चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावात बदल...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) राणी दुर्गावती यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. 

राणी दुर्गावतीच्या 500 व्या जन्मशताब्दी वर्षात हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. ना. श्री. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात काही दिवसांपूर्वी कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्रालयाला यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला होता, हे विशेष.

आदिवासींच्या समृद्ध इतिहासात आपल्या अफाट शौर्यासाठी ओळखली जाणारी राणी दुर्गावती हिचे नाव महिलांसाठी समर्पित एका संस्थेला देणे, ही अत्यंत आनंदाची बाब मानली जात आहे. त्यासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांचे आदिवासी समाजाकडून आभार मानण्यात येत आहेत. ना. श्री. मुनगंटीवार यांनी 18 सप्टेंबर 2024 ला संबंधित विभागाला पत्र दिले होते.

चंद्रपूर येथील महिलांसाठी असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राणी दुर्गावती यांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांनी पाठवला होता. त्यानुसार सोमवार, दि. 30 सप्टेंबरला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करून निर्णय जाहीर करण्यात आला. तसे कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्रालयाकडून ना. श्री. मुनगंटीवार यांना कळविण्यात आले आहे.

विरांगणा राणी दुर्गावतीने आपल्या राजवटीत उत्तम प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून लौकीक प्राप्त केला. सशक्तपणे आदिवासी साम्राज्य सांभाळत शत्रूपासून सुरक्षित ठेवले. त्यामुळे महिलांसाठी समर्पित संस्थेला तिचे नाव देणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. 

विरांगणा राणी दुर्गावती यांचा 500 वी जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) राणी दुर्गावती हिचे नाव देणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्यामुळे हे शक्य होऊ शकले, याबद्दल आदिवासी बांधवांनी त्यांचे विशेषत्वाने आभार मानले आहेत.

दिनविशेष : गोंडवानाची राणी दुर्गावती !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राणी दुर्गावती यांची आज ५ ऑक्टोबर रोजी ५०० वी जयंती आहे. राणीच्या सत्तेखालील दिवस म्हणजे गोंडवाना राज्याचा सुवर्णकाळ होता, असे म्हटले जाते.

दलपत याच्याशी दुर्गावतीचे लग्न झाले. त्यांना मुलगा झाला त्याचे नाव वीर नारायण होते. दुर्दैवाने वीर नारायण चार वर्षांचा असतानाच दलपतचा मृत्यू झाला, पण राणी दुर्गावती डगमगली नाही, छोट्या वीर नारायणचा राज्याभिषेक केला आणि त्याच्या नावाने ती स्वतः राज्यकारभार करू लागली.
चितोड, मेवाड, गोंडवाना अशी काही राज्ये सोडली तर आजूबाजूला सगळी मुघल राज्ये होती. आता हे राजे आपले राज्य बळकावण्याचा प्रयत्न करतील याची तिला कल्पना होती, म्हणून तिने सर्वप्रथम सैन्याची फेररचना केली. २० हजार घोडेस्वार १ हजार हत्ती व मोठ्या प्रमाणावर पायदळ होते. त्यामध्ये महिला सेनेचाही अंतर्भाव होता. याशिवाय ५२ गड तिच्या ताब्यात होते. माळवा प्रदेशातील बहादूर शहा आणि मीआणा अफगाण यांचा पराभव केल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. ती उत्तम प्रशासक होती. राज्यात सर्व स्थरांतील लोकांमध्ये तिचा वावर असे. प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेत असे. जेव्हा तिने शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या, तेव्हा राज्यामध्ये अनेक ठिकाणी विहिरी आणि तलाव याचे बांधकाम केले. त्यामुळे राज्यामध्ये पाण्याची कमतरता कधीच जाणवली नाही. अजूनही जबलपूरमध्ये राणी तालाब, आधार तालाब, चौरी तालाब आपल्याला पाहायला मिळतात. असे म्हणतात तिचे राज्य इतके समृद्ध होते की प्रजा सुवर्ण मुद्रांमध्ये किंवा हत्तीच्या रूपात कर देत असे.

राणी दुर्गावती जणू काही सर्वगुणसंपन्न होती, रुपवती होती तितकीच बुद्धिमान होती. तिच्या राज्यात कला व साहित्य क्षेत्रासाठी चांगले दिवस होते. तिच्या दरबारात मेगा सिंह उईका, छन्ना सिंह मडावी, पद्मनाभ भट्टाचार्य असे विद्वान होते, ज्यांनी दुर्गा मां, यायल, गोंडवाना वारी, दुर्गावती विलास समयालोक, वीरचंपू अशा साहित्य रचना केल्या. महेश ठाकूर, रघुनंदन दामोदर ओझा, भाव सिंह, राजनेगी असे अनेक कवी तिच्या दरबारात होते. लहानपणी अनेक वेळा ती राजकुमाराच्या वेशात शिकारीला जात असे. तसेच स्वतः राज्य करताना पुरुष वेशात फिरत असे, लढाईच्या वेळीसुद्धा पुरुष वेश परिधान करत असे.
अशा रूपवान, कर्तबगार दुर्गावती राणीचे सर्वत्र कौतुक होत होते. तिची कीर्ती अकबर बादशाहपर्यंत पोहोचली. एक स्त्री असून अशी कारकीर्द करणाऱ्या विरांगनेला अकबराने प्रस्ताव पाठविला की, राणीने आपला प्रिय सफेद हत्ती व आपला विश्वासू अधिकारी वजीर आधार सिंह यांना भेट म्हणून पाठवावे. राणीने अर्थातच हा प्रस्ताव धुडकावून लावला. आणि १५६४ मध्ये युद्धाला सुरुवात झाली. अकबराने आपल्या आसिफ खान नावाच्या सरदाराला राणी विरोधात युद्ध करण्यासाठी पाठविले. पहिले युद्ध युद्ध सिरमौर पासून उत्तरेला काराबाग येथे झाले, दुसरे युद्ध सीरमौर येथे झाले व तिसरे युद्ध गड मांडला मध्ये झाले. या तिन्ही युद्धात आसफखान पराजित झाला. चौथे युद्ध नर्रई मध्ये झाले. हे क्षेत्र दुर्गम डोंगरांचे होते, डोंगरांमध्ये मोठा नाला होता, एके रात्री या नाल्याचा बांध आसफखानच्या सेनेने तोडला. त्यामुळे दुथडी भरून वाहाणारा नाला राणीच्या सेनेला पार करता येईना. आसफखान जवळ मोठे सैन्य होते तर राणीकडे मात्र जेमतेम पाचशे सैनिक होते. हिंमत न हरता राणी त्वेषाने लढू लागली. ते पाहून सैनिकांचे पण मनोबल वाढले व त्यांनी निकराचे युद्ध सुरू केले. पण यावेळी राणीला बाण लागून ती जखमी झाली. तेव्हा तिने आपल्या विश्वासू सैनिकाला आपला वध कर म्हणून सांगितले. पण त्या सैनिकाला हिंमत होईना, त्याचे हात थरथरू लागले. तेव्हा शत्रूच्या हातून मरण येऊ नये म्हणून राणीने स्वतःच्या कट्यारीने स्वतःच स्वतःला मारले, राणी दुर्गावती शहिद झाली. साधारण पंधरा वर्षे तिने राज्य कारभार चालविला. जबलपूर जवळ नरंई गावाजवळ तिची समाधी आहे. वयाच्या ४० व्या वर्षी तिला मृत्यू आला.

उपसरपंच सचिन रासेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

भाऊसाहेब....
तुम्ही निराधार, गोरगरीब सामान्य जनतेचा आधारवाड बनून काम करण्यासाठी मोहदा ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी विराजमान झाला, तेव्हापासून तुम्ही उत्तम कार्य व धुरा सांभाळत जनसेवा करत आहात, हे कार्य करत असताना चढउतार येतीलच... त्या आव्हानाला स्विकारून प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचे आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जावो. तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा. तुमच्या आनंदाची फुले सदैव बहरलेली असावीत. आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.
भाऊसाहेब आपणास निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक :
सचिन रासेकर मित्र परिवार, मोहदा ता. वणी जि. यवतमाळ 

मारेगाव तालुक्यातील विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजनाचा धुमधडाका


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : राज्यात विधानसभा निवडणूकीचे वेध लागले असून वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामांचा झंजावात धूमधडाका लावला आहे.
त्यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील जळका, म्हैसदोडका, करणवाडी, टाकळी कुंभा व सिंधी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा दिनकर पावडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष शंकर लालसरे, भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, भाजपा तालुका उपाध्यक्ष मारोती तुराणकर, सरचिटणीस गणेश झाडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर थेरे, गणेश खडसे, नाना पाटील डाखरे, दिनेश गेडाम व भाजपा कार्यकर्ते, सरपंच व उपसरपंच आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ग्रामीण भागात कधीही एवढी विकासात्मक कामे पाहायला मिळाली नव्हती. परंतु या दहा वर्षांमध्ये मारेगाव तालुक्यातील अनेक गावात विकासात्मक काम होताना दिसत आहे. जर नेतृत्वामध्ये इच्छाशक्ती असेल आणि सेवाभाव असेल तर अशक्य असे काहीच नाही हे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब यांच्या निमित्ताने दिसून आलेले आहे. आ.बोदकुरवार यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या मतदार संघांसाठी निधी खेचून आणला आहे.या कामाचे श्रेय घेण्याच्या ऐवजी आणखी दुसऱ्या विकास कामासाठी आमदार साहेब यांचे प्रयत्न सुरु आहे, त्यांच्या नेतृत्वात तालुक्याचा कायापालट होणार आहे.

-अविनाश लांबट 
भाजपा तालुका अध्यक्ष, मारेगाव 





गौराळा येथील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : स्वातंत्र्य मिळालं, मात्र, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच मिळाला नसल्यामुळे तालुक्यातील गौराळा ग्रामस्थांनी आगामी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आज (ता. 3) गुरुवार रोजी घेतला. यासंदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

तालुक्यातील अनेक गावात स्मशानभूमीच नाही. तर स्मशानभूमी असुन त्याकडे जाण्यासाठी रस्ता नाही. हिच परिस्थिती गौराळा येथे असून स्मशानभूमी आहे, मात्र रस्ता नसल्याने अंत्यविधी करायचा कसा असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला जात आहे. यापूर्वी शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलन केले गेले. मात्र, तरीही समस्या काही सुटली नाही. आमदार खासदार व जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन पाठवून सुद्धा प्रश्न मार्गी लागला नाही. अखेर तोंडावर असलेल्या वणी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असुन, गावातील नागरिकांनी या संदर्भात एक निवेदन तहसीलदार उत्तम निलावाड यांना सादर केलं आहे. 

यावेळी सोमेश्वर गेडेकर, सुरेश काळे, अरविंद तुराणकर, गणेश येरगुडे, योगेश भोयर, अंकुश मडावी, प्रफुल काकडे, यासह असंख्य गावातील महीला पुरुष हजर होते.