केंद्र व राज्य सरकार दलित आदिवासींच्या प्रश्नाकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष करीत आहे - जगदीश कुमार इंगळे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नागपूर : दलित आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारे संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र व राज्य सरकार दलित आदिवासींच्या मूलभूत प्रश्नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्यामुळे विदर्भासहित राज्यातील हजारो दलित आदिवासी जमिनींच्या हक्कापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालासमोर आंदोलनात्मक भूमिका घेऊन संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. सुखदेव कांबळे यांनी पाठपुरावा केला परंतु नितीन गडकरी हे नागपूरला नसल्यामुळे येत्या 29 सप्टेंबर रोजी पुन्हा आंदोलनात्मक भूमिका घेऊन लक्ष वेधणार असल्याची माहिती डॉ. सुखदेव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रपरिषदेमध्ये भाई इंगळेनी सांगितले की, आपण 75 विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. परंतु आजही दलित आदिवासी जिथे घर बांधून राहतात ते घर त्यांच्या नावावरच नाही, जी जमीन कास्त कारीत आहेत ती जमीन सुद्धा त्यांच्या नावावर नाही यापेक्षा दुर्दैव कोणतही नाही.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय क्रांतिवीर शहीद बापूराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शेडमाके, बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे डॉ. सुखदेव कांबळे, भंडारा जिल्ह्यातून महिला अध्यक्षा सौ. इंदुताई गोपाले, काशीराम ठाकरे, श्रीमती वैशाली शिरसाम सोबत गडचिरोली जिल्ह्यातून दलित आदिवासी महिला व अनेक पुरुषांची उपस्थिती होती. यावेळी वनजमीनधारकांनी केंद्र व राज्य सरकार प्रती मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करतांना दलित आदिवासी समाजाच्या प्रश्नाकडे सरकार जर लक्ष देत नसेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यांना किंमत मोजावी लागणार असल्याची बिगर सातबारा शेतकऱ्यांनी सांगितले. ही संपूर्ण माहिती पत्रपरिषदेत भाई जगदीश कुमार इंगळे यांनी पत्रकारांना दिली.

केळापूर येथे पोषण अभियान कार्यक्रमाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केळापूर : आज केळापूर येथे पांढरकवडा बीटच्या अंगणवाडी सेविकांनी पोषण अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सुमन सोयाम मॅडम आणि पर्यवेक्षिका पेंदोर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 

कार्यक्रमात उपस्थित मातांना पोषण आहार, बालकांच्या वाढ व विकासाबाबत सखोल माहिती देण्यात आली. यावेळी लेखा परीक्षण चार्टद्वारे पोषण आहाराचे महत्व स्पष्ट करण्यात आले. तसेच बाल संगोपनाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात अनेक मातांनी सहभाग घेतला आणि त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली. 

हा कार्यक्रम बालकांच्या पोषणासंदर्भातील जनजागृतीसाठी उपयुक्त ठरला आहे.

नरसाळा येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथील एका तरुण शेतकऱ्याने बुधवार दि.२५/०९/२०२४ ला सकाळी शेतात जातो असे सांगून शेतात गेला. व तिथे कपाशीवर फवारणी साठी ठेवलेले तणनाशक औषधं प्रशान करून आपले जीवन संपवले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

शैलेंद्र सोनबाजी उईके (अंदाजे वय ४०) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने शेतातच तणनाशक प्राशन केले, सदर माहिती मिळताच जवळील नातलगांनी त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, येथे प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात भरती करून उपचार सुरु होते. मात्र, गुरुवार दि. २६/०९/२०२४ रोजी अंदाजे दुपारी ४:१६ ला त्याची प्राणज्योत मालवली. 

शैलेंद्र याने आत्महत्या का केली हे अजूनही अस्पष्ट असून या मृतक शेतकऱ्यांवर अनेक कर्ज असल्याचे गावात चर्चा आहे. त्याच्या पाठीमागे पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे.


क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयासमोर अखिल भारतीय खदान मजदूर संघाचे धरणे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कोळसा खदानी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना दुर्घटना झाल्यास एक करोड १५ लाख आणि ठेका कामगारांना ४० लाख रुपये दुर्घटना इन्शुरन्स देण्यात यावा, सीएमपीएफ घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, घोटाळ्यातील आरोपी दोषीवर कारवाई करण्यात यावी, सी एम पी एफ मध्ये ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशा अनेक विविध मागण्यांना घेऊन (ता. 26) रोजी भारतीय कोयला खदान मजदूर संघ च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

वणी नार्थ भालर वसाहत कार्यालयासमोर भारतीय कोयला खदान मजदूर संघाचे वणी माजरी क्षेत्राचे महामंत्री जगन्नाथ जेनेकर यांच्या नेतृत्वात कामगारांची सुरक्षा सी एम पी एफ समस्या संदर्भात एकूण १७ मागण्या घेऊन अखिल भारतीय खदान मजदूर संघाच्या वतीने भारतीय कोळसा खदान मजदूर संघ, वणी-माजरी द्वारे गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालया समोर धरणे देण्यात आले.

या वेळी मंगेश अजमिरे सह कोषाध्यक्ष अ.भा.ख.म. संघ, कमलाकर पोटे सदस्य अभाखम संघ, शंकर एडलावार कार्याध्यक्ष, गणेश चौधरी अध्यक्ष वणी नाथ क्षेत्र, क्षेत्रीय कल्याण समिती सदस्य गुलाब चौधरी, दिलीप जुनघरी, क्षेत्रीय सुरक्षा समिती सदस्य शरद डवरे, या सह मोठ्या प्रमाणात वेकोली कामगार, कंत्राटदार उपस्थित होते.

मारेगाव येथील नव्या बस स्थानकाचे भूमिपूजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथे सुमारे 2 कोटी 49.68 लक्ष खर्चुन नव्याने बांधण्यात येणाऱ्या मारेगाव बस स्थानकाचे भूमिपूजन विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते आज करण्यात आले. 

मारेगावात राज्य परिवहन महामंडळाचे नवीन बस स्थानक व्हावे यासाठी स्थानिकांनी वर्षानुवर्षे मोठा लढा दिला होता. अनेकदा आंदोलन, मोर्चे, उपोषण अशा विविधांगी लढ्याच्या माध्यमातून मागणी होत होती. त्यामुळे तालुक्यातील जनतेची, विद्यार्थ्यांची व बाहेरगावी प्रवाश्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे विशेष प्रयत्नाने खनिज निधी अंतर्गत (2 कोटी 49.68 लक्ष) खर्चून बांधण्यात येणाऱ्या आज गुरुवार (ता. 26) ला मारेगाव शहरात सुसज्ज नवीन बस स्थानक बांधकामाचा भूमिपूजन समारंभ मोठ्या थाटात पार पडला.या प्रसंगी आंदोलन, उपोषण कर्त्यांच्या हाताने नारळ फोडून भूमिपूजन केले. 

यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते साठे काका, कॉम्रेड बंडू गोलर, भाजपचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे, नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की, नगरसेवक हर्षांली महाकुलकर, नगरसेवक अंजुम शेख, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, पवन ढवस, प्रसाद ढवस, पत्रकार श्रीकांत तांबेकर, नगरसेवक राहुल राठोड, रमण डोहे, गणेश झाडे, सुनील देऊळकर, प्रसाद झाडे, नगरसेवक वैभव पवार, प्रवीण बोथले, योगीराज बलकी, दादाराव ठोबरे, लता रामटेके, काॅ.विलास ढुमने, अक्षय रामटेके, धनराज अडबाले, दत्तु कोहळे, इरफान भाई, शारदा गेडाम, प्रवीन आडे, अजय मेश्राम, संदिप टेकाम, चंद्रभान ढेगळे, दशरथ येनगंटिवार, प्रमोद पहुरकार, पांडुरंग ठावरी, वासुदेव गोहने, यांच्यासह अधिकारी व भाजप पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.