आल्या द्या प्रसिद्धी, निवडुन आला द्या प्रसिद्धी, काही पगार नाही, मानधन नाही, पण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून खंबीरपणे लिखाण करतो आहे. सरकारे आली गेली पण लाडका पत्रकार म्हणुन त्याच्या सणाला काहीच घोषणा नाही. एखादा पत्रकार निर्भिडपणे भ्रष्टप्रवृत्तीवर लिखाण करेल त्याच्या वाट्याला हल्ले, धमकी,खोटे गुन्हे नोंद केलेले आढळेल असे असले तरी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवुन न डगमगता पत्रकार आपले कर्तव्य निस्वार्थ मनाने सातत्याने बजावत आला आहे.भाषणात फक्त पत्रकार समाजाचा आरसा आहे. एवढी चांगुलपणा व्यक्त करणे आणि सर्व पत्रकाराची सहानुभुती मीळविणे याशिवाय काहीच कानी पडत नाही. वर्षभरातला एक दिवस सुध्दा त्याच्या कार्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायला कोणाच जवळ वेळच नसेल का ? कदाचीत या दिवसाचे महत्व घटकाना माहीती नसेल आणि म्हणुनच आमचा पत्रकार बांधव वर्षभरातला एकदिवस एकमेकांना शुभेच्छा देतो आणि आपलीच पाठ आपणच थोपटुन घेत पत्रकार दिवस साजरा मानतो. पारंपारीक पध्दतीने सुरु असलेल्या या सणा बद्दल माझ्यासह अनेक पत्रकार बांधवाच्या मनातील ही खंत मी व्यक्त केली आहे. बर खुप कमी संख्येने असलेले ही जात त्याचा सण साजरा करण्यासाठी खुप गाजावाज करण्याची गरज नाही. गाजावाजा करण्याचे माध्यम निशुल्क आहे .कोणी पुढाकार घेतलाच तर खर्च पण नाही मात्र कोणीही पुढाकार घेत नाही आणि त्याच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करत नाही,याबाबतचे कारण काय असु शकते हा संशोधनाचा विषय आहे. त्याच्या परिवाराला तर सोडाच केवळ त्याला सुध्दा ईतर घटका कडुन सार्वजनिक रित्या शुभेच्छा देण्यासाठी पुढाकार घेताना दिसुन येत नाही. एवढा स्वार्थी समाज आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतो तरीही निस्वार्थ सेवा देण्यासाठी आम्ही अजुनही तत्पर आहोत.नविन वर्षात घडणाऱ्या घटना बद्दल आम्ही तत्पर आहोत सर्व सामान्य, पिडीत, शोषित, प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, पुढारी, अशा सर्व घटकांनी आमच्या कडुन वर्षभर मोफत प्रसिद्धी करुन प्रसिद्धी मिळवुन घ्यावी, यासाठी माझ्या सह माझ्या विचाराच्या पत्रकार बांधवा कडुन पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुख समृद्धी भरभराटी मीळो एवढी अपेक्षा...
     
      पत्रकार 
 माणिक कांबळे
 9623483682
    

यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटच्या वतीने ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : ३ फेब्रुवारी रोजी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट च्या वतीने,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळसोनी येथे ज्ञानजोती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  शाळेच्या मुख्याध्यापिका परसावर मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पळसोनी ग्रामपंचायत च्या सरपंच नलिनीताई दुधबळे, उपसरपंच पुखराजभाऊ खैरे व यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट च्या सदस्य काजलताई वाळके, प्रेम अडकिने, श्वेताताई माहुरे, अंकिताताई पथाडे उपस्थित होते. 

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शिक्षणाचे महत्त्व काय आहे,हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले व काजलताई वाळके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भर टाकत त्यांचे आपल्यावर असलेले उपकार हे अमोलनिय आहे,असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून मांडले व प्रेम अडकिने सर यांनी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटचे ध्येय काय आहे व महापरिनिर्वाणदिनी मिळालेल्या शालेय उपयोगी वस्तूचे वाटप कशा पद्धतीने होईल यावर विश्लेषण करून आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी आयोजित "एक पेन एक वही" या उपक्रमात आलेल्या शालेयपयोगी साहित्याचे वाटप शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे मार्गदर्शक श्री.हेमंत टिपले सर व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग तसेच यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट चे सर्व सन्माननीय पदाधिकारी रज्जत सातपुते, आकाश बोरकर, सुरज खैरे, गौरव जवादे, आदित्य वाळके, अश्विनीताई अडकिने, ऋचाताई दारुंडे, राहुल घोस्की, इस्माईल खान उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे संचालन श्री.गजानन मडई सर यांनी केले व आभार माननीय आकाश खोब्रागडे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वर्गशिक्षकांनी आपला फीडबॅक दिला व मुख्याध्यापिका परसवार मॅडम यांनी उपक्रमाचे कौतुक करून लेटर पॅड वर वितरित झालेल्या शालेय उपयोगी वस्तूचे लेखी स्वरुपात शुभेच्छा पत्र दिले.

से.नि.शिक्षक हरिप्रसाद पांडे अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : येथील आदर्श हायस्कूल येथून निवृत्त झालेले हरिप्रसाद पांडे गुरुजी यांचे वणी येथे पुत्र विवेक पांडे यांचे निवासस्थानी सकाळी ९.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षाचे होते.

स्वर्गवासी पांडे गुरुजी यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असून ते विध्यार्थी प्रिय शिक्षक होते. त्यांचा हिंदी विषय शिकविण्यात हातखंडा होता. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीत सक्रिय रहात त्यांनी नाट्यअभिनय व पत्रकारिताही जोपासली. महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी दै. लोकसत्ता साठी त्यांने बरेच वर्ष काम केले.

दुपारी २ वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मारेगाव येथील लर्नर्स अकॅडमी स्कूल मध्ये ठेवण्यात आले, अनेक चाहत्यांनी अंतिम दर्शन केल्यानंतर सायंकाळी ५. ४५ वाजता मुखागनी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले.
       
स्व. पांडे गुरुजी यांचे पशच्यात पश्चात पत्नी गीतादेवी, पुत्र शैलेश पांडे, विवेक पांडे, जावई, मुलगी कल्पना माळोदे (पांडे) एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, सतिष पांडे, नातवंड असा आप्त परिवार आहे.

लाभ योग्यतेनुसार देण्यात यावा, परीक्षार्थी यांची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : पंचायत समिती वणी अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत नांदेपेरा येथील शिपाई पदभरती घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये परिक्षा सभागृहात संबंधीत अधिका-याने घोळ निर्माण करून परिक्षेच्या नियमाची पायमल्ली करण्यात आली, संबंधित अधिका-यावर कार्यवाही करून झालेली शिपाई पदभरती निष्पक्षपणे चौकशी करून योग्यतेनुसार परिक्षेत बसलेल्या परिक्षार्थीच्या योग्यतेनुसार निवड करा, अशा आशयचे निवेदन गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले. 

वणी तालुक्यातील नांदेपेरा ग्रामपंचायत येथील शिपाई पदाच्या भरतीकरीता पंचायत समिती वणी तर्फे एकुण १० विद्यार्थ्यांची परिक्षा दिनांक ३०/१२/२०२४ रोजी घेण्यात आली. सदर लेखी परिक्षा संपल्यानंतर पंचायत समिती वणी यांच्या द्वारे अर्ध्या तासानंतर निकाल तोंडी स्वरूपात घोषीत करण्यात आली व या निकालामध्ये रविंद्र देविदास ढवस यांना उत्तीर्ण करण्यात आले.मात्र,जो परिक्षार्थी यांचा मागील खुप दिवसापासुन शिक्षणाचा गंध नाही त्याला सभागृहातील परिक्षकाने सहकार्य करून त्याला उत्तीर्ण करण्यात आले, असा आरोप निवेदन कर्त्यांनी केला आहे. या बाबत त्यांनी दिनांक ३१/१२/२०२४ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या बाबत पत्र लिहुन सविस्तर माहिती दिली आहे. असं निवेदनात नमूद असून याबाबत तत्काळ समिती नेमून पुनःश्च परीक्षा घेऊन,होतकरु व गरजू व्यक्तींना त्यांचा लाभ त्यांच्या योग्यतेनुसार देण्यात यावा,अशी मागणी परीक्षार्थी यांनी केली आहे. तसेच झालेला घोळ याची चौकशी करून संबंधित अधिका-यावर कार्यवाही करण्यात यावी अशी देखील मागणी निवेदनकर्त्यांनी निवेदनातून केली असून या प्रकरणाची चार दिवसात दखल घ्यावी,अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. 

निवेदनावर सचिन चिकटे,तुषार खामणकर,पवन कोडापे, अजय किन्हेकर, राहुल वांढरे, धीरज खामणकर,प्रवीण खैरे, साहिल ठमके,प्रफुल यावले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.