सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ; तर आता ग्रामपंचायत अधिकारी पद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आज (ता. 23) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. तर उपसरपंचांना 2 हजार, 3 हजार आणि 4 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. सध्या सरपंचांना 3 हजार, 4 हजार आणि 5 हजार रुपये इतके मानधन मिळते. तर उपसरपंचांना 1 हजार, दिड हजार आणि 2 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळते. राज्यात 27 हजार 943 ग्रामपंचायती आहेत.

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ‘ग्रामपंचायत अधिकारी’ पद

राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ‘ग्रामपंचायत अधिकारी’ करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ग्रामसेवक (एस-8) व ग्रामविकास अधिकारी (एस 12) ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना 25500 – 81,100 या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येईल. तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी (एस 14) वीस वर्षांच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहायक गटविकास अधिकारी (एस 15) व तीस वर्षांनंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गटविकास अधिकारी (एस 20) असा मिळेल.

सौ. रश्मी उद्धव ठाकरे व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी उद्धव ठाकरे व शिवसेना प्रणित युवासेना चे सचिव वरुन सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त वणी ग्रामीण रुग्णालयात युवासेना विस्तारक यवतमाळ जिल्हा धिरज खोडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या वतीने रुग्णांना फळ वितरण करुन रश्मीवहिनी ठाकरे व वरून सरदेसाई यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 
युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे हे काही ना काहीदरवर्षी सामाजिक उपक्रम राबवित असतात. नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या उपजिल्हा प्रमुखांनी आपल्या युवा सैनिकांना घेऊन सौ रश्मी उद्धव ठाकरे व वरून सरदेसाई यांचा एकत्रित वाढदिवस साजरा केला. यानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. व आरोग्याची विचारपूस केली 

यावेळी धनराज येसेकर, सुधीर ठेंगणे, संतोष राजुरकर, तेजस नागपुरे, सागर गोलाईत, बादल येसेकर, जर्मन शेख, करण नागपुरे, धनराज मडावी, रतन धोबे, अमोल आरेलवार, आर्यन राऊत, सप्नील बल्की इत्यादी युवा सैनिक उपस्थित होते.

पि एम किसान खात्याची लिंक ओपन करताच खात्यातील रक्कम उडविली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील राहुल मेडिकल स्टोअर्स'चे संचालक अतुल देविदास बोबडे यांनी पि एम किसान खात्याची लिंक ओपन करताच त्यांच्या वेगवेगळ्या दोन बँकेच्या खात्यातील रकमा उडवून त्यांना वीस हजार रुपयाचा गंडा दिला आहे. 
          
मार्डी येथील व्यावसायिक अतुल बोबडे यांनी पि एम किसान खात्याची लिंक ओपन करताच मोबाईल हॅक करून 19 सप्टेंबरला मोबाईल बंद केला. 20 सप्टेंबर रोजी मारेगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेतून 5000 रुपये तर, एचडीएफसी बँकेच्या खात्यातून 1100 रुपये परस्पर लांबविण्यात आले. दुसऱ्या दिवशी 21 सप्टेंबरला पुन्हा वेगवेगळ्या ट्रांजेक्शन मधून 12263 रुपये हडप करण्यात आले. यानंतर हॅकरद्वारा व्हाट्स ऍप, फोन पे, गुगल पे बंद करून वेगवेगळ्या कंपनीचे ओटीपी मॅसेज येऊ लागल्याने बोबडे यांनी त्वरित डेबिट कार्ड ब्लॉक केले. याबाबत मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.      
मात्र,सायबर क्राईम च्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने मोबाईलधारकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

विधानसभेच्या रिंगणात हरीश पाते उतरणार!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा युवा कार्यकर्ता तथा भावी आमदार हरीश पाते वणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य कुटुंबातील हरीश पाते मागील काही वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. 
गोरगरिबाच्या कामासाठी धावून जातात तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी, बेरोजगारांसाठी काम करत असतात. जात पात न पाहता रात्री बे रात्री उठून ते धावून जातात. तसेच जिथे अन्याय होत असेल तर, ते धावून जातात. आतापर्यंत त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नावर हात घालून सर्वच कामे प्रशासन दरबारी रेटून धरली. सामाजिक कार्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची, बेरोजगारांची त्यांनी काम करून दिलेले आहेत. सर्व समाजातील घटकावर वरती काम करत असतात. असा नवा चेहरा वणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत आहेत. 
आंबेडकरी चळवळीचा युवा कार्यकर्ता हरीश पाते....काही ग्रामीण भावात संवाद साधत असताना पिण्याच्या पाण्याच्या, पांदन रस्ता, शेतजमिनीचा मोबदला ह्या समस्या जाणून आल्या. हा प्रश्न सोडण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असे, यावेळी प्रथम 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना ते म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी विधानसभा लढवावी, अशी वणी विधानसभा मतदार संघातील युवकांची इच्छा आहे. आज सर्व संघटना तयार असून सगळ्या कार्यकर्त्यांची देखील एकमेकांशी चर्चा करून इच्छा जाहिर केली आहे.

त्यामुळे "नवा चेहरा, बदल हवा" अशी एक संकल्पना घेत हरीश पाते हे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा लढवण्यास ईच्छुक आहेत.

आदिवासीच्या आरक्षणात धनगर जातीचा समावेश करू नये-

सह्याद्री चौफेर । कुमार अमोल 

जिवती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातुन भारतीय राज्यघटना लिहून त्यात भारतीय समाजातील जातीय असमानता दुर करून समताधिष्टीत बलशाली भारत निर्माण करण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली. भारतीय संविधानात एस. टी. आरक्षण लागू केले आहे. मात्र अजूनही या समाजाचे मागासलेपण संपलेले नसल्याने एस.टी. समुहाला घटनेनुसार प्राप्त आरक्षणाला धक्का लावून केंद्र किंवा राज्य सरकारने धनगरासह अन्य कोणत्याही जातीला या प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. मा. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच धनगर जातीला, आदिवासी/अनुसूचीत जमातीचे यादित समाविष्ठ करता येत नाही, असे स्पष्ट केलेले आहे. तरीपण धनगर जातीचा समुह, आदिवासींच्या यादित धनगर जातीला समाविष्ठ करण्यासाठी राजकिय दबाव आणत आहे. 

यापूर्वी TISS संस्थेकडून अभ्यासगट तयार करून धनगर व आदिवासी यांचा तुलनात्मक अभ्यास करून अहवाल तयार केलेला आहे. सदर अहवाल आजही प्रकाशित न करता नव्याने धनगर जातीचा समावेश आदिवासीचे प्रवर्गात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. घटनात्मक कायद्याने सरकारने धनगर समाजाला आरक्षण निश्चितपणे द्यावे मात्र अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) यादीत समावेश करण्यात येऊ नये. धनगर समाजाच्या नेत्यांनी पंढरपूर येथे आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी बेमुदत उपोषण केले असताना त्यावर मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करून 'धनगर व धनगड' हे एकच असल्याचे म्हटले आहे. 

यावर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात आदिवासी संघटनांनी विरोध दर्शविला व गजानन जुमनाके यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना आदिवासीच्या आरक्षणात धनगर जातीचा समावेश करू नये अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी प्रा. लक्ष्मण मंगाम, माजी सभापती भीमराव मेश्राम, सोनेराब पेंदोर, मारोती कुमरे, शित्रू गेडाम, गोचू पेंदोर, सुखलाल कोटनाके, आनंदराव कोटनाके, मारोती सिडाम आदींची उपस्थिती होती. उच्च न्यायालय मुंबई, तसेच सर्वोच्च न्यायालयात धनगड (जमात) व धनगर (जात) हे या भिन्न जमाती व जाती असून धनगर या जातीला आदिवासींमध्ये समाविष्ट करता येणार नाही, असा स्पष्ट निकाल दिला. तरीही निवडणुकांवर डोळा ठेवून, मते मिळवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. असे झाल्यास आदिवासी समाजावर अन्याय होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.